मांसाहार व अन्नटंचाई
मांसाहारामुळे अन्नटंचाईच्या समस्येला कसा मोठा हातभार लागत आहे त्याबद्दल माहीतीपूर्ण दुवे:
http://blog.wired.com/wiredscience/2008/04/food-riots-begi.html
http://www.fao.org/newsroom/en/news/2006/1000448/index.html
आजची पिढी ही पूर्वीच्या पिढ्यांच्या तुलनेत मांसाहाराकडे जास्त वळलेली आहे आणि रोज त्यात भर पडत आहे. मांसाहाराचे इतर बरेच तोटे अनेक वेळेस अनेक ठिकाणी नमूद केलेले आहेतच (मानवी शरीरातील पचनसंस्था मांसाहारासाठी उत्क्रांत झालेलीच नव्हती, मांसाहारामुळे होणारे आजार, वगैरे वगैरे). महावीर, बुध्द आदींनी या आपल्या जिव्हालौल्यासाठी एखाद्या जीवनाचा बळी घेण्यापासून समाजाला परावृत्त करायचा प्रयत्न केला पण त्याला मर्यादित यश आले.
पण आजची परिस्थिती अजून गंभीर आहे. मांसाहार हा अन्नसाखळीमध्ये शेवटच्या कडीमध्ये येत असल्याने तो भयंकर खर्चिक मामला आहे. खर्चिक नुसते खाणार्याच्या पाकीटाच्या दृष्टीने नव्हे तर पर्यावरणाच्या दृष्टीने सुध्दा. इतकेच नव्हे तर आज जी अन्नटंचाईची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याबाबतीतही मांसाहार हा एक घटक जबाबदार असल्याचे दाखविलेले आहे. आजची अन्नटंचाई ही जागतिक आहे आणि त्यामुळेच पाश्चात्य विचारवंतही या मुद्द्याला मांडत आहेत. हा ब्लॉग लिहिणारा स्वतः कट्टर मांसाहारी होता हे सुध्द्दा लक्षात घ्यावे.
मला पूर्ण कल्पना आहे की मिसळपाववर मांसाहारप्रेमी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातले फारच थोडे आरोग्यासाठी वा धार्मिक (!) श्रध्दांसाठी मांसाहार करत असावेत. मला कोणत्या प्रकारच्या प्रतिक्रिया येतील याबद्दलही कल्पना आहे. मात्र, जे कोणी संवेदनाशील सभासद असतील ते किमान एकदा याबाबत विचार करतील अशीही खात्री आहे. माझ्या चैनीसाठी मी कोणा जीवाचा बळी घेतो हे जरी विचारात घेतले जात नसले तरी मनुष्य समाजाची अन्नविषयक व पर्यावरणविषयक हानी होऊ नये म्हणून स्वेच्छेने, चैनीचा मांसाहार जर कोणी कमी करायचे ठरविले तरी या लिखाणाचा उपयोग झाला असे मला मानता येईल.
सर्वे भद्राणि पश्यन्तु|
-ऐश्वर्या राय
वाचन
15145
प्रतिक्रिया
36