मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिवरात्र जागवोनी...

अत्रुप्त आत्मा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
कालच्या दिवसाच्या निमित्ताने! नेहमी कामानिमितानी शिवरात्रीला आणि श्रावणातही, निरनिराळ्या शंकराच्या देवळात जाणे होते. भक्त मंडळी शंकराच्या गाभार्‍याला जी काहि "कळा" आणवतात. ते साहून हे लेखन घडत आहे. मी अनेकदा अनेक देवळात देवळांच्या काम पहाणार्‍या मंडळींना या बद्दल सूचना आणि सहकार्य करायचा प्रयत्न केला आहे. पण हाती आले फक्त दारुण अपयश. मंदिरवाल्यांना "ग्राहक" वाढतील या दृष्टीनी काहि सुचवलं तर तेच हवं असतं..तीथे आंम्ही स्वच्छतेचा नारा लावलेला कुणा ऐकू जावा? सकाळी देऊळ उघडल्यापासून भक्त मंडळी शंकराचा जो काही महा-देव करतात तो पहाण्यासारखा असतो! एकानी कडेनी दुध ओतावे..आणि कुणी दुसर्‍यानी पंचामृत टाकावे..त्यातच अजुन साखर/शेंगादाणे/गूळ/धान्य/मध केळी ... अरारारारा... अहो आपल्याला वाढदिवसाच्या दिवशी कुणी खुर्चीत बसवून अंगभर मिठाईमर्दन करून त्यातली थोडी थोडी तोंडात भरवून ह्याप्पी बर्थ डे केलं तर कसं वाटेल? भक्तिमार्गात स्वच्छतेची भावना लोप पावलीच पाहिजे असा काही संकेतच आहे का? या मंदिरवाल्यांचं तर सोडा,पण ज्या संघटना हल्ली स्वतःला धर्माभिमानी म्हणवतात,त्यांनी तरी आंम्हाकारणी सहकार्या यावे. पण त्यांनाही "हे" नको आहे. त्यांचा सारा आवेश गाभार्‍यात सोवळी-घालुन शिरावे का शिरू नये! असल्या फालतू कारणातच संपतो. नाहि म्हणता गेली ५ वर्ष ठणाणा केल्याचे फलित म्हणजे- फक्त एका मंदिराने..भक्त मंडळींना नीट मॅनेज करायचा प्रयत्न या वर्षी केला आणि मी सुचवलेली "गाभार्‍याबाहेर धान्य/दुधासाठी-बादल्या-भांडी योजना" एका निरिक्षक माणसासह राबवायला सुरवात केली. (तरी काल आमचा लघुरुद्र संपेपर्यंत लोकांना थोपवणं जड गेलच!) एरवी दुसर्‍या दिवशी अनेक मंदिरात शंकराची पिंडी आणि भोवतीचा परिसर नारळाच्या घासण्या घेऊन साबणसोड्यानी धुवायची वेळ येते. मला नेहमी प्रश्न पडतो,की जगातल्या प्रत्येक समाजाला आपल्या धर्मातली ही अश्या प्रकारची घाण साफ करायचा कंटाळा का??? वास्तविक याच कामात या धार्मिक संघटनांनी पुढाकार घेतला पाहिजे. आणि त्या समाजातल्या सज्जनांन्नी (मग ते धार्मिक असोत,अथवा नसोत!) या संघटनांच्या मागे यासाठी तगादा लावायला पाहिजे. माझ्या मते "हे" घडेल तो खरा सुदिन! शिवरात्र जागवोनी जन शांत झोपलेले कावून रात्र सारी पोळतो शंभू...स्व-भावे॥धृ॥ देवळात भोवती त्या पडलाच बेल सारा दहिभात ही सुखाने करी पिंडि पाशी राडा किती घाण अंतरी या,तरि शंभू शांत आहे॥१॥ भरला नाकात त्याच्या पन्हाळीतला सुगंध माश्या.. तिथे भणाणा करितात अंदा-धुंद गोमुखा समोर पुढती साक्षात गटार आहे॥२॥ काहूर अंतरीचे स्वमनात चोप देई भक्तांसी सांगताना मन हे दमून जाई भक्तीत माज सारा हे दिव्य(?) रूप आहे.॥३॥ ================ मूळ रचना:-मधुकर जोशी "आकाश पांघरूनी जग शांत झोपले हे घेऊन एकतारी गातो कबीर दोहे" ==========================

वाचन 17349 प्रतिक्रिया 69