Skip to main content

मेट्रो ट्रेनचा अनुभव

लेखक साधा मुलगा यांनी गुरुवार, 12/06/2014 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक दिवस प्रतीक्षेत असलेली मुंबई ची मेट्रो रेल्वे रविवार दिनांक ८ जून २०१४ ला सुरु झाली. त्याचे श्रेय कोणाला याचा वाद सुरु राहील परंतु माझासारख्या असंख्य मुंबईकरांना हि अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक घटना आहे. ज्यांना सेन्ट्रल ते वेस्टर्न प्रवास करायचा आहे, जास्तकरून जे रोज ठाणे, डोंबिवली , कल्याण आणि खाली ते अंधेरी, बोरीवली असा प्रवास करतात त्यांच्यासाठी नक्कीच वेळेची बचत करणारी आहे. मेट्रो रेल्वे चालू झाल्याच्या दोन तीन दिवस मी जो प्रवासाचा अनुभव घेतला आहे तो आपल्यासमोर मांडत आहे. सध्या मला इंटर्नशिप साठी चांदिवलीला जावे लागते. घाटकोपर स्टेशनला भयानक गर्दी होईल आणि आपल्याला उशीर होईल यामुळे पहिल्या दिवशी( म्हणजे उद्घाटनाच्या दुसर्या दिवशी)सकाळी जाणे टाळले. आणि संध्याकाळी आरामात घरी जाताना जाऊ असा विचार केला. त्याप्रमाणे चान्दिवालीला जवळ असलेले साकीनाका हे स्टेशन सुमारे साडेसहाच्या सुमारास गाठले. तिथे गेल्यावर बघितले तर तिकिटासाठी भीषण गर्दी. मोनोरेलचा प्रवास आधी केला असल्यामुळे टोकन घ्यायचे ते वापरायचे याबाबत माहिती होती. पहिले ३० दिवस कुठल्याही दोन स्टेशनांना जायला तिकिटाचा दर हा १० रुपये ठेवला आहे. नंतर तो वाढविणार आहेत.(कंपनीच्या वेबसाईट वर १०,२०,३०,४० असा सांगितला आहे, त्यावरून राजकारण चालू आहे, शेवटी काय ते आपल्याला नन्तर कळेलच.) त्याप्रमाणे १० रुपये देऊन टोकन घेतले. त्यातच माझी साधारण १५-२० मिनिटे गेली. मागे वळून पहिले तर आधी २ पदरी असलेली माझी रांग आता ४-५ पदरी झाली होती. त्यामुळे पहिल्या दिवशी टोकन घेऊन प्रवास केला आणि मग घाटकोपरला स्मार्ट कार्ड घेतले. अर्धे प्रवासी ऑफिसचे लोक दिसत असले तरी अर्धे लोक फिरायला आलेले होते. पुढे जाऊन बघितले तर वर प्लात्फोर्म वर जाण्यासाठी आपल्याला दोन अडथळे पार करावे लागतात . एक म्हणजे AFC (automatic fair collection) गेट आणि दुसरी म्हणजे सुरक्षा व्यवस्था. हि सुरक्षा व्यवस्था निव्वळ औपचारिकता आहे. पहिले आपल्याला आपली bag conveyer belt वर ठेवावी लागते ती x ray machine मधून पास होण्यासाठी. अगदी विमानतळ असल्यासारखे नखरे आहेत. मग स्त्रियांची वेगळी आणि पुरुषांची वेगळी अश्या चेकिंग साठी दोन रांगा आहेत. आपण मेटल डेतेक्टर मधून पुढे जातो. प्रत्येकाचे वेळी ते यंत्र वाजत असते. मग एक सुरक्षारक्षक उगीचच आपल्याला तपासायचे नाटक करतो. त्यातून त्याला काय कळते , कुणी काय बरोबर घेतले आहे ते त्याला कसे कळते ते मला अजूनही कळलेले नाही. इथपर्यंत साधारणपणे आपली ५-१० मिनिटे सहज मोडतात. गर्दीच्या वेळी तर नक्कीच कारण त्यालाही लाईन मोठी असते. हे झाले कि पुढचे दिव्य म्हणजे afc gates . या यंत्रणेशी मुंबईच्या लोकांना सवय करून घ्यावी लागेल. आपल्याकडे एकतर टोकन नाहीतर स्मार्ट कार्ड असे पर्याय आहेत. ते आपल्याला या गेटवर स्वाईप करावे लागतात. एकदा स्वाईप केले कि एकाच माणसाला जाता येते. परंतु मुंबईच्या लोकांना घाई असते आणि धीर तर अजिबात नसतो. लोकांना स्वाईप कसे करावे याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. कारण तुमचे कार्ड स्वाईप होत नसेल किंवा वेळ लागत असेल तर मागे उभे असलेल्या शंभर लोकांच्या शिव्या खाव्या लागतात. गर्दी आणि गोंधळ वाढत जातो. बर एकाने केले कि त्यातून एकावेळी तीन चार लोक जायचा प्रयत्न करतात. मग कधी कधी ते गेट उघडत नसेल तर मग सुरक्षा रक्षक ते कंट्रोलला सांगून उघडतात आणि एकाच वेळी दहा दहा लोकांना आत सोडतात. गर्दीच्या वेळी तर पहिले एक दोन दिवस मला हाच अनुभव आलेला आहे आणि त्यातून फुकट्या लोकांचे चांगलेच फावले आहे. एकदा तुम्ही हि दिव्य पार केलीत कि मग अखेरीस तुम्ही फलाटावर पोहोचता. तसे फलाटावर ५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ उभी रहायची वेळ येत नाही कारण गाड्यांची वारंवारता (frequency) चांगली आहे. मात्र चुकीच्या फलाटावर आलात तर लोकल सारखे रूळ ओलांडायचा अजिबात प्रयत्न करू नका, कारण एक तर ते जमणार नाही आणि ते जीवघेणे देखील आहे. एवढेच काय फलाटावर उभे असलेले सुरक्षारक्षक तुम्हाला पिवळ्या रेषेच्या पलीकडे जाऊन देत नाहीत. साकीनाक्याला तर ते लोक दाराप्रमाणे लाईन सुद्धा लावतात . एकंदरीत हा टप्पा एकदम आरामशीर आहे. ट्रेनचे डबे ए सी असल्यामुळे प्रवास आरामशीर आहे. तसेच वेगवानही आहे. ट्रेनचे डबे मोकळे असले तरी बसायला जागा फार नाही. पण २० मिनिटांपेक्षा जास्त प्रवास नसल्याने त्याचे काही वाटत नाही. महिला, जेष्ठ नागरिक आणि अपंग यांच्यासाठी राखीव जागा आहेत. आपत्कालीन परिस्थितीत आपल्याला मोटरमनशी देखील बोलता येण्याची सोय केली आहे. पुढचे स्थानक कुठले , फलाट कुठल्या बाजूला येणार याचीही घोषणा होत असते. बाहेर बघण्यासारखे मात्र काही नाही. झोपडपट्टीचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. परत येताना पुन्हा तुम्हाला AFC गेट पार करण्याचे दिव्य करावे लागते. येथेही जर का प्रचंड गर्दी असेल तर ते लोक manually उघडून लोकांना बाहेर काढतात ते सुद्धा स्वाईप न करता. ज्यांच्याकडे टोकन आहे त्यांचे परत घेतात. खरेतर ते गेटच्या खाचेमध्ये आत टाकायचे असते आणि कार्ड असेल तर ते स्वाईप करायचे असते. कार्ड वाल्यांना नुसते कार्ड आहे ना बघून बाहेर काढतात. येथे मला आलेला अनुभव सांगतो. माझ्याकडे असलेले कार्ड मी साकीनाका स्टेशनला स्वाईप करून आत आलो. घाटकोपरला तौबा गर्दी असल्याने त्यांनी गेट बंद ठेवले आणि मी नुसतेच कार्ड दाखवून बाहेर आलो. त्यामुळे मी बाहेर पडल्याची नोंद झाली नाही पण माझे पैसेही गेले नाहीत. दुसर्यादिवशी मी जेव्हा घाटकोपरला आत जात होतो तेव्हा माझे कार्ड read/ स्वाईप होत नवते. तिथल्या कर्मचार्याने मला सांगितले कि काल येताना स्वाईप न केल्याने असे होत आहे, पुढे असलेल्या customer care ला सांगून कार्ड अपडेट करून घ्या. असे म्हणून मी तिथे गेलो तर माझ्यासारखीच २५-३० माणसे तिथे गर्दी करून होती. आणि एक एक कार्ड अपडेट करायला वेळ लागत होता. शेवटी उशीर होईल हे लक्षात आल्यावर लोकांनी थोडी आराडा ओरड केल्यावर त्यांनी बाजूच्या गेटवर काहीतरी सेटिंग करून पुन्हा कार्ड स्वाईप करून आम्हाला आत घेतले. या प्रकरणामध्ये माझे दहा रुपये वाचले पण नाहक मनस्ताप सहन करावा लागला,थोडा वेळी गेला. ते सुद्धा सकाळच्या गर्दीच्या वेळी. खाली मी एक गणित मांडत आहे, कि एखाद्या माणसाला ठाणे ते अंधेरी असा प्रवास करायचा असेल तर त्याला मेट्रो रेल वापरून आणि न वापरता किती वेळ लागेल. यामध्ये मी फक्त प्रत्यक्ष प्रवासाचा वेळ गृहीत धरला आहे. जिने चढण्या-उतरण्याचा वेळ, गाडीची वाट बघण्याचा वेळ, तिकीट काढणे ,कार्ड स्वाईप करणे इ. वेळ गृहीत धरलेला नाही कारण तो गर्दीच्या वेळेनुसार कमी जास्त होऊ शकतो. सर्व वेळासाठी m-indicator या ऍपचा संदर्भ घेण्यात आला आहे. तर घाटकोपर ते अंधेरी या मेट्रोच्या प्रवासासाठी माझ्या आई-वडिलांना सुमारे १८ मिनिटे लागली त्यामुळे तसे गृहीत धरत आहे. ठाणे ते अंधेरी प्रवास व्हाया दादर ( मेट्रो ट्रेन न वापरता केलेला पारंपारिक प्रवास) ठाणे ते दादर (फास्ट ट्रेन) + दादर ते अंधेरी (फास्ट ट्रेन) = २८ मिनिटे + १५ मिनिटे = ४३ मिनिटे ठाणे ते दादर (स्लो ट्रेन) + दादर ते अंधेरी (स्लो ट्रेन) = ४२ मिनिटे + २२ मिनिटे = ६४ मिनिटे ठाणे ते दादर (फास्ट ट्रेन) + दादर ते अंधेरी (स्लो ट्रेन) = २८ मिनिटे + २२ मिनिटे = ५० मिनिटे ठाणे ते दादर (स्लो ट्रेन) + दादर ते अंधेरी (फास्ट ट्रेन) = ४२ मिनिटे + १५ मिनिटे = ५७ मिनिटे ठाणे ते अंधेरी व्हाया घाटकोपर (मेट्रो ट्रेन वापरून केलेला प्रवास ) ठाणे ते घाटकोपर (फास्ट ट्रेन) + घाटकोपर ते अंधेरी (मेट्रो ट्रेन) = १५ मिनिटे +१८ मिनिटे= ३३ मिनिटे ठाणे ते घाटकोपर (स्लो ट्रेन) + घाटकोपर ते अंधेरी (मेट्रो ट्रेन) = २३ मिनिटे + १८ मिनिटे = ४१ मिनिटे आता यामध्ये एक गोची आहे ती अशी कि घाटकोपर लोकल आणि मेट्रो स्टेशन हि जोडलेली आहेत, पण अंधेरी लोकल आणि मेट्रो स्टेशन हि लांब आहेत आणि त्यांना एका ब्रीजने जोडले आहे जो पार करायला ५-१० मिनिटे जातात. पण तुम्हाला जर का मरोळ , चाकाला , वर्सोवा या भागात जायचे असेल तर त्यासाठी मेट्रोची स्टेशनच आहे त्यामुळे अंधेरी वरून होणारा रिक्षाचा/बसचा खर्च आणि वेळ वाचतो. जरी हा प्रवास वेळ वाचवणारा असला तरी तो खर्चिक आहे जर का त्यांनी १०,२०,३०,४० असे दर पत्रक ठेवले तर. त्या तिकिटांचे दर असलेला तक्ता खाली देत आहे. fare V-VERSOVA, DN- DN NAGAR,AZ –AZAD NAGAR,WEH- WESTERN EXPRESS HIGHWAY, CHK- CHAKAL, APR- AIRPORT ROAD, MAR-MAROL NAKA, SKN-SAKI NAKA,ASA- ASALPHA,JN- JAGRUTI NAGAR, GHK- GHATKOPAR आता ठाणे ते अंधेरी रिटर्न तिकीट ३० रुपये आहे आणि हे इथे घाटकोपर ते अंधेरी एका वेळचे तिकीट ३० रुपये लावत आहेत. त्यामुळे खर्चाचे गणित पुढीप्रमाणे: ठाणे ते अंधेरी प्रवास व्हाया दादर ( मेट्रो ट्रेन न वापरता केलेला पारंपारिक प्रवास) सिंगल = रु.१५ रिटर्न = रु. ३० ठाणे ते अंधेरी व्हाया घाटकोपर (मेट्रो ट्रेन वापरून केलेला प्रवास ) सिंगल = रु. १० + रु. ३०= रु. ४० रिटर्न = रु. २० + रु. ६० = रु. ८० अजून मेट्रो ट्रेनच्या पासाची घोषणा झालेली नाही. त्यामुळे तो पास आणि लोकलचा फर्स्ट आणि सेकंद क्लास चा पास यांची तुलना करता आली असती. पण एक आहे ते म्हणजे मुंबईत कितीही जरी पाउस पडला तरी मेट्रो ट्रेन चालूच राहील! एकूण पाहता मेट्रो ट्रेन तुमचा वेळ नक्की वाचवते जर तुम्ही वर सांगितल्या प्रमाणे ठाणे, डोंबिवली , कल्याण आणि खाली ते अंधेरी, बोरीवली असा प्रवास करत असाल. एकदा का मुंबैकारांना या यंत्रणेची सवय झाली कि हा प्रवास सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे. कारण अनुभव असा आहे कि प्रत्यक्ष प्रवासाचा वेळ कमी असला तरी आत आणि बाहेर जाण्यातच सुमारे २०-२५ मिनिटे वेळ गर्दीच्या वेळी विशेषतः संध्याकाळी जातो. त्यामुळे सध्यातरी मेट्रो ट्रेनने प्रवास करायचा असेल तर एकतर भरपूर वेळ असेल तर करा नाहीतर पूर्ण तयारीशी वेळ बघून करा. मुंबईच्या चाकरमान्यांना हि ट्रेन खुप आवडलेली आहे. एकदा का मुंबईकरांनी या यंत्रणेशी जुळवून घेतले कि प्रवास सुखाचा होईल, होणारा गोंधळ कमी होईल अशी आशा करूया. नव्याचे नौ दिवस संपले कि फिरायला येणार्यांची गर्दी कमी होईल. लोकांकडून सुद्धा थोडी शिस्त, संयम आणि सहकार्याची अपेक्षा आहे. तिकिटाचे दर सामन्याच्या खिशाला परवडतील असे ठेवावे अशीही अपेक्षा आहे. येथील स्टेशन वरचे फूड स्टँाल चे अन्न अगदी मॉलसारखे महागडे आहे ते जरा स्वस्त केले पाहिजे. पण बर्याच लोकांना विविध मार्गांवर ट्र्फिकला टाळून जाता येत आहे, बेस्ट बसेसची गर्दी टाळता येत आहे, रिक्षाचा खर्च वाचत आहे. काही का होईना पण रोज जीवघेणा प्रवास करणाऱ्या माझ्यासारख्या मुंबईकराला एक नवीन जीवनदायिनी मिळाल्यामुळे “अच्छे दिन” आल्यासारखे वाटत आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 9380
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

मेट्रोचा व्हिडीओ पाहील्यावर समजलं कि ही यंत्रणा बे एरियातल्या बार्टसारखी आहे फक्त सेक्युरिटीची भानगड आणि टोकन सोडले तर... छान माहीतीपुर्ण लेख आहे. सगळे statistics चांगले मांडले आहेत.

In reply to by दिपाली पाटिल

छान माहीतीपुर्ण लेख आहे. सगळे statistics चांगले मांडले आहेत.
असेच म्हणतो. अभ्यासपूर्ण लेख. बाकी मुंबई मेट्रोला आमच्या पुण्याच्या मेट्रोची सर दिसत नाही म्हणा. ;-)

मस्त माहीती . नवीन माणसाला हा लेख वाचून अगदी नीट आखता येईल आपला पहिला मेट्रो प्रवस. सवय झाली की मुंबईकर सराईत पणे मेट्रो चा धंदा वाढवतील यात शंका नाही . हळू हळू मेट्रो सगळ्या महत्वाच्या मार्गांवरून धावेल अशी अपेक्षा करायला ही हरकत नाही . फक्त एक च आहे की आपल्यासारख्या अस्थिर सीमा रेषा असलेल्या देशाच्या नागरिकांनी स्वतःलाच एक शिस्त लावून घेतली पाहिजे. सुरक्षा व्यवस्था धाब्यावर न बसवणे, केवळ वेळ नाही म्हणून नियम वाकवणे अशा गोष्टी प्रत्येकाने आपल्यापुरत्या टाळल्या तरी एवढे सगळे लोक सहज manage होतील . हे सगळं मनात आलं कारण साध्या mall मधल्या सुरक्षा व्यवस्थेला पण आपण वैतागतो. मुंबईकरांना सदाचीच घाई त्या मुळे असे नियम धाब्यावर बसायला वेळ लागणार नाही . तुमच्या ही लेखात उल्लेख आहेच "
अगदी विमानतळ असल्यासारखे नखर आहेत
". आपण थोडा त्रास सहन करणं भाग च आहे जर जिवंत राहायचा असेल तर.

चांगली माहिती. सुरक्षा व्यवस्था आता पाहिजेच! बॉम्बस्फोटात जीव गेल्याच्या बातम्या पुरे झाल्या. एकंदरीत प्रकरण सोयिस्कर दिसतय. पब्लिकनेही गंमत म्हणून मेट्रोतून फिरायला जाणे टाळावे म्हणजे खर्‍या प्रवाशांची गैरसोय होणार नाही हे खरे आहे पण खोटे का बोलू? मलाही बातमी आल्यादिवशी एक राईड घ्यावीशी वाटली होती. ;)

खुप छान माहिती अमोल केळकर

माहितीपूर्ण लेख. दिल्लीतला मेट्रोचा अनुभव सुखद आहे, मुंबईतलाही नक्की असेल. थोडा चालण्याचा व्यायाम करायची तयारी असेल तर मेट्रो सोयीची आहे एकदम! पुढच्या मुंबई भेटीत मेट्रोने नक्की प्रवास करणार. दिल्लीत तरी मेट्रोचा मासिक पास नाही - स्वाईप कार्ड वापरलं तर १०% फायदा होतो. मुंबई मेट्रो 'मासिक पास' काढणार असेल तर उत्तम आहे.

छान माहिती दिली आहे. देल्ली मेट्रो मस्त आहे. मी उभे राहून प्रवास करत होते तर अचानक माझ्या डब्यात सिक्यूरिटीचे लोक्स व त्यांच्याबरोबर एक मस्त लॅब्राडोर कुत्रे आले. हे कायम गस्त घालत असतात. कुक्कु पायाशी बसून गेले. माझ्या सवयी प्रमाणे त्याचे मला लाड करायचे होते पण सिक्यूरिटी कुत्र्यांना फार प्रेम दाखवायचे नसते असे काहीतरी वाचले होते म्हणून घाबरून गप उभी राहिले. सेंट्रल वेस्ट र्न करणार्‍यांना खरेच मस्त असणार हा ऑप्शन. सिक्युरिटी चेकप मस्ट आहे. स्मार्ट कार्ड कसे घ्यायचे. ते लिहा.

In reply to by पेट थेरपी

स्मार्ट कार्ड मेट्रो स्टेशन वरच मिळते. त्यासाठी वेगळी लाईन असते, generally customer care च्या cubicle पाशी लाईन असते.किमान १०० रुपये त्यात टाकू शकता. नाहीतर मग १०० रुपयाच्या पटीत त्यात पैसे भरू शकता. वेब साईट वर ५० रुपये डीपोझीट आणि ५० रुपये बॅलन्स असे सांगितले आहे. परंतु मी १०० रुपयाला घेतले तर गेटवर स्वाईप करताना मात्र १०० रुपये बॅलन्स दाखवत होते. त्यामुळे या बाबतीत जरा मी confused आहे.

लेख आणि त्यातली माहिती आवडली. माझ्यासारख्या मुंबईकराला एक नवीन जीवनदायिनी मिळाल्यामुळे “अच्छे दिन” आल्यासारखे वाटत आहे. :) माझ्या मते मोदी सरकारला योग्य वेळ देण्याची गरज आहे,मग फरक दिसुन येइल याची खात्री आहे. निवडणुका डोळ्या समोर ठेवुन निर्णयांचे धडाके लावले जात आहेत हे आता सामान्य माणसालाही कळते. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अपर्णा तप करिते काननी :- {चित्रपट :-तांबडी माती}

आवडला. पुढल्या भारत भेटित निदान एखादितरी मेट्रोवारी नक्कि फक्त लोकल ट्रेन्स मधे जशी हाणामारी करुन आत जायची जी पराकाष्ठा करावी लागते त्याची पुनरावृत्ती ईथे होउ नये म्हणजे झालं.

In reply to by दिपक.कुवेत

जरूर प्रवास करा, दुपारी गर्दी नसताना केलात तर आणखी उत्तम. संध्याकाळी गर्दी होते. इथे हाणामारी फक्त तिकीट आणि आत,बाहेर करण्यासाठी होते, बाकी प्रवास सुखाचा आहे.

फोटोवरून मेट्रो ही लोकलसारखीच ओव्हरहेड वायर मधून वीज घेते असे दिसते. इतर मेट्रोज (बंगलोर आणि कलकाता) थर्ड रेल मधून वीज घेतात. त्यामुळे नेहमीप्रमाणे प्लॅटफॉर्मवरून रुळावर उतरून पलिकडे जाण्यात काही विजेच्या धक्क्याचा धोका नसावा.... अर्थात गाडीखाली सापडण्याचा धोका आहेच. बंगलोर मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर लोकांनी पुढे (प्लॅटफॉर्मच्या कडेला) जाऊ नये म्हणून रक्षक असतात आणि ते लोकांना ओरडून मागे ठेवतात. तसे रक्षक कलकाता मेट्रोवर पाहिलेले नाहीत.

In reply to by नितिन थत्ते

कोलकाता मेट्रो देशातली पयली असली तरी ढिसाळ आहे. एक तर फक्त उत्तरदक्षिण मार्गावरून धावते अन फ्रीक्वेन्सीही कमीच आहे जरा..२०११ पर्यंत तरी असे होते. आत्ताचं माहिती नाही. शासनाने फक्त रेंज वाढवली स्टेशनांची पण तेवढ्या गाड्या वाढवल्या नैत. त्यामुळे गर्दी वाढली. नैतर अगोदर जेव्हा ठराविकच स्टेशने होती तेव्हा पीक अवर्सलाही फारशी गर्दी नसायची. मेन गर्दी ती चित्तरंजन अर्थात सी आर अ‍ॅव्हेन्यूला. अख्खा बराकपूर ट्रंक रोड तेव्हा फुल गजबजलेला असायचा. त्यातही श्यामबझार ते एस्प्लनेडपर्यंतचा स्ट्रेच लैच्च प्याकबंद असायचा.

In reply to by नितिन थत्ते

ट्रेनला ओवारहेड वायरच आहे. फक्त दोन रुळांमध्ये मोठ्या उंचीचे डिवायडर आहेत, ते पार करणे सामान्य माणसाला अशक्य आहे, म्हणून रूळ ओलांडून जाण्याचा प्रयत्न करू नका म्हणालो.

मेट्रो चालु झाल्यामुळे पारंपारिक प्रवासातली ( दादर मार्गे ) गर्दी थोडी तरी कमी झाली आहे का?

In reply to by प्रसाद१९७१

दादर वरून प्रवासाचा योग पुढील आठवड्यात येईल तेव्हा बघून अनुभव कळवतो, याची मलाही उत्सुकता आहे. पण बेस्टची ३४० नंबर बसच्या प्रवाशांची संख्या दहा हजाराने कमी झाली असे मटा मध्ये आले होते. हि बस घाटकोपर ते आगरकर चौक, अंधेरी असा प्रवास करते.

झोपडपट्टीवासियांची गैरसोय झाली , आता डब्बा टाकायचा म्हटले की टमरेल घेऊन वरती चढून जावे लागणार . रेल्वे कसे घराच्या बाहेर चा मामला होता. भिकारी , विक्रेते ह्यांना प्रवेश बंद असेल ही सुखद गोष्ट महिला व पुरुषांना वेगवेगळे डबे आहेत का

In reply to by निनाद मुक्काम …

>>महिला व पुरुषांना वेगवेगळे डबे आहेत का मेट्रो आतून कनेक्टेड असते त्यामुळे वेगळे डबे नाहीत. मात्र काही सीट (बस सारक्या) राखीव असतात नहुधा).

In reply to by निनाद मुक्काम …

महिलांसाठी वेगळा डबा नाहीये. पण प्रत्येक डब्यात बस प्रमाणे महिलांकरिता राखीव जागा आहेत.

In reply to by निनाद मुक्काम …

लवकरच ही सोय सुरु होईल. पाच रुपये घेऊन त्यातले काही सिक्युरिटीला देउन पंचतारांकित संडासची सेवा झोपडपट्टीसाठी सुरु करण्यात येईल.

उपयुक्त आणि परिपूर्ण माहिती. धन्यवाद. झोपडपट्टीचे विहंगम दृश्य ??? वा...वा...

कुठल्याही मेट्रो स्टेशनला आत आणि बाहेर जायला दोन बाजूंना सोय आहे. जर का तुम्हाला आत जायला किंवा बाहेर पडायला गर्दी वाटली आणि वेळ जातोय असे वाटले तर दुसर्या बाजूने प्रयत्न करावा. कधी कधी दुसर्या बाजूला काळे कुत्रे देखील नसते. विशेषतः घाटकोपर मेट्रो स्टेशनला सगळे जन रेल्वेच्या बाजूने बाहेर पडायचा प्रयत्न करतात त्याऐवजी विरुद्ध दिशेने पटकन बाहेर पडता येते.

मस्त माहिती रे, नवीन इन्फो मिळाली ती पटपट शेअर करून भाव खातो आता.. तसेच काही पुणेकर काका-मामांशी या मेट्रोवरून वाद घालायला पण आता काही चांगले मुद्दे मिळतील ;) बाकी स्वताच्या नशीबात हा प्रवासयोग कसा लवकरात लवकर जुळवून आणावा हा विचार करतोय, हे वाचून तर आणखी उत्सुकता चाळवलीय, झोपडपट्टीचे विहंगम द्रुश्य एसी डब्यात बसून वा उभे राहून बघण्याची मौजच न्यारी असेल नाही ..

फक्त पहिले ३ दिवस - ८,९,१० जुनला कार्ड काढले तर फुल्ल १०० रुपये मिळतिल, आता ५० रुपये डीपोझीट आणि ५० रुपये बॅलन्स मिळणार. लेडिजसाठि लाईन नाहि त्यामुळे त्यान्चा जास्त वेळ वाचतो ( १५ मिनिटे तरि वाचतात). सेपरेट ड्ब्बा नसला तरि पायलटजवळचा ड्ब्बात लेडिज जास्त जातात. मला चकालाहुन ठाण्याला यायला ४० मिनिटे लागली. चकाला ते ठाणे व्हाया दादर ७० मिनिटे होतात. प्रवास वेळ वाचवणारा असला तरी खर्चिक आहे. दादरची गर्दी घाटकोपरला होउ लागली आहे. त्यामुळे ट्रेन सोडावी लागते. मेट्रो मधे रिकामटेकडे लोक येउन बसतात. जर तुम्हि स्वाइप आउट केले नाहि तर तुम्हि अगदि सहज घाटकोपर-वर्सोवा-घाटकोपर प्रवास रिपीट करु शकता. कोणीहि अडवत नाहि. त्यामुळे सन्ध्याकाळि मेट्रो हाउसफुल्ल धावते. एक महिन्यानतर ३० रु टिकिट होणार, मी तरी खुश नाहि.

पूण्यात बीआर्टीयस च्या नावाने जो खेळ्खंडोबा सुरु आहे तो तरी आटपता घ्या ! उगीचच मेट्रोची स्वप्ने का पहाता ?

पुणे मुंबई वाद इथे कशाला आणता. मुंबईच्या गरजा वेगळ्या आहेत. अजूनही सेनापती बापट रोड वरून संध्याकाळी रमत गमत स्कूटर वरून येताना मस्त वाटते. आमच्यावेळचं पुणं वेगळं आणि खूप मस्त होतं एक एटर्नल पुणेरी काकू.

उगाच मुंबई- पुणे वाद कशाला आणताय इथे.. पुण्याची सार्वजनिक वाहतुक सेवा.. एक नाही दहा भिकार आहे.. पुणेकर सुद्धा वाद घालत बसणार नाहीत ह्यावर.. लोकल वगैरेची इथे एकतर कुणाला सवय नाही.. त्यात ती तासाला एक.. पीएम्टी बद्दल बोलायलाच नको.. हे सगळं कमी होतं म्हणुन आता सगळे मोठे रस्ते बीआरटी साठी अर्धे ब्लॉक करुन ठेवलेत. म्हणजे अर्ध्या अरुंद रस्त्यावर १ किमीचा ट्रॅफिक जॅम.. उरलेला अर्धा रिकामा... १० वर्ष अजुन ऑपरेशनल करायची नव्हती बीआरटी तर अत्तच कशाला रस्ते अर्धे करुन ठेवलेत..??? बरं समजा झालीच उद्या सुरु.. तर रस्त्यच्या मधोमध उतरलेल्या प्रवाशांनी रस्ता क्रॉस करायचा कसा? तसंही सिग्नलला बीआरटी काय किंवा साधी लेन काय.. सगळ्यांनाच थांबाव लागणारे.. आणि समजा.. बीआरटीला डावीकडे वळायचय आणि काही पब्लिकला उजवीकडे तर चौकात नक्की कसं करणार म्हणे हे? पार वाट लावुन ठेवलीये पुण्यात..

In reply to by पिलीयन रायडर

अगदी! बीआर्टीचा थांबा माझ्या घराच्या समोरच आहे. भयंकर वैताग आणतात ते. मधल्या पट्ट्यात धावणारी महाराणी असल्याने वेगात येतात.