मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कडेगावची भानामती : दुसरी बाजू

खेडूत · · काथ्याकूट
अगदी मागच्या वीकांताला मनात विचार आला की मिपा वर काही लिहावे. पहिल्यांदा सुचलेल्या काही विषयांमध्ये हाही एक होताच पण आता तो कालबाह्य झाला असे वाटून टाळला होता, तोच......(असो!) त्यावेळी मी पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजात शिकायला असल्याने खडे प्रकरण प्रत्यक्ष पाहिले नाही पण सुट्टीत गावी आल्यावर चर्चेतून नंतर पूर्ण माहिती मिळाली. या लेखावर अर्थातच माझी मते आहेत कारण ही माझ्याच गावातली घटना आहे . सदर खडे येण्याचा प्रकार अशास्त्रीय वाटल्याने सुरुवातीला नेत्ररोग तज्ञ आणि लगेचच शंका असल्याने अंनिस लाही बोलावले गेले. (गावाबाहेर च्या व्यक्तीने सांगितले तर लवकर स्वीकारले जाते असाही विचार असेल) सर्व डॉक्टर मंडळीनी याला औषध नाही हे सांगितल्यावर रुग्णांच्या नातेवाईकानी 'इतर' उपाय करून पाहिले. त्यालाही यश न आल्याने अंनिस ला उपचारांमध्ये भाग घेऊ दिला गेला. या लेखातील बहुतेक सर्व व्यक्ती मला माहीत असून 'पुढारी' चा वार्ताहर ही आमच्याच गावातला होता. प्रत्येकाने या घटनेचा आपल्याला हवा तसा अर्थ लावला असे वाटते. एकूणच हा प्रकार म्हणजे छोट्यांचा खोडसाळपणा होता असे म्हणावे लागते. त्या मुलीनी स्वतःच डोळ्यात खडे घालणे विचित्र वाटले तरी अशक्य नव्हते. या घटने नंतर त्यांना घरात विशेष वागणूक मिळू लागली. एकीच्या अनुभवाने दहा जणींना जमले. आपल्याला महत्व दिले जातेय ही सुखद भावना सुद्धा त्यामागे असू शकते. चहाच्या टपरीवाल्याने 'मालक' म्हणावे किंवा गल्लीतल्या नेत्याने 'सरकार' म्हणाल्यावर सामान्य माणसाला काहीसा अशाच प्रकारचा आनंद होत असतो. माझ्या शाळेत मुले मास्तरांना गैर हजेरीची असंख्य कारणे सांगत असत आणि एकूणच शाळेत न जाणे अनेकांना आवडे. शिक्षणाविषयी आजही खूप अनास्था वाढते आहे आणि जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा कल्पनेपलीकडे खालावला आहे. तर डॉ. दाभोळकरांनी केलेला उपाय आवश्यक होता त्यामुळे खरे काय ते कळायला मदत झाली. अन्यथा आपल्या गम्मत म्हणून केलेल्या युक्तीला जिल्हाभर अनपेक्षित प्रसिद्धी मिळत आहे हे बघून त्या चिमण्या मुलीना खरे बोलण्याचे धाडस पण झाले नसते. ही घटना होऊन चोवीस वर्षे झाली. या सर्व मुली आता दिल्या घरी सुखी आहेत. त्यांना पुन्हा कधी त्रास झाल्याचे ऐकिवात नाही. प्रश्न उरतो तो श्री ओंक साहेब यांच्या लेखाचा. ज्या कोणा बाबांचा ते उदो उदो करू पहातात त्याचे कारण काहीही असो. मूळ प्रश्न असे आहेत: १. डॉ. दाभोळकर हे स्वतः डॉक्टर आहेत. त्यांना रुग्णांशी कसे वागावे हे समजत नाही असे वाटते काय? २. १९८८ नंतर असे खडे परत गावात आले नाहीत हे सत्य नाही काय? का बरे आले नाहीत? ३. अंनिस ला बोलावण्या आधी काही पालकांनी मांत्रिक वगैरे उपाय केलेच होते. मग त्याला यश का आले नाही? ४. खडे थांबले ते नक्की कोणामुळे, याचे उत्तर का शोधले नाही? ५. या विषयावर स्वतः दाभोळकर यांनी त्यांच्या पुस्तकात एक पूर्ण प्रकरण दिले आहे ते आपण वाचले आहे काय? ६. अंधश्रद्धा निर्मूलन हे कार्यच चूक आहे असे आपल्याला वाटते काय?

वाचन 19571 प्रतिक्रिया 54