मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आजची स्त्रीची प्रतिमा - १

३_१४ विक्षिप्त अदिती · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मे महिन्यातला दुसरा रविवार मातृदिन. स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते असं आपण म्हणतो. भारतीय संस्कृतीत स्त्री ही देवीसमान आहे असंही म्हणण्याची पद्धत आहे. पण प्रत्यक्षात दिसायला काय दिसतं? जाहिरातींतून, सिनेमांतल्या आयटम गाण्यांतून, टीव्हीवरच्या सीरियल्समधून, आंतर्जालावर ठिकठिकाणी स्त्रीचं क्षणभंगूर रूप केवळ आपल्या डोळ्यांसमोर येतं. शिवाजीला संस्कार देणारी जिजाबाई अधूनमधून जयजयकार करण्यासाठी इतिहासाच्या पुस्तकात दडून राहाते. पण जिथे पाहावं तिथे मुखपृष्ठावर, बिलबोर्डांवर तारुण्याने मुसमुसलेल्या व अंगप्रदर्शन करणाऱ्या मोहिनी दिसत राहातात. ही विसंगती कमी करण्यासाठी या लेखमालेचं प्रयोजन. निदान पहिलं पुष्प तरी. फक्त पहिलं पुष्प अशासाठी म्हटलं की एका अर्थाने हा अभिनव प्रयोग आहे. कोणीतरी एकीने/एकाने आपले विचार मांडण्यापेक्षा, व एक काथ्याकूट करून सोडून देण्यापेक्षा मिपावर येणाऱ्या सुजाण वाचकांच्या व लेखकांच्या मनात स्त्रियांबद्दल काय भूमिका आहे हे या सदरातून समोर यावं अशी माझी इच्छा आहे. स्त्रियांचा केवळ शरीरापलिकडे विचार करणार बरेच लोकं असतील, त्यांनी पुढची पुष्पं गोवावीत असं आवाहन. त्यातला समान धागा जिवंत राहील ही आशा आहे. लहानपणी आईकडून गोष्टी ऐकताना एक गोष्ट सांगताना आईच्या डोळ्यात चमक दिसायची. ती गोष्ट आता आठवत नाही पण आईच्या डोळ्यांत दिसलेला अभिमान आणि ती चमक विसरणं शक्य नाही. ती गोष्ट होती चन्नमेची, कित्तूरची राणी चन्नमा! १७७८ साली जन्मलेली चन्नमा, भारतातली सगळ्यात पहिली स्त्री स्वातंत्र्यसैनिक. जेव्हा पुण्यात पेशवे राज्य करत होते, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्मही झाला नव्हता तेव्हा चन्नमा ब्रिटीशांशी लढा देत होती. काकती नावाच्या एका छोट्या गावात जन्मलेल्या चन्नमेला लहानपणीच लोकं तिच्या बहादुरीमुळे ओळखायचे. लहानपणीच घोड्यावर बसणे, तलवार चालवणे, तिरंदाजी अशा त्याकाळच्या युद्धकलेतच्या महत्त्वाच्या अंगांचे शिक्षण तिने घेतले. वयात आल्यावर कित्तूरचे राजा मल्लसर्जा यांच्याशी तिचा विवाह झाला. राज्यात सर्वकाही सुरळीत सुरू असताना इंग्रजांचा, आपला देश घशात घालण्याचा उद्योग सुरूच होता. याच नीतीचा भाग म्हणून कित्तूरच्या राजांकडेही इंग्रजांचे तैनाती सैन्य होतं; (... दोन शतकांनंतर हिटलरने ऑस्ट्रीया, झेकोस्लोवाकियाच्या बाबतीत जे केलं साधारण तसंच! आजच्या काळात परराष्ट्रखातं दुसर्‍या देशाच्या हातात जाण्यासारखंच ). राजा मल्लसर्जा यांचं १८१६ मधे निधन झाल्यावर परिस्थिती थोडी बदलली. चन्नमेने आपल्या एकुलत्या एका मुलाचा राज्याभिषेक करून दिला. पण दुर्दैवाने दिवस फिरणार होती. तिच्या मुलाचाही १८२४ साली मृत्यु झाला आणि इंग्रजांना कित्तूरचं राज्य घशात घालण्याची कधीपासून हवी असलेली संधी मिळाली. पण चन्नमा इंग्रजांना बधली नाही. तिने शिवलिंगप्पा याला दत्तक घेऊन त्याच्या राज्याभिषेक केला. ब्रिटीशांनी (झाशीच्या संस्थानाच्या बाबतीत केलं तेच) दत्तकपत्र नामंजूर करून कित्तूर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. चन्नमाला बाहेरच्या लोकांचा हा प्रयत्न मान्य नसल्यामुळे तिने लढण्याची पूर्ण तयारी केली. ब्रिटीशांच्या प्रचंड फौजफाट्याला न घाबरता तिने बंडाळी करून स्वत:चं सैन्य उभं केलं. २३ ऑक्टोबर १८२४ च्या लढाईत संस्थान खालसा करणारा, धारवाडचा तेव्हाचा कलेक्टर थॅकरे, चन्नमेच्या सैन्याने मारला. चन्नमेची ही लढाई मात्र फार काळ चालली नाही. दीड महिन्यांच्या आतच, ३ डिसेंबरला चन्नमा पकडली गेली. कित्तूरचे राज्य बेळगाव जिल्ह्याला जोडले गेले. आणि युद्धबंदी बनवून चन्नमेला बैलहोनंगळच्या किल्ल्यात पाठवलं आणि तिथेच तिचा २१ फेब्रुवारी १८२९ साली मृत्यु झाला. बेळगावपासून ५० किमीवर कित्तूरचा किल्ला आजही चन्नम्मांची कहाणी सांगत उभा आहे. आपल्या हक्कासाठी, आपल्या जनतेसाठी लढणारी चन्नमा ही आज फक्त कर्नाटकातच नाही तर सगळ्यांसाठीच वीरश्रीचा एक मापदंड ठरली आहे. चन्नम्मेचा वारसा चालवू पहाणार्‍यांपैकी मी एक, आज तिला मानाचा मुजरा करते. (सर्व माहिती आंतरजालावरून घेतली आहे.)

वाचन 37124 प्रतिक्रिया 147