मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खाद्ययात्रा कल्याणची!!

राजेंद्र मेहेंदळे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
बर्‍याच दिवसांनी मागच्या आठवड्यात कल्याणला गेलो होतो. थोडी घरची कामे, नातेवाईकांच्या भेटीगाठी आणि असेच कायकाय मनात होते. सकाळीच पोचलो आणि घरी पोचायच्या आधीच भुकेची जाणीव झाली. आता ईतक्या सकाळी काय बरे खावे? बरं दुपारी एका ठिकाणी जेवायचे आमंत्रण होते, त्यामुळे फार जास्त खाउन चालणार नव्ह्ते. पाय आपोआप पारनाक्यावर ताम्हणकर यांच्या श्री उपहारगृहात वळले. खरेतर तिथे बसायलाही फार जागा नाहिये, पण तिकडे वर्षानुवर्षे मिळणार्‍या एकाच खास चवीच्या ओल्या नारळाच्या कचोर्‍या खाण्यासाठी खवैय्यांची गर्दी असते. सकाळची वेळ, आचारीकाका शांतपणे कचोर्‍यांचा एक एक घाणा काढत होते. जशी ऑर्डर येईल तसेच , कारण गार कचोर्‍या कशा आणि कोण खाणार? लोकही चुळबुळत का होईना पण धीर धरुन आपला नंबर येण्याची वाट पहात होते. याला म्हणतात मोनोपॉली. काय बिशाद गिर्‍हाईक दुसरीकडे जाईल. असेच दुसरे ठिकाण म्हणजे वझे बंधु यांचा खिडकी वडा. मला आठवतंय लहानपणी आई ऑफिसमधुन येताना खिडकीवडा घेउन यायची तेव्हा आम्हा भावंडांना काय आनंद व्हायचा. अनेक वर्षे उलटली पण वड्याची चव अजुनही तीच.आणि सकाळ संध्याकाळ दुकानासमोर होणारी गर्दी पण तशीच. गांधी चौकात लागणारी हरी विट्ठला पांडुरंगा ची गाडी मिसळीसाठी फेमस. चहासुद्धा फक्कड असतो तिथे. सकाळी सकाळी पोटभर नाश्ता आणि मित्र मंडळीना भेटायचे अजुन एक ठिकाण म्हणजे बाजारपेठेतले दिवाकर भट यांचे क्षुधा शांती गृह. इडली चटणी खावी तर ईथलीच. लहानपणी दुपारच्या मधल्यावेळी काय खावे असा प्रश्न पडला तर सरळ टिळक चौकात ठ्क्करच्या दुकानात रवाना होणे. खमण ढोकळा, समोसा,शेव फरसाण खावे तर ठक्करकडे. एकदा हे दुकान शॉर्ट सर्कीटमुळे पुर्ण जळले होते, पण पुन्हा पहिल्यासारखे उभे केले ठक्करने. आता त्यांचा मुलगा दुकान चालवतो. संध्याकाळी फिरायला बाहेर पडले किंवा सुभाष मैदानात क्रिकेट खेळुन बाहेर आलो कि फेमसची मुगभजी खाणे होणारच. आता अत्रे रंगमंदीर झाल्यापासुन हि गाडी तिकडे लागते कि नाही माहित नाही. रविवारी किंवा सणासुदिला कल्याणकरांना आठवण होणार ती अनंत हलवाईच्या श्रीखंडाची. म्हणजे ईतर मिठाई सुद्धा तिथे मिळते पण अनंताचे श्रीखंड म्हणजे खासच. पहिले बाजारपेठेत असलेले दुकान रस्ता रुंदीकरणात छोटे झाले आणि मग देवीच्या देवळासमोर नवीन मोठे दुकान त्यांनी उघडले. शिवाय स्टेशनजवळ एक अजुन शाखा आहेच. जेव्हा घरोघरी फ्रिज नव्हते तेव्हा आइस्क्रीम खाणे म्हणजे मोठीच पर्वणी असे.आणि डोक्यावर पाटी घेउन घरोघरी आइस्क्रीम विकणारे तायडे बंधू सगळ्यांच्या परीचयाचे होते. मग त्यांनी बाजारपेठेत एक दुकान घेतले आणि तिथे आइस्क्रीम विकायला लागले. ते आइस्क्रीमचे वेगळेच ग्लास आणि चमचे आणि त्यात असणारा सिंगल किंवा डबल स्कुप म्हणजे आम्हा मुलांना पर्वणीच. यांनीही नंतर रामवाडीजवळ दुसरे दुकान काढले आणि ज्युस बार चालु केले. पण ती पहिली आइस्क्रीमची मजा काही औरच. अजुन एक काळाच्या पडद्या आड गेलेले दुकान म्हणजे अहिल्यादेवी चौकातले महाराष्ट्र कोल्ड्रिंक्स. फालुदा, चॉकलेट शेक, कसाटा आइस्क्रीम हे फक्त तिथेच मिळणार. कल्याण पालिकेसमोरचे गणेश आणि क्रुष्ण रसवंती उन्हाळ्यात थंडावा द्यायला एकदम बेस्ट. कल्याण म्हणजे हिंदु मुस्लिम पुर्वापार एकत्र आणि बर्‍यापैकी शांततेने राहणारे शहर. सगळे हिंदु लोक दुध नाक्यावर दुध आणायला जाणारच आणि सगळा दुधाचा धंदा कोकणी मुस्लिमांच्या हातात. दुधाचा भाव रोज ठरणार. इदला दुध स्वस्त होणार आणि दसरा दिवाळीला महाग. तर पहाटे २.३० ला दुधाचा धंदा सुरु झाला कि नाक्यावरचे एकमेव हॉटेल उघडणार आणि रात्रपाळीचे रिक्षावाले ,गणपतीच्या सजावटीसाठी जागणारी मुले तिथे एक खास डिश खायला रांग लावणार ती म्हणजे मलईपाव. एक बशीभर साय, त्यावर मुठभर साखरआणि पाव ...आहाहा. सकाळी ६ वाजेपर्यंत ही डिश संपणार. बाकी सामिष वाल्यांसाठी पायापाव, खिमापाव आहेतच. संध्याकाळी मशिदीजवळ अजुन एका गाडीवर शीग कबाब. आणि बाजुच्या एका दुकानात "अफलातुन" या नावाने मिळणारी भयंकर गोड मिठाई पण जबराट. असो. ताम्ह्णकरांनी कचोरीतळेपर्यंत कुठपर्यंत पोचलो बघा मी. आता हे सगळे पदार्थ पुन्हा चाखायला कल्याणच्या अजुन फेर्‍या करायला लागणार. पण हरकत नाही. जीभ आणि पोटासाठीच तर जगतो आपण..काय म्हणता?

वाचन 10160 प्रतिक्रिया 25