मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कसं सुचतं हे सगळं ? अहो, ब्रह्ममुहूर्तावर जाग येण्यातून.

चित्रगुप्त · · जनातलं, मनातलं
माझ्या ' मारा डंख मारा डंख मारा बिछुवा' या धाग्याच्या एका प्रतिसादात 'ढालगज भवानी' यांनी " कसं सुचतं हे सगळं ? असा प्रश्न केला होता, त्याचं उत्तर " अहो, ब्रह्म मुहूर्तावर जाग येण्यातून" असं आहे. कसं, ते सांगतो. 'ब्रम्ह मुहूर्त' ज्याला म्हणतात, त्याची नेमकी अशी काही वेळ (पंचांगातील सूर्योदयाच्या नियत वेळेसारखी) असेल, असे वाटत नाही (असल्यास सांगावे). साधारणत: पहाटे तीनच्या सुमाराची वेळ म्हणजे 'ब्रम्ह मुहूर्त' असे म्हटले जाते. पण मुळात त्या वेळेला 'ब्रम्हमुहूर्त' असे का म्हणायचे ? ब्रम्हदेव हा सृष्टीचा निर्माता. सृजनाचा देव. तेंव्हा 'ब्रम्हमुहूर्त' म्हणजे सृजनशीलतेची वेळ. चित्र, लेखन, किंवा अन्य कश्याहीसाठी नवीन कल्पना केंव्हाही, कुठेही सुचून जात असल्या तरी त्यांचं प्रमाण या ब्रह्म मुहूर्तावर मात्र सर्वात जास्त असतं, असा माझा दीर्घ अनुभव आहे. पण म्हणून आपण गजर वगैरे लावून पहाटे तीनला जांभया देत, आळसवटलेले उठलो, तरी काही सृजनशील कल्पना सुचतीलच, ही शक्यता फारच कमी आहे. पहाटे तीनच्या सुमारास उठून 'ब्रम्हमुहूर्ता' चा लाभ घ्यायचा, तर खालील अटी पूर्ण झालेल्या असल्या पाहिजेत: १. झोप पूर्ण झालेली असली पाहिजे, आणि तात्काळ उठून अंथरुणाच्या बाहेर येण्याचा उत्साह वाटत असला पाहिजे. गजराशिवाय आपोआप झोप उघडलेली असली पाहिजे. २. पोटातले अन्न पूर्ण पचलेले असले पाहिजे, आणि उठल्यावर लगेच शौच्याची भावना/निकड झाली पाहिजे. या दोन गोष्टी साधायच्या, तर खालील दोन गोष्टींची सवय लावून घेतली पाहिजे: १. आदल्या रात्री नऊ -साडेनऊच्या सुमारास झोपणे, आणि २. आदल्या दिवशीचे संध्याकाळचे जेवण (तेही हलके, सुपाच्य) सूर्यास्ताच्या सुमारास झालेले असणे. असे थोडे दिवस केले, की झोप आपोआपच लवकर उघडू लागेल. ज्यांना शक्य असेल त्यांनी दिवसा केंव्हाही, विशेषत: दुपारच्या जेवणानंतर थोडावेळ अवश्य झोप घ्यावी. मग काय मंडळी, घेणार ना 'ब्रह्ममुहूर्ता' चा लाभ?

वाचन 20866 प्रतिक्रिया 66