गल्फ मधील अनुभव आणि माझा झालेला फायदा..
प्रिय मिपा करांनो,
गेली ५/६ वर्षे मी गल्फ आणि भारतात जॉब निमित्ताने फिरत आहे.त्या आधी १७ वर्षे फक्त भारतातच नौकरी करत असल्याने गल्फ विषयी जास्त माहिती न्हवती.कुवैत, यु.ए.इ आणि सौदी हे देश आणि इथली मॅनेजमेंट बघीतली आणि नकळत तूलना झाली. (एक भारतीय नागरिक म्हणून , माझे भारतावर प्रेम आहे, पण... आपण मागे का आहोत, ह्याचा विचार करावासा वाटला म्हणून लिहीत आहे.)
१. कायदा आणि कायद्याचा मान... २००७ मध्ये मी दुबईला होतो.सलमान साहेबांची केस चालू होती.तीच ती कारच्या अपघाताची.त्याच सुमारास माझ्या कं.तील एका मित्राने, हाय-वे वर , एका माणसाला उडवले.मित्राने फोन करून पोलिसांना बोलावले.मग पोलिस आल्यावर, त्यांच्या परवानगीने, घरी फोन केला.साहेब मस्त ए.सी. कोठडीत.मग जबानी वगैरे इतर सोपस्कार पार पडले.अपघात स्थळावर पोलीसांनी परत एकदा तालीम घेतली.गाडीचा स्पीड , त्याने त्या माणसाला केंव्हा बघितले, ब्रेक केंव्हा मारला. १७६० गोष्टींची नोंद केली.
अपघात झालेला मनुष्य "कोमात" गेला होत.त्याला हॉस्पीटल मध्ये ट्रीटमेंट चालू झाली आणि ती पण सरकारी खर्चाने.२/३ दिवसांनी त्याची जबानी घेतली.त्या माणसाने त्याची चूक कबूल केली.६व्या दिवसाला कोर्टाने निर्णय दिला की मित्राची काही चूक नाही.
अपघात झालेल्या माणसाला तो २ महिन्यांनी बरा झाल्यावर. ४/५ दिवसांनी शिक्षा दिली, कारण हाय्-वे वर रस्ता ओलांडू नये असा कायदा आहे.
कं.तील इतर माणसे म्हणाली की. इथल्या शेखच्या मूलाला पण ट्रॅफिक पोलीस सोडणार नाहीत. ट्रॅफिक पोलीसांना खूप मान आहे आणि कामाच्या बाबतीत ते तेव्हढेच कठोर पण आहेत.
२. मॅनेजमेंट... गल्फ मधील सगळ्या मुलांना शिकवले जाते, की ते शासनकर्ते आहेत.२५व्या वर्षीच त्यांच्यावर जबाबदारी टाकल्या जाते.वरचे अधिकारी वेळो-वेळी त्यांना मदत करत असतात.इथे लहान-लहान मूले सर्रास गाड्या चालवतात.बाजूला वडील बसलेले असतात आणि ते पण त्याला मदत करत असतात.
३. भाषा...गरज असेल तरच इंग्रजीचा वापर.इथे बर्याच वेळी , मीटींग मध्ये अरेबिक मध्ये संभाषण चालते.कोर्टात आणि इतर सरकारी खात्यात अरेबिक मध्ये जे काही लिहिले असेल तेच सत्य.
आपल्याकडे पण ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्या होत्या म्हणूनच आपण एकेकाळी हिंदूस्थानाच्या राजाचे रक्षण केले.(पानीपतची लढाई)
१. कायदा आणि कायद्याचा मान... राघोबांनी केलेला खून आणि न्यायमुर्तींचा निवाडा
२. मॅनेजमेंट... बाजीराव पेशवे, माधवराव पेशवे ह्यांनी २०/२५ वर्षांचे असतांनाच पेशवेपद सांभाळायला सूरुवात केली..(इथे पेशव्यांचे उदाहरण हे "मॅनेजमेंट" म्हणून दिले आहे.शासनकर्ते म्हणून नाही)
३. भाषा... १८१८ पर्यंत महारष्ट्राची , मराठी , भाषा शासन्कर्त्यांपासून ते थेट तळागाळ्यातील लोक वापरत असत आणि बहूदा इंग्रज पण ही भाषा वापरत असावेत्.इथे अमेरिकन आणि युरोपियन लोक जर अरेबिक बोलायचा प्रयत्न करतात्.मग त्या काळी पण ते मराठी बोलायचा प्रयत्न नक्कीच करत असतील.(जाणकार इतिहासकारांनी प्रकाश टाकावा)
मी घेतले धडे आणि माझा झालेला फायदा...
१. कायदा आणि कायद्याचा मान... आमच्या घरात काही नियम, आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले आहेत.
२. मॅनेजमेंट... लहानपणापासून मुलांना त्यांची खरेदी स्वतःची स्वतः करायला दिली.सुरुवातीला खरेदी करतांना फसले.पण आज काल तेच स्वतः बाजारात जातात, भाव काढतात, तूलना करतात आणि मग वस्तू विकत आणतात... हे मॅनेजमेंटचे धडे मी गल्फ मध्ये येण्या अगोदरच मुलांना देत होतो आणि मी योग्य करत आहे, ह्याची खात्री इथे आल्यावर झाली.
३. भाषा... आम्ही सगळेच मराठी माध्यमात शिकलो.अगदी अमेरिका आणि इतर देशांत स्थायीक झालेले देखील. पण आज-काल सगळेच ज्ञान इंग्रजीत असल्याने मुलांना सेमी-इंग्रजी मिळाले (शाळेत काही ठराविक मार्क्स मिळाले, तरच , परवानगी मिळते) तेंव्हा मी नकार दिला नाही.
माझी विचारसरणी चूकीची असली तर जरूर सांगा आणि इथे गल्फ मधील आणि इतर देशांतील मंडळी असतीलच. तर त्यांनी पण आपले अनूभव सांगावेत , अशी विनंती करतो. आपला देश बदलायला ह्याचा उपयोग होणार नाही , आणि शासनकर्त्याने बदलावे, अशी अपेक्षा पण नाही.त्यांना बदलवणे , आपल्याला शक्य होणार नाही.त्यामूळे शासनाला सल्ला न देता, परदेशातील अनुभवामूळे , आपला वैयक्तीक फायदा कसा झाला तेच सांगीतले तर जास्त बरे...
एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सूपंथ...
प्रतिक्रिया
धाग्याचे स्वागत !!
छोट्या छोट्या सवयींतुन सुयोग्य प्रशसनाची वीण घट्ट होते.
आपले अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद. इतर मंडळींचे विचार ऐकायला उत्सुक.
अवांतरः नागरीकांनी काय केलं तर भारतातलं प्रशासन वगैरे सुधारेल माहित नाहि... पण सद्यस्थितीत भारत देश एका प्रचंड मोठ्या स्थित्यंतराच्या उंबरठ्यावर उभा आहे असं सारखं जाणवतय... आणि उंटाच्या पाठीवरील कुठली काडी काम साधेल याचा नेम नाहि.
अर्धवटराव
-रेडि टु थिंक
आवडले...
मुवि - आपले हे अनुभवाचे बोल खरंच प्रेरणादायक आहे. आजच्या जगात टिकून राहायचे असेल तर आपण वर्णिलेल्या गोष्टी फारच मोलाच्या आहेत.
बादवे - अप्पून को इस में से वो क्या बोलते हैं, हां विडंबन की खुशबू आ रैली हैं!!
नाही रे बाबा...
हे विडंबन नाही आहे....
सही====> नानू सरंजामे म्हणाला, "मी झोपतो करून हिमालयाची उशी"====
ठीक है भाय...
अच्छा हुआ टैम पे किलियर कर दिया नही तो फोकट में टेन्सन हो जाता...
हम्म
आधी राजस्थान बदलू पाहू. कारण तिकडे उंट आहेत.
tan(α)
मुवि, लेख आणि निष्कर्श चांगले आहेत!
धन्यवाद!
_____________________
जगतो तेच लिहीतो
साधारणपणे मुलं काय वयाची
साधारणपणे मुलं काय वयाची असताना त्यांना खरेदी वगैरेंची सवय लावली?
मलासुद्धा माझ्या लेकीला विचार करुन खरेदीची सवय लावायचीये. ती जरा काही चमकदार दिसलं की छान आहे म्हणुन घ्यायचा हट्ट करते.
***********************************************************
http://www.facebook.com/shilpket
http://shilpasview.blogspot.com/
माझ्या पोराला ही स्वावलंबी
माझ्या पोराला ही स्वावलंबी सवय वय वर्षे १ या वयापासून आहे. शॉपिंगकार्टमधे कार्ट्याला बसवून सर्व शॉपिंग करुन बिलिंग करत असताना आपण अजिबात न घेतलेल्या वस्तू (त्यातल्या बहुतेक विशेष चकचकीत आणि आकर्षक पॅकिंगच्या) आपल्या बास्केटीत अवतरलेल्या दिसल्यावर अचंबित व्हायचो. मग एकदा गुपचूप लक्ष ठेवलं तेव्हा चिरंजीव चहा तोडून टोपलीत भरणार्या आसामी युवतींप्रमाणे जवळच्या रॅक्समधून हाती लागेल त्या वस्तू बास्केटीत टाकत होते. त्यातही आकर्षक वेष्टनाला प्राधान्य होतं. आता हल्ली शॉपिंग कार्टच कार्ट्याच्या हाती असते. आम्ही झेपेल तितपत पळत पळत आम्हाला जमतील तशा काही गृहोपयोगी वस्तू त्यामधे टाकण्याचा प्रयत्न करतो.
-----------------स्वाक्षरी सुरु--------------
छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..
-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..
लेख आवडला.. यातून देश बदलेल
लेख आवडला..
यातून देश बदलेल की नाही माहित नाही कारण "माझा देश" ही भावनाच कुठेतरी लोप पावत चालली आहे. आपलं घर सुधारलं तरी पुष्कळ.
ईतकच काय मिपावर देखील नियमाने वागा, भ्रष्टाचाराचे समर्थन करु नका असं म्हंटल तर लोक उलट ते करणं कसं योग्य आणि बरोबरच आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
अगदी सहमत.... आपण सरकार,
अगदी सहमत.... आपण सरकार, शासन-व्यवस्था, पुढारी/नेते ह्यांना दोष देण्यापेक्षा स्वतः बदलायला हवं...ते म्हणतात ना "बदल हवे आहेत का? मग आधि स्वतः बदल" असं व्हायला हवं, सगळे जण त्या 'स्पिरीट' मधे वागायला हवे.
(आज काल इथे नियम पाळले कि उलट वेड्यातच काढतात, 'मुर्खच आहे' असे काहि 'लुक्स' देतात' .... )
------------------------------------------------
मनं वढाय वढाय.....
छान
छान अनुभव कथन!
[अवांतर: नक्कीच तेथील पोलिस कर्मचार्यांचा (वाहतूक) पगार काही करोड रुपयात असणार अन्यथा काही हजार-लाख रुपयांमध्ये सेटलमेंट नक्कीच झाली असती, भारतातील पद्धत बघता. ]
माझ्या माहितीप्रमाणे
माझ्या माहितीप्रमाणे पोलिस कर्मचार्यांचा (वाहतूक) पगार हा ठरवुन दिलेला असतो.
मात्र नियम तोडताना त्यांनी पकडलेल्यांना लोकांना केल्या जाणार्या दंडाच्या रकमेतील काही भाग पोलिस कर्मचार्यांना प्रोत्साहन भत्ता म्हणुन की काय मिळतो.
बराच टप्पा गाठायचा आहे
याचाच अर्थ अरब आपल्या पेक्षा किमान २५० वर्षे मागे आहेत. आपण पेशवे कालात जे करायचो त्या गोष्टी ते अत्ता करत आहेत. बराच टप्पा गाठायचा आहे अजुन त्यांना.
पैजारबुवा,
_______________________
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते
हम्म्म...! तुमचे अनुभव
हम्म्म...! तुमचे अनुभव चांगलेच आहेत त्यापासून प्रेरणा घ्यावी असेच आहेत. पण ते प्रातिनिधिक नाहीत. निदान संपूर्ण गल्फचा विचार करता तरी नाहिच नाही.
ह्याचा अर्थ बाकी गल्फ देशांमध्ये फार वाईट परिस्थिती आहे असे आहे का? तर नाही. तसे नाही. पण कुठेतरी परिस्थिती बिघडायला सुरुवात झाली आहे. नियम बनविणारी संस्था (शासन) वेगळी असते आणि त्याची अम्मलबजावणी करणारी संस्था (कर्मचारी वर्ग) वेगळी असते. नियम चांगले असतात पण त्यांची अम्मलबजावणी करताना अरब आणि परदेशी असा भेदभाव, नेहमीच नाही पण खुपवेळा, केला जातो. भ्रष्टाचार बोकाळू लागला आहे. मेहनत करून पैसा कमवयची संस्कृती अजून म्हणावी तेवढी रुजलेली नाही.
नियम तोडण्याचे प्रमाण फार कमी आहे हे मान्य. पण त्या मागे नियमांचा आदर कमी आणि पोलीसांची भिती जास्त असा प्रकार आहे. पोलीसांची भिती थोडी कमी झाल्या बरोबर रहदारीचे नियम तोडण्याचे प्रमाण भयंकर वेगात वाढले आहे.
माझ्या सारख्या अनेकांना इथे येऊन रहदारीच्या शिस्तीची सवय लागली. त्याचे फायदे जाणवले पण त्यामुळेच इतरांच्या, अरेरावी करून, बेशिस्त वर्तनाचा त्रास होतो. तशी, भारतापेक्षा कितीतरी चांगली शिस्त असलेल्या रहदारीच्या सवयी मुळे कधी भारतात आल्यावर पुण्याच्या बेशिस्त रहदारीचा मानसिक त्रास होतो. उलट तिथे शिस्तीत वाहन चालवणार्या चालकाकडे तिथली (काही) माणसे 'काय मूर्ख माणूस आहे', अशा नजरेने बघतात.
औषधं भयंकर महाग आहेत. पण भेसळीची शक्यता कमी असते(जवळजवळ नाहीच). पाणी (महानगरपालिकेचे), अन्नधान्य शुद्ध स्वरूपात आहे.
मनाने कितीही केली तरी इथली - तिथली तुलना विषम परिस्थितीतील आहे. जेवढी लोकसंख्या, धर्म, जाती, बेकारी, भ्रष्टाचारातून आलेले वैफल्य आणि बिन महत्त्वाचे बनत चाललेले मानवी जीवन ह्या भारतिय चित्रा बरोबर गल्फ मधील, त्या मानाने अल्प असलेल्या वरील सर्व समस्या, चित्र ह्यांची तुलना समपातळीवर होऊ शकत नाही.
माझा अरबी स्पॉन्सर कधी भारतात येतो तेंव्हा इथली लोकसंख्या, वेगवेगळ्या धर्म-जातींच्या संकल्पना ह्यांना बरोबर घेऊन भारताने केलेल्या प्रगतीने थक्क होऊन जातो, भाराऊन बोलतो.
मी स्वतः बर्यापैकी शिस्त लावून घेतली आहे. ते ह्या देशाचेच, मस्कतचेच, देणे आहे.
मान्य आहे...
" तुमचे अनुभव चांगलेच आहेत त्यापासून प्रेरणा घ्यावी असेच आहेत. पण ते प्रातिनिधिक नाहीत. निदान संपूर्ण गल्फचा विचार करता तरी नाहिच नाही."
हे १००% मान्य आहे...
५/६ वर्षांत जसे गल्फ समजले. तसे लिहिले.त्यातून मला काय शिकता आले आणि माझी वैयक्तिक काय प्रगती झाली, त्याबद्दल लिहिले आहे.
गल्फ आणि भारत, ह्यांची तूलना होवूच शकत नाही.
सही====> नानू सरंजामे म्हणाला, "मी झोपतो करून हिमालयाची उशी"====
नियमांचा आदर असो वा कायद्याचा
नियमांचा आदर असो वा कायद्याचा बडगा... परिस्थिती चांगली आहे हे नक्की.
भारतातही नियमांचा आदर करत बघण्याची वाट बघत बसले तर अजून काही शतके लागतील... पण कायद्याच्या बडग्याने काम नक्की लवकर होईल. त्यातही शिक्षा शारिरिक असतील तर भारतात जास्त इफेक्टिव्ह. भारतीय माणूस मानसिक शिक्षा, जगजाहीर अपमान अशा गोष्टींना भीक घालत नाही.
मागे कधीतरी पोलीस सिग्नल तोडणार्या दुचाकीस्वारांना भर चौकात पाच का दहा उठाबशा काढायची शिक्षा देत होते. एकदा एक फोटो पाह्यला त्यात आजूबाजूचे बघे हसत होते, तो पोलीसही हसत होता आणि तो उठाबशा काढणाराही दात दाखवत होता. अशा शिक्षांचं कौतुक होतं पण रिझल्ट शून्य...
कधीकधी कर्फ्यू असला की ते एस. आर. पी. येतत बघा काठ्या घेऊन.. आणि कुणाला लागतंय, कुठे लागतंय हे न बघता काठ्या फिरवायला लागतात... मग सगळे आपसूक पळतात.
बाकीच्या रस्त्यावर हीरोगिरी करणारे आणि नियम तोडाणारे सदर्न कमांडच्या जवळपास गेले की जरा सावरतात... तिथे पुणे पोलीस नसतात.. आर्मीचे जवान हटकायची शक्यता असते..
गल्फमधे सगळे घाबरून असतात. कायदे मोडले की होणारा दंड रडायला लावतो. सद्ध्या कतारमधे सिग्नल तोडला की कमीत कमी ६००० रियाल [ आजच्या भावाने ८५०००-९०००० रुपये ], ड्रायव्हिंग करताना मोबाईलवर बोलताना पकदलं तर ३००० रियाल [ ४००००-४५००० रुपये ] असे दंड आहेत. असे दंड भरायला लागले तर कमवायचे किती आणि गमवायचे किती...? बरं... पोलीसमामा काही सातारा सांगलीचे नसतात... आपल्या गल्लीतले नसतात. त्यांना चिरीमिरी द्यायची सोय नाही. इथे पोलीसांना टोयोटा लेन्डक्रूजर दिल्या आहेत आणि त्यांचे पगारही भरभक्कम आहेत... त्यांना काय देणार तुम्ही.. आणि देण्याचा प्रयत्न केला की अजून एक गुन्हा... मग खल्लास..!
एम.जी.
पोलीसमामा काही सातारा
हे काही समजले नाही.
मुंबई पुण्याचे काही विषेश असतात का ?
दुबईत असताना माझा पोलिसांचा
दुबईत असताना माझा पोलिसांचा आलेला अनुभव चांगला होता. (तोच शारजाह मधला एकदम विरुद्ध.)
एकदा मी एका गाडीला ठोकलं आणि ती ठोकलेली गाडी पलटी खाउन एकदम उलटीच झाली. माझं धाबं पार दणाणल होत. सोबत बायको आणि १० महिन्याची लेकं. वेळही संध्याकाळची. घरापासुन ५०-६० किलोमिटर लांब एका मॉल जवळ. मॉल असला तरी आजु बाजुला ओसाड वाळवंट. (डेव्हलपमेंट चालु होती.)
पहिल्यांद्या धाव घेतली त्या गाडीकडे. आतुन एक अरबी माणुस उतरला. (खरतर माझी चुक नव्हती. त्याने गाडी चुकीच्या लेन मधुन आणली, ती ही काहीही सिग्नल न देता. माझ्या गाडीचा वेगही त्याच्या पेक्षा कमी होता. बाजुला गटार सदृश्य खड्डा खणला होता. त्यात पडुन त्याची गाडी उलटी झाली होती.)
तो धड धाकट बाहेर आलेला पाहुन जरा धीर आला. मी पोलिसांना बोलवुया म्हटल्यावर तोच नको म्हणाला. पण बाजुने जाणार्या पेट्रोलिंग कारने पाहिलं आणि ते आमंत्रण न देताच आले.
दोघे अरेबिक मध्येच बराच वेळ बडबडत होते. म्हटल खल्लास आता तो त्याच्या देशबांधवाचच ऐकणार. येव्हाना बायको लेकीला कडेवर घेउन आली होती. तिने कपाळावर भांगेत लिप्स्टिक स्टाईलचं 'सिंदुर' लावल होतं. ते पाहुन तो अरबी आणि पोलिस दचकला. त्यांना वाटलं की बायकोला खोक पडुन रक्त येतय की काय? १० वेळा सॉरी सॉरी म्हणाले. मी ही काही सारवा सारव करण्याचा प्रयत्न नाही केला.
मी पोलिसांकडे माझं गार्हाणं मांडलं की मी कसा स्पिड लिमिटमध्ये गाडी चालवत होतो, लेन सांभाळुन. आणि हा मनुष्य चुकीच्या लेन मधुन ओव्हर टेक करत आला तेही सिग्नल न देता त्यामुळे मी धडकलो. (शक्यतो मागुन धडक देणाराच चुकीचा असतो असा एक समज असतो.)
लेकीला वेळ साधुन रडायच बाळकडु बहुतेक तेव्हाच मिळालं असावं. तिने भोकांड पसरल. मग पोलीसाने पंचनामा केला. आणि माझी काहीच चुकी नाही असा शेरा देउन मला मोकळं केलं. (मागाहुन कळलं की ती गाडी त्या अरबी माणसाची नव्हतीच शिवाय त्याच्याकडे गाडी चालवण्याचा परवानाही नव्हता.)
सध्या जिथे रहातोय तिथे आनंदच आहे. तब्बल ३-४ वेळा पोलिसांकडुनच लुबाडला गेलोय तेही काही चुक नसताना अगदी भरदोलमध्ये.
काही गोड अनुभव तर काही कडू..... जीना इसीका नाम है.
भारतात तरी अजुन 'कडू' अनुभव आलेले नाहीत. (टच वुड.
)
~*~*~*~*~*~*~*~*~*~*
-माझं लेखन / माझी खादाडी
मिपाच्या स्मायली
कुरकुरीत प्रतिसाद..
हे वाचुन कुरकुरे 'टेढा है पर मेरा है' स्टाईल "वाह! क्या फॅमिली है!" असे म्हणावेसे वाटले.
जे न करे रवी | ते करे कवी | देतो तो शिवी | अस्खलित ||
एकदम आवडलं.
अजून अनुभव असतील तर टाका नक्की. बाकी सौदी किंवा एकूणच गल्फ म्हटलं की बुरखा घातलेल्या बायका, पांढरे झगे घातलेले पुरुष, बक्कळ पैसा, तेलाच्या विहीरी हे असच काहीतरी डोळ्यासमोर येतं.
हे काहीतरी वेगळं वाचायला मिळालं. धन्यवाद.
*********************************************************************
"Aut inveniam viam aut faciam"
बिपिन कार्यकर्त्यांच माझं
बिपिन कार्यकर्त्यांच माझं खोबार वाचालं नसल्यास जरूर वाचा.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*
-माझं लेखन / माझी खादाडी
मिपाच्या स्मायली
वाचलंय की!!
मिपावरच्या उत्कृष्ट लेखामालिकांपैकी एक!! खरंतर मिपाची वाचायची सवय या लेखामुळे लागली. पण काही पुस्तकात वाचलेलं वर्णन थोड निराळं होतं. (संदर्भ - प्रिन्सेस) बरीच भ्रष्टाचाराची वर्णन वाचली होती. त्यामुळे हे थोडं वेगळ वाटलं.
*********************************************************************
"Aut inveniam viam aut faciam"
आवडल तुमच कंपॅरिझम. आपल्या इथ
आवडल तुमच कंपॅरिझम.
आपल्या इथ 'खाय्ची' फार सवय आहे पोलिसांना. आरटिओ, ट्रॅफिक मध्ये नोकरी म्हणजे प्रत्येकाची स्वत:ची एकेक तेलाची खाणच म्हणा.
एकदा भाइंदरहुन गोरेगावला शिफ्ट होत होतो.
मध्ये चेकपोस्ट लागते. आम्हाला तिथल्या माणसान पकडल. "गॅस सिलिंडर, गॅस सिलिंडर" अस ओरडत तो आम्च्या कडे आला न सरळ ५०० ५०० अस म्हणु लागला. नवरा एकदम बिलंदर. एव्हढे नाहीत हो अस सांगुन १०० दिले मग म्हणाला आता या टेंपोवाल्याला द्यायला पैसे कमी पडताहेत, ५० परत द्याना साहेब. साहेब फार गडबडीत होते, त्यांनी खिशात हात खुपसला अन एकाच्या ऐवजी दोन नोटा देउन पुढे गेले.
हमने उध्धर सौ कमाया।
शब्दांना नसते दु:ख, शब्दांना सुखही नसते ।
ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते ॥
चांगला लेख
इतरांचे अनुभव वाचायला पण आवडले. बाकीचे काही लोक कसेही वागले तरी आम्ही भारतात राहूनही सार्वजनिक शिस्त नेहमी पाळतो. पोलिसांचे आजपर्यंत कधी वाईट अनुभव आले नाहीत.
माझी आई आम्हाला ५/६ वर्षांचे असल्यापासून खरेदीला पाठवायची. तोच शिरस्ता मी चालू ठेवला आहे. एखादी वस्तू निवडून विकत आणली की त्या पोरांच्या चेहर्यावर अवर्णनीय आनंद दिसतो. मुलगा तर खरेदी करून सुटे पैसे घ्यायला कधीपासून तयार झाला आहे. ६/७ वर्षांचा होता, तेव्हा सोसायटील्या अंकलच्या दुकानात ३/४ वस्तू घेऊन, अंकल केल्क्युलेटरवर हिशेब करायचा तेवढ्यात हा भराभर तोंडी हिशेब करून "अंकल अमके पैसे परत दी" म्हणून मोकळा! मुलांवर जबाबदारी टाकली की ती अगदी काळजीपूर्वक खरेदी करतात.
फक्त लहान वयात गाडी चालवायला द्यायच्या मात्र मी विरोधात आहे. कारण वेग आणि प्रसंगावधान यांचं भान लहान वयात येणं कठीण असतं.
o ज्योति कामत o
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नामा म्हणे मज विट्ठल सापडला|म्हणोनी कळिकाळा पाड नाही||
मान लिया आपको.
दुनिया कशी ही असो , ती सुधारवत राहायचा प्रयत्न करत राहायचे आणि आपला फायदा करून घेणे कदापी सोडायचे नाही.
इस मे मेरा क्या ? हा प्रश्न ज्याला पडला तो उद्धरला !
आपल्या कडे असे " कायद्याचे " राज्य" लवकरच येईल अशी आशा करूया.
"बहुसंख्य " भारतीय जनता अती सहिष्णू आहे आणि ती सहिष्णुता कायद्याच्या कठोर अंमल बजावणी आड येते.
टोकाचा जातीभेद हे एक नवे प्रकरण सुरु झाले आहे. सरदार गुन्हेगार असेल तर त्याला फाशी होत नाही.
बाकी एका दुसऱ्या धाग्यावर थत्तेनी समान नागरी कायद्या चा उल्लेख केला आहेच , फक्त धागा चुकला.
- तर्री
Humor is the absence of terror, and terror the absence of humor.