आणिबाणी
२५ जून १९७५ ला पंतप्रधान इंदीरा गांधी आणि केंद्रीय मंत्रीमंडळाच्या शिफारशीनुसार तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी देशांतर्गत आणिबाणी घोषित केली आणि कधी नव्हे ते प्रथमच स्वतंत्र भारताच्या इतिहासात औपचारीकरीत्या हुकूमशाही अस्तित्वात आली. त्यावेळचे अनेक किस्से खूप लहान असून देखील आठवतात - व्यक्तिगत म्हणाल तर अचानक शाळेत कुठलीतरी गाणी म्हणायची सुरवात झाली (सक्ती झाली असावी पण कळले नाही). त्या व्यतिरीक्त काहीच समजले नाही. पण एक दिवस दुर्गा भागवत आणि पुल देशपांडे हे आणिबाणीविरुद्ध कडाडल्याचे समजले. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण (त्यांना हेडमास्टर म्हणायचे) यांनी पुलंना विदूषक म्हणून हिणावले. तेव्हढ्यात जेपींबद्द्लच्या बातम्या ऐकू येऊ लागल्या मग अचानक निवडणूका जाहीर झाल्या आणि ठाण्यात अनेक सभा होऊ लागल्या. त्या सभांना लहान असून देखील घरच्यांबरोबर हजेरी लावलेली आठवते - ठळकपणे आठवतात त्या मॄणाल गोरे, सुब्रम्हण्यम स्वामी आणि जॉर्ज फर्नांडीस यांच्या सभा. त्यात सांगीतले गेलेले अत्याचार आणि दिसला कुठेतरी त्याविरुद्ध किमान मताच्या बळावर उभा राहीलेला सामान्य माणूस.
बघता बघता "गाय वासरू नका विसरू" म्हणणारी काँग्रेस काही काळ पडद्याआड गेली. अनेक ठिकाणी दिग्गज पडले त्यात राजनारायण समोर इंदिरा गांधी पडल्या तर संजय गांधी आणि चांडाळ चौकडी पण काही काळ नामशेष झाली... अर्थात दैव देते आणि कर्म नेते या उक्तिप्रमाणे जनता पार्टी आणि त्यातील सभासद उपपक्षांना लोकशाहीतील सत्ता झेपली नाही आणि बघता बघता खेळ खल्लास झाला!
नंतर परत आणिबाणी आली नाही आणि कुठेतरी दिसलेले सामान्यांचे बळ पण परत दिसले नाही. परीणामी राजकारण खराब होत गेले आणि सत्ताधारी बदलले तरी "लहरी राजा, प्रजा आंधळी.." सारखा प्रकार कायम राहीला... एकीकडे पंजाब, एलटीटीइ , काश्मिर दहशतवाद तर दुसरीकडे इंदीरा गांधी, राजीव गांधी, यांच्या हत्येचे धक्के पचवले, नाणेनिधीचे संकट दूर केले, उपग्रह उडवले आणि अणूबाँब उडवले पण सामाजीक विषमता आणि समस्या या कमी होण्या ऐवजी लोकसंख्येच्या पटीत वाढण्याऐवजी त्याहून अधीक जोरात वाढत असल्यासारखे वाटत आहे...
थोडक्यात तत्कालीन आणिबाणी ही एका नेतॄत्वाला सत्ता टिकवण्यासाठी जाहीर करावी लागली. पण आज देश टिकवणे अथवा बळकट करण्यासाठी लागणारा सामाजीक क्षमतेचा किमान वरकरणी दिसणारा अभाव पाहीला तर आजची परीस्थिती ही खरी आणिबाणीची वाटते, असे म्हणले तर ते १००% बरोबर ठरणार नाही (निदान तशी आशा करतो) पण १००% चूक पण नाही अशी भिती वाटल्यास ती खोटी आहे का?
वाचन
8089
प्रतिक्रिया
26