तुम्ही कधी न खाल्लेला ऐकलेला पदार्थ - ---नाकारड्...
निवेदिता ताईंचा विस्मरणात गेलेले पदार्थ वाचला अन मग फार दिवसापासून लिहीन लिहीन म्हणतेय तो पदार्थ 'नाकारड' आज लिहायचा घाट घातला.
हा पदार्थ मी माझ्या घरा व्यतिरिक्त कोठेही ऐकला सुद्धा नाही. चाखन तर दूरच ! त्यामुळे एका प्रकारे मी माझ्या घरातली सिक्रेट रेसिपी इथे देते आहे.
तुम्हा कोणाला माहीत असेल असं अजिबात वाटत नाही. माहीत असेल तर 'चू चू' च गजराच घड्याळ बक्षिस !!
हा पदार्थ काकड्यां पासून बनवतात. मागे प्रियालि कडे खुप काकड्या झाल्या अस ऐकल , घ्या त्यातल्याच दोन!!
आता काकडी म्हंटल की मला हसायच्या उकळ्यावर उकळ्या फुटतात.
का?
कारण पंचतंत्र!
त्यात एक गोष्ट आहे.
'राजाच्या जवळपास काम करणारा चतुर्थ श्रेणी कामगार सुद्धा दुखवू नये. त्यामुळे राजाची गैर मर्जी होऊ शकते.' संजीवक म्हणाला.
'ते कसे?' दमनक म्हणाला
'ऐक.'
एकदा एका महाअमात्याने एका महालाच्या झाडूवाल्याला अपमानास्पद वागणूक दिली.
त्यानंतर थोड्या दिवसांनी एकदा महाराज साखर झोपेत असताना हा झाडूवाला तेथे झाडू मारत होता. अचानक तो म्हणाला, ' महाअमात्य राणी साहेबांना आलिंगन देऊन चुंबत आहेत'.
राजा खाडकन जागा झाला. ' काय बोललास?' त्याने खडसावल.
'काय झालं महाराज? मी काही बोललो का?' मी काल रात्री नाटकाला गेल्याने माझी झोप अपुरी झालेय. मी काही तरी नाटकातले बोललो असेन ' झाडूवाल्याने सावरा सावरी केली.
पण संशयाचा किडा राजाच्या मनात घुसला अन महाअमात्यांची पदोपदी दैना सुरु झाली.
हे कसे झाले? असा प्रश्न पडून महाअमात्यांनी सखोल विचार केले तेंव्हा आपण त्या कामगाराला दुखावल्याचे त्यांच्या लक्षात आले.
मग त्यांनी वस्त्र प्रावरणे देऊन त्याचा सन्मान केला अन क्षमा याचिली.
दुसऱ्या दिवशी परत महाराज साखर झोपेत, अन झाडूवाला बोलला ' महाराज प्रात:विधीला बसून काकड्या खाताहेत '
परत महाराज खाडकन जागे झाले, ' काय ?काय बोललास?'
' काय बोललो महाराज? मी काल परत रात्री नाटकाला गेलो होतो'
राजाने विचार केला हा झाडूवाला खरच झोपेत काहीही बरळतो आपण तर कधीच प्रात:विधीला बसून काकड्या नाही खाल्ल्या?(डोळा मारायची स्मायली) अन मग महाअमात्य परत मर्जीत आले.
तर अश्या या काकड्य!!

From Drop Box" alt="" />
आता रेसिपी.
तर सामग्री:-
२ जून काकड्या. बरोबर वाचलात , थोड्या जून झालेल्या काकड्या मध्यम आकाराच्या.
हळद
हिंग
मीठ
हिरवी मिरची. (इथवर सार आ. आ. मा. ने घे.)
१०-१२ लवंग
२ इंच दालचिन
९-१० मिरे
२ टी स्पून जिरे
१-इंच भर सुंठ
२ टी स्पून मोहरी
५-६ पाकळ्या लसूण.
अर्धी वाटी दही पूर्ण पाणी गाळून (ऑप्शनल)
कृती :-
काकड्यांची साले काढून, खिसून घेणे.
आता हा कीस एका नॅपकिन वर टाकून, नॅपकिन गुंडाळून चक्क कपडा पिळल्या सारखा पिळून घ्या. जमेल तेव्हढ पाणी काढून टाका.
वरील सर्व मसाले, मोहरी, सुंठ(आधी फोडुन घेणे), लवंग दालचिन , जिरे मिरे, यांची मिक्सरवर छान पावडर करून घ्या.
एकदा बारीक झाले की मग त्यातच लसूण अन मिरची घालून परत एकदा मिक्सर वर वाटून घ्या. हळद हिंग मीठ मिसळा.
आता हे सर्व काकडीच्या किसात मिसळून छान एकत्र करा. आता पाणी काढलेलं दही मिक्स करा. तुमच दही भाता बरोबरच वा नुसत तोंडीलावण तयार.
हे 'नाकारड' खाताना नाकातून अक्षरश: सुं सुं पाणी सुरु होत. सर्दी पडश्यावर नामी उपाय !! झटकन जाम झालेलं डोकं हलक होत.
फ्रीज नसलेल्या काळात हे 'नाकारड' सहज महिनाभर मडक्यात राहायचं. टिकायच.
आतातर मी चक्क बरणीत भरून दोन महिने चाखत माखत राहते.
वाचन
9114
प्रतिक्रिया
27