मिपा विडंबन स्पर्धा २०१६ - मतदानापूर्व चाचणी - (भाग १/९८७६५४३२१०)
मिपावर सध्या विडंबन स्पर्धेसाठी जोरदार मतदान चालु आहे. कधी एक कविता पुढे जाते तर कधी दुसरी. या स्पर्धेवर देशविदेशातल्या बडयाबड्या लोकांचे लक्ष आहे असे मला खुद्द एका साहित्य संपादकाने सांगीतले. परवा तर म्हणे मोदीसाहेबांनी स्वतः फोन करुन या स्पर्धेचा सविस्तर आढावा घेतला. कोणती कविता बाजी मारणार यावर म्हणे मोठा सट्टाही चालला आहे.
मिपावरचे जेष्ठ विष्लेशक आदरणीय श्री क्लिंटन साहेब सुध्दा या मतदानावर लक्ष ठेवुन आहेत. मतदानपूर्व चाचणीचा एक धागा काढावा असे पण त्यांच्या मनात होते. पण सध्या क्लिंटन सरांचे सगळे लक्ष हिलरीताई आणि ट्रंपकाकांकडे आहे. अमेरीकेच्या निवडणुकीनंतर होंडारुस मधे टेग्युसीगाल्पा महानगरपालिकेची निवडणुक आहे. (नाव त्यांनी जसे सांगीतले तसे लिहिले आहे). या निवडणुकीचे जगाच्या अर्थकारणांवर होणारे परीणाम या विषयावर ते मिपावर एक प्रदीर्घ लेखमाला ते लिहिणार आहेत. त्याच्यासाठी आकडेवारी गोळाकरण्यात ते व्यस्त आहेत्. त्यानंतर लगेचच टोगो येथे निवडणुक होणार आहे. तर थोडक्यात काय क्लिंटनभाउ सध्या लै बिझी आहेत.
पण मिपाकरांची निराशा होउ नये म्हणुन मग त्यांनी मला विनंती केली की या वेळी मिपावर होणारे हे मतदान तुम्ही सांभाळा. “कमी तिथे आम्ही” या तत्वाचा आम्ही अंगीकार केला आहे त्यामुळे आम्ही याला नाही म्ह्णणार नाही याची क्लिंटनभाउंना खात्री होती आणि आमच्या समोर हो म्हणण्याव्यतिरीक्त दुसरा पर्याय नव्हता.
तर या पार्श्वभुमीवर हे शिवधनुष्य उचलण्याचा आम्ही क्लिंटनसरांना शब्द दिला आणि कामाला लागलो.
या लेखात आपण फजिती या विषयावर विड्ंबकांनी पाडलेल्या कवितांचा आस्वाद घ्यायचा प्रयत्न करुया.
सर्वात आधि मला या सर्व अनामिक विडंबनखोर लोकांचे अभिनंदन करायचे आहे. कारण त्यांनी निवडलेले विषय सामान्य माणसाच्या अतिशय जवळ जाणारे आहेत. आणि सामान्य माणसाचे प्रश्णांना त्यांनी विनोदाचे स्वरुप देउन वाचा फोडण्याचा जो प्रयत्न केला आहे तो निश्चितच कौतुकास पात्र आहे.
मिपावरचे जेष्ठ कवी मिका, विशाल कुलकर्णी, गणेशा, रातराणी, संदिप, चाण्याक्य ह्या लोकांचा वाचकांच्या भावनांना हात घालण्यावर भर असतो. वाचकांना शब्दांच्या जंजाळात गुरफटवुन मुळ मुद्याला बगल मारण्यात हे लोक पटाईत आहेत. उदाहरणच घ्यायचे तर मिकाची “उंबरठा नसलेले घर” ही कविता घ्या. घर मोडकळीला आहे आहे आणि ते दुरुस्त करायला हवे हे सांगण्यासाठी या गृहस्थाने दोन भाग खर्च केले. गवंडी दुरुस्तीला आला की मिका त्याला रोज एक कविता ऐकवायचा. आता तो गवंडी पण मिपावर कविता लिहायला लागला आहे असे मला मिका कडुनच समजले.
त्या उलट स्पर्धे मधली “हनुवटी रुतुन आहे” ही कविता बघा डायरेक्ट मुद्यालाच हात घालते. वजन वाढले आहे आणि त्याची मला लैच काळजी वाटते आहे. दुसरा कोणताही अर्थ निघत नाही कविते मधुन उगीचच आडपडद्याने लिहीत बसत नाही. हीच कविता आपल्या डॉ सुनील अहिररावांनी लिहीली असती तर
जसजसे जगणे सुखासिन होत आहे
तसतसा तुझा धरणीवरचा भार वाढत आहे
सोसतो मी जे,मला ना खंत त्याची
पण तुझ्यामुळे रोज रात्री माझी कंबर लचकते आहे
असे काहीतरी लिहिले असते. पण इकडे कविने मुद्यालाच हात घालुन वाचकांना अर्थ वैगेरे शोधायच्या भानगडीत पाडलेले नाही जे काही आहे ते सरळसोट स्वच्छ.
तशीच दुसरी कवितया’ओल्ड मॉंक येता येता”, बघा कवी हे अजिबात लपवत नाही की त्याला ओल्डमाँक आवडते. पण बिचार्याला घरी स्टॉक करुन ठेवणे शक्य नाही म्हणुन मग त्याने नाईलाजाने बारचा रस्ता धरला आहे. एक विदारक सामाजिक समस्या मोठ्या खुबीने त्याने जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. बहुसंख्यवाचक ही कविता वाचल्यावर हसतील पण जो खराखुरा मदिराभक्त आहे त्याच्या डोळ्यात ही कविता वाचल्यावर अश्रु तरळल्याशिवाय रहाणार नाहीत. अशी दुधारी कविता लिहिल्या बद्दल मी कविरायांचे अभिनंदन करु इच्छितो.
अजुन एक कविता “येशील येशील दोस्ता” मधे सुध्दा कवी बघा सगळा कार्यक्रम संपल्यावर् दोस्ताला बोलावतो आहे. बघा त्याचे आपल्या दोस्तावर किती प्रेम आहे ते. त्याचा हा दोस्त माळकरी समाजातला असावा. मग तो आपल्यासमोर बार मधे नुसता बसुन काय करेल? त्या पेक्षा बाबारे माझे उरकले मी तुला मिसकॉल करतो आणि मग तू येउन इकडले बील भागव आणि मला पण घरापर्यंत सुखरुप पोचव. केवढा हा समजुतदार पणा. केवढे हे औदार्य. मी तर कवीवर फिदाच झालो आहे. पण सगळे कसे लिहिले आहे डायरेक्ट, कुठलाही आडपडदा न ठेवता.
विडंबकांची हिच तर खासीयत असते की ते मुद्दासोडुन भरकटत नाहीत. हीच कविता आनंदमयी यांनी लिहीली असती तर त्याची सुरुवात काहीशी अशी केली असती….
जसे फुलावे रंग साजिरे
श्यामनिळ्याच्या मोरपिसातून
मुके तरी मोहाहुन मोहक
नाते आपुले तसेच आतून..
असे सांगीतल्यावर त्या मित्राला घंटा काही कळले नसते की आपल्याला याचे बील द्यायचे आहे. उलट फोन करुन त्याने शिव्या दिल्या असत्या आणि मग फोन बंद करुन झोपला असता. आणि मग कवी वर हॉटेलमधे भांडी घासायची वेळ आली असती.
अजुन एक कविता “चांगली खोली दिलीस देवा मला रहायला” किती हृदयद्रावक परिस्थीतीतुन गेला आहे हा कवी. घरदार सोडुन नोकरी साठी परगावी रहाणार्या एका बॅचलरची व्यथा कवीने मोठ्या खुबीने आपल्यासमोर आणली आहे. ही कवीता वाचुन अनेक आजी आणि माजी बॅचलर सदगदीत झाले असतील याची मला खात्री आहे. या कवितेच्या प्रभावामुळे लवकरच “बॅचलर बचाओ देश बचाओ” आंदोलनाला कन्हय्याकुमार हात घालणार आहे असे विश्वसनिय सुत्रांकडुन समजले. ही कविता अताहउल्ला खान यांनी स्वतःच्या बॅचलर लाईफवर लिहिलेली असावी इतकी अस्सल उतरली आहे. काय दर्द काय दर्द खरे म्हणजे ही कविता विडंबन विभागात का टाकली असे मला कवीला विचारायचे आहे. रुम पार्टनर कपडे पळवतो, डास झोपुदेत नाहीत, मेसचे टुकार जेवण गिळावे लागते ह्या सगळ्या समस्यांकडे जगाचे लक्षवेधण्यासाठी त्याने ही कवितारुपी मशाल पेटवली आहे. पुढच्या जी ७ परिषदे मधे ह्य कवितेवर चर्चा घडवुन आणेन असे स्पष्ट आश्वासन मला रा.रा. पुतीन साहेब यांनी, ते जेव्हा हगणदारी मुक्त पाभे बुद्रुक अभियानाचे उद्घाटन करायले आले होते तेव्हा, दिले. यासाठी आम्ही कविवर्यांचा जाहिर सत्कार पुण्याच्या लकडी पुलावर आयोजीत केला आहे. तारीख आणि वेळे साठी टाइम्स ऑफ मिपा वाचत रहा.
या विभागातली अजुन एक अतिशय महत्वाच्या विषयाला हात घालणारे कविता म्हणजे “चांदण्यात पळताना’ ही वेळ आपल्यावर अनेकदा आलेली असते. पण जेव्हा आपण दुसर्यावर अशी वेळ आलेली बघतो तेव्हा त्या माणसाला आपण हसतो. येथे कवी सर्व पाषाण हृदयी बघ्यांना आव्हान करतो आहे की अशा वेळी नुसते बघत बसु नका. एकतर पोटामधुन भयंकर कळा येत आहेत आणि हे श्वान मला मोकळे होउन देत नाहीत. माणसाने जी बेसुमार वृक्षतोड चालवलेली आहे त्यावर सुध्दा कवी अप्रत्यक्षपणे वार करतो. तो सांगतो की लोट्या मधले पाणी संपले आणि आजुबाजुला असे एकही असे झाड नाही की त्याची पाने तोडुन मी मझे अंतरंग स्वच्छ करावे. या साठी तरी प्रत्येकाने वृक्षसंवर्धन करावे असे मी या निमित्ताने प्रतेक वाचकाला आवहान करतो. अशी वेळ कधीही सांगुन येत नाही याची प्रत्येकाने जाणीव ठेवावी व मोठ्या पानांचा एकतरी वृक्ष लावावा. अगदी केळीचे झाड नका लावू पण अगदी चिंचेचे झाडही नको. अशा वेळेला अंब्याची पाने मोठी उपयोगी असतात हे मी नम्रपणे सुचवु इच्छितो.
शेवटची पण अतिशय महत्वाची कविता म्हणजे “ओळखलत का अॅडमिन मला”. मिपा मालकांच्या “पटलं तर रहा नाहीतर चपला घाला” या धोरणामुळे अनेक आयडिंवर अशी वेळ आलेली आहे. अशा मिपाग्रस्त आयडिच्या भावनांना वाट मोकळी करुन देणारी ही कविता आहे. आयडी बॅन झाल्यामुळे होणारा कोंडमारा या कविते मधुन अतिशय प्रभावी पणे व्यक्त झाला आहे. देवाच्या काठीला आणि मिपा मालकांच्या कारवाईला आवाज नसतो. पण ज्याच्या आयडीवर वरवंटा फिरवला जातो त्याला आपत्यवियोगाचेच दुःख होत असेल. त्या दुःख्खाला थोड्याफार प्रमाणात का होइना या कविते मुळे वाट मोकळी करुन मिळाली आहे. त्यामुळे या कवितेच्या कविवर्यांचेही हार्दिक अभिनंदन्.
तर मंडळींनो अशा रितीने मी वर मांडलेला मुद्दा पुन्हा एकदा मांडतो की विड्ंबनाच्या माध्यमातुन कविता लिहिणारे कवी हे डायरेक्ट मुद्याला हात घालतात आडवळणाने एखादि गोष्ट सांगणे त्यांना जमत नाही. ही सगळी मंडळी तुकोबाच्या वंशातली असतात “नाठाळाचे माथी मारु काठी” असे म्हणणारी.
पुढच्या लेखा मधे प्रेम या विषयावर लिहिल्या गेलेल्या कवितांचा आस्वाद घेण्याचा विचार आहे. पण कार्यबाहुल्यामुळे ते कसे जमते ते बघु (मी लै म्हणजे लै बिझी असतो याची वाचकाण्नी कृपया नोंद घ्यावी) तो पर्यंत तुम्ही विडंबना स्पर्धेतल्या कवितांचा आनंद लुटत रहा.
पैजारबुवा,
वाचन
8211
प्रतिक्रिया
0