✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.-२

ज
जयंत कुलकर्णी यांनी
Sat, 08/18/2012 - 00:23  ·  लेख
लेख
Simple, Free Image and File Hosting at MediaFire विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.-१ ............उत्तरेत काळाच्या ओघात हिंदू संस्कृती वरीच नष्ट झाली. भारतात हिंदूंची संस्कृती, त्यांचा धर्म, त्यांच्या कल्पना, त्यांच्या काव्य शास्त्र विनोद या विषयीच्या कल्पना याचे दृष्य स्वरूप कोठे दिसत असेल ते फक्त दक्षिणेकडेच..व याचे श्रेय जाते विजयनगरला हे निर्विवाद.......... क्रमश:..... वर आपण या राजांनी उत्तर सीमा सुरक्षित करण्यासाठी तयारी चालवली होती हे आपण बघितले. पण वीरबल्लाळचे मदूरा काबीज करायचे स्वप्न कोणी पुरे केले हे बघूयात. बुक्करायाचा कम्पराय नावाच जो मुलगा होता त्याने हे काम तडीस नेले. हा कम्परायही बुक्कप्रमाणे मोठा शूर व कर्तबगार होता यात शंका नाही. याचे शत्रूही याला नावाजत. त्याच्या कारकीर्दीत त्याने दाखवलेल्या कर्तबगारीची वर्णने त्याच्या पत्नीने लिहिलेल्या एका “कम्पराजविजयम” या संस्कृत काव्यग्रंथात आढळतात. त्या काळात एखादी राणी एखादे काव्य रचते यावरून त्यावेळी हा प्रदेश कसा सुसंस्कृत असेल हेही लक्षात येते. या राजघराण्यांमधे अनेक थोर ग्रंथरचनाकार व दी्र्घका्व्ये रचणारे होऊन गेले. मुसलमानांची हकालपट्टी केल्यावर त्याने त्याप्रित्यर्थ मुसलमानांनी उध्वस्त केलेली श्रीरंगम व मदूरा येथील देवळे पूर्णपणे नव्याने बांधून काढली. त्या देवळांवरचे हिंदू झेंडे जणू मुसलमानांपासून आता सुटका झाली आहे हे मोठ्या डौलाने फडकत सांगत होते. पण या सगळ्याला चौदावे शतक संपत अले होते. पाच भावांपैकी हरिहर व कंप मरण पावले होते तर बुक्कही खूपच वृद्ध झाला होता. ठिकठिकाणी अनेक हिंदू राजे आपले राज्य सांभाळून होते पण एकत्रीत असे काही राज्य स्थापन होत नव्हते. हा मान शेवटी बलाढ्य कम्परायला मिळाला. त्याने बुक्काच्या मृत्यूनंतर (१३७८ साल असावे) दूसरा हरिहर असे नाव धारण करून स्वत:ला विजयनगरच्या साम्राज्याचा पहिला सम्राट म्हणून घोषीत केले. या दुसर्‍या हरिहराचा गोतावळा बराच मोठा होता व पहिल्या हरिहराच्या मुलांचा कोठे उल्लेख आढळत नाही. पहिल्या कम्पाला एक मुलगा असल्याचा भक्कम पुरावा उपलब्ध आहे पण तरी सुद्धा तिसर्‍या भावाच्या मुलाला गादीवर बसविण्यात आले यावरून जो कर्तबगार, त्यालाच राजा म्हणून निवडायचे धोरण प्रधानांनी व सरदारांनी स्वीकारले होते हे कौतूकास्पद आहे. थोडीफार कुरकुर झाली असणार पण इतिहासात त्याचा विशेष उल्लेख नाही. या राजावर आता साम्राज्याचे संघटन, सुव्यवस्था व हिंदूंचे स्वतंत्र राज्य असून हिंदूंकडे वाकड्या नजरेने पहाणार्‍यांचे डोळे काढले जातील अशी जरब बसविण्याची जबाबदारी येऊन पडली. ती त्याने मोठ्या निर्भयतेने, कुशलतेने व पराक्रमाने निभावली असे म्हणायला हरकत नाही. याने अनेक पदव्या धारण केल्या होत्या व त्यातील बहुतेक "वेद प्रणीत नियमांचे व राष्ट्र स्थापन करणारा” या अर्थाच्या आहेत. हे वेद प्रणीत हिंदू धर्मस्थापनेचे शंकराचार्यांचे कामही त्याने स्वत:च्या अंगावर घेतेले होते यावरून त्याच्या समर्थ्याची कल्पना येऊ शकते. त्याच्या सुसंस्कृतपणाची साक्ष त्याची अजून एक पदवी देते. त्याचा अर्थ आहे “वेदांवरची टीका व भाष्ये प्रकाशीत करणारा” असा आहे. या प्रकारच्या पदव्या घेतलेला राजा मला तरी दुसरा आढळला नाही. त्यामुळे हिंदूंची म्लेंच्छांपासून सुटका करणे एवढेच त्याचे काम नसून त्याने त्याच्या प्रजेच्या एकंदरीत सामाजीक उन्नतीची काळजी घेणे हेही त्याचे ध्येय असावे असे वाटते. सामान्य लोकांना कल्पना नसते व शाळांतूनही इतिहास नीट शिकवला जात नाही त्यामुळे विजयनगरच्या साम्राज्यावर एकंदरीत चार राजवंशांनी राज्य केले हे माहीत नसते. खाली ही वंशावळ विकीवरून दिलेली आहे. यांच्या सनावळीबद्दल मलाच शंका आहे परंतू अंदाज येण्यासाठी या ठीक आहेत आणि मुख्य म्हणजे आपण त्यांचा इतिहास थोडक्यात बघतोय म्हणून यात अधिक खोल जाता येणार नाही. पहिला राजवंश संगमा हरिहरराय-१: १३३६-१३५६ बुक्कराय-१: १३५६-१३७७ हरिहरराय-२: १३७७-१४०४ विरूपाक्षराय: १४०४-१४०५ बुक्कराय-२: १४०५-१४०६ देवराय-१: १४०६-१४२२ देवराय-२: १४२४-१४४६ रामचंद्रराय: १४२२ वीरविजय बुक्कराय: १४२२-१४२४ देवराय-२: १४२४-१४४६ मल्लिकार्जूनराय: १४४६-१४६५ विरूपाक्षराय-२: १४६५-१४८५ सालुव घराणे. नरसिंहदेवराय: १४८५-१४९१ तिम्मा भुपाला: १४९१ नरसिंहराय-१: १४९१-१५०५ तुलूव घराणे. नरसानायक: १४९१-१५०३ वीरनरसिंहराय: १५०३-१५०९ कृष्णदेवराय: १५०९-१५२९ अच्युतदेवराय: १५२९-१५४२ सदाशिवराय: १५४२-१५७० अरविदू घराणे अलियरामराय: १५४२-१५६५ तुरूमलदेवराय: १५६५-१५७२ श्रीरंग-१: १५७२-१५८६ वेंकट-२: १५८६-१६१४ श्रीरंग-२: १६१४ रामदेव: १६१७-१६३२ वेंकट-३: १६३२-१६४२ श्रीरंग-३: १६४२-१६४६. पहिला राजवंश – संगमा घराणे या राजवंशाने विजयनगरवर साधारणपणे शंभरएक वर्षे राज्य केले असे समजले जाते. यांच्या कारकिर्दीत त्यांनी त्यांच्या उत्तरसीमेचे उत्तमप्रकारे संरक्षण केले व या दरम्यान त्यासाठी ज्या काही लढाया त्यांनी मुसलमानांबरोबर लढल्या, त्यातील दोन तीनच लढायांमधे त्यांना माघार घ्यावी लागली असेल. या युद्धातील विजयांमुळे हिंदू सैनिकांचा आत्मविश्वास इतका वाढला की दुसर्‍या देवरायाच्या काळात या राजांना मुसलमानांच्या आक्रमणाची फिकीर राहिली नाही. दक्षिणेकडे साम्राज्याचा विस्तार होऊन भरपूर महसूल गोळा होऊ लागला व लोककल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात आल्या. एकंदरीत शांतता व सुबत्ता व हिंदू पद्धतीप्रमाणे चांगल्या राजाचे एकछत्री अंमल असे सगळे चांगले वातावरण होते. दुसर्‍या देवरायाच्या काळात अजून एक महत्वाची घटना घडली म्हणजे या राजाने समुद्राचे महत्व ओळखून त्यामार्गे होणार्‍या व्यापारावर लक्ष व अंकूश ठेवण्यासाठी लक्ष्मण नावाचा एक अधिकारी नेमला. याला पदवीच दक्षिण समुद्राचा स्वामी अशी दिली होती. पण दुर्दैवाने यावेळी व भविष्यात कधीही विजयनगरचे नौदल असल्याचा पुरावा नाही. बहुदा याचे काम समुद्रावरून येणार्‍या मालावरची जकात गोळा करण्याचे असावे. या राजवंशाने त्यांचा शेवटचा राजा दुसरा विरूपाक्ष सिंहासनावरून पदच्युत होई पर्यंत साम्राज्याची चांगलीच उभारणी केली. यांच्या राजवटीत अजून एक अत्यंत महत्वाचे कार्य झाले. हिंदू शिक्षण पद्धतीमधे गूरू-शिष्य़ परंपरेमधे सर्व विद्या ही गुरूकडून विद्यार्थ्यांकडे पाठांतराने जात असे. पण जेव्हा हिंदू मुसलमान हा झगडा चालू झाला व मुसलमानांच्या अत्याचारी व क्रूरतेमुळे ही परंपरा वारंवार खंडीत होऊ लागली. हे टाळण्यासाठी ही सर्व विद्या, ग्रंथ लिखित स्वरूपात आणायचे काम यांच्या कारकीर्दीतच चालू झाले. यामुळेच कदाचित बुक्क याने वेदांची टिका व भाष्ये प्रकाशीत करणारा अशी पदवी धारण केली असावी. यांच्याच काळात प्रासिद्ध माधवाचार्य व सायणाचार्य या द्वयींनी इतर विद्वानांबरोबर व राजांबरोबर बरीच ग्रंथ निर्मती केली. राजघराण्यतील स्त्रियाही ज्ञानी असत याचा उल्लेख वर आलाच आहे. या सर्व वातावरणाने ज्ञान व संस्कृतीची सर्व बाजूने वृद्धी झाली. व्यापारवृद्धीचे तर बोलायलाच नको. सुबत्ता म्हणजे खरोखरच सोन्याचा धूर निघत असे व हिरे माणके तर अगणित जमा झाली होती. विजयनगरचा व्यापार चौदाव्या शतकात तीनशे बंदरातून चालत असे यावरून आपल्याला याची कल्पना येऊ शकेल. दुसरा राजवंश – सालुव घराणे पण चांगल्या वाईटाचा फेरा येतच असतो या नियमाप्रमाणे या राजवंशाचा शेवटचा राजा दुसरा विरूपाक्ष याला त्याची सत्ता गमवावी लागली. अर्थात त्याला तोच जबाबदार होता. तो दुर्बळ व दुर्वतनी असल्यामुळे त्याच्या दरबारात अनेक तंटे बखेडे उभे राहिले व त्यातच याच घराण्यातील पण दुसर्‍या पातीच्या कुटुंबातील नरसिंह या राजपुत्राने सत्ता हस्तगत केली. हे सत्तांतर व्हायला बरीच कारणे होती. कलिंगराज्यात (ओरिसा) सत्ताबदल होऊन कपिलेश्वर नावाच्या सरदाराने गादी बळकावली होती. तो व त्याचा मुलगा पुरुषोत्तम यांनी सत्तेवर आल्या आल्या आपल्या राज्याच्या विस्ताराची योजना हाती घेतली. अर्थातच त्यांना पहिला अडथळा होता तो विजयनगरचा. त्यांनी पूर्वकिनार्‍याने खाली उतरून राजमहेंद्रीपर्यंतचा मुलूख जिकला व ते कृष्णाकाठाने विजयनगर साम्रज्यात उतरले. बघता बघता त्यांनी अर्काट पर्यंतचा मुलूख आपल्या अधिपत्याखाली आणला. हे झाल्यावर विजयनगरच्या राजाच्या दुबळेपणाची चीड येऊन बहुदा त्याला सिंहासनावरून हटविण्याचे कारस्थान झाले असावे. त्याच काळात बहामनी सुलतानानेही विजयनगरचा कृष्णा व तुंगभद्रा या पट्यातील सुपीक प्रदेश बळकावला होता. नशिबाने याच काळात बहामनी सत्तेतही सत्तेसाठी कुरबुरी चालू झाल्या होत्या ज्यामुळे नरसिंहाला त्यांनी बळकावलेला सर्व मुलूख परत मिळविण्यात यश आले. नरसिंहाच्या या कामगिरीमुळे जनमत त्याच्या बाजूने झुकले पण दुर्दैवाने उत्तरेची मोहीम हाती घेण्याआधीच तो शूर राजा मरण पावला. याच्या नंतर याचा मुलगा गादीवर आला परंतू नरसिंहाला आपल्या मुलाच्या कुवतीची कल्पना असल्यामुळे त्याने मरायच्या आधीच त्याला नामधारी राजा करायचे ठरविले होते. ही योजना त्याने त्याचा एकनिष्ठ सेनापती नरसानायक याला समजावून सांगितली व त्याप्रमाणे राज्यशकट हाकायची त्याच्याकडून शपथ घेतली. त्या शपथेनुसार नरसानायक याने त्या मुलाला गादीवर बसवून प्रधान राज्यकारभार म्हणून हाती घेतला. हा नरसानायकही कर्तबगार होता. त्याने जिवावर उदार होऊन दिलेले वचन पाळले. याच्या मृत्यूनंतर ही जबाबदारी त्या दुर्बळ राजाने नरसानायकाच्या मुलावर टाकली. वचनाची देवाणघेवाण आदल्या पिढीत झाली असल्यामुळे त्या वचनाचे ओझे या नवीन प्रधानाला वहायचे कारण नव्हते. त्याने त्या राजाला पदच्यूत करून विजयनगरची सत्ता हस्तगत केली. योगायोगाने याचेही नाव नरसिंहच होते. हा होता तिसरा राजवंश - तुलूव घराणे हा मुळ राजघराण्यातील नसल्यामुळे याला जनतेकडून व इतर सरदाराकडून बराच विरोध झाला पण हा सगळ्यांना पुरून उरला. याच्या नंतर (१५०५) याचा धाकटा भाऊ सिंहासनावर बसला त्याचे नाव “कृष्णदेवराय” हाच तो इतिहास प्रसिद्ध कृष्णदेवराय. यालाही सिंहासनावर येताच बराच त्रास देण्यात आला पण काहीच काळात त्याची कर्तबगारी लक्षात आल्यामुळे त्याला होणारा विरोध शांत झाला. त्याने गेलेले वैभव व प्रदेश परत मिळवायचा विडा उचलला. त्याची धडाडी बघनू त्याला इतर सरदारांनी उत्तम साथ दिली व त्याच्या कारकीर्दीत गेलेला बहुतेक प्रदेश विजयनगरमधे परत समाविष्ट करण्यात त्याला यश आले. याच काळात बहामनी राज्यात बंडाळी माजून त्याचे पाच तुकडे झाले. या गोंधळाचा फायदा उठवण्यासाठी कृष्ण्देवरायने आपली सेना बाहेर काढली. पहिल्याच धडाक्यात त्याने त्याचा जुना शत्रू कलिंगाच्या राजावर आक्रमण केले. पूर्वी गमावलेला सर्व प्रदेश त्याने काबीज केलाच पण एवढ्यावर न थांबता त्याने कटक येथील राजालाही आपले मांडलिक केले. ही मोहीम सुरू करण्याअगोदर त्याने कृष्णा व तुंगभद्रा या नद्याच्या मधे असलेला प्रदेश खालसा केला (रायचूरचा दुआब) व म्हैसूरच्या दक्षिणेत एक गंगवंशी राजा जरा त्रास देत होता त्याचे पारिपत्य केले. अशा तर्हेदने विजयनगरची उत्तर सरहद्द परत एकदा निर्वेध झाली. कृष्णदेवरायच्या या कामगिरीमुळे विजयनगरचा दबदबा सर्वदूर पसरला. उत्तरेकडून होणार्‍या मुसलमानांच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्याच्या प्रयत्नात शेवटी अशा प्रकारे यश मिळाले. कृष्णदेवरायने अजून एक महत्वाचा उपक्रम राबवला त्याची फळे आपण आजही उपभोगतोय तो म्हणजे उध्वस्त देवळांच्या पुनरूज्जीवनाचा उपक्रम. त्याने पडलेली देवळे बांधायला घेतली व यासाठी निधीची कमतरता भासू दिली नाही. त्याच्या या उत्तेजनाने पडलेली देवळे उभीच राहिली नाही तर नवीन देवळे बांधण्याचा वेगही वाढला. नवीन नवीन प्रकारच्या देवळाचे बांधकाम होऊ लागले. त्यासाठी वास्तूशास्त्रज्ञ दूरदुरहून आणण्यात आले. दक्षिण भारतात बहुतेक सगळ्या देवळांना जी मोठमोठी गोपूरे बांधलेली आहे यांना रायगोपूरम असे संबोधले जाते. असे म्हणतात ही रचना कृष्णदेवरायने करविली असल्यामुळे याला असे नाव पडले. खाली गोपूर आतून कसे दिसते त्याचे छायाचित्र दिले आहे. हे आतून पोकळ असते. वरून याचा डोलारा बराच मोठा असतो. याचे बांधकाम विटांचे व अचूक असावे लागते व याचा गुरूत्वमध्य बरोबर पायात पडवा लागतो. ( बाहेरची रचना कशीही असली व मोठी असली तरी मग ही वास्तू स्थिर राहू शकते.) एका ढासळलेल्या व बांधकाम अर्धवट सोडलेल्या गोपूराच्या आत जाऊन मी हा फोटो काढला होता... गोपूर आतून: Simple, Free Image and File Hosting at MediaFire दुसरा फोटो गोपूराचा पण बाहेरून काढला आहे. व प्रसिद्ध विरूपाक्ष मंदीराचा आहे. विरूपाक्ष मंदीराचे गोपूर - Simple, Free Image and File Hosting at MediaFire मंदीर बांधकामाची कला बरीच पुढारलेली होती हे निश्चित. मी असे म्हणतो कारण तेथील एकाही देवळाचे छत भर पावसातही गळत नाही. मंदिराचे आराखडे करून त्याच्या लहान प्रतिकृती करत असत व त्याच देवळाला सजविण्यासाठीही वापरल्या जात होत्या असा माझा कयास आहे कारण बर्‍याच मंदिरावर अशा छोट्या प्रतिकृती जोडलेल्या दिसतात. देवळाच्या भिंतीची रचनाही वेगळी असायची. दगडाच्या मधे बहुतेक चूना मिश्रित दगड व वाळू/माती भरून भिंती उभ्या केल्या जायच्या. याचे ही खाली एक चित्र दिले आहे. भिंतींच्या मधे भरलेला माल - Simple, Free Image and File Hosting at MediaFire ही सगळी मंदीरे दगडाची आहेत कारण स्पष्ट आहे तो भरपुर उपलब्ध आहे. दगडाची मुबलक उपलब्धता - Simple, Free Image and File Hosting at MediaFire पण हे दगड पाहिजे त्या आकारात कापण्याची कलाही त्यावेळेच्या कारागिरांकडे होती. दगडाला लहान लहान चौकोनी भोके पाडून त्यात ओल्या लाकडाची पाचर मारत जायचे म्हणजे लाकूड फुगून त्या दगडाचा बरोबर तेवढा भाग अलग होतो व तोही अगदी कापल्यासारखा. अर्थात ही पद्धत तेथे सापडणार्‍या विशिष्ठ प्रकारच्या दगडातच शक्य आहे हेही समजून घेतले पाहिजे. खाली ती पद्धत वापरून दगडाचे तुकडे करण्यासाठी भोके मारलेली दाखवली आहेत. पाचर मारण्यासाठी मारलेली चौकोनी भोके - Simple, Free Image and File Hosting at MediaFire तुटलेला दगड. (हा तोच नाही पण उदाहरणासाठी दाखवला आहे) - Simple, Free Image and File Hosting at MediaFire याच्या कडेला अर्धी भोके स्पष्ट दिसत आहेत..... . गोपूर सोडल्यास इतर छोट्या देवळांच्या छताची बांधणीही एका वर एक दगड ठेऊन केली जायची. व्हेंटिलेशनची या स्थापत्य अभियंत्यांना चांगली जाण होती हे दाखविणारे एक छायाचित्र खाली देत आहे. अशा अनेक गोष्टी होत्या त्यावर एक वेगळेच प्रकरण लिहायचा मानस आहे.... Simple, Free Image and File Hosting at MediaFire कृष्णदेवराय हा एक थोडासा कर्मठ हिंदू होता असे म्हटले तरी चालेल. त्याच्यावर हिंदूधर्माच्या प्राचीनतेचा व कर्मकांडांचा बराच प्रभाव होता. देवळांसाठी त्याच्याकडे नेहमीच मोठी रक्कम तयार असायची. त्याचे हे वेड इतके पराकोटीस पोहोचले होते की पंढरपूरला मुसलमानांचा सारखा त्रास व्हायला लागल्यावर त्याने एक मोठे विठ्ठल मंदीर बांधले व त्यात पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती स्थापन करण्याचा त्याचा मानस होता. (हा एक वादग्रस्त प्रश्न आहे. कोणी म्हणतात पंढरपूरची मुर्ती ही विजयनगराहून आणली. पण काळाचा अभ्यास केला तर हे अशक्य वाटते. ही मूर्ती अगोदरपासून पंढरपूरलाच होती पण वरील शक्यता नाकारता येत नाही.) जे देऊळ त्याने बांधले ते खालच्या चित्रात दिसते. विठ्ठल मंदिर - Simple, Free Image and File Hosting at MediaFire हे बघितल्यावर एवढ्या चांगल्या जागेत रहायची श्री. विठ्ठलाची संधी हुकली असे उगाचच वाटून गेले. सध्याची पंढरपूरची अवस्था बघितली तर कोणालाही असेच वाटेल. विठ्ठल मंदिर आतील एक भाग - Simple, Free Image and File Hosting at MediaFire कृष्णदेवरायच्या कारकीर्दीतच विजयनगरच्या स्थापनेचे उद्दिष्ट सफल झाले असे म्हणायला हरकत नाही. आपल्या सरहद्दीच्या संरक्षणाची व्यवस्था चोख केल्यावर कृष्णदेवराय राज्याच्या व्यवस्थापनाकडे लक्ष देऊ लागला. त्याने पहिले काम कुठले केले तर ते म्हणजे प्रजेवरचे अन्यायकारक कर मागे घेतले. राज्याच्या प्रशासकीय विभागांच्या अती महत्वाकांक्षी प्रमुखांना त्याने अगोदर वठणीवर आणले. कृष्णदेवरायबद्दल आपण अजून माहिती परकीय प्रवाशांनी जे वर्णन केले त्यात बघणारच आहे. या प्रवाशांमधे पोर्तुगीजांचा महत्वाचा सहभाग होता. मी तर असे म्हणतो या प्रवाशांच्या वर्णनामुळेच विजयनगरातील त्या काळातील जीवनपद्धतींवर बराच प्रकाश पडतो. नाहीतर इतर ग्रंथात त्यांच्या पराक्रमाविषयी लिहिलेले आढळते पण कृष्णदेवरायचा दिनक्रम काय होता हे आपल्याला पोर्तुगीज प्रवाशांनी लिहिलेल्या पानांवरूनच कळते. त्यामुळे पोर्तुगीजांबद्दल काही परिच्छेद खर्ची घातले नाही तर योग्य होणार नाही. १४८४ साली पोर्तुगालचा राजा जॉन याला भारताबद्दल माहिती (विशेषत: त्यातील संपत्ती विषयी) कळाल्यावर या देशाचा शोध घेण्यासाठी त्याने तीन जहाजे तयार करायची आज्ञा दिली. दुर्दैवाने ती तयार व्हायच्या आतच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या नंतर गादीवर आलेल्या डॉम मॅन्युएलने वास्को-द-गामाच्या व त्याचा भाऊ पाउलो यांच्या नेतृत्वाखाली ही तीन जहाजे ८ जूलै १४९७ या दिवशी रवाना केली. Simple, Free Image and File Hosting at MediaFire जात्याच दर्यावर्दी असणार्‍या या खलाशांनी केप ऑफ गूड होपला वळसा घातला व ते २६ ऑगस्ट १४९८ ला कालिकतच्या जवळ पोहोचले. या भेटीदरम्यान त्यांना भारतात शिरकाव करता आला नाही. जो मार्ग गामाने शोधून काढला होता त्याच मार्गाने १५०० साली पेद्रो अल्वारिस कॅब्रालच्या नेतृत्वाखाली एक बर्‍यापैकी मोठे आरमार पाठवण्यात आले. कॅब्राल - Simple, Free Image and File Hosting at MediaFire या माणसाने कालिकतला पोहोचल्यावर तेथे व्यापार वैगेरे सोडून एकदम स्थानिक लोकांबरोबर लढायाच चालू केल्या. याच्यात बरेच दिवस हाणामारी झाल्यावर त्याचे काही लोक कालिकतच्या प्रदेशात उतरले व काही तेथेच स्थायीकही झाले. त्यातच प्रसिद्ध इतिहासकार बारबोसा दुआर्ते हाही होता. १५०४ साली वास्को-द-गामा कालिकतला उतरला व त्याने पोर्तुगालच्या राजाला त्या समुद्राचा राजा म्हणून जाहीर केले. तेथे आल्याआल्या त्याने कालिकतवर तोफांचा भडिमार केला व दशहत बसविण्यासाठी आठशे निरपराध कोळ्यांची कत्तल केली. युरोपला परत जायच्या अगोदर त्याने कोचीनला एक वखार स्थापन केली. त्याच्या या क्रूर अत्याचारांमुळे कोचीन व कालिकतमधे लढाया सुरू झाल्या त्यातच त्याच्या नौकांनी कोचीन बंदराची नाकेबंदी केली. गंमत म्हणजे कोचीनच्या राजाने पोर्तुगीजांना “अथिती देवो भव” या न्यायाने वागवले होते. पण दुरदृष्टीचा अभाव, भौगोलिक माहितीचा अभाव, पोर्तुगिजांचा इतिहास माहीत नसल्यामुळे या अतिथींनी कोचीनच्या राजाला चांगलाच हिसका दाखवला. १५०५ साली अलमिडा नावाच्या सरदाराला पोर्तुगालच्या राजाने इंडियाचा व्हाईसरॉय नेमला. हा स्वत: बरोबर १५०० पोर्तुगिज सैनिक व आरमार घेऊन होनावरवर चालून गेला. भारतातील प्रचंड लोकसंख्या ही कत्तली करून संपणारी नाही हे लक्षात आल्यामुळे पोर्तुगिजांनी स्थानिकांना हाताशी धरून व्यापारवृद्धीचे प्रयत्न सूरू केले. (इतर देशांमधे जेथे त्यांनी पाय ठेवले तेथे एका कत्तलीत गावे उजाड व्हायची.) होनावरच्या बंदरात काही चकमकीं नंतर त्याला त्या चकमकींचा फोलपणा लक्षात आल्यावर त्याने जरा नरमाईचे धोरण स्वीकारले. त्याच काळात त्याला स्थानिक व्यापारांकडून विजयनगर साम्राज्याची माहिती कळाली व तेथे एक नरसिंह नावाचा राजा राज्य करत आहे हेही कळाले. या अल्मिडाचा मुलगा कनन्नूरला गेलेला असताना त्याची गाठ एका वारथेमा नावाच्या इटालियन प्रवाशाची पडली ज्याच्याकडून त्याला या साम्राज्याची अधिक माहिती मिळाली. या सगळ्याचा परिणाम म्हणून अल्मिडाने त्याच्या मुलाला विजयनगरच्या राजाकडून भटकळ येथे एक वखार बांधायला परवानगी मागितली. अर्थात त्याचे काहीच उत्तर आले नाही. या वारथेमाने त्या काळातील महत्वाच्या घटनांची अत्यंत काळजीपूर्वक नोंद ठेवली होती. या सगळ्या युरोपियन प्रवाशांचे मला याबद्दल प्रचंड कौतूक वाटते. हे कुठेही गेले की त्या प्रदेशाचा अभ्यास करत, त्या प्रदेशातील लोकांच्या चालिरीतींचा अभ्यास करत, व त्याची अचूक नोंद ठेवत. या नोंदीत त्यांच्या राजाला उपयुक्त असणार्‍या माहितीचा जास्त भरणा असे. वारथेमाने त्याच्या या नोंदीत विजापूरच्या राजाचे विजयनगरच्या राजाशी युद्ध चालू आहे असा उल्लेख केला होता. तो स्वत: विजयनगरला राहून आला होता. या वारथेमाने विजयनगरचे खूप वर्णन केले आहे. “हे शहर मोठे आहे, याला तीन तटबंद्या आहेत. येथील जनता खूपच श्रीमंत आहे. राजाकडे केव्हाही चाळीसहजार घोडे व चारशे हत्ती असतात. हत्तींना युद्धात कसे वापरतात याचेही त्याने वर्णन केले आहे. “यांच्या सोंडेला मोठ्या तलवारी बांधतात. या हत्तींना वर बसलेल्या माणसाची भाषा कळते...इ.इ..... त्याने एका वर्णनात लिहिले आहे की या राजाच्या घोड्याच्या अंगावर इतकी हिरे माणके आहेत की या एका घोड्याची किंमत आपल्या येथील एका शहराच्या किंमतीपेक्षाही जास्त आहे.....” तटबंदीतील प्रवेशद्वार. - Simple, Free Image and File Hosting at MediaFire बाजूला जी भिंत दिसते आहे ती नंतर बांधलेली आहे पण जरा त्याच्या कडेने बाजूला गेले की तटबंदीचे अवशेष अजूनही दिसतात. पोर्तुगीजांचा असा या प्रदेशात पाय रोवायचा निकाराचा प्रयत्न चालला होता व त्यांना थोडेफार यशही मिळत होते. याच काळात अल्बुकर्क पर्शियाच्या समुद्रात मूर लोकांची जहाजे बुडवत होता. १५०९ च्या आसपास या माणसाला भारतात गव्हर्नर म्हणून पाठविण्यात आले. याच काळात अल्बुकर्कचा गोव्यात मुसलमानांशी झगडा चालू झाला व त्यासाठी त्याने विजयनगरची मदत मागितली. अर्थातच त्याला तसे कुठलेच आश्वासन मिळाले नाही. अखेरीस जेव्हा पोर्तुगीजांनी गोवा जिंकले तेव्हा मात्र विजयनगरहून एक खास दूत अभिनंदनाचा खलिता घेऊन आला होता. कृष्णदेवराय त्या काळात विजयनगरमधे सिंहासनावर होता त्याची व या पोर्तुगीज अधिकार्‍यांची बरीच मैत्री झाली व पोर्तुगीज प्रवाशांना विजयनगरमधे बर्‍याच मानाने वागवले गेले. या सगळ्या राजकारणात आता मुसलमानांना अत्याचारात मागे सारणार्‍या एका अत्यंत क्रूर अशा जमातीने प्रवेश केला होता ती म्हणजे ख्रिश्चन पोर्तुगीज. कृष्णदेवरायला अदीलशहाचा काटा काढायचा असल्यामुळे त्याने अलबुकर्कशी मैत्रीचे धोरण स्वीकारले. या धोरणाचे अजून एक कारण होते ते म्हणजे पोर्तुगीज उत्कृष्ठ घोड्यांचा पुरवठा करत व कृष्णदेवरायला अदिलशहाशी लढायला वाट्टेल ती किंमत देऊन घोडे पैदा करणे अत्यंत आवश्यक होते. असे म्हणतात, त्या काळी कृष्णदेवरायने अलबुकर्कला वीस हजार पौंड त्यांनी आणलेल्या सर्व घोड्यांच्या व्यापाराचा सर्वाधिकार मिळण्यासाठी देऊ केले होते....पण ती हकीकत परत केव्हातरी..... ही झाली पोर्तुगीज भारतात कसे आले त्याची कहाणी....आता परत कृष्णदेवराय व विजयनगरकडे वळू. त्याच्या अगोदर विजयनगरमधील घोड्याच्या व्यापाराच्या पेठेचा फोटो खाली दिला आहे त्याच्यावर एक नजर टाका... घोडेबाजार - Simple, Free Image and File Hosting at MediaFire क्रमश: विजयनगरचा अंताची सुरवात....पुढच्या भागात.. जयंत कुलकर्णी. एकदम दोन भाग टाकले आहेत त्यामुळे आता भेट एकदम २४ तारखेला....:-)

Book traversal links for विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.-२

  • ‹ विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.
  • Up
  • विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.-३ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
माहिती

प्रतिक्रिया द्या
17219 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

मस्तच.....

मन१
Sat, 08/18/2012 - 01:33 नवीन
हाही भाग उत्तम जमलाय. http://www.mediafire.com/view/?oukcaggacwgshyi# हा जो नकशा दिलाय तो त्या कालातला आहे? म्हणजे युरोपिअनांनी काढलेला? तसे असेल तर आशर्य वाटते आहे. जवळपास सर्व तपशील अचूक, नेटके आहेत. तेव्हाची साधने विचारात घेता हे अवघड आहे. (भारतीय ह्या गोश्टींत मागे पडले असे मला वाटते.) कालिकतला वास्को द गामा जो उतरला तो "झामोरिन" नावाच्या सत्ताधीशाकडे वगैरे उत॑रला म्हणतात. नंतर गोळीबार, लढायही त्याने ह्याच्याशीच केल्या. बरोबर ना? पुन्हा एकदा लेख वाचला. भारतीय इतिहास वाचताना वारंवार एकाच गोष्टीची चीड येते ती म्हणजे इतका प्रचंड समुद्रकिनारा असूनही भूमीवरचे आपले राजे ,सुलतान समुद्रात असे गलितगात्र का असायचे कुणास ठाउक? अक्षरशः काही म्हणता काही किंमत नव्हती ह्यांची. खुद्द मुघल बादशहाच्या शाही जहाजांना संरक्षणासाठी पोर्चुगीज आरमार घेउन जावे लागे. पोर्तुगिजांना १६१८ पर्यंत तोल द्यावा लागे. समुद्राचे राजे युरोपिअनच. म्हणूनच मला वाटते हे असे आले १५०० च्या आसपास छटाकभर संख्येने, ते थेट गोळीबार वगैरे करुन युद्ध वगैरे कसे सुरु करु शकले? कल्पना करा काही शे लोकांचे जहाज आज भारतातून निघते आणि अमेरिकेच्या किनार्‍यावर जाउन आज असले काही करते. त्यांच भूभाग बळकावून ठाण मांडून बसते. कल्पनाही हास्यास्पद वाटते. हे कसं होउ शकलं? कारण ते समुद्रातून हल्ले करत. आम्ही दुबळे होतो, प्रत्युत्तर देउ शकलो नाही.(असे मला वाटते. हा माझा तर्क आहे.) . . अवांतर :- गोवा विषयाबद्दलच्या एका मालिकेतला एक प्रतिसद इथेही उधृत करावासा वाटातोय. त्यासठी पेस्टवतोय. पोर्तुगीजांच्या विचित्र आक्रमकतेचा,धर्मांधतेचा,जुलूम जबरदस्तीचा व थेट लोकसंख्येचा तोलच निव्वळ बळाच्या आधारावर बदलू पाहण्याच्या वृत्तेचा फटका फक्त गोव्यातल्या हिंदू-मुस्लिम ह्यांनाच बसला असे नाही; तर त्यांनी पश्चिम किनारपट्टीवर थेट केरळपर्यंत उच्छाद मांडलेला दिसतो. रोचक गोष्ट ही की ह्यातून त्याकाळचे खुद्द गैर-पोर्तुगिज ख्रिश्चनही सुटले नाहित!! भारतात ख्रिश्चन धर्म हा युरोपच्या कितीतरी आधी आला. अगदि इसवीसनाच्या पहिल्या दुसर्‍या शतकात. आज आपण ख्रिश्चन जग बघतो त्या ख्रिश्चन धर्मावर आख्खा युरोपीय, त्यातही पश्चिम युरोपीय संस्कृतीचाच पगडा आहे. नाव ख्रिश्चनांचे, कित्येक प्रथा युरोपच्याच. मग सुरुवातीचा ख्रिश्चन धर्म कसा होता? तो ह्या आजच्या धर्माहून खूपच भिन्न भासणारा होता. जिथे येशू वसला, फिरला व जिथे त्याने देह ठेवला त्या मध्य-पूर्व आशियाच्या संस्कृतीची व काही प्रमाणात ज्यू परंपरेची त्यात झाक होती.(ती युरोपिअनांमध्येही आहे, पण फारच कमी.) तर, मध्यपूर्वेत आजच्या इस्राइलच्या भागात ख्रिस्ताचा वावर. त्या भूभागाच्या असपास आसणार्‍या सिरियामध्येही झटकन ह्या नव्या धर्माचा प्रसार सर्वप्रथम झाअला. तिथून व्यापारी मार्गाने तो थेट केरळात दुसर्‍या शतकात पोचला. आजही केरळात सिरियन ख्रिश्चन आहेत.(त्यापैकीच एक पी सी अलेक्झांडर ). ह्यांच्या परंपरा, पद्धती, समजूती युरोपिअन ख्रिश्चन फ्लेवरहून फारच वेगळ्या होत्या.अशी सिरियन-अरमाइक नि भारतीय प्रभावित एक संस्कृती बनत होती. आणि नेमके सोळाव्या शतकात ह्यांचा पत्ता पोर्तुगीजांना लागला. झाले! इथल्या एतद्देशीय हिंदू -मुस्लिम ह्यांच्या बरोबरच सिरिअन ख्रिश्चनांचाही छळ पोर्तुगीजांनी मांडला. ह्यांचे अत्यंत आदराचे आणि समाजशास्त्रीय दृष्ट्या महत्वाचे, दुर्मिळ ग्रंथच्या ग्रंथ सापडातील तिथे जाळले, शोधून शोधून जाळले.(तेव्हा छपाइ फारशी होत नसे. जाळले, की संपले. पुन्हा कुठली आवऋत्ती असणे असे नव्हतेच.) आणि (पोर्तुगीज) ख्रिश्चनांनी (सिरियन) ख्रिश्चनांना बळाने ख्रिश्चन करणे सुरु केले!
  • Log in or register to post comments

सुंदर ..

शेखर काळे
Sat, 08/18/2012 - 02:46 नवीन
याचकरिता केला होत अट्टहास - मिपाचे सदस्य व्हावयाचा. श्री. जयंत कुलकर्णी आणि श्री मनोबा यांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे. अत्यंत रोचक, माहितीपुर्ण आणि सोपे लेख व चर्चा. - शेखर काळे.
  • Log in or register to post comments

वाचतोय

रामपुरी
Sat, 08/18/2012 - 08:33 नवीन
बरीच माहीत नसलेली माहीती मिळतेय. पुभाप्र
  • Log in or register to post comments

वाः वाः वाः

रणजित चितळे
Sat, 08/18/2012 - 09:05 नवीन
जयंतरावांचे लिखाण म्हणजे मेजवानी. अजून वाचले नाही. आज नुसते फोटो बघितलेत. उद्याला वाचणार आहे. परत सध्या मी बंगळूरला असल्या कारणाने हे सगळे जाणून घ्यायची मोठी इच्छा आहे. सलाम साहेब आपल्याला तुमचा फॅन रणजित चितळे
  • Log in or register to post comments

सुरेख

प्रचेतस
Sat, 08/18/2012 - 09:40 नवीन
अप्रतिम आणि संग्राह्य अशी लेखमाला. दुमिंगुश पाइश आणि फेर्नांव नुनीश ह्या दोन पोर्तुगीज इतिहासकारांनी कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत विजयनगरला प्रत्यक्ष भेट देऊन लिहिलेल्या बखरींचा रॉबर्ट स्युअल यांनी केलेला इंग्रजी अनुवाद येथे उपलब्ध आहे. विजनगरच्या इतिहासाच्या दृष्टीने याचे महत्व अनन्यसाधारण आहे.
  • Log in or register to post comments

उत्तम!

पैसा
Sun, 08/19/2012 - 10:10 नवीन
नेहमीप्रमाणेच उत्तम लेख! विजयानगरच्या बांधकामांबद्दल वर्णने खूप आवडली. घोड्यांच्या व्यापाराबद्दलची माहिती मनोरंजक आहे. या घोड्यांच्या व्यापारावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशाने कृष्णदेवरायाचा सरदार थिमय्य्याने पोर्तुगीजांना गोव्यात यायचे आमंत्रण दिले. आपण कोणतं संकट बोलावून घेतो आहोत याची त्याला कल्पना आली नाही. गोव्यातून मुस्लिमांचा नायनाट तर झालाच, पण शेवट या थिमयाला त्याच्या बायकोपोरांसकट ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागला. आरमाराचे महत्त्व जा़णणारा फक्त एकच भारतीय राजा नंतरच्या काळात झाला तो म्हणजे शिवछत्रपती. हा सगळा इतिहास वाचताना महाराजांच्या दूरदृष्टीची कल्पना येऊन अचंबित व्हायला होतं.
  • Log in or register to post comments

केवळ अप्रतिम मालिका.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 08/19/2012 - 12:25 नवीन
अतिशय सुंदर लेख मालिका. पाहिजे तसा दगडांचा आकार मिळविण्यासाठी छोटे छोटे चौकोन करुन पाचर मारुन हवा तसा दगड मिळविण्याची आयडिया छानच, हे माहिती नव्हतं. विठ्ठल मंदिर आवडलं. आपला पंढरपुरचा विठ्ठल तिथेच शोभला असता. संत एकनाथांचे पणजोबा संत भानुदासांनी श्री विठ्ठ मूर्ती परत आणली मूर्तीच्या या नेण्या-आणन्यांवर आमचा विश्वास आहे. हं आता मूर्ती कृष्णदेवरायांनी नेली की रामराजाने नेली हे काही माहिती नाही. श्री विठ्ठल एक समन्वयक. रा.चि. ढेरे यांचे पुस्तक चाळावे लागेल. विठ्ठल मंदिराचा आतील भागही आवडला. 'देवा तुम्ही मंदिरी कधी याल' असं एक पद म्हणुन त्या मंदिरात पुजाअर्चा चालते असे वाचलेले होते. बाकी, विजयनगरचे काही राजे स्त्रीलंपट व चैनीच होते म्हणे कुठेही सुंदर मुलगी आढळल्यास आई-वडिलांच्या संमतीने अशा मुलीस राजाकडे पाठवून द्यावे लागत असे म्हणे. अर्थात राजे-रजवाड्यांच्या काळातल्या या गोष्टी काही नवलाईच्या नसाव्यात. फक्त, शिवाशिव, भेदाभेद, आणि कडक अशी वर्ण व्यवस्थेमुळे हिंदुधर्मातील काही लोकांना हिंदुधर्मात राहणे नको त्यापेक्षा इस्लाम धर्म परवडला असा हा अनागोंदीही कारभार याच साम्राज्यात होता त्याबद्दलही तपशिलवार वाचायला आवडेल. (चुभुदेघे) - दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

//बाकी, विजयनगरचे काही राजे

जयंत कुलकर्णी
Sun, 08/19/2012 - 13:42 नवीन
//बाकी, विजयनगरचे काही राजे स्त्रीलंपट व चैनीच होते म्हणे कुठेही सुंदर मुलगी आढळल्यास आई-वडिलांच्या संमतीने अशा मुलीस राजाकडे पाठवून द्यावे लागत असे म्हणे. अर्थात राजे-राजवाड्यांच्या काळातल्या या गोष्टी काही नवलाईच्या नसाव्यात//// अहो मुलिबाळींना तीस वर्षापूर्वीही राज्याकडे पाठवावे लागत असे. त्यामुळे वाईट लोकांबद्दल ही लेख मालिका नाही. आजही कांडाकडे सुंदर मुलीला जावेच लागले. काही वाईट चालिरिती, कर्मठपणा, गलि्च्छपणा चाललाच असणार या बद्दल आमच्या मनात शंका नाही पण त्यासाठी एक वेगळी लेखमालिका लिहावी लागेल. कोणीतरी एकाने एक संस्थानिकांच्या रंगेल आयुष्याबद्दल केक पुस्तक लिहिले आहे व ते चवीने वाचणारे वाचकही आहेत. त्याप्रमाणे. पण प्रस्तूत लेखकाला त्यात रस नाही. क्षमस्व ! हं पण त्यामुळे ते राज्य बुडाले असते तर त्याचाही परामर्श घ्यावाच लागला असता..... आपण शिल्पकला इ.वर लिहायला सांगितले आहे ते मान्य करून लिहायलाही लागलो आहे. //त्यापेक्षा इस्लाम धर्म परवडला असा हा अनागोंदीही कारभार याच साम्राज्यात होता त्याबद्दलही तपशिलवार वाचायला आवडेल//// तसे असते तर जसे पूर्वी लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला तसा मुसलमान धर्मही स्वीकारला असता. .....तसे झाले नाही त्याला काहितरी कारण असावे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्याला जे आवडेल तेच लिहा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 08/19/2012 - 15:32 नवीन
कुलकर्णी साहेब, इतकी छान लेख मालिका लिहित आहात तेव्हा लेखाला केवळ आवडलं. छान, मस्त, म्हणुन जाण्यापेक्षा काही तरी अधिक लिहावं म्हणुन मी विविध विषय प्रतिसादात घुसवले इतकेच. आपण त्यावर लिहावंच असा माझा आग्रहही नाही, लेखमाला कदाचित आपण ठरवले आहे, त्या दिशेने जाणे ऐवजी भरकटु शकते. म्हणुन आपण लिहाल ते आवडीने वाचतोच आहे. आपण शिल्पकला इ.वर लिहायला सांगितले आहे ते मान्य करून लिहायलाही लागलो आहे मनःपूर्वक आभार. :) अरे हो, तटबंदीतील प्रवेशद्वार मस्तच आहे आणि आजही टीकुन आहे, ते पाहुन आनंद वाटला. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

मनापासून धन्यवाद !

जयंत कुलकर्णी
Sun, 08/19/2012 - 16:28 नवीन
मनापासून धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१

मन१
Sun, 08/19/2012 - 14:29 नवीन
संत एकनाथांचे पणजोबा संत भानुदासांनी श्री विठ्ठ मूर्ती परत आणली मी तर ऐकलं होतं पुंडरिक(की पुंडलिक?) नावाच्या माणसाने ती मूर्ती उत्तरेतून आणली. खरे खोटॅ रा चिं ढेर्‍यांचे संदर्भ देणारा धन्या आणि खट्टामीठा ब्लॉगच जाणोत. बाकी, विजयनगरचे काही राजे स्त्रीलंपट व चैनीच होते म्हणे कुठेही सुंदर मुलगी आढळल्यास आई-वडिलांच्या संमतीने अशा मुलीस राजाकडे पाठवून द्यावे लागत असे म्हणे. अर्थात राजे-रजवाड्यांच्या काळातल्या या गोष्टी काही नवलाईच्या नसाव्यात. ह्याबद्दल अधिक स्वतः धागाकर्त्यानं वरती लिहिलचं आहे. फक्त, शिवाशिव, भेदाभेद, आणि कडक अशी वर्ण व्यवस्थेमुळे हिंदुधर्मातील काही लोकांना हिंदुधर्मात राहणे नको त्यापेक्षा इस्लाम धर्म परवडला असा हा अनागोंदीही कारभार याच साम्राज्यात होता त्याबद्दलही तपशिलवार वाचायला आवडेल. हो. मलाही पटते. सर्वच भारतीय मुस्लिमांच्या पूर्वजांना बळजबरीने धर्मांतर करावे लागले हे पटत नाही. इथला वर्णभेद ज्यास भोगावा लागत होता, त्याने वैतागून, त्याच वेळी सूफी संप्रदायाने प्रभावित होउन( उदा:- अजमेर शरीफ, ख्वाजा मोइनुद्दिन चिश्ती हे बाराव्या शतकातच भारतात आले होते. घोरीचा अंमल सुरु होण्याच्या आधीच ते अजमेरल अपोचले होते म्हणतात.) कित्येकांनी धर्मांतर केले. अशा प्रकारचे धर्मांतर सर्वदूर पसरलेही असते. पण झाले काय की स्थानिक ठिकाणीच वारकरी भक्तिमार्गी परंपरा, शीख संप्रदाय, बसवेश्वरांचा "अंग आहे त्याला लिंग धारण करण्याचा अधिकार आहे." असा केलेला जात्-पात विरहित उद्घोष ह्यामुळे एक चांगला पर्याय मिळाला. आहे त्याच धर्मात काही प्रमाणात सुधारणा दिसल्या. व ह्या प्रकाराची ओढ नंतरच्या काळात बरीच कमी झाली. ह्या सर्वांबद्दल एक धागा काढणार होतो. पण इथलं एकूण वातावरण पाहता शांत डोक्यानं मुद्दा डिफेंड करणं माझ्याबाजूनं अवघड जाइल; अजून खूप जास्त संदर्भ आधी मिळवावे लागतील म्हणून थांबलोय. अर्थात हे इथं खूपच अवांतर ठरतय. सॉरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दुवे द्या. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 08/19/2012 - 15:35 नवीन
>>>>>> मी तर ऐकलं होतं पुंडरिक(की पुंडलिक?) नावाच्या माणसाने ती मूर्ती उत्तरेतून आणली. च्यायला, हे कुठं ऐकलं ? काही दुवे, कै पुरावे, कै संदर्भ ? मिपावरील रुढी परंपरा आणि पद्धत पाहता अवश्य तिथे संदर्भ द्यावेत आणि खरडवहीत लिहावे. धन्यवाद. ;) रा.चि. ढेरे लिहितात. '' संत भानुदासांच्या काळात कोणा विजयनगरच्या हिंदु राजाने मूर्ती स्वतःच्या राजधानीत नेल्या आणि भानुदासाने ती परत आणल्याची कथा मराठी संतचरित्रपर ग्रंथात अनेक ठिकाणी रंगवून सांगितली आहे. परंतु त्या कथेच्या सत्यतेच्या आणि ती सत्य असेल तर तिच्या काळाचा निर्णय करण्याची विश्वसनीय साधने उपलब्ध नाहीती. भानुदासाच्या घराण्याच्या वास्तूत म्हणजे पैठण येथील संत एकनाथांच्या वाड्यातील देवघरात जी विठ्ठल मूर्ती आहे, तिचे ' विठ्ठल विठ्ठल ' हे नाव विजयनगरच्या विठ्ठलाशी संबद्ध आहे; तिचे ध्यानही विजयनगरकालीन दक्षिणी विठ्ठमूर्तीसारखे आहे. आणि ती आकाराने लहान असल्यामुळे विजयनगरहुन महाराष्ट्रात परत येतांना 'देव भानुदासाच्या पडशीत मावण्याइतका लहान झाला' या कथासंदर्भांशी जुळणारी आहे. दक्षिणी परंपरेत मात्र विजयनगर येथे विठ्ठल पंढरपुराहुन नव्हे, तर वेंकटगिरीहून आला, असे मानले जाते''* मूर्ती भानूदासांनी आणली इतका अर्थ वरील उता-यातून स्पष्ट होतो असे वाटते * श्री विठ्ठल : एक महासमन्वय . रा.चि. ढेरे. पृ.क्र. १३३. -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

सूफी काय करत होते...

जयंत कुलकर्णी
Sun, 08/19/2012 - 17:27 नवीन
//सर्वच भारतीय मुस्लिमांच्या पूर्वजांना बळजबरीने धर्मांतर करावे लागले हे पटत नाही. इथला वर्णभेद ज्यास भोगावा लागत होता, त्याने वैतागून, त्याच वेळी सूफी संप्रदायाने प्रभावित होउन( उदा:- अजमेर शरीफ, ख्वाजा मोइनुद्दिन चिश्ती हे बाराव्या शतकातच भारतात आले होते. घोरीचा अंमल सुरु होण्याच्या आधीच ते अजमेरल अपोचले होते म्हणतात.) कित्येकांनी धर्मांतर केले///// पहिला सूफी होता अली-उल-हुजवेरी - १००० ते १०६३ (क्रूसेडचा काळाच्या इकडे तिकडे) आपण जेव्हा असे म्हणणे मांडतो तेव्हा याचे प्रमाणही बघावे लागते. उदा. भाजपवाले व कॉंग्रेसवाले तेवढेच चोर आहेत असे जेव्हा कोणी प्रतिपादन करतो व जर ते खरे असेल तर चोरांचे व चोरीचे प्रमाण किती आहे यावरच शेवटचे अनुमान काढता येईल. हे वाक्य पटले असेल तर आपल्या वाक्यातील फोलपणा आपल्या लक्षाते येईल. असो.. अरब व्यापारांचा हिदूस्थानातील मलबार व कोकण किनार्‍यावरील बंदरातून व्यापार उदीम चालूच होता. इस्लाम स्थापन झाल्यानंतर पन्नास एक वर्षातच अरब येथे येजा करू लागले होते (ज्ञात अगोदरही असू शकतील). त्याच्या अगोदर येथे पळून आलेल्या मुसलमानांना नबायत मुसलमान असे म्हणतात. त्यांचा धर्म हा नव्हता.. पण ते जाऊदेत.... आपल्या बर्‍याच लोकांची समजू असते की सूफी संत साधू हे आपल्या संतसाधू प्रमाणे फक्त इश्वरभक्तीच शिकवत असत व त्याचा प्रसार करीत असे. हा एक मोठा भ्रम आहे. भारतातील त्यांना पाहिजे होत्या त्या मंदीरांच्या मशिदी करण्याचे काम यांनी मोठ्या तडफेने भाग पाडले. त्यासाठी त्यांनी तात्कालीन सत्तेचे सहाय्य घेतले व त्याबदल्यात त्यांना धर्मपरिवर्तनाच्या कामी सहयोग दिला. यांनी अत्याचार करून लढाया/दंगली करून हिंदू बाटवले का ? नाईलाजाने याचे उत्तर होय असे द्यावे लागते. यांना याच कारणाने मुसलमान रा्जांचे संरक्षण व मदत मिळत असे. जे सूफी संत यात धडाडीने काम करत नसत त्यांना सुलतानाच्या अवकृपेला सामोरे जावे लागत असे. उदा, दिल्लीच्या निजामौद्दीन अवलियाला पकडून कोतवालासमोर हजर व्हावे लागले होते. (त्यासाठी कारण तो कव्वाली म्हणतो हे दिले गेले होते पण खरे कारण ते नव्हते). सेतू माधवराव पगडी याबाबतीत काय म्हणतात हे बघूया - शब्द माझे आहेत......पण सुफी हे कर्मठ इस्लामच्या विरूद्ध होते हा समज वस्तिस्थितीला सोडून आहे. सुफींचा कोणताही पंथ असो- चिश्ती, कादरी, सोहरावर्दी, नक्शबंदी...इ... या सगळ्या संप्रदायातून शरीयतचे पालन करा हाच आदेश देण्यात येत होता. सूफींनी त्यांच्या प्रार्थेनेत गायन वादन इत्यादी प्रकार वापरले या बद्दल अनेक आक्षेप घेण्यात आले व वादही घालण्यात आले. पण सूफींनीही त्यांच्या गायनातून करमणूक करणारे आकर्षक असे भाग काढून टाकले हेही सत्य आहे. सूफींच्या मते त्यांचा भक्तीमार्ग हा शरियतचाच एक भाग आहे व त्याला पूरक आहे. हे मत एकदा ग्राह्य धरले की शरियत पाळणे आले त्यामुळे मुसलमानांच्या कर्तव्यापैकी एक महत्वाचे कर्तव्य “धर्मप्रसार” हेही त्यांचे एक कर्तव्यच होऊन बसले. हजारो नाही लाखो इतर धर्मियांनी मुसलमान धर्माची दीक्षा दिली व त्यासाठी साम भेद दंड असे सगळे उपाय वापरण्यात आले. यात ख्वाजा मोईनोद्दीन चिश्ती, फरिदोद्दीन गंज शक्कर, बू अली कलंदर पानिपती, जहांगीर सम्नानी, शर्फोद्दीन मुनेरी, मुंतजबोद्दीन, बुर्हासणोद्दीन गरीब शहा, निजामोद्दीन अशी अनेक नावे या संदर्भात येतात. धर्मप्रसार हे कर्तव्याचा एक महत्वाचा भाग ठरल्यावर त्यात आक्रमकपणा आपसूकच येतो तसा येथेही आलाच. मंदिरे आणि मठांवर जबरदस्तीने ताबा घेणे, मूर्तींचा विध्वंस करणे, मंदिराच्या जागेवर मशीदी उभारणे, किंवा मंदिराचे दगड मशीदीच्या बांधकामात घालणे हे सुफींचे उद्योग चालू झाले. मोईनोद्दीन चिश्तीचा दर्गा आज जेथे आहे तेथे पूर्वी मंदिर होते. पैठणच्या निजामोद्दीनच्या दर्ग्याच्या जागी कालीचे देऊळ, मौलाना दर्ग्याच्या जागी महालक्ष्मीचे देऊळ हे सर्व प्रकार सूफींची शिकवण एक व कर्तृत्व एक हे सिद्ध होते. (यात राजसत्ता आपल्या पाठीशी आहे याचा आत्मविश्वास त्यांच्या मनात होता व तेही नैसर्गिक होते. महाराष्ट्रात मराठ्यांचे राज्य स्थापन झाल्यावर सूफींचे हे कार्यक्षेत्र संकुचित झाले व ते हौद्राबाद इ. भागात वाढले. औरंगजेबाचा धार्मिक कट्टरपणा वाढविण्यात सूफी संतांचा फार मोठा हात होता. (नक्षबंदी कय्यूमचे घराणे) त्यांच्या आग्रहामुळेच हिंदूंवर ज़िज़िया कर लादण्यात आला. त्याचा अर्थकारणाशी काहीही संबंध नाही हे वेगळे सांगायला नको. दारा शिकोह या सगळ्याला अपवाद होता पण फक्त अपवादच. त्याने मज़मुल बहरैन” या नावाचा ग्रंथ लिहिला होता ज्यात त्याने सगळ्या धर्माची तत्वे एकच आहेत इ...असे प्रतिपादन केले होते असे म्हणतात. या दाराला औरंगजेबाने काफ़र म्हणून हिणवले ते सूफी तथाकथीत नक्शबंदी संत कय्यूमच्या चिथावणीनेच. मुसलमानांची राजसत्ता बळकट करण्यासाठी सगळे प्रयत्न सूफी संप्रदायाकडून होत असत. “तंजकरे अवलिया-ए कराम” या ग्रंथकर्त्याने म्हटले आहे “हिंदूस्थानात मुसलमानांची राजवट दोन प्रकारची होती. एक बादशहा, सुलतान आणि अमीर उमरावांची तर दुसरी मठातील या सूफी तथाकथीत साधूसंतांची. एकांच्या हातात सत्ता होती तर दुसर्यामनी लोकांच्या धर्मावर सत्ता गाजवली. या दोन्ही सत्तांचे उद्दीष्ट एकच होते आणि ते म्हणजे इस्लामचा प्रसार. बळजबरी्ने. तलवारीने. सूफी आणि भागवत धर्मात देवाण घेवाण होत होती हाही असा एक भ्रम आहे. असे काही होत नव्हते...इतिहास हा आहे. आणि तोच राहणार आहे. हं आत्ता याचा संदर्भ घेऊन या काळात काय करायचे, काय शिकायचे हे समाजधूरीणांचे काम आहे.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

हे ठाउक नव्हतं....

मन१
Sun, 08/19/2012 - 17:32 नवीन
सूफी- भागवत प्रबहवांबद्द्ल. कित्येकजण उत्तरेत कबीर वगैरेंचं उदाहरण देतात. आणि आपल्याकडे तुकारामांच्या सुरुवातीच्या अभंगांवरही सूफी प्रबहव दिसून येतो म्हणतात. बाकी सूफी हे ही बळजबरी करावयास मागेपुढे पहात नसत, हे नव्यानेच ऐकले. ह्यामुळेच अधिकाधिक संदर्भ मिळाल्याशिवाय चर्चा सुरु करणार नाही असे म्हणालो होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

सूफी हे ही बळजबरी करावयास मागेपुढे पहात नसत, हे नव्यानेच ऐकले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 08/19/2012 - 18:07 नवीन
कुलकर्णी साहेबांचं म्हन्नं अगदी करेक्ट आहे. सुफी पंथाचा मुख्य उद्देश धर्म प्रसारच होता त्यांचे मार्गही सत्तेचा आधार घेऊन धर्माची जबरदस्तीच करणे हाच होता. आम्ही याच सुफी पंथाच्या कार्याबद्दल इथं आणि त्याखालील काही प्रतिसादात लिहिलं होतं. तुम्ही आम्हाला मराठवाड्याचा म्हणुन दाद तर सोडा साधी पोच दिली नै राव. सुफी पंथांनी आपल्या मराठवाड्यात लै उद्योग केले आहेत. तरी मागे तुम्हाला म्हणालो होतो. तुम्ही मराठवाड्यातील एकेक भाग घ्या लिहायला तर तेही घेत नाही. (तुमच्या इतकी म्हैती मला असती ना तर असो) [उद्योग शब्दामुळे कोणाच्या भावना बिवना दुखावल्या असतील तरसॉरी हं ] -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

अरेच्च्या ! हे वाचले नव्हते

जयंत कुलकर्णी
Sun, 08/19/2012 - 19:43 नवीन
अरेच्च्या ! हे वाचले नव्हते नाहीतर याचा दूवा निश्चितच दिला असता. पण आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे....

मन१
Mon, 08/20/2012 - 16:50 नवीन
हे कसं सुअत्लं म्हणायचं नजरेतून? तो धागा, त्यावरचे प्रतिसाद मी ट्रॅ़क असा केलाच नाही. (त्याचे काहीतरी विडंबन आलेल होते, ते मात्र जाम आवडले.) तरी मागे तुम्हाला म्हणालो होतो. तुम्ही मराठवाड्यातील एकेक भाग घ्या लिहायला तर तेही घेत नाही. इथे वाइट वाइट्ट अडकलोय मास्तर. हातच मोकळा होइना. किंवा अजून एक उत्तर:- पहले आप पहले आप. ;) मराठवाडयत बराच काही उच्छाद निजामाच्या राजवटीत घातला गेला ह्याची कल्पना आहे. पण त्यात सूफी सामील होते, हे ठाउक नव्हतं. . तुमच्या इतकी म्हैती मला असती ना तर असो वाक्य पूर्ण करा की.... तुमच्या इतकी म्हैती मला असती ना तर झाकली मूठ सव्वा लाखाची असं मानून गप्प बसलो असतो. उगीच नाही तिथे अज्ञान प्रदर्श केलं नसतं. . पण काय करणार, राहवत नाही, बोटं खाजतात, कीबोर्ड बोलवतो. बस. अजून काय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर लेख..मस्त कुलकर्णी

अविनाशकुलकर्णी
Sun, 08/19/2012 - 12:45 नवीन
सुंदर लेख..मस्त कुलकर्णी साहेबांचा जय जय कार असो..
  • Log in or register to post comments

सुंदर लेख..मस्त कुलकर्णी

अविनाशकुलकर्णी
Sun, 08/19/2012 - 12:45 नवीन
सुंदर लेख..मस्त कुलकर्णी साहेबांचा जय जय कार असो..
  • Log in or register to post comments

मस्त,अत्यंत माहीतीपुर्ण लेख.

प्राध्यापक
Sun, 08/19/2012 - 19:29 नवीन
मस्त,अत्यंत माहीतीपुर्ण लेख.
  • Log in or register to post comments

मस्त

गोंधळी
Sun, 08/19/2012 - 21:12 नवीन
लेख व त्यावरील प्रतिसाद दोन्ही....... वाचतो आहे.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा