विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.-२
विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.-१
............उत्तरेत काळाच्या ओघात हिंदू संस्कृती वरीच नष्ट झाली. भारतात हिंदूंची संस्कृती, त्यांचा धर्म, त्यांच्या कल्पना, त्यांच्या काव्य शास्त्र विनोद या विषयीच्या कल्पना याचे दृष्य स्वरूप कोठे दिसत असेल ते फक्त दक्षिणेकडेच..व याचे श्रेय जाते विजयनगरला हे निर्विवाद..........
क्रमश:.....
वर आपण या राजांनी उत्तर सीमा सुरक्षित करण्यासाठी तयारी चालवली होती हे आपण बघितले. पण वीरबल्लाळचे मदूरा काबीज करायचे स्वप्न कोणी पुरे केले हे बघूयात. बुक्करायाचा कम्पराय नावाच जो मुलगा होता त्याने हे काम तडीस नेले. हा कम्परायही बुक्कप्रमाणे मोठा शूर व कर्तबगार होता यात शंका नाही. याचे शत्रूही याला नावाजत. त्याच्या कारकीर्दीत त्याने दाखवलेल्या कर्तबगारीची वर्णने त्याच्या पत्नीने लिहिलेल्या एका “कम्पराजविजयम” या संस्कृत काव्यग्रंथात आढळतात. त्या काळात एखादी राणी एखादे काव्य रचते यावरून त्यावेळी हा प्रदेश कसा सुसंस्कृत असेल हेही लक्षात येते. या राजघराण्यांमधे अनेक थोर ग्रंथरचनाकार व दी्र्घका्व्ये रचणारे होऊन गेले. मुसलमानांची हकालपट्टी केल्यावर त्याने त्याप्रित्यर्थ मुसलमानांनी उध्वस्त केलेली श्रीरंगम व मदूरा येथील देवळे पूर्णपणे नव्याने बांधून काढली. त्या देवळांवरचे हिंदू झेंडे जणू मुसलमानांपासून आता सुटका झाली आहे हे मोठ्या डौलाने फडकत सांगत होते. पण या सगळ्याला चौदावे शतक संपत अले होते. पाच भावांपैकी हरिहर व कंप मरण पावले होते तर बुक्कही खूपच वृद्ध झाला होता. ठिकठिकाणी अनेक हिंदू राजे आपले राज्य सांभाळून होते पण एकत्रीत असे काही राज्य स्थापन होत नव्हते. हा मान शेवटी बलाढ्य कम्परायला मिळाला.
त्याने बुक्काच्या मृत्यूनंतर (१३७८ साल असावे) दूसरा हरिहर असे नाव धारण करून स्वत:ला विजयनगरच्या साम्राज्याचा पहिला सम्राट म्हणून घोषीत केले.
या दुसर्या हरिहराचा गोतावळा बराच मोठा होता व पहिल्या हरिहराच्या मुलांचा कोठे उल्लेख आढळत नाही. पहिल्या कम्पाला एक मुलगा असल्याचा भक्कम पुरावा उपलब्ध आहे पण तरी सुद्धा तिसर्या भावाच्या मुलाला गादीवर बसविण्यात आले यावरून जो कर्तबगार, त्यालाच राजा म्हणून निवडायचे धोरण प्रधानांनी व सरदारांनी स्वीकारले होते हे कौतूकास्पद आहे. थोडीफार कुरकुर झाली असणार पण इतिहासात त्याचा विशेष उल्लेख नाही. या राजावर आता साम्राज्याचे संघटन, सुव्यवस्था व हिंदूंचे स्वतंत्र राज्य असून हिंदूंकडे वाकड्या नजरेने पहाणार्यांचे डोळे काढले जातील अशी जरब बसविण्याची जबाबदारी येऊन पडली. ती त्याने मोठ्या निर्भयतेने, कुशलतेने व पराक्रमाने निभावली असे म्हणायला हरकत नाही. याने अनेक पदव्या धारण केल्या होत्या व त्यातील बहुतेक "वेद प्रणीत नियमांचे व राष्ट्र स्थापन करणारा” या अर्थाच्या आहेत. हे वेद प्रणीत हिंदू धर्मस्थापनेचे शंकराचार्यांचे कामही त्याने स्वत:च्या अंगावर घेतेले होते यावरून त्याच्या समर्थ्याची कल्पना येऊ शकते. त्याच्या सुसंस्कृतपणाची साक्ष त्याची अजून एक पदवी देते. त्याचा अर्थ आहे “वेदांवरची टीका व भाष्ये प्रकाशीत करणारा” असा आहे. या प्रकारच्या पदव्या घेतलेला राजा मला तरी दुसरा आढळला नाही. त्यामुळे हिंदूंची म्लेंच्छांपासून सुटका करणे एवढेच त्याचे काम नसून त्याने त्याच्या प्रजेच्या एकंदरीत सामाजीक उन्नतीची काळजी घेणे हेही त्याचे ध्येय असावे असे वाटते.
सामान्य लोकांना कल्पना नसते व शाळांतूनही इतिहास नीट शिकवला जात नाही त्यामुळे विजयनगरच्या साम्राज्यावर एकंदरीत चार राजवंशांनी राज्य केले हे माहीत नसते. खाली ही वंशावळ विकीवरून दिलेली आहे. यांच्या सनावळीबद्दल मलाच शंका आहे परंतू अंदाज येण्यासाठी या ठीक आहेत आणि मुख्य म्हणजे आपण त्यांचा इतिहास थोडक्यात बघतोय म्हणून यात अधिक खोल जाता येणार नाही.
पहिला राजवंश संगमा
हरिहरराय-१: १३३६-१३५६
बुक्कराय-१: १३५६-१३७७
हरिहरराय-२: १३७७-१४०४
विरूपाक्षराय: १४०४-१४०५
बुक्कराय-२: १४०५-१४०६
देवराय-१: १४०६-१४२२
देवराय-२: १४२४-१४४६
रामचंद्रराय: १४२२
वीरविजय बुक्कराय: १४२२-१४२४
देवराय-२: १४२४-१४४६
मल्लिकार्जूनराय: १४४६-१४६५
विरूपाक्षराय-२: १४६५-१४८५
सालुव घराणे.
नरसिंहदेवराय: १४८५-१४९१
तिम्मा भुपाला: १४९१
नरसिंहराय-१: १४९१-१५०५
तुलूव घराणे.
नरसानायक: १४९१-१५०३
वीरनरसिंहराय: १५०३-१५०९
कृष्णदेवराय: १५०९-१५२९
अच्युतदेवराय: १५२९-१५४२
सदाशिवराय: १५४२-१५७०
अरविदू घराणे
अलियरामराय: १५४२-१५६५
तुरूमलदेवराय: १५६५-१५७२
श्रीरंग-१: १५७२-१५८६
वेंकट-२: १५८६-१६१४
श्रीरंग-२: १६१४
रामदेव: १६१७-१६३२
वेंकट-३: १६३२-१६४२
श्रीरंग-३: १६४२-१६४६.
पहिला राजवंश – संगमा घराणे
या राजवंशाने विजयनगरवर साधारणपणे शंभरएक वर्षे राज्य केले असे समजले जाते. यांच्या कारकिर्दीत त्यांनी त्यांच्या उत्तरसीमेचे उत्तमप्रकारे संरक्षण केले व या दरम्यान त्यासाठी ज्या काही लढाया त्यांनी मुसलमानांबरोबर लढल्या, त्यातील दोन तीनच लढायांमधे त्यांना माघार घ्यावी लागली असेल. या युद्धातील विजयांमुळे हिंदू सैनिकांचा आत्मविश्वास इतका वाढला की दुसर्या देवरायाच्या काळात या राजांना मुसलमानांच्या आक्रमणाची फिकीर राहिली नाही. दक्षिणेकडे साम्राज्याचा विस्तार होऊन भरपूर महसूल गोळा होऊ लागला व लोककल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात आल्या. एकंदरीत शांतता व सुबत्ता व हिंदू पद्धतीप्रमाणे चांगल्या राजाचे एकछत्री अंमल असे सगळे चांगले वातावरण होते.
दुसर्या देवरायाच्या काळात अजून एक महत्वाची घटना घडली म्हणजे या राजाने समुद्राचे महत्व ओळखून त्यामार्गे होणार्या व्यापारावर लक्ष व अंकूश ठेवण्यासाठी लक्ष्मण नावाचा एक अधिकारी नेमला. याला पदवीच दक्षिण समुद्राचा स्वामी अशी दिली होती. पण दुर्दैवाने यावेळी व भविष्यात कधीही विजयनगरचे नौदल असल्याचा पुरावा नाही. बहुदा याचे काम समुद्रावरून येणार्या मालावरची जकात गोळा करण्याचे असावे. या राजवंशाने त्यांचा शेवटचा राजा दुसरा विरूपाक्ष सिंहासनावरून पदच्युत होई पर्यंत साम्राज्याची चांगलीच उभारणी केली.
यांच्या राजवटीत अजून एक अत्यंत महत्वाचे कार्य झाले. हिंदू शिक्षण पद्धतीमधे गूरू-शिष्य़ परंपरेमधे सर्व विद्या ही गुरूकडून विद्यार्थ्यांकडे पाठांतराने जात असे. पण जेव्हा हिंदू मुसलमान हा झगडा चालू झाला व मुसलमानांच्या अत्याचारी व क्रूरतेमुळे ही परंपरा वारंवार खंडीत होऊ लागली. हे टाळण्यासाठी ही सर्व विद्या, ग्रंथ लिखित स्वरूपात आणायचे काम यांच्या कारकीर्दीतच चालू झाले. यामुळेच कदाचित बुक्क याने वेदांची टिका व भाष्ये प्रकाशीत करणारा अशी पदवी धारण केली असावी. यांच्याच काळात प्रासिद्ध माधवाचार्य व सायणाचार्य या द्वयींनी इतर विद्वानांबरोबर व राजांबरोबर बरीच ग्रंथ निर्मती केली. राजघराण्यतील स्त्रियाही ज्ञानी असत याचा उल्लेख वर आलाच आहे. या सर्व वातावरणाने ज्ञान व संस्कृतीची सर्व बाजूने वृद्धी झाली. व्यापारवृद्धीचे तर बोलायलाच नको. सुबत्ता म्हणजे खरोखरच सोन्याचा धूर निघत असे व हिरे माणके तर अगणित जमा झाली होती. विजयनगरचा व्यापार चौदाव्या शतकात तीनशे बंदरातून चालत असे यावरून आपल्याला याची कल्पना येऊ शकेल.
दुसरा राजवंश – सालुव घराणे
पण चांगल्या वाईटाचा फेरा येतच असतो या नियमाप्रमाणे या राजवंशाचा शेवटचा राजा दुसरा विरूपाक्ष याला त्याची सत्ता गमवावी लागली. अर्थात त्याला तोच जबाबदार होता. तो दुर्बळ व दुर्वतनी असल्यामुळे त्याच्या दरबारात अनेक तंटे बखेडे उभे राहिले व त्यातच याच घराण्यातील पण दुसर्या पातीच्या कुटुंबातील नरसिंह या राजपुत्राने सत्ता हस्तगत केली. हे सत्तांतर व्हायला बरीच कारणे होती. कलिंगराज्यात (ओरिसा) सत्ताबदल होऊन कपिलेश्वर नावाच्या सरदाराने गादी बळकावली होती. तो व त्याचा मुलगा पुरुषोत्तम यांनी सत्तेवर आल्या आल्या आपल्या राज्याच्या विस्ताराची योजना हाती घेतली. अर्थातच त्यांना पहिला अडथळा होता तो विजयनगरचा. त्यांनी पूर्वकिनार्याने खाली उतरून राजमहेंद्रीपर्यंतचा मुलूख जिकला व ते कृष्णाकाठाने विजयनगर साम्रज्यात उतरले. बघता बघता त्यांनी अर्काट पर्यंतचा मुलूख आपल्या अधिपत्याखाली आणला. हे झाल्यावर विजयनगरच्या राजाच्या दुबळेपणाची चीड येऊन बहुदा त्याला सिंहासनावरून हटविण्याचे कारस्थान झाले असावे. त्याच काळात बहामनी सुलतानानेही विजयनगरचा कृष्णा व तुंगभद्रा या पट्यातील सुपीक प्रदेश बळकावला होता. नशिबाने याच काळात बहामनी सत्तेतही सत्तेसाठी कुरबुरी चालू झाल्या होत्या ज्यामुळे नरसिंहाला त्यांनी बळकावलेला सर्व मुलूख परत मिळविण्यात यश आले. नरसिंहाच्या या कामगिरीमुळे जनमत त्याच्या बाजूने झुकले पण दुर्दैवाने उत्तरेची मोहीम हाती घेण्याआधीच तो शूर राजा मरण पावला.
याच्या नंतर याचा मुलगा गादीवर आला परंतू नरसिंहाला आपल्या मुलाच्या कुवतीची कल्पना असल्यामुळे त्याने मरायच्या आधीच त्याला नामधारी राजा करायचे ठरविले होते. ही योजना त्याने त्याचा एकनिष्ठ सेनापती नरसानायक याला समजावून सांगितली व त्याप्रमाणे राज्यशकट हाकायची त्याच्याकडून शपथ घेतली. त्या शपथेनुसार नरसानायक याने त्या मुलाला गादीवर बसवून प्रधान राज्यकारभार म्हणून हाती घेतला. हा नरसानायकही कर्तबगार होता. त्याने जिवावर उदार होऊन दिलेले वचन पाळले. याच्या मृत्यूनंतर ही जबाबदारी त्या दुर्बळ राजाने नरसानायकाच्या मुलावर टाकली. वचनाची देवाणघेवाण आदल्या पिढीत झाली असल्यामुळे त्या वचनाचे ओझे या नवीन प्रधानाला वहायचे कारण नव्हते. त्याने त्या राजाला पदच्यूत करून विजयनगरची सत्ता हस्तगत केली. योगायोगाने याचेही नाव नरसिंहच होते.
हा होता तिसरा राजवंश - तुलूव घराणे
हा मुळ राजघराण्यातील नसल्यामुळे याला जनतेकडून व इतर सरदाराकडून बराच विरोध झाला पण हा सगळ्यांना पुरून उरला. याच्या नंतर (१५०५) याचा धाकटा भाऊ सिंहासनावर बसला त्याचे नाव “कृष्णदेवराय” हाच तो इतिहास प्रसिद्ध कृष्णदेवराय. यालाही सिंहासनावर येताच बराच त्रास देण्यात आला पण काहीच काळात त्याची कर्तबगारी लक्षात आल्यामुळे त्याला होणारा विरोध शांत झाला. त्याने गेलेले वैभव व प्रदेश परत मिळवायचा विडा उचलला. त्याची धडाडी बघनू त्याला इतर सरदारांनी उत्तम साथ दिली व त्याच्या कारकीर्दीत गेलेला बहुतेक प्रदेश विजयनगरमधे परत समाविष्ट करण्यात त्याला यश आले.
याच काळात बहामनी राज्यात बंडाळी माजून त्याचे पाच तुकडे झाले. या गोंधळाचा फायदा उठवण्यासाठी कृष्ण्देवरायने आपली सेना बाहेर काढली. पहिल्याच धडाक्यात त्याने त्याचा जुना शत्रू कलिंगाच्या राजावर आक्रमण केले. पूर्वी गमावलेला सर्व प्रदेश त्याने काबीज केलाच पण एवढ्यावर न थांबता त्याने कटक येथील राजालाही आपले मांडलिक केले. ही मोहीम सुरू करण्याअगोदर त्याने कृष्णा व तुंगभद्रा या नद्याच्या मधे असलेला प्रदेश खालसा केला (रायचूरचा दुआब) व म्हैसूरच्या दक्षिणेत एक गंगवंशी राजा जरा त्रास देत होता त्याचे पारिपत्य केले. अशा तर्हेदने विजयनगरची उत्तर सरहद्द परत एकदा निर्वेध झाली.
कृष्णदेवरायच्या या कामगिरीमुळे विजयनगरचा दबदबा सर्वदूर पसरला. उत्तरेकडून होणार्या मुसलमानांच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्याच्या प्रयत्नात शेवटी अशा प्रकारे यश मिळाले. कृष्णदेवरायने अजून एक महत्वाचा उपक्रम राबवला त्याची फळे आपण आजही उपभोगतोय तो म्हणजे उध्वस्त देवळांच्या पुनरूज्जीवनाचा उपक्रम. त्याने पडलेली देवळे बांधायला घेतली व यासाठी निधीची कमतरता भासू दिली नाही. त्याच्या या उत्तेजनाने पडलेली देवळे उभीच राहिली नाही तर नवीन देवळे बांधण्याचा वेगही वाढला. नवीन नवीन प्रकारच्या देवळाचे बांधकाम होऊ लागले. त्यासाठी वास्तूशास्त्रज्ञ दूरदुरहून आणण्यात आले. दक्षिण भारतात बहुतेक सगळ्या देवळांना जी मोठमोठी गोपूरे बांधलेली आहे यांना रायगोपूरम असे संबोधले जाते. असे म्हणतात ही रचना कृष्णदेवरायने करविली असल्यामुळे याला असे नाव पडले. खाली गोपूर आतून कसे दिसते त्याचे छायाचित्र दिले आहे. हे आतून पोकळ असते. वरून याचा डोलारा बराच मोठा असतो. याचे बांधकाम विटांचे व अचूक असावे लागते व याचा गुरूत्वमध्य बरोबर पायात पडवा लागतो. ( बाहेरची रचना कशीही असली व मोठी असली तरी मग ही वास्तू स्थिर राहू शकते.) एका ढासळलेल्या व बांधकाम अर्धवट सोडलेल्या गोपूराच्या आत जाऊन मी हा फोटो काढला होता...
गोपूर आतून:
दुसरा फोटो गोपूराचा पण बाहेरून काढला आहे. व प्रसिद्ध विरूपाक्ष मंदीराचा आहे.
विरूपाक्ष मंदीराचे गोपूर -
मंदीर बांधकामाची कला बरीच पुढारलेली होती हे निश्चित. मी असे म्हणतो कारण तेथील एकाही देवळाचे छत भर पावसातही गळत नाही. मंदिराचे आराखडे करून त्याच्या लहान प्रतिकृती करत असत व त्याच देवळाला सजविण्यासाठीही वापरल्या जात होत्या असा माझा कयास आहे कारण बर्याच मंदिरावर अशा छोट्या प्रतिकृती जोडलेल्या दिसतात.
देवळाच्या भिंतीची रचनाही वेगळी असायची. दगडाच्या मधे बहुतेक चूना मिश्रित दगड व वाळू/माती भरून भिंती उभ्या केल्या जायच्या. याचे ही खाली एक चित्र दिले आहे.
भिंतींच्या मधे भरलेला माल -
ही सगळी मंदीरे दगडाची आहेत कारण स्पष्ट आहे तो भरपुर उपलब्ध आहे.
दगडाची मुबलक उपलब्धता -
पण हे दगड पाहिजे त्या आकारात कापण्याची कलाही त्यावेळेच्या कारागिरांकडे होती. दगडाला लहान लहान चौकोनी भोके पाडून त्यात ओल्या लाकडाची पाचर मारत जायचे म्हणजे लाकूड फुगून त्या दगडाचा बरोबर तेवढा भाग अलग होतो व तोही अगदी कापल्यासारखा. अर्थात ही पद्धत तेथे सापडणार्या विशिष्ठ प्रकारच्या दगडातच शक्य आहे हेही समजून घेतले पाहिजे. खाली ती पद्धत वापरून दगडाचे तुकडे करण्यासाठी भोके मारलेली दाखवली आहेत.
पाचर मारण्यासाठी मारलेली चौकोनी भोके -
तुटलेला दगड. (हा तोच नाही पण उदाहरणासाठी दाखवला आहे) -
याच्या कडेला अर्धी भोके स्पष्ट दिसत आहेत.....
.
गोपूर सोडल्यास इतर छोट्या देवळांच्या छताची बांधणीही एका वर एक दगड ठेऊन केली जायची. व्हेंटिलेशनची या स्थापत्य अभियंत्यांना चांगली जाण होती हे दाखविणारे एक छायाचित्र खाली देत आहे. अशा अनेक गोष्टी होत्या त्यावर एक वेगळेच प्रकरण लिहायचा मानस आहे....
कृष्णदेवराय हा एक थोडासा कर्मठ हिंदू होता असे म्हटले तरी चालेल. त्याच्यावर हिंदूधर्माच्या प्राचीनतेचा व कर्मकांडांचा बराच प्रभाव होता. देवळांसाठी त्याच्याकडे नेहमीच मोठी रक्कम तयार असायची. त्याचे हे वेड इतके पराकोटीस पोहोचले होते की पंढरपूरला मुसलमानांचा सारखा त्रास व्हायला लागल्यावर त्याने एक मोठे विठ्ठल मंदीर बांधले व त्यात पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती स्थापन करण्याचा त्याचा मानस होता. (हा एक वादग्रस्त प्रश्न आहे. कोणी म्हणतात पंढरपूरची मुर्ती ही विजयनगराहून आणली. पण काळाचा अभ्यास केला तर हे अशक्य वाटते. ही मूर्ती अगोदरपासून पंढरपूरलाच होती पण वरील शक्यता नाकारता येत नाही.) जे देऊळ त्याने बांधले ते खालच्या चित्रात दिसते.
विठ्ठल मंदिर -
हे बघितल्यावर एवढ्या चांगल्या जागेत रहायची श्री. विठ्ठलाची संधी हुकली असे उगाचच वाटून गेले. सध्याची पंढरपूरची अवस्था बघितली तर कोणालाही असेच वाटेल.
विठ्ठल मंदिर आतील एक भाग -
कृष्णदेवरायच्या कारकीर्दीतच विजयनगरच्या स्थापनेचे उद्दिष्ट सफल झाले असे म्हणायला हरकत नाही. आपल्या सरहद्दीच्या संरक्षणाची व्यवस्था चोख केल्यावर कृष्णदेवराय राज्याच्या व्यवस्थापनाकडे लक्ष देऊ लागला. त्याने पहिले काम कुठले केले तर ते म्हणजे प्रजेवरचे अन्यायकारक कर मागे घेतले. राज्याच्या प्रशासकीय विभागांच्या अती महत्वाकांक्षी प्रमुखांना त्याने अगोदर वठणीवर आणले. कृष्णदेवरायबद्दल आपण अजून माहिती परकीय प्रवाशांनी जे वर्णन केले त्यात बघणारच आहे.
या प्रवाशांमधे पोर्तुगीजांचा महत्वाचा सहभाग होता. मी तर असे म्हणतो या प्रवाशांच्या वर्णनामुळेच विजयनगरातील त्या काळातील जीवनपद्धतींवर बराच प्रकाश पडतो. नाहीतर इतर ग्रंथात त्यांच्या पराक्रमाविषयी लिहिलेले आढळते पण कृष्णदेवरायचा दिनक्रम काय होता हे आपल्याला पोर्तुगीज प्रवाशांनी लिहिलेल्या पानांवरूनच कळते. त्यामुळे पोर्तुगीजांबद्दल काही परिच्छेद खर्ची घातले नाही तर योग्य होणार नाही.
१४८४ साली पोर्तुगालचा राजा जॉन याला भारताबद्दल माहिती (विशेषत: त्यातील संपत्ती विषयी) कळाल्यावर या देशाचा शोध घेण्यासाठी त्याने तीन जहाजे तयार करायची आज्ञा दिली. दुर्दैवाने ती तयार व्हायच्या आतच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या नंतर गादीवर आलेल्या डॉम मॅन्युएलने वास्को-द-गामाच्या व त्याचा भाऊ पाउलो यांच्या नेतृत्वाखाली ही तीन जहाजे ८ जूलै १४९७ या दिवशी रवाना केली.
जात्याच दर्यावर्दी असणार्या या खलाशांनी केप ऑफ गूड होपला वळसा घातला व ते २६ ऑगस्ट १४९८ ला कालिकतच्या जवळ पोहोचले. या भेटीदरम्यान त्यांना भारतात शिरकाव करता आला नाही. जो मार्ग गामाने शोधून काढला होता त्याच मार्गाने १५०० साली पेद्रो अल्वारिस कॅब्रालच्या नेतृत्वाखाली एक बर्यापैकी मोठे आरमार पाठवण्यात आले.
कॅब्राल -
या माणसाने कालिकतला पोहोचल्यावर तेथे व्यापार वैगेरे सोडून एकदम स्थानिक लोकांबरोबर लढायाच चालू केल्या. याच्यात बरेच दिवस हाणामारी झाल्यावर त्याचे काही लोक कालिकतच्या प्रदेशात उतरले व काही तेथेच स्थायीकही झाले. त्यातच प्रसिद्ध इतिहासकार बारबोसा दुआर्ते हाही होता.
१५०४ साली वास्को-द-गामा कालिकतला उतरला व त्याने पोर्तुगालच्या राजाला त्या समुद्राचा राजा म्हणून जाहीर केले. तेथे आल्याआल्या त्याने कालिकतवर तोफांचा भडिमार केला व दशहत बसविण्यासाठी आठशे निरपराध कोळ्यांची कत्तल केली. युरोपला परत जायच्या अगोदर त्याने कोचीनला एक वखार स्थापन केली. त्याच्या या क्रूर अत्याचारांमुळे कोचीन व कालिकतमधे लढाया सुरू झाल्या त्यातच त्याच्या नौकांनी कोचीन बंदराची नाकेबंदी केली. गंमत म्हणजे कोचीनच्या राजाने पोर्तुगीजांना “अथिती देवो भव” या न्यायाने वागवले होते. पण दुरदृष्टीचा अभाव, भौगोलिक माहितीचा अभाव, पोर्तुगिजांचा इतिहास माहीत नसल्यामुळे या अतिथींनी कोचीनच्या राजाला चांगलाच हिसका दाखवला.
१५०५ साली अलमिडा नावाच्या सरदाराला पोर्तुगालच्या राजाने इंडियाचा व्हाईसरॉय नेमला. हा स्वत: बरोबर १५०० पोर्तुगिज सैनिक व आरमार घेऊन होनावरवर चालून गेला. भारतातील प्रचंड लोकसंख्या ही कत्तली करून संपणारी नाही हे लक्षात आल्यामुळे पोर्तुगिजांनी स्थानिकांना हाताशी धरून व्यापारवृद्धीचे प्रयत्न सूरू केले. (इतर देशांमधे जेथे त्यांनी पाय ठेवले तेथे एका कत्तलीत गावे उजाड व्हायची.) होनावरच्या बंदरात काही चकमकीं नंतर त्याला त्या चकमकींचा फोलपणा लक्षात आल्यावर त्याने जरा नरमाईचे धोरण स्वीकारले. त्याच काळात त्याला स्थानिक व्यापारांकडून विजयनगर साम्राज्याची माहिती कळाली व तेथे एक नरसिंह नावाचा राजा राज्य करत आहे हेही कळाले.
या अल्मिडाचा मुलगा कनन्नूरला गेलेला असताना त्याची गाठ एका वारथेमा नावाच्या इटालियन प्रवाशाची पडली ज्याच्याकडून त्याला या साम्राज्याची अधिक माहिती मिळाली. या सगळ्याचा परिणाम म्हणून अल्मिडाने त्याच्या मुलाला विजयनगरच्या राजाकडून भटकळ येथे एक वखार बांधायला परवानगी मागितली. अर्थात त्याचे काहीच उत्तर आले नाही. या वारथेमाने त्या काळातील महत्वाच्या घटनांची अत्यंत काळजीपूर्वक नोंद ठेवली होती. या सगळ्या युरोपियन प्रवाशांचे मला याबद्दल प्रचंड कौतूक वाटते. हे कुठेही गेले की त्या प्रदेशाचा अभ्यास करत, त्या प्रदेशातील लोकांच्या चालिरीतींचा अभ्यास करत, व त्याची अचूक नोंद ठेवत. या नोंदीत त्यांच्या राजाला उपयुक्त असणार्या माहितीचा जास्त भरणा असे. वारथेमाने त्याच्या या नोंदीत विजापूरच्या राजाचे विजयनगरच्या राजाशी युद्ध चालू आहे असा उल्लेख केला होता.
तो स्वत: विजयनगरला राहून आला होता. या वारथेमाने विजयनगरचे खूप वर्णन केले आहे. “हे शहर मोठे आहे, याला तीन तटबंद्या आहेत. येथील जनता खूपच श्रीमंत आहे. राजाकडे केव्हाही चाळीसहजार घोडे व चारशे हत्ती असतात. हत्तींना युद्धात कसे वापरतात याचेही त्याने वर्णन केले आहे. “यांच्या सोंडेला मोठ्या तलवारी बांधतात. या हत्तींना वर बसलेल्या माणसाची भाषा कळते...इ.इ..... त्याने एका वर्णनात लिहिले आहे की या राजाच्या घोड्याच्या अंगावर इतकी हिरे माणके आहेत की या एका घोड्याची किंमत आपल्या येथील एका शहराच्या किंमतीपेक्षाही जास्त आहे.....”
तटबंदीतील प्रवेशद्वार. -
बाजूला जी भिंत दिसते आहे ती नंतर बांधलेली आहे पण जरा त्याच्या कडेने बाजूला गेले की तटबंदीचे अवशेष अजूनही दिसतात.
पोर्तुगीजांचा असा या प्रदेशात पाय रोवायचा निकाराचा प्रयत्न चालला होता व त्यांना थोडेफार यशही मिळत होते. याच काळात अल्बुकर्क पर्शियाच्या समुद्रात मूर लोकांची जहाजे बुडवत होता. १५०९ च्या आसपास या माणसाला भारतात गव्हर्नर म्हणून पाठविण्यात आले. याच काळात अल्बुकर्कचा गोव्यात मुसलमानांशी झगडा चालू झाला व त्यासाठी त्याने विजयनगरची मदत मागितली. अर्थातच त्याला तसे कुठलेच आश्वासन मिळाले नाही. अखेरीस जेव्हा पोर्तुगीजांनी गोवा जिंकले तेव्हा मात्र विजयनगरहून एक खास दूत अभिनंदनाचा खलिता घेऊन आला होता. कृष्णदेवराय त्या काळात विजयनगरमधे सिंहासनावर होता त्याची व या पोर्तुगीज अधिकार्यांची बरीच मैत्री झाली व पोर्तुगीज प्रवाशांना विजयनगरमधे बर्याच मानाने वागवले गेले.
या सगळ्या राजकारणात आता मुसलमानांना अत्याचारात मागे सारणार्या एका अत्यंत क्रूर अशा जमातीने प्रवेश केला होता ती म्हणजे ख्रिश्चन पोर्तुगीज.
कृष्णदेवरायला अदीलशहाचा काटा काढायचा असल्यामुळे त्याने अलबुकर्कशी मैत्रीचे धोरण स्वीकारले. या धोरणाचे अजून एक कारण होते ते म्हणजे पोर्तुगीज उत्कृष्ठ घोड्यांचा पुरवठा करत व कृष्णदेवरायला अदिलशहाशी लढायला वाट्टेल ती किंमत देऊन घोडे पैदा करणे अत्यंत आवश्यक होते. असे म्हणतात, त्या काळी कृष्णदेवरायने अलबुकर्कला वीस हजार पौंड त्यांनी आणलेल्या सर्व घोड्यांच्या व्यापाराचा सर्वाधिकार मिळण्यासाठी देऊ केले होते....पण ती हकीकत परत केव्हातरी..... ही झाली पोर्तुगीज भारतात कसे आले त्याची कहाणी....आता परत कृष्णदेवराय व विजयनगरकडे वळू. त्याच्या अगोदर विजयनगरमधील घोड्याच्या व्यापाराच्या पेठेचा फोटो खाली दिला आहे त्याच्यावर एक नजर टाका...
घोडेबाजार -
क्रमश:
विजयनगरचा अंताची सुरवात....पुढच्या भागात..
जयंत कुलकर्णी.
एकदम दोन भाग टाकले आहेत त्यामुळे आता भेट एकदम २४ तारखेला....:-)
Book traversal links for विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.-२
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्तच.....
सुंदर ..
वाचतोय
वाः वाः वाः
सुरेख
उत्तम!
केवळ अप्रतिम मालिका.
//बाकी, विजयनगरचे काही राजे
आपल्याला जे आवडेल तेच लिहा.
मनापासून धन्यवाद !
+१
दुवे द्या. :)
सूफी काय करत होते...
हे ठाउक नव्हतं....
सूफी हे ही बळजबरी करावयास मागेपुढे पहात नसत, हे नव्यानेच ऐकले.
अरेच्च्या ! हे वाचले नव्हते
अरे....
सुंदर लेख..मस्त कुलकर्णी
सुंदर लेख..मस्त कुलकर्णी
मस्त,अत्यंत माहीतीपुर्ण लेख.
मस्त