मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मध्य वयातील वादळ

सुबोध खरे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
कर्करोग स्तनांचा मध्य वयातील वादळ मध्यवयातील वादळ- पुढे ---------------------- रजो निवृत्ती (menopause) हा एक पूर्ण कुटुंबावर परिणाम करणारा विषय आहे. हा केवळ स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय नसून सर्व वयाच्या पुरुषांवर सुद्धा परिणाम करतो. कारण या कालखंडातून आपली आई बहिण बायको मुलगी किंवा सासू जात असेल तर त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम पुरुषांवर होतो. रजो निवृत्ती म्हणजे स्त्रियांच्या मेंदूत तयार होणार्या संप्रेरकांना बीजांड कोश(ovary)प्रतिसाद देणे बंद करतात त्यामुळे त्यांच्या प्रभावाखाली बीजांड कोश तयार करणारी स्त्रियांची संप्रेरके इस्ट्रोजन आणि प्रोजेस्तीरोन यांचे प्रमाण बरेच घसरते. हि दोन्ही संप्रेरके स्त्रियांचे स्त्रीत्व जागृत ठेवण्याचे काम करतात. त्यांच्या मुळेच मासिक पाळी चालू राहते. साधारण चाळीशीनंतर स्त्रियांची पाळी अनियमित होण्यास सुरुवात होते आणि पंचेचाळीशीच्या आसपास ती बंद होते. हा शारीरिक बदल आहे. यापेक्षा जास्त बदल मानसिक स्थितीत होतो. स्त्रियांना रजोनिवृत्ती मुळे आपले स्त्रीत्व संपले असे वाटू लागते. आपण म्हातारे होणार हि भीती बोचू लागते. आता आपण पूर्वी सारख्या तरुण राहिलो नाही याची खंत वाटू लागते. आपल्या नवर्याला आपल्याबद्दल आकर्षण राहणार नाही हि भीती वाटू लागते.इत्यादि इत्यादि याचा मुळापासून विचार केला तर असे लक्षात येते कि सुंदर असणे सुंदर दिसणे आणि सुंदर राहणे हा स्त्री स्वभावाचा मूळ पैलू आहे लग्नात आपण पाहिले तर आपल्या आजीच्या वयाच्या बायका सुद्धा ( साठीच्या पुढील) छान साड्या नेसून दागिने घालून नटून आलेल्या दिसतात. तेच आपल्या आजोबांच्याच काय पण काकांच्या वयाचे सुद्धा (४० -४५ वर्षे) पुरुष हे जर बर्यापैकी शर्ट आणि पैन्ट घालून आलेले असतात मग त्याला इस्त्री असो कि नसो त्यांना काही फरक पडत नाही. नुस्तेच असे नाही कोणतीही स्त्री जर तिच्या साडीवर डाग पडला असेल ( आणि लोकांना दिसत नसेल तरीही) पूर्ण समारंभ संपेपर्यंत अतिशय अस्वस्थ असतात. बायका अगदी पूर्ण बायकान्चे हळदी कुंकू असेल तरीही अस्वस्थ असतात. कारण चांगले दिसणे आणि चांगले राहणे( good looking and well groomed) हा एक स्त्री स्वभावाचा पैलू आहे.पुरुषांना आकर्षित करणे हा त्या व्यक्तिमत्त्वाचा एक छोटासा भाग आहे रजोनिवृत्ती झाली म्हणजे आपण म्हातारे होणार आणि सुंदर राहणार नाही, आपल्या त्वचेला सुरकुत्या येणार आणि आपली कांती पूर्वीसारखी राहणार नाही या दडपणाखाली त्यांचे मानसिक आयुष्य उलथा पालथ होते.( age miracle cream) सारख्या सौंदर्य प्रसाधनाचा जबरदस्त खप यामुळेच होतो. आपण कधी एखाद्या स्त्री चा चाळीशीचा वा पन्नासावा वाढदिवस थाटात साजरा केलेला पहिला आहे काय? क्वचितच. पण एखाद्या प्रथितयश माणसाचा(राजकारण्याचा सुद्धा) पन्नासावा वाढदिवस सहज साजरा होताना दिसतो कारण काय? पुरुषाचे कर्तृत्व पहिले जाते स्त्री चे कर्तृत्व पहिले जाते पण आपले वाढते वय साजरे करावे असे कोणाही स्त्रीला वाटत नाही. त्याच वेळेला त्या स्त्रियांचे नवरे साधारण ४५ ते ५० वयाचे असतात आणि ते आपल्या कर्तृत्वाच्या शिखराकडे वाटचाल करत असतात. त्यात आपले पोट सुटले आहे कि टक्कल पडले आहे याचे त्यांना वाईट वाटत असले तरी ते मनाला फारसे लावून घेत नाही. त्यामुळे बायको जेंव्हा त्यांना विचारू लागते कि माझा चेहरा सुरकुतलेला दिसतो आहे काय त्यावर त्यांचे फारसे लक्षच नसते. त्यांना उत्साह वाटत नाही काही करू नये असे वाटते. हे सर्व संप्रेरके कमी झाल्यामुळे होते. जसे व्होल्टेज कमी झाल्यावर दिवा मंद होतो.त्याप्रमाणे त्यांच्या सर्व पेशींची क्रिया थोडीशी मंदावते. या काळात बायकांचे वजन वाढू लागते.पोटावर आणि मांड्यांवर ते चढू लागते आणि शरीराचा आकार बेढब होऊ लागतो(असे स्त्रीला जास्त वाटते). हा सर्व परिणाम संप्रेरके कमी झाल्यामुळे होतो कारण पूर्वी ती जर ४०० ग्राम अन्न दिवसात खात होती तर त्यातील ५० टक्के अन्नाचे शोषण होत असे आणि उरलेले ५० टक्के आतड्यातून मला वाटे बाहेर टाकले जात असे. आता कार्य प्रणाली हळू झाल्याने ६० टक्के अन्नाचे शोषण होते. म्हणजे रोज ३० -४० गरम अन्न जास्त शोषले जाते. म्हणजे महिन्यात १ किलो आणि वर्षाला १० ते १२ किलो वजन वाढते. आता उरलेले ४० टक्के अन्न सुद्धा हळूहळू खाली उतरल्यामुळे त्यावर जीवाणूंचा प्रभाव होऊन पोटात वात तयार होतो आणि पोट फुगल्या सारखे वाटते.(याच मुळे त्या स्त्रीला प्रत्यक्ष असल्यापेक्षा जास्त लट्ठ झाल्यासारखे वाटते)याच काळात बर्याचशा स्त्रियांची मुलेसुद्धा शाळेत वरच्या वर्गात किंवा कॉलेजात जाऊ लागलेली असल्याने त्याना पण शिंगे फुटू लागतात. या मुळे ती आई ज्या काही गोष्टी काळजीपोटी सांगत असते त्या काय कटकट आहे या नजरेने पाहत असतात. शालिनीताईनि सकाळी उठून केशर घालून आपल्या मुलांना गरम गरम शिरा डब्यात दिला होता. शाश्वत( त्यांचा मुलगा जो आता ११ वीत जायला लागला आहे तो डबा घेऊन गेला पण त्याच्या मित्राने वाढदिवसाची मैकडोनाल्डमध्ये पार्टी दिली त्यात तो डबा खायचा विसरून गेला.आणि शाल्मली हि इंजिनियरिंग च्या तिसर्या वर्षाला आहे ती आज आपल्या मित्र मैत्रिणींच्या बरोबर कॅन्टीन ला जाणार आहे तेथे आईचा दिलेला डबा उघडला तर काकूबाई वाटू अशी तिला भीती वाटते म्हणून ती घरून डबा न्यायलाच "विसरते". यावर शालिनीताई मुले घरी आल्यावर चिडचिड करतात माझ्या कष्टाची कुणाला किंमतच नाही पहाटे उठून इतकी मरमर करून मुलांसाठी काही करावे तर त्यांना याच काही पडलेलं नाही. शैलेशराव संध्याकाळी परत आल्यावर शालिनी ताई त्यांच्या कडे तक्रार करतात तर शैलेशराव शाल्मलीला विचारतात तर ती म्हणते कि मी चुकून डबा विसरले पण मी कॅन्टीनमध्ये व्हेज सैंडविच खाल्ले हे सांगते( मी जंक फूड खात नाही). आता शैलेशराव मुलांवर ओरडावे का या विचारात असताना शालिनी ताई चिडचिड करतात लेकीला बापाचीच फूस आहे मी इतकी मरमर करते त्याची कुणाला किंमतच नाही इ. उत्साहात शैलेशराव आपल्या कंपनीत होणार्या पगारवाढ किंवा बढती बद्दल बोलणार असतात पण बायकोचे बोलणे ऐकून त्यांच्या उत्साहावर विरजण पडते. मुलांना घेऊन आज बाहेर KFC किंवा smoking joe मध्ये जाऊ अस ते सांगणार असतात पण ते काही बोलत नाहीत. शाश्वत डबा खायला विसरलो हे सांगतो तर आई ते ऐकण्याच्या मूड मध्येच नसते आईची बडबड चालू आहे तर काय करावे हे त्याला कळत नाही. आई म्हणते ते पटत असले तरी तो खरोखरच डबा विसरलेला असतो हे कोणी ऐकतच नाही शेवटी तो आपल्या खोलीत निघून जातो. हि कहाणी घरोघरी थोड्या फार फरकाने दिसणारी आहे. संप्रेरके मनावर सुद्धा परिणाम करीत असतात त्यामुळे स्त्रियांना उल्हसित वाटत असते जेंव्हा ती संप्रेरके कमी होऊ लागतात तशी मानसिक उभारी कमी होऊ लागते आणि नैराश्य येते. यात भर म्हणजे तिला असे वाटत असते कि कुटुंबात कोणालाही तिची किंमत राहिली नाही. अशा वेळी तिला समजून घेणारे कोण असते तर तिची एखादी मैत्रीण जी या सर्वातून गेलेली असते किंवा तिची आई जी आपल्या मुलीत घडणारी स्थित्यंतरे पाहत असते आणि तिला त्याचा स्वानुभव असतो. या काळात स्त्रीला अशा आधाराची गरज असते. क्रमशः

वाचन 34336 प्रतिक्रिया 79