हे सारे कोठून येते?
अलीकडेच वाचलेल्या दोन बातम्या. एक टांझानियात अल्बिनोंवर होत असलेल्या अत्याचारांची (अल्बिनो म्हणजे मेलॅनिनच्या अभावामुळे एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण अंगावर सफेद कोड उठल्यासारखे वाटण्याची स्थिती) आणि दुसरी सातारा जिल्ह्यात सुखेड आणि बोरी गावच्या महिलांत दरवर्षी नागपंचमीच्या दुसर्या दिवशी भरणार्या शिवीगाळीच्या सामन्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेल्या विरोधाची.
. . .
आपल्या ज्या काही म्हणून मूलभूत भावना आहेत - आनंद, दु:ख, द्वेष इ.; त्यांची बीजं उत्क्रांतीमध्येच आपल्यात रोवली गेली असावीत. उदाहरणार्थ, अलीकडेच कोणीतरी डोंगरमाथ्यावरून दूरवर पसरलेली हिरवळ ही आपल्या आदिम मनाला कुठेतरी (जड शब्दच वापरायचा झाला, तर नेणीवेच्या पातळीवर) सुरक्षिततेची, संपन्नतेची ग्वाही देते आणि तो दिलासा आपल्या मनाला सुखावतो असा विचार मांडला होता. हिरवीगार रम्य वनश्री आणि कसेतरी विखरून पडलेले दगड. पण यातलं एक दृश्य (निदान बहुसंख्यांना) आवडतं आणि दुसरं आवडत नाही, ह्या (थोडा विचार केला तर भासणार्या) विसंगतीमागचं हे एक संभाव्य कारण.
पुढचं उदाहरण कदाचित टोकाचं वाटू शकेल, परंतु आईवडिलांच्या आपल्या अपत्यांवरील निरपेक्ष प्रेमात वंशसातत्याच्या सनातन प्रेरणेचाही मोठा हिस्सा आहे, असं काही उत्क्रांतिशास्त्रज्ञांचं मत आहे. या विचारप्रवाहाकडे थोडंफार हे निसर्गाने तयार केलेलं 'मॅट्रिक्स' या दृष्टीतून पाहता येईल. अगदी 'श्यामची आई'मध्येही साने गुरूजींना 'माझ्या आईचं केवळ माझ्यावरच इतकं प्रेम का? सार्या जगातल्या लेकरांवर तिने माझ्याच एवढं प्रेम करायला हवं' या प्रश्नाने छळल्याचा उल्लेख आहे. (या विधानांचा विपर्यास सहज करता येईल किंवा मानवी भावनांना साच्यात बसवल्याचा आरोप होईल. पण तो लेखाचा मुख्य विषय नसल्याने विस्तारभयास्तव अधिक लिहित नाही)
तिसरी भावना भयाची व/वा द्वेषाची. कदाचित एकाच आदिम भावनेच्या या दोन बाजू असाव्यात. प्रेमाच्या झेंड्यापेक्षा द्वेषाच्या झेंड्याखाली माणसं लगेच गोळा होतात, हे सत्य आहे. 'आपण' आणि 'ते' अशी विभागणी सनातन आहे. (विंदांचा याच आशयाचा एक लघुनिबंध यासंदर्भात फार बोलका आहे. गर्दीने भरलेल्या डब्यात आतल्या माणसांशी झगडून लेखक आत शिरतो आणि मग पुढच्या स्थानकात आतल्या गर्दीचाच एक भाग बनून इतरांना आत चढण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतो.) मग ती कांदिवलीचे प्रवासी उलट बसून येतात म्हणून बोरिवलीचे लोक त्यांना शिव्या घालतात इतक्या छोट्या पातळीवरची असो की थेट दोन राष्ट्रांतील युद्धाला दोन धर्मांतील संघर्षाचे रूप यावे इतकी मोठी.
पण मुळात द्वेषभावनेला इतकी तीव्रता का येते? यात उत्क्रांतीतलं 'सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट' सारखं काही सूत्र आहे का? कोंडलेलं मांजर जसं सर्वशक्तीनिशी माणसाच्या नरड्यावर झेप घेऊ शकतं, तशी काही तग धरून रहायची (सर्व्हायवल इन्स्टिंक्ट) भावना यामागे असावी का?
कुठल्याही संस्कृतीचा एक मोठा भाग हा 'नैसर्गिक ऊर्मींवर नियंत्रण ठेवण्याचे काही समाजमान्य उपाय' असा असतो. यातून कदाचित प्रत्येकात कमीअधिक प्रमाणात खदखदलेपणाची एक भावना निर्माण होत असावी. घरात होणार्या संस्कारांपेक्षा हा मुळात पिंडाचा भाग असावा असं मला वाटतं. हे वैफल्य कुठेतरी व्यक्त करायला मग एक लक्ष्य लागतं. हिटलरने दुसर्या महायुद्धापूर्वी ज्यू समाजाला केलं, बरेचसे पाकिस्तानी राजकारणी भारताला ठरवत आलेत किंवा पहिल्या ओळीत म्हटल्याप्रमाणे टांझानियातल्या अल्बिनोंना सध्या गुप्तधनासारख्या हव्यासापोटी नरबळी पडावं लागत आहे तसं. भिंग योग्य अंतरावर धरल्यावर किरण एका बिंदूवर एकत्र यावेत, तसं एक लक्ष्य ठरवून दिलं की माणसातला पशू जागा होतो.
बहुतेक म्हणूनच प्रत्येक धर्मात, समाजात या सुप्त पण खदखदणार्या द्वेषभावनेचा निचरा करायला एक जागा असते, आणि नसलीच तर प्रत्येक व्यक्ती आपापल्या कलाप्रमाणे ती शोधत असते. ज्याचा त्याचा बागुलबुवा. ज्याला कृतीने किंवा उक्तीने झोडपून काढलं की मन शांत होतं, रोजच्या आयुष्यातलं वैफल्य कमी होतं असं काहीतरी. उदाहरणं शोधली तर अनेक सापडतील. मक्केत सैतानाचं प्रतीक म्हणून उभारलेल्या खांबावर त्वेषाने दगडफेक करणारे भाविक, वाय टू केच्या चक्रात नोकरी गेल्यावर घरी बायकोला येऊन मारहाण करणारे काही पुरूषोत्तम, मुलांवर राग काढणार्या आया, बेणारे बाईंवर खटला चालवणारे सभ्य लोक, 'वॉर अँड पीस'मधल्या वेरेश्चागिनचा जमावाने घेतलेला बळी; एक ना अनेक.
ही द्वेषभावना असणार आणि वेळोवेळी तिचं कुठेना कुठे प्रकटन होत राहणार, हे अमान्य करणं भाबडेपणाचं होईल. जागतिकीकरणात अशा जुन्या समाजमान्य (आठवा : बेंबट्या, होळी पेटल्यावर बोंबा मारायला लाजणे यात पुरुषार्थ नाही. कोर्टात भांडण आणि तीर्थास मुंडण हे हवेच) जागा (आऊटलेट्स) जात आहेत; पण त्यांची जागा घ्यायला नवीन पर्याय मात्र फारसे उपलब्ध नाहीत. अशा वेळी अंनिसने अशा 'ब्लेसिंग इन डिस्गाईज' असणार्या प्रथा बंद करण्यात ऊर्जा वाया घालवणे कितपत योग्य आहे? अशी अस्वस्थ ऊर्जा मग प्रथम भडक उक्तीकडे आणि अपरिहार्यपणे विध्वंसक कृतींकडे वळत असेल का? उक्तीला कमी लेखण्याकडे जरी कल असला, तरी तिच्यामुळे पुढच्या कृतींना बळ मिळू शकते. भांडारकर प्राच्यविद्या संशोधनसंस्थेवरील हल्ल्याचे उदाहरण या संदर्भात पुरेसे ठरावे.
'थिंकिंग अॅज अ हॉबी' हा विल्यम गोल्डिंग या नोबेल पुरस्कारप्राप्त लेखकाचा लघुनिबंध या संदर्भात चिंतनीय आहे. त्याने समाजाची विचारशक्तीच्या दृष्टीने तीन स्तरांत विभागणी केली आहे. पहिला बराच मोठा स्तर हा हेवेदावे, पूर्वग्रह, गैरसमजुती यांना कळत नकळत उराशी बाळगून जगणार्यांचा. लेखकाने उदाहरण दिल्याप्रमाणे घाऊक प्रमाणात सरसकट सगळ्याच जर्मनांचा द्वेष करणार्या ब्रिटिश म्हातारीचा. (इथे वूडहाऊसच्या 'आय डोन्ट हेट इन प्लुरल' या विधानाची अपरिहार्यपणे आठवण होते.) दुसरा स्तर हा अधिक विचारी व्यक्तींचा. तिसर्या स्तरातील लोकांना त्यांच्या समजुतीतील विसंगती दाखवून देणार्यांचा. पण त्यांचा हेतू चांगला असला तरी लेखक म्हणतो त्याप्रमाणे जुनी व्यवस्था मोडीत काढून त्याऐवजी पर्यायी व्यवस्था न देणार्यांचा (For grade-two thinking destroys without having the power to create. It set me watching the crowds cheering His Majesty the King and asking myself what all the fuss was about, without giving me anything positive to put in the place of that heady patriotism.). या सर्वांहूनही पहिला वर्ग शतकात अगदी हाताच्या बोटांवर मोजता येणार्या कृतिशील विचारवंतांचा. जो केवळ 'सत्य काय आहे?' हे विधान वाद संपवायचे एक साधन म्हणून न वापरता ती एक आव्हानात्मक सुरूवात म्हणून वाट चोखाळतो.
अंनिसची ही कामगिरी 'दुसर्या स्तरातील लोकांचा तिसर्याशी होणारा संघर्ष' आणि 'विचारांत विसंगती असली तरीही तिला वाट देण्यासाठी नव्या पर्यायी यंत्रणेचा अभाव' या सदरात मोडतं, असं माझं मत. याबद्दल आणि वर उल्लेखलेल्या मुद्द्यांबद्दल आपल्याला काय वाटतं हे जाणून घ्यायला आवडेल.
(एकाहून अधिक विषय असल्याने लेख जनातलं, मनातलं या सदरात टाकला आहे. तो हलवला/काढून टाकला तरी काही हरकत नाही.)
वाचन
13122
प्रतिक्रिया
32