लेकीसूना घेऊन नाचासाठी या : नागपुरी तडका
खाली करा शेतशिवार, इथून चालते व्हा
कुठं जाऊ पुसू नका, ढोड्यामंधी जा ...॥
शूद्र तुम्ही शेतकरी, ध्यानी धरा पक्के
सरकाराचे बाप आम्ही, चार पानी एक्के
वाद फालतू घालू नका, उगाच काहीबाही
कोर्टामधी जाण्याची, तुम्हांस मुभा नाही
कायदा कडक वाटतो? तर तेल माखून घ्या ...॥
घटनेमधले परिशिष्ट, नऊ वाचून पहा
शेतकऱ्यांनो तुम्ही तुमच्या, औकातीत राहा
मर्जीनुसार हिसकून घेऊ, तुमचा जमीनजुमला
कायद्यानंच बांधू तिथं, फाइव्ह स्टार बंगला
तुमच्या लेकीसूना घेऊन, नाचासाठी या ...॥
इलंक्शनच्या टायमाले, थैल्या ढिल्या करतो
नाक लाजिम करण्यासाठी, चिमटीमध्ये धरतो
तवा कुठं भूमीग्रहण, कायदा येत असते
पैशाबिगर कोणालेच, 'अभय' मिळत नसते
उचला आता धोपटी-बिर्हाड, अन चालते व्हा ...॥
- गंगाधर मुटे 'अभय'
------------------------------------------------------
प्रतिक्रिया
26 Apr 2015 - 9:04 pm | जेपी
काय फालतुपणा आहे..
अंत्यत हि&हि
26 Apr 2015 - 11:55 pm | चलत मुसाफिर
मुटे साहेब, तुमचं लेखन प्रत्येक वेळी पटतंच असं नाही. पण भावना पोचतात आणि त्या अस्सल असतात असे वाटते.
27 Apr 2015 - 12:09 am | आयुर्हित
पोसून राजबिंडे; आलू समान नेते
उत्पादकास नेते, खड्ड्यात कास्तकारी
सत्ता सुकाळ शेती, बारामती-अमेठी
ती तांबड्या दिव्याची, अज्ञात कास्तकारी
हे बोलणेच आता, हा नाइलाज उरला
की सोड ’अभय’ एका झटक्यात कास्तकारी
- गंगाधर मुटे
आपणच अमेठीची शेती मध्ये नकारात्मक बोलून ही वेळ आणली आहे....
आपल्यासारख्यांनी "एका झटक्यात कास्तकारी सोडणे" सोपे होईल आता!
27 Apr 2015 - 12:35 am | काळा पहाड
शेतकर्यांनीच ही स्थिती स्वतः वर ओढवून घेतली आहे. आत्तापर्यंत साखरकारखानदारांच्या पक्षांना, दूधसम्राट आणि शिक्षणसम्राटांच्या पक्षांना, ह्या राजाला आणि त्या टग्याला मतं देत आले. टग्यानं जलसिंचनाची किती कामं केली या बद्दल जी जाणीव असायला हवी ती फसवलेल्या गेलेल्या शेतकर्यांनासुद्धा किती आहे हा प्रश्नच आहे. शिकायबद्दल आणि मेहनत करण्याबद्दल एकूणच दु:स्वास. शिकणार्यांची टिंगल करणे. आपल्याकडं किती जमीन आहे आणि आपल्याला शिक्षणाची आणि एकूणच कशाचीच गरज कशी नाही याची रसभरीत वर्णनं मी ऐकली आहेत. बरेच जण स्थानिक राजकारण्याच्या मागं लागून तेवढंच करणे, फटफटीवर बसून त्याचा प्रचार करणे वगैरे गोष्टीत मन लावून काम करतात. रिकामा मिळालेला वेळ गावात गप्पा ठोकण्यात घालवणे, दारू ढोसणे हे आहेच. उगीच काळी माती आमची आई आहे वगैरे १८ व्या शतकातली चमकदार वाक्यं टाकायची आणि बिल्डर आला की त्याला जमीन विकायला सगळ्यात पुढं. यांना फक्त पैशाशी मतलब आहे आणि सरकारला कोंडीत पकडून आपल्या जमीनीबद्दल ४ पट ऐवजी १० पट पैसे बिल्डर कढून काढून घेण्याची इच्छा आहे.