एक आठवण
आज १४ ऑगस्ट . बऱ्याच वर्षांनी ह्या दिवशी भारतात असण्याचा योग आला. सकाळी बाहेर गेलो असताना एक मुलगा मोटारीपाशी तिरंगा विकावयास आला आणि जुन्या आठवणी जागृत झाल्या.
८ऑगस्ट ४२ ला 'चले जाव' ची घोषणा झाली आणि त्याच रात्री काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना अटक झाली व ते तुरुंगात गेले. चळवळीचे नेतृत्व दुसऱ्या/ तिसऱ्या फळीतील नेत्यांकडे गेले. चळवळीचे स्वरूप बदलले . पण आम्हां ८/९ वर्षाच्या मुलांना फक्त एवढेच समजत होते की काहीतरी निराळे घडत आहे.
युद्ध संपले -- सर्व नेते सुटले आणि परत फरक जाणवला. ज्या नेत्यांना तुरुंगात टाकले होते त्यांना आता दिलीहून आमंत्रणे येऊ लागली. आझाद हिंद सेनेच्या रंजीत कथा ऐकू येऊ लागल्या. 'कदम कदम बढाये जा' एकदम लोकप्रिय झाले.
थोडक्यात सर्व वातावरण बदलू लागले. स्वातंत्र्याच्या गोष्टी होत होत्या पण सर्व साधारण मनुष्याला कितपत समजत होते ह्याबद्दल शंकाच आहे. प्रसारमाध्यमे आतासारखी अमाप नव्हती. पुण्यात मुख्य वर्तमानपत्रे म्हणजे 'सकाळ', 'काळ' आणि 'केसरी'. मी १३/१४ वर्षांचा होतो. मला तरी फारशी चर्चा झाल्याचे आठवत नाही. ( माझ्या वयोगटात).
जशी जशी १५ ऑगस्ट ४७ ची तारीख जवळ येऊ लागली तसे तसे वातावरण भारावलेले होऊ लागले. मला तर ते दिवस खरंच मंतरलेले होते असेच आठवते.
मी १९४१/४२ पासून राष्ट्र सेवादलाचा सैनिक होतो. जसजसा दिवस जवळ येत गेला तसतसे नवीन उपक्रम सुरू झाले. त्यातला एक म्हणजे नवीन ध्वज तयार करणे. पुण्यात भिकारदास मारुतीशेजारी एका बिल्डिंग मध्ये दलाचे एक कार्यकर्ते राहावयाचे. त्यांच्या गॅलरीत बसून कामास सुरुवात झाली. कापडाचे झेंडे शिंपी बनवत होते तर आम्ही मुले कागदाच्या पताका व झेंडे करत होतो. महत्वाचे काम नंतरच होते. ह्या सर्व गोष्टी दारोदारी जाऊन विकणे! मी दापोडी पासून केळकर रस्ता २/३ आठवड्यात कव्हर केला. का कोणास ठाऊक पण एका इराणी दुकानात पताका विकल्याचा मला फारच आनंद झाला होता.
बघता बघता १४ ऑगस्ट उजाडला. उद्यापासून आपल्या लोकांचे राज्य येणार एवढेच महत्वाचे होते. राष्ट्र सेवा दलाचा असल्यामुळे माझे विचार एकाच विचारसरणीचे होते हे मी आधीच कबूल करतो पण हे सर्वांच्याच बाबतीत होते.
त्या दिवशी एका निराळ्याच विश्वात वावरत होतो, रात्रभर गादीखाली ठेवून इस्त्री केलेली अर्धी चड्डी , पांढरा शर्ट आणि वर गांधी टोपी अशा थाटात रात्री ८/९ च्या सुमारास मंडईच्या आसपास कोठेतरी (ठिकाण आता लक्षात नाही) सगळे जण जमलो.
सगळ्यांना मशाली देण्यात आल्या. तेथून मिरवणूक सुरू झाली. इतरही अनेक लोक मिरवणुकीत होते. असे करत करत मिरवणूक कलेक्टरच्या कचेरीपर्यंत पोहोचली. 'भारतमाता कि जय', 'इन्किलाब झिंदाबाद' अशा अनेक घोषणा देत समुदाय काही निराळ्याच मूड मध्ये होता.
बरोबर १२ वाजता सर्वत्र शांतता पसरली - UNION FLAG सन्मानपूर्वक खाली आला आणि त्याची जागा तिरंग्याने घेतली. समुदाय वेडा झाला आणि...
भारत स्वतंत्र झाला!