मला आलेले एक पत्र
मित्रांनो,
अनेक दिवसांनी माझ्या एका मित्राने मला पत्र लिहिलेले आहे. त्यात काही विचार आहेत. आणि काही महत्त्वाचे प्रश्न. त्या पत्रामधला वैयक्तिक मजकूराचा भाग वगळता , तेच पत्र आपल्या मिपाकर मित्रमैत्रिणीना दाखवावे असे वाटले. कदाचित उत्तमोत्तम संकल्पना, उत्साह ऊर्जा असलेल्या आपल्या या सुहृदांकडूनच माझ्या या मित्राला काही उत्तरे सापडतील अशी आशा वाटली. (मित्राला मिसळपाव वर हा धागा टाकल्याचे कळवणार आहे. तो अर्थात वाचनमात्र असेल. )
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पत्र लिहायला काहीही कारण नाही. निमित्त नाही. काल बोलणे झाल्यावर थोडे बरे वाटले होते. आणि बर्याच दिवसात पत्र न लिहिल्याची जाणीवही प्रकर्षाने झाली.
आजकाल काय झाले कळत नाही. काही लिहूनच होत नाही. संकल्पना सुचतात (असे निदान माझ्यापुरते मला तरी वाटते !) . परंतु त्या कागदावर उतरवायच्या म्हण्टल्यावर आळस येतो, नको वाटते - बहुदा आतून कुठे तरी भीतीसुद्धा. (कसली ते माहिती नाही.) तुला म्हण्टल्याप्रमाणे , हमड्रम असा शब्द कानात वाजत राहतो. असे अनेक प्रश्न , शब्द, विधाने खूपच गुणगुणायला लागली की एकदम गोंधळल्यासारखे होते.
चांगल्या लेखकाचे (माझ्यापुरते मला कळलेले) एक महत्त्वाचे लक्षण म्हणजे, त्याच्या कुठल्यातरी निवेदकाप्रमाणे/पात्राप्रमाणे कधीतरी विचार आपण नक्की केलेला असतो. तर पेठेबाईंची ती "आएं कुछ अब्र" मधली नायिका ..तिला जे वाटते ते मला वाटल्याने कुठेतरी जवळीक साधली गेली आहे. "वयाची अमुक वर्षे ओलांडली तरी आपण ठेचकाळत चालणारे आपण" अशा अर्थाचे वाक्य ती म्हणते. अगदी हजार हिश्शांनी हे पटलेले वाक्य आहे. कशाचीच नक्की खात्री पटत नाही. "आपण नक्की डिप्रेस्ड आहोत का ?" या प्रश्नाचेही खात्रीलायक उत्तर असे जवळ नाहीच ! (हद्द आहे की नाही !) आणि हे जे फ्रॅगमेंटेड असल्याचे दु:ख आहे तेदेखील असे जाळून टाकणारे, तेजाबी नव्हेच , की ज्यामधे सगळे नष्ट करून पुन्हा नव्याने स्वत:ची पुनर्स्थापना करण्याचे इमले बांधावे. किडुकमिडुक अतृप्तींचे किडुकमिडुक आयुष्य.
अनेक प्रश्नांचा छडा लावायचा आहे; परंतु ही उत्तरे जगण्यातून शोधावीशी वाटतात. जे वाचतो, जे ऐकतो, जे पाहातो ते खूप शिकवतेच - किंबहुना , तेच तर सगळे संचित आहे - पण आपल्याला फर्स्ट हँड गोष्टी कशा समजतील ? जगण्याचा सुगंध/दुर्गंध , स्पर्श, रस , तृष्णा , या सार्याचा परिपोष करणारे जगणे आपल्याला कसे साधता येईल ? त्याची एखादी छटा तरी आपल्याला कशी अनुभवता येईल ? अनेक प्रकारची पुस्तके वाचूनसुद्धा, या एका प्रश्नाचे उत्तर मला माझ्यापुरते समाधानकारक मिळावयाचेच आहे.
आपल्या आतापर्यंतच्या आयुष्यात न केलेल्या गोष्टी करून पाहाणे हा एक उपाय आहे. आपल्या आयुष्यातल्या आजवर केलेल्या गोष्टीच "समरसतेने" करण्याचा प्रयत्न करणे हा दुसरा उपाय आहे.
आणि बहुदा, मला केवळ थिअरीपुरतीच - पण पक्की - पटलेली एक गोष्ट आहे. ती म्हणजे , "बी अवेअर". "तू आळस करतो आहेस" , "तू ही ही गोष्ट कशीतरीच उरकतो आहेस" , "तू तुझ्याकडून शंभर टक्के देत नाहीस" , "या या गोष्टीचे हे हे परिणाम नक्की होणार", हा जो अवेअरनेस आहे तो (माझ्यासारख्यांच्या बाबतीत) अंधुकसर , अस्पष्ट, धूसर जाणीवेच्या पातळीवर असतो हे मला कळलेले आहे. तो सेन्स जोवर पूर्णपणे जागा होत नाही, तोवर आयुष्य मरगळलेले राहील, त्यामधे कन्व्हिक्शनचा अभाव असेल, बेचव अन्न खूप वेळ खाल्यासारखा आयुष्याचा अनुभव राहील. हे निदान थिअरीपुरते मला कळलेले आहे.
प्रश्न तोच तो सनातन आहे जो अगदी घासून गुळगुळीत झालेला आहे : हे सर्व रोजच्या कृतीमधे कसे आणायचे ?
मला अजून हे कळलेले नाही. तुला तुझ्यापुरते कसे ते समजलेले असेल तर मला सांग.
तुझा मित्र
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हम्म.
का बॉ ?
मग
मुक्तराव, आपला मित्र
"वयाची अमुक वर्षे ओलांडली तरी
प्रत्येकाची उत्तरं वेगळी
बालकवी
धन्यवाद
व्.पु काळेंचे एक वाक्य आठवले
प्रत्येक व्यक्तीमध्ये
वाचायला उत्सुक आहे
जाता जाता मस्त सांगुन गेलात,
रोचक
ज्याचा त्याचा विठ्ठ्ल.
प्रेमात पडा
अवांतर
पत्र वाचून उत्तरायण मधल धुंद
साक्षीत्वाने जगणे
सहमत
एक विचार !!
मला सुचलेला उपाय
उत्तम प्रतिसाद
मला असं वाटतंय की थोडं
चर्चा प्रतिसाद माहितीपूर्ण
सहमत आहे
मित्राला सांगा वर्जेश सोळंकी
अहाहा !