मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपा संपादकीय - पुलं, ओबामा आणि एकविसाव्या शतकातले मराठीपण.

संपादक · · विशेष
विशेष
मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचायला मिळेल! धन्यवाद...
पुलं, ओबामा आणि एकविसाव्या शतकातले मराठीपण
विसावे शतक जेव्हा चाळीशीत शिरले तेव्हा विशीत आलेले पुलं आज हयात असते, तर परवा त्यांनी नव्वद वर्षे पूर्ण केली असती. त्यांच्या साहित्याबद्दल, अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाबद्दल नव्याने काही लिहिण्याची गरज नाही. त्यांच्या पश्चात त्यांचे लेखन तितकेच लोकप्रिय आहे. अजूनही 'व्यक्ती आणि वल्ली'ची पारायणे होतात, 'ती फुलराणी'चे प्रयोग रंगतात आणि रोजच्या वापरात अनेकदा त्यांचे विनोद, त्यांची वाक्ये ओठांवर येतात. बराक ओबामाची अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड होणे हे अनेक दृष्टींनी प्रतीकात्मक आहे. केनियन वडील, कॅन्सस राज्यातील आई, हवाईत जन्म, इंडोनेशियन सावत्र वडिलांमुळे तिथे गेलेले बालपण आणि तिथल्या मुस्लिम (आणि काही प्रमाणात हिंदूही?) धर्माचा पडलेला प्रभाव. तीन खंडांत पसरलेले नातेवाईक, दोन वेगवेगळ्या वर्णांचे आईबाप आणि तीन धर्मांशी अगदी लहान वयात झालेली तोंडओळख. या आठवड्यात घडून आलेल्या ह्या दोन वरवरच्या वेगवेगळ्या गोष्टींची सांगड घालण्याचे कारण काय? विसाव्या शतकात मराठी भाषक समाजाच्या संस्कृतीवर ज्यांनी प्रभाव पाडला, अशा मोजक्या व्यक्तिमत्वांमध्ये ज्यांचे नाव घ्यावे लागेल असे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि दुसरा राजकीय क्षितिजावर वेगाने वर आलेला, अनेकांच्या आशा ज्यावर केंद्रित आहेत असा तारा. दोघांची तुलना शक्य नाही, आणि तसा या लेखाचा उद्देशही नाही. (थोडा बादरायणी) उद्देश आहे तो, ओबामा ज्या जागतिकीकरणाचे प्रतीक म्हणून पाहता येईल त्या प्रक्रियेचा, पुलंनी त्यांच्या साहित्यात रेखाटलेल्या विसाव्या शतकातल्या मराठी समाजाच्या ओळखीवर भविष्यात होणार्‍या अपरिहार्य परिणामांचा वेध घेण्याचा. * * * जागतिकीकरण आणि मानवसमूहांचे होणारे स्थलांतरण या पूर्वापारपासून घडणार्‍या घटनांना अधिक वेग आल्यावर काय होईल, याची एक चुणूक ओबामाच्या निवडीतून मिळते असे मानायला हरकत नसावी. इंग्रजीचा, अमेरिकीकरणाचा मारा होत असला तरी बर्‍याच संस्कृती आपापली स्वतंत्र ओळख अद्याप टिकवून आहेत. पण जरी असे असले, तरी कमीअधिक फरकाने या भाषांना आपले स्वत्व टिकवून ठेवण्याची धडपड करावी लागते आहे. रेड इंडियन जमातीच्या सू, टिवा सारख्या भाषा जर आज जात्यात असतील तर कर्नाटकातील तुळूसारखी भाषा सुपात आहे. हिब्रू टिकवून ठेवण्यासाठी जसे परिश्रम घेतले गेले, तसे विशेष प्रयत्न केले नाहीत तर मराठीच्या वेगवेगळ्या बोलींनाही काही दशकांनी याच स्थितीला सामोरे जावे लागेल. अर्थात, भाषा हे संस्कृतीचे प्रतिबिंब मानले तर हे कितीही अप्रिय असले तरी अपरिहार्य आहे. मालवणी आणि मराठीचे उदाहरण घेऊ. मच्छिंद्र कांबळींच्या नाटकांमुळे मिळालेली लोकप्रियता ही जमेची बाजू असली तरी मालवणी बोलता येणार्‍यांची संख्या आजच्या पिढीत - हळूहळू का होईना - रोडावते आहे. मुंबई किंवा इतर शहरांत होणारे स्थलांतर हे त्यातले मुख्य कारण असावे. शेवटी एका व्यापक अशा मराठी संस्कृतीचा भाग असल्याने, मराठीने मालवणीची म्हणा किंवा अहिराणीची म्हणा, जागा घेणे हे अपरिहार्य आहे. हाच धागा, जर पुढे वाढवून विचार केला तर काय दिसेल? कोकणातून किंवा खानदेशातून मुंबई-पुण्यात होणारे स्थलांतर जागतिक पातळीवर पाहिले तर विकसनशील देशांतून विकसित देशांकडे होणार्‍या स्थलांतरासारखेच, मात्र स्वतःची संस्कृती टिकवून ठेवण्याचे आव्हान तितक्याच प्रमाणात अवघड. रसेल पीटर्स हा भारतीय वंशाचा विनोदी कार्यक्रम करणारा अभिनेता (स्टॅंड-अप कॉमेडियन) म्हणतो, तसे की ही स्थलांतराची, वेगवेगळ्या वंशांचे लोक एकत्र येण्याची प्रक्रिया अशीच चालू राहिली, तर यामुळे जगातला वर्णभेद नाहीसा होईल. कारण जगातले सारे लोक एकाच मिश्र रंगाच्या विविध छटांचे बनतील. यातला विनोदाचा भाग सोडला, तर जागतिकीकरणामुळे आता कुणालाच एकटे, स्वयंभू, विसाव्या शतकातील सार्‍या बारीकसारीक वैशिष्ट्यांसह फार दिवस राहता येणार नाही हे खरे. फार पूर्वी, गोंडवन नावाच्या भूभागातून खंड तयार होऊन वेगवेगळ्या दिशांना वाहत गेले, त्याच्या उलट प्रक्रिया होऊन जग आता 'यत्र विश्वभवत्येक नीडम्' सारखे एकत्र येत राहील. ओबामा काय किंवा भारतीय वंशाचे व्ही. एस. नायपॉल, मॉरिशसच्या शीलाबाय बापू काय - हे केवळ या भविष्याच्या नांदीतलेच काही सूर. याचा परिणाम म्हणून मग अजून काही शतकांनी, डार्विनने मांडलेल्या जीवसृष्टीच्या नियमाप्रमाणे, सध्याच्या हजारो प्रचलित भाषांपैकी केवळ आर्थिक आणि संख्याबळाच्या दृष्टीने सामर्थ्यवान असणार्‍या काही मोजक्या भाषाच मागे राहतील. दहा कोटींच्या आसपास असणार्‍या समूहाकडून आज बोलली जाणारी, संख्याबळाच्या दृष्टीने जगातल्या पहिल्या पंधरा भाषांत गणना होणारी मराठी यापैकी एक असेल, असं मला वाटतं. पण तिचे स्वरूप - आपल्याला आवडो वा न आवडो, बदलत जाणार हे नक्की. संस्कृतीतील बदलाचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणून पुलंच्या लेखनाच्या आस्वादक्षमतेत पिढ्यांनुरूप झालेल्या फरकाचे घेता येईल. दुसर्‍या महायुद्धाची झळ सोसून तगून राहिलेला मराठी मध्यमवर्ग हा पुलंच्या लिखाणाचा केंद्रबिंदू. त्यांच्या आशा-आकांक्षा, अभावितपणे किंवा स्वभाववैशिष्ट्यांमुळे घडणारे विनोद, चाळीतून फ्लॅटमध्ये येतानाही जुन्या सवयी, संस्कार टिकवून ठेवण्याची धडपड या सार्‍यांचं चित्रण त्यांनी इतक्या जिवंतपणे केलं आहे, की उद्या एखाद्या समाजशास्त्रज्ञाला त्यात माहितीचा खजिना सापडेल. असा हा मध्यमवर्ग, किंवा त्याच्याशी नातं जोडू शकणारा वर्ग अजूनही टिकून आहे. पण त्यातले काही संदर्भ अपरिहार्यपणे बदलत आहेत. सा नंबरची ट्राम, भो पंचम जॉर्ज भूप, कुळकर्ण्यांची भजी, मिस मेरी भोर या गोष्टी माझ्या पिढीलाच ऐकून माहीत होत्या. पुढच्या काही पिढ्यांना मग 'टाकुनिया बाबा गेला'तले मूळ गाणे, तुडुंब प्रसन्न होणे मधली चपखल शब्दयोजना, 'वीट येणे' सारखे भाषिक विनोद हेही समजावून द्यावे लागेल. असे असले, तरी त्यांच्या लेखनातून सतत जाणवत राहणारा त्यांचा आनंदयात्री स्वभाव म्हणा किंवा 'जे जे आपणासी भावे, ते ते इतरांसी सांगावे' सारखी मार्मिक रसिकवृत्ती ही - त्यांचेच आवडते उदाहरण द्यायचे झाले तर - प्रलयातल्या पिंपळपानासारखी टिकून राहील, हे नक्की. पण असे व्हायचे असेल, तर विसाव्या शतकातील निकषांचा दुराग्रह धरणे योग्य होणार नाही. मराठीपणाची व्याख्या त्यासाठी विस्तारावी लागेल. सर्वसमावेशकतेच्या धोरणामुळे हिंदू धर्म इतकी वर्षे टिकला - भाषा आणि संस्कृतीबद्दलही तसेच धोरण स्वीकारणे भविष्यात भाग आहे. पाश्चात्यीकरणाला बळी पडावे, भाषेत बिनदिक्कत इतर भाषेतल्या शब्दांची भेसळ होऊ द्यावी असा याचा अर्थ नाही. पण त्या रेट्याला तोंड देताना, लवचिक धोरण स्वीकारणे भाग आहे. जे जे जपण्याजोगे आहे ते जपलेच पाहिजे यात काही वाद नाही, पण एकंदर 'सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पण्डित:' हे ध्यानी ठेवून वाटचाल करणे भाग आहे. यात मग परभाषेतल्या शब्दांचा स्वीकार, पोशाख आणि आहारपद्धतीतील बदल, लिखाणाचे नवीन नियम, धार्मिक कुळाचार हे सारे आले. बटाट्याच्या चाळीच्या शेवटी मनोगतात पुलंनी व्यक्त केलेली खंत त्या पिढीची प्रातिनिधिक आहे. 'ते हि नो दिवसा गता:'ची. मुली नोकरीसाठी बाहेर पडल्या म्हणून हळहळणारी, उद्याच्या पिढीतला अभिजीत मॅट्रिकच्या परीक्षेला जाताना वडीलधार्‍यांच्या पाया न पडता 'रॉक, रॉक' म्हणत जाईल असे भाकीत वर्तवणारी. या पिढीत किंवा पुढे येणार्‍या पिढ्यांत, आता ज्या गोष्टींबद्दल खंतावायचे त्या बदलतील पण धोंडो भिकाजी जोशींच्या त्या घड्याळासारखे, काटे वेळोवेळी बदलत्या काळाशी जुळवून घेत राहणे भाग आहे. अर्थात हे निर्णय, हे बदल सामाजिक पातळीपेक्षाही वैयक्तिक पातळीवर अधिक होतात. आशा करूया की, बाविसाव्या शतकात शांघायमध्ये वाढणार्‍या एखाद्या मराठी मुलाला नारायण बोहलं झाडतो म्हणजे काय करतो किंवा लग्नात नवरा हातरुमाल हवेत म्हणून का अडून बसतो; हे जरी नीट उमगलं नाही, तरी त्यातील काळा झालेला लाडू मुठीत धरून झोपी गेलेल्या नारायणाच्या मुलामागचे प्रतीक तरी समजेल. पाहुणा संपादक : नंदन.

वाचन 20915 प्रतिक्रिया 53
Permalink

मुक्तसुनीत यांनी येथे मांडलेल्या चर्चाप्रस्तावावरून या विषयावर लिहायचे सुचले, हे येथे कृतज्ञतापूर्वक नमूद करावेसे वाटते.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

Permalink

अतिशय आवडला अग्रलेख.
Permalink

अतिशय सुंदर लेख, नंदनराव.
Permalink

मस्तच ! अभिनंदन जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
Permalink

नंदन, मस्तच जमलाय अग्रलेख.. खरं म्हणजे, नाव वाचून मला या तिन्हींचा संबंधच लावता आला नाही.. पण सुंदरच झालाय! :) http://bhagyashreee.blogspot.com/
Permalink

फार फार समर्पक लेख नंदन. अभिनंदन.
Permalink

याचा परिणाम म्हणून मग अजून काही शतकांनी, डार्विनने मांडलेल्या जीवसृष्टीच्या नियमाप्रमाणे, सध्याच्या हजारो प्रचलित भाषांपैकी केवळ आर्थिक आणि संख्याबळाच्या दृष्टीने सामर्थ्यवान असणार्‍या काही मोजक्या भाषाच मागे राहतील. दहा कोटींच्या आसपास असणार्‍या समूहाकडून आज बोलली जाणारी, संख्याबळाच्या दृष्टीने जगातल्या पहिल्या पंधरा भाषांत गणना होणारी मराठी यापैकी एक असेल, असं मला वाटतं. पण तिचे स्वरूप - आपल्याला आवडो वा न आवडो, बदलत जाणार हे नक्की. सहमत. ह्या शतकात आंतरजालावर/[का आंतरजालामुळे??] मराठी चांगलीच फोफावणार.

In reply to by सहज

Permalink

मराठी भाषा (खरंतर भाषिक) असंच नवीन तंत्रज्ञानाला आपलंसं करत राहिले तर मराठीला (कोणात्याही भाषेला) मरण कठीणच आहे. अर्थात कालौघात भाषेचं स्वरुप बदलेल हे मान्य. बाकी सुंदर अग्रलेख. अदिती
Permalink

समर्पक आणी सुंदर लेख !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
Permalink

संख्याबळाच्या दृष्टीने जगातल्या पहिल्या पंधरा भाषांत गणना होणारी मराठी यापैकी एक असेल, असं मला वाटतं. दहा कोटीच्या निव्वळ संख्याबळामुळे मराठी वाचणार हे उघड आहे. कर्नाटकातील कोडवा , तुळू किंवा त्रिपुराची कोकबोरोक भाषा अनुक्रमे कन्नड व बंगालीच्या आक्रमणामुळे मृत्यपंथाकडे वाटचाल करित आहे. त्याचवेळी कोकणी सारख्या अल्पभाषी समुहाने गोव्यात स्वतःची "भास" टिकवण्यासाठी केलेले प्रयत्नही कौतुकास्पद आहेत. जागतिकीकरणाचा बाऊ न करता जे जे मराठी ते ते टिकवणे शक्यकोटितील गोष्ट आहे. आज आंतरराजालावरील मराठी भारतीय भाषांमधे सर्वाधिक(किमान पहिल्या तीनातील) active भाषा म्हटली तरी अतिशयोक्ती होऊ नये. मागे एकदा मी सहजच मराठी विकी च्या लेखसंख्येची इतर भारतीय विकींशी तुलना केली होती. यात हिंदी वगळता तुलना केलेल्या इतर सर्व भाषांमधे मराठी च आघाडीवर होती. ही काही सकारात्मक लक्षणे. त्याचवेळी मराठी चित्रपट कात टाकतोय असे जरी म्हटले तरी जे काही होत आहे ते क्षमतेपेक्षा तरी किती तरी कमी आहे असे वाटते. (विशेषत: मराठी चित्रपटाचा भौगोलिक प्रसार) आज मराठीत नवी गाणी तयार होणे लक्षणीयरित्या कमी झालेय. आंतरजाल वगैरे नाही म्हटले तरी अभिजात जनांची मक्तेदारी आहे. रिक्षातल्या रेडिओवर वाजणारी मराठी गाणी मराठी संवर्धनाचे काम चांगले करतील; पण यावर आणखी काही तरी भरिव होण्याची गरज आहे.
Permalink

नंदन, लेख फार आवडला. मग अजून काही शतकांनी, डार्विनने मांडलेल्या जीवसृष्टीच्या नियमाप्रमाणे, सध्याच्या हजारो प्रचलित भाषांपैकी केवळ आर्थिक आणि संख्याबळाच्या दृष्टीने सामर्थ्यवान असणार्‍या काही मोजक्या भाषाच मागे राहतील. दहा कोटींच्या आसपास असणार्‍या समूहाकडून आज बोलली जाणारी, संख्याबळाच्या दृष्टीने जगातल्या पहिल्या पंधरा भाषांत गणना होणारी मराठी यापैकी एक असेल, असं मला वाटतं. पण तिचे स्वरूप - आपल्याला आवडो वा न आवडो, बदलत जाणार हे नक्की. अगदी अगदी... स्वाती
Permalink

लेख आवडला. ही प्रतिक्रिया केवळ पोचपावती. कारण लेख भाषा ह्या माझ्या आवडीच्या विषयावर असल्यामुळे विस्तृत प्रतिसाद नंतर देईनच! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
Permalink

पण त्या रेट्याला तोंड देताना, लवचिक धोरण स्वीकारणे भाग आहे. जे जे जपण्याजोगे आहे ते जपलेच पाहिजे यात काही वाद नाही, पण एकंदर 'सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पण्डित:' हे ध्यानी ठेवून वाटचाल करणे भाग आहे. यात मग परभाषेतल्या शब्दांचा स्वीकार, पोशाख आणि आहारपद्धतीतील बदल, लिखाणाचे नवीन नियम, धार्मिक कुळाचार हे सारे आले. एकदम पटले! :)
Permalink

मस्त झालाय लेखं फक्त ओबामाचा उल्लेख तोंडओळखीसाठीच आलाय असे वाटले (तीन खंडांत पसरलेले नातेवाईक, दोन वेगवेगळ्या वर्णांचे आईबाप आणि तीन धर्मांशी अगदी लहान वयात झालेली तोंडओळख हे मान्य) या आठवड्यात घडून आलेल्या ह्या दोन वरवरच्या वेगवेगळ्या गोष्टींची सांगड घालण्याचे कारण काय? हे निटसे कळले नाही. किंवा पुलं, ओबामा आणि एकविसाव्या शतकातले मराठीपण हे शिर्षक फारसे कळले नाही. :W बाकी अग्रलेख किंवा संपादिकिय या सदरात हा लेख एकदम फिट्ट बसलाय. हॅट्स ऑफ नंदनजी चेतन
Permalink

प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक आभार. या आठवड्यात ५ नोव्हेंबरला बराक ओबामाची अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि ८ नोव्हेंबर ही पुलंची नव्वदावी जयंती. अग्रलेख शक्यतो नुकत्याच घडून गेलेल्या घटनांबदल लिहावा असा विचार करत असताना या दोघांतला बादरायण म्हणता येईल, असा एक संबंध डोक्यात आला. गेल्या शतकात मराठी मध्यमवर्गाची एक विशिष्ट घडी बसली होती. वर एका परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे, पुलंच्या लेखनाचा केंद्रबिंदू हाच समाज होता. स्थितीशील आणि अपरिहार्य बदलांना हळूहळू तोंड देणारा. नव्वदीतल्या उदारीकरणानंतर, हाती अधिक पैसा आला. परदेशगमन अधिक सुलभ झाले. पण याचबरोबर इतर अनेक गोष्टीही घडल्या. सांस्कृतिकदृष्ट्या पुढे जे बदल होऊ घातले आहेत, त्यांची ती एक नांदी म्हणता येईल. बदल पूर्वीही होत होते, पण त्यांचा वेग गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढला आहे आणि तो वाढत राहील अशीच चिन्हे आहेत. एकजिनसीपणा जाऊन सार्‍या जगाचे मेल्टिंग पॉट होण्याची ही प्रक्रिया आवडो-न आवडो सुरू आहे. देशागणिक तिचा वेग निराळा एवढाच फरक. मिश्रवंशीय ओबामाची निवड याच दृष्टीने महत्त्वाची वाटते. अर्थात, ओबामा हा मुख्य मुद्दा नाही हे मान्य. पण थोडे 'कॅची' शीर्षक द्यायचा मोह आवरला नाही :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

Permalink

लेखकाच्या प्रगल्भ जाणीव, सखोल चिंतनशील वाचन आणि वैयक्तिक परिप्रेक्ष्यात वैश्विक पातळीवरचे बदल (-अथवा याउलट)उलगडून दाखवण्याचे कसब या तीन्ही गोष्टींचे कौतुक वाटले. असे ललित आणि वैचारिक पातळीवर एकाचवेळी आकर्षित करणारे लेखन सहसा विरळाच आढळते. असेच आणखी लेख लेखकाकडून अपेक्षित आहेत.

In reply to by विसुनाना

Permalink

असे ललित आणि वैचारिक पातळीवर एकाचवेळी आकर्षित करणारे लेखन सहसा विरळाच आढळते. असेच आणखी लेख लेखकाकडून अपेक्षित आहेत. विसुनानांशी सहमत व अश्याच लेखनाची विसुनाना यांच्याकडून अपेक्षा. :-)

In reply to by विसुनाना

Permalink

>असे ललित आणि वैचारिक पातळीवर एकाचवेळी आकर्षित करणारे लेखन सहसा विरळाच आढळते. अगदी सहमत आहे. -- लिखाळ.
Permalink

>तरी त्यातील काळा झालेला लाडू मुठीत धरून झोपी गेलेल्या नारायणाच्या मुलामागचे प्रतीक तरी समजेल. उत्तम लेख. आवडला.. संस्कृती म्हणजे रोजच्या जीवनातील कोणत्या गोष्टी? कोणते आचार विचार? हे ठरवणे सामान्य व्यक्तिला शक्य नाही. ते सर्व काळ ठरवतो. आणि संस्कृती प्रवाही असते त्याचे प्रत्यंतर देत राहतो. संस्कृतीमधले स्थिर तत्व कोणते ते समजणे फार अवघड आहे. ते स्थिर तत्व समजले नाही तर पुढचा विचार करणे सुद्धा शक्य नाही. कोणत्या प्रकारच्या जीवननिष्ठा एखाद्या मानवसमूहाच्या ठायी आहेत ते समजावे म्हणून साहित्यकृती मदत करतात. तुझे शेवटचे वाक्य याचकडे निर्देश करते असे वाटले. भाषा नक्की काय काम करते आणि आपली भाषा तिच्यातील शब्दांमुळे वेगळी आहे, तिच्या धाटणी मुळे वेगळी आहे की अजून इतर कशामुळे वेगळी आहे? जूने मराठी शब्द जाऊन वेगळे इंग्रजी शब्द आले तर भाषेमध्ये काय फरक पडतो? हे मला अजून समजले नाही. पण यावर विचार करतो आहे. -- लिखाळ.
Permalink

असे असले, तरी त्यांच्या लेखनातून सतत जाणवत राहणारा त्यांचा आनंदयात्री स्वभाव म्हणा किंवा 'जे जे आपणासी भावे, ते ते इतरांसी सांगावे' सारखी मार्मिक रसिकवृत्ती ही - त्यांचेच आवडते उदाहरण द्यायचे झाले तर - प्रलयातल्या पिंपळपानासारखी टिकून राहील, हे नक्की. क्या बात है! सुंदर लिहिलं आहेस रे नंदन सायबा..! असे ललित आणि वैचारिक पातळीवर एकाचवेळी आकर्षित करणारे लेखन सहसा विरळाच आढळते. विसूनानांसारखेच म्हणतो...! तात्या.
Permalink

करणारा अग्रलेख. शब्दांकन सहज समजण्यासारखे झाले आहे. विचार करायला लावणार तुम्ही वाचकांना.
Permalink

अग्रलेखामागची लेखकाची वाङ्मयीन आणि सांस्कृतिक परंपरांची सखोल जाण, नव्या मनुला समजून घेण्याकरता मागच्या पाऊलखुणांचा मागोवा घेण्याची दृष्टी, भाषा-संस्कृती यांच्या संदर्भातील "भविष्यातल्या धक्क्यांचे"(फ्युचर शॉक्स) स्वरूप अभिव्यक्त करण्याची क्षमता आणि हे धक्के पचवण्याकरता करण्याची तयारी या सर्वांचे दर्शन या लेखात घडते. या सर्व माझ्या दृष्टीने जमेच्या बाजू होत. ओबामांचा धागा या लेखाच्या विणलेल्या वस्त्रात नीट विणला गेला नाही. आणि ओबामा हे नाव जरी वगळले , तरी , "भविष्यातील भाषेचा वेध" हा कोनाचा धांडोळा पुरेसा झाला नाही. खुद्द लेखकाने हे मान्य केलेले दिसते. लेखाचे प्रॉमिस मोठे होते ; डिलिव्हरी पुरेशी सर्वंकष रीतीने झालेली नाही. नंदनने याचा दुसरा भाग लिहावा असे मी सुचवतो. माझे काही तुटपुंजे विचार : १. चीन , जपान , रशिया, जर्मनी या राष्ट्रांनी राबवलेले भाषाविषयक धोरण, आपापल्या मजबूत अशा संस्कृतीला पोषक ठरेल , समाजाला स्वयंपूर्ण बनवेल , इंग्रजीच्या प्रसाराला विरोध न करता आपले स्वतःचे अस्तित्त्व टिकून धरेल या दृष्टिने या सार्‍याचा तौलनिक अभ्यास व्हायला हवा. आपल्याला कॉपीक्याट बनायचे नाही , पण इतरांच्या धड्यांपासून आपल्याला कसे शिकता येईल याचा अभ्यास व्हायला हवा. २. मराठी भाषेच्या भविष्याबद्दल बोलताना आपण गेल्या शतकातील मराठी भाषेच्या संदर्भात त्याचा अभ्यास करू पहातो. असे करणे बरोबरच. पण केवळ चूष म्हणून मला १९वे शतक आणि २०वे शतक यातील मराठीच्या प्रवासाची तुलना करावीशी वाटते. काही गोष्टी समोर येतात. अ. मराठी मुद्रणाचा उगम स्थूलमानाने १८९० पासून झाला असे म्हणू. (चूभूद्याघ्या) या दृष्टिने, छापील स्वरूपातील मराठी कितीतरी पट लोकांपर्यंत १०० वर्षांत पोचली. हाच मुद्दा आंतरजालीय मराठीशी जोडता येईल का ? १९९५-९६ साली पहिले मराठी पोर्टल अस्तित्त्वात आले असावे. तेव्हापासून आतापावेतो आंतरजालीय मराठीची देवघेव कितीतरीपट वाढली आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होईल का ? ब. विसाव्या दशकाच्या सुरवातीला मराठी भाषेची सूत्रे टिळक, चिपळूणकर वगैरेंकडे होती. (नाटकाच्या बाबतीत देवल, खाडिलकर). ही सगळी मनॉपली हळूहळू संपून प्रवाह कसा जोमदार बनत गेला ते सर्वज्ञात आहे. हेच तर्कशास्त्र वापरले , तर आपण असे म्हणू शकतो का , की शोषितांचा, अंधारातल्या घटकांचा आवाजाला मराठी भाषेत तोंड फुटले. साक्षरतेचा आणखी प्रसार होईल तसे आणखी घटक यात यायला हवेत. (कितपत वेगाने हे होईल माहीत नाही.) ३. खुद्द इंग्रजी भाषेतील साहित्याबद्दल थोडे बोलू : व्हिक्टोरियन काळ हा या भाषेचा सुवर्णकाळ मानला जातो. तेव्हापासून आजवर भाषेतील साहित्यात जी भर पडली त्यात ब्लू-ब्लडेड इंग्रजापेक्षा, एकेकाळी पुरेशा सुसंस्कृत न मानल्या गेलेल्या अमेरिकनांचा वाटा सिंहाचा ठरला. गेल्या शतकाच्या शेवटीशेवटी जशी अमेरिकेल्या साहित्याची चळवळ मंदावत चालली तसे सगळे लक्ष नायपॉल, रश्दी यंसारख्या आंग्लेतर लेखकांकडे वळले. मराठी भाषेकडे या दृष्टिने पाहू. २१ शतकांचे पु ल किंवा अत्रे बहुदा ब्राह्मण समाजातले नसतील असे या बाबतीत म्हणू शकतो का ? दुसरे म्हणजे , इंग्रजी भाषेत निर्माण होणार्‍या साहित्याचे प्रमाण , दर्जा , वाचकसंख्या यांचे पर्सेन्टेज घटले तरी भाषेचा व्यवहार चालूच आहे. मराठीच्या बाबतीतही असेच होईल असे म्हणू शकतो काय ? कथा/कादंबर्‍या/साहित्याधारित समीक्षा वगैरेंचा पन्हा अरुंद बनत चालला असला , तरी भाषेचा व्यवहार चालू राहील असे काही चित्र जमेस धरू शकतो काय ?
Permalink

वर मुक्तराव म्हणतात तसे पुलं आणि ह्या शतकातले मराठीपण ह्या दोन धाग्यांमधे ओबामांचा धागा घुसमटला. हे घुसमटलेपण मोकळे व्हावे ह्या हेतूने ही दोन ते तीन अग्रलेखांची मालिका होऊ शकेल/व्हावी! 'कोणत्याही वयात वाचल्यानंतर तुम्हाला त्या त्या वयाला आणि अनुभवाच्या वर्तुळाला साजेसा अर्थ ज्यातून सापडू शकतो ते अक्षर वाङ्मय' अशी व्याख्या केली असता पुलंचे बहुतेक लिखाण त्यात बसते असे आपल्याला आढळून येईल. एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितले तर पुलंचे लिखाण हे खरेतर विनोदाचा तोंडावळा लेऊन आलेले अतिशय गंभीर लिखाण आहे. त्यांच्या व्यक्तिचित्रांनी, बाटाट्याच्या चाळीसारख्या लिखाणांनी वाचक अंतर्मुख का होतो ह्या प्रश्नाचं उत्तर हे मुळात ते गंभीर लिखाण आहे ह्यात मिळते! एकविसाव्या शतकात मराठी ही निश्चितच जगाच्या रंगमंचावर असलेली एक महत्त्वाची भाषा असेल. त्या भाषेचे स्वरुप हे नक्की कसे असेल हे सांगणे अवघड आहे. शिक्षणाने, विस्तारत जाणार्‍या अनुभव क्षितिजाने तळातल्या समाजात येणारी जागृती, त्यांना सापडणार्‍या नव्या वाटा, संधी ह्याचे पडसाद बोलीभाषेतून उमटतातच आणि त्याचेच ठसे लिखाणातही दिसतात. त्या अनुषंगाने भाषेत बदल होत जातात. ओबामाचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून येणे ही घटना प्रत्येक समाजघटकाच्या नजरेत वेगवेगळी बघितली जाते. मागच्या शतकात गुलामगिरीच्या चरकात पिळून निघालेल्या आफ्रिकन-अमेरिकन समाजाला त्यांच्या लढ्याचा हा नैतिक विजय वाटतो, अमेरिकेतल्या बर्‍याच गोर्‍या लोकांना ही एक नव्याने प्रयोग करण्याची चालून आलेली संधी वाटते, जगात इतरत्र एका सामर्थ्यवान राष्ट्राची सामाजिक जाणीव कशी बदलत आहे ह्याचा संदेश दिला जातो. ओबामावर गांधींचा, त्यांच्या अहिंसा तत्त्वज्ञाचा प्रभाव आहे हे नमूद करणे लक्षणीय वाटते. सामाजिक, साहित्यिक आणि भाषिक उत्थानात जे जे म्हणून चिरंतन मूल्य असलेले असते ते ते कोणत्या ना कोणत्या स्वरुपात पुन्हा पुढे येते. किंबहुना जे जे खर्‍या अर्थाने पुढे येते तेच चिरंतन असते! चतुरंग
Permalink

चतुरंग , चांगले मुद्दे ! भाषेच्या अस्तित्त्वाचा प्रश्न "संपत्तीच्या निर्मितीशी" (जनरेशन ऑफ वेल्थ) कितपत जोडता येईल याचाही आपण थोडा विचार करू शकतो. गुजराथीचे उदाहरण घेतले (किंवा मारवाडी लोकांची भाषा राजस्थानी असे मानले तर त्या भाषेचे उदाहरण घेतले) तर आपल्याला अपेक्षित ते उत्तर सापडणार नाही. गुजराथी/मारवाडी भाषेचा प्रवाह कितपत जोमदार आहे; या भाषेला स्वतःचे स्वयंपूर्ण अस्तित्व आहे का ही भाषा इंग्रजी-हिंदीचीच दासी आहे यावर मी केवळ मी अंदाजच बांधू शकतो; माझा काही या क्षेत्रात अधिकार नाही. माझ्या अंदाजाप्रमाणे , भारतातल्या इतर भाषांप्रमाणे, गुजराथीलाही "इंग्रजी-हिंदीचीच दासी " बनण्याचे दुर्दैव ओढवलेले असावे. (चूभूद्याघ्या). याउलट, तमिळ भाषेतल्या गेल्या पन्नासेक वर्षातल्या द्रविडी चळवळींमुळे त्या भाषेला (विद्वेषी स्वरुपाचे का होईना ) पण एक स्वयंपूर्ण स्थान आहे हे मान्य करावे लागते. याचा एक निष्कर्ष : केवळ पैशाने भाषेचा प्रश्न सुटणारा नाही ; व्यापक चळवळीला पर्याय नाही आणि किमान काही दशके सगळ्या गोष्टी रुजायला वेळ लागेल. एका रात्रीत कसलाही चमत्कार होणे नाही.
Permalink

अग्रलेख आवडला.. पटला.. तरीही का कोण जाणे काहिसा विस्कळीत/अपूर्ण (नक्की सांगता येणार नाहि) वाटला.. प्रत्येक धागा थोडासा विणून सोडून दिला आहे. त्यातहि ओबालांचा धागा मधेच कधीही येतो असे वाटले.. ओबामा-पुलं आणि मराठी या तीनहि धाग्यांची वेणी अथवा गोफ असे काहिच न होता एकमेतांत गुंफु पाहणारे स्वतंत्र धागेच राहिले. तरीही अग्रलेख आवडला.. आशय मनापासून पटला.. हे श्रेय मात्र लेखकाच्या अचुक शब्दयोजनेचे आणि वापरलेल्या रुपकांचे.. सुंदर भाषेत लिहिला गेलेला काहिसा अपूर्ण अग्रलेख असे मी वर्णन करेन बाकी
तसे विशेष प्रयत्न केले नाहीत तर मराठीच्या वेगवेगळ्या बोलींनाही काही दशकांनी याच स्थितीला सामोरे जावे लागेल
अगदी पटले.. काहि बोली तर आताच जात्यात आहेत.. किंवा जाण्याच्या मार्गावर आहेत... उदा. आगरी
दहा कोटींच्या आसपास असणार्‍या समूहाकडून आज बोलली जाणारी, संख्याबळाच्या दृष्टीने जगातल्या पहिल्या पंधरा भाषांत गणना होणारी मराठी यापैकी एक असेल, असं मला वाटतं. पण तिचे स्वरूप - आपल्याला आवडो वा न आवडो, बदलत जाणार हे नक्की.
यावरून पुलंचेच एक वाक्य आठवले ते (बहुदा) जावे त्यांच्या देशा मधे हंगेरीत भाषेमुळे अडल्यावर ते एका ठिकाणी म्हणतात, "कीती छान होईन ना जर सार्‍या जगाची एकच भाषा झाली.... पण नको हे म्हणजे सारी फुले एका रंगाची एका वासाची होण्यासारखे आहे" (हा वाक्याचा सारंश आहे. पुस्तक समोर नसल्याने चुभुदेघे)
बाविसाव्या शतकात शांघायमध्ये वाढणार्‍या एखाद्या मराठी मुलाला नारायण बोहलं झाडतो म्हणजे काय करतो किंवा लग्नात नवरा हातरुमाल हवेत म्हणून का अडून बसतो; हे जरी नीट उमगलं नाही, तरी त्यातील काळा झालेला लाडू मुठीत धरून झोपी गेलेल्या नारायणाच्या मुलामागचे प्रतीक तरी समजेल
वा भन्नाट शेवट!!!! खास नंदन फेम लेखन :) ओव्हरऑल अग्रलेख आवडूनहि भाग दुसरा लिहावा या मुक्तरावांच्या मताशी सहमत - ऋषिकेश
Permalink

अपेक्षा पूर्ण केलीत, नंदनराव! अभिनंदन!! कोणतीही संस्कृती जर प्रवाही असेल तरच काळाच्या ओघात टिकून रहाते. आणि त्या संस्कृतीची भाषा ही सुद्धा जर प्रवाही असेल तरच वाचते.... काळाबरोबर भाषेचे बदलणे हे नैसर्गिक आहे. ज्ञानेश्वरांची मराठी तुकारामांच्या काळात बदललेली होती. त्याचप्रमाणे पुलं ची मराठी (त्यांच्या सुरवातीच्या लेखनातली) आता नॉस्टाल्जिक वाटायला लागली आहे (म्हणून आमच्यासारख्या म्हातार्‍यांना ती भावते!!:)) इतर भाषा सर्वकाळ इंग्रजीच्या दासी बनून रहातील असे मानण्याचे कारण नाही. आज इंग्रजीला ऍड्व्हान्टेज मिळालाय तो मुख्यतः संगणकामुळे आणि त्यातही क्वर्टी कळफलकाच्या सर्वदूर वापरामुळे! उद्या जसजसा व्हॉईस रेक्गनिशन सॉफ्टवेअरचा वापर वाढत जाईल तसतसा इंग्रजीचा हा वरचश्मा शाबूत राहील काय याविषयी मी तरी साशंक आहे. ही प्रगती होण्यास काही काळ लागेल, मात्र तोपर्यंत आपण कळ काढून मराठीचा वापर चालू ठेवला पाहिजे. गमभन वाल्यांनी ती सोय करून दिली आहेच! असो. एक चांगला अग्रलेख वाचायला मिळाला....
Permalink

नंदन लेख फार आवडला. दुसरा भाग अवश्य लिहावा अशी मी विनंती करतो. आपला, (आग्रही) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

Permalink

नंदन लेख फार आवडला. दुसरा भाग अवश्य लिहावा अशी मी विनंती करतो. येऊ दे पुढील भाग !!! अवांतर : कर्णाच्या वाक्याशी सहमत असण्याचा योग आंतरजालावर फार दुर्मिळ असतो
Permalink

तीन विषयांची सांगड घालण्याचा प्रयत्न छान आहे. अग्रलेखातील कल्पनांचा अधिक विस्तार करता येऊ शकतो असे वाटले.
Permalink

संपादकीयात ओबामा हे जागतिकीकरणाचे प्रतिक आणि त्याचबरोबर पुलंनी रेखाटलेले पुढच्या पिढीतील मराठी जीवनमान यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. वरकरणी पाहता यात साम्यस्थळे दिसतीलही पण अधिक खोलात जाऊन पहाल तर भेदच नजरेस येतील. ओबांमांच्या ज्या केनियन आणि इंडोनेशियन वारशाचा गवगवा केला जातोय तो पुन्हा एकदा तपासून पहायला हवा. कारण ओबामा हे ज्या अमेरिकन मेल्टींग पॉटचे प्रतिक आहेत त्या मेल्टींग पॉटचे एक वैशिष्ट्य असते. त्यात घातलेल्या सर्व घटकांचा मिळून एक नवा एकजिनसी पदार्थ बनतो खरा पण त्याचवेळी त्यातील घटक पदार्थ आपले स्वतंत्र अस्तित्व गमावून बसलेले असतात. संस्कृतीची इतर लक्षणे सोडून केवळ भाषेचाच विचार केला तरी, ओबांमांना त्यांच्या वडिलांची मूळ भाषा किंवा सावत्र वडिलांची बहासा इंडोनेशिया कितपत येत असावी याची शंकाच आहे. कारण अमेरिकन बनताना त्यांना हे दोर कापावेच लागले आहेत. पुलंनी वर्णन केलेले पुढील पिढीच्या मराठी संस्कृतीबद्दलचे भाष्य हे पूर्णतः वेगळे आहे. त्यांचा अभिजित कदाचित परीक्षेला जाताना वडीलधार्‍यांच्या पाया पडलाही नसेल (पण फूटपाथवरील देवळाला नमस्कार ठोकला असेल!) किंवा रॉक रॉक म्हणत गेला असेल पण मराठीशी असलेली त्याची नाळ तुटलेली आहे असे म्हणता येणार नाही (किंबहुना मनसेचा सर्वात मोठा समर्थक तोच असेल!). तेव्हा महाराष्ट्रात असलेली मराठीसमोरील आव्हाने आणि परदेशात मराठी टिकविण्यासाठीची धडपड यांची सांगड न घालता त्यांचा वेगवेगळाच विचार केला पाहिजे. युनेस्कोने बनविलेल्या जगातील नष्ट होऊ घातलेल्या भाषांच्या यादीत (रेड बूक) मध्ये मराठी नाही. दहा कोटींवर लोकांकडून बोलली जाणारी मराठी ही अशी सहजासहजी नष्ट पावणारही नाही. (पण मुंबई-पुणे ही मराठीची मिनि-मेल्टींग पॉट आहेत. त्यात बोलीभाषांची आहुती पडत जाणार. त्याला नाईलाज आहे). वर मुक्तसुनीत यांने म्हटल्याप्रमाणे मराठीची सूत्रे जसजशी बहुजनसमाजाकडे जातील तसतशी मराठी विस्तारतच जाईल. परदेशात मराठी फारतर एखाद्-दुसर्‍या पिढी पर्यंत टिकेल, त्यापुढे नाही. उगाच मॉरीशसचे वगैरे उदाहरण देण्यात अर्थ नाही. तेथे एकगठ्ठा माणसे पाठवली गेली तशी परिस्थिती युरोप-अमेरिकेत नाही. तेव्हा नंदनरावांनी दोन स्वतंत्र अग्रलेख लिहावेत, अशी विनंती. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

काल मी लेख वाचला तेव्हा तो आवडला होता (एक दृष्टीकोण म्हणून) मात्र 'पटला' नव्हता. त्याचे कारण मला लिहिता आले नाही. त्यामुळे नंदनने दुसरा लेख लिहावा असे वाटले. मात्र ते कारण सुनीलरावांनी लिहिले आहे. मी त्यांच्याशी पूर्ण सहमत आहे आपला (सहमत) आजानुकर्ण
Permalink

नंदन - संपादकीय रुचले. अगदी छान जुळून आले आहे. विचार आणि लिखाण दोन्हीही आवडले. तरी त्यातील काळा झालेला लाडू मुठीत धरून झोपी गेलेल्या नारायणाच्या मुलामागचे प्रतीक तरी समजेल. (प्रतीक) एकलव्य
Permalink

कित्येक दिवसात काहि बोलायचे होते त्याला ह्या लेखाने वाट करुन दिली. म्हणजे स्वंतन्त्र लेख लिहावा असे खुपदा वाटले. पण एवढे मोठे साहस या आयुष्यात शक्य नाही. मला पु. ल. किंवा कुसुमाग्रज वाचावेसे वाटत नाहि. त्यांच्या सर्व लिखाणात कुठेतरि एक स्निग्धता असते. मी गलिछ्च चाळित वाढलो. तिथे बटाट्याच्या चाळिसारखे कधिच काहिच नव्हते. पुलंच्या लेखनातले कुठलेहि पात्र खर्‍या आयुष्यात कधिच भेटले नाहि. आता इथुन दुर जावे तर दलित साहित्य वैगेरे देखिल एक वेगळा प्रकार होता. ती पुस्तकदेखिल पुलंसारख्या लेखकाच्या वाचकांसाठीच असावित असे वाटले. त्या पुस्तकांमधली टोकाचि परिस्थिती देखिल कुठे पहाण्यात आली नाहि. पण पु. ल. आवडतं नाहि या एका कारणास्तव खुपसे लोक दुरावले. शाळेच्या अभ्यासक्रमात भेटलेले पु. ल.नंतर अधिक वाचल्यानंतर फार दुरचे वाटले नव्हते पण आता मागे वळुन पहातांना सर्व कहिसे कृत्रिम होते असे वाटते. मी माझ्या मुलांना मराठी शाळेत घालणार नाहि. ईथल्या बर्‍याच लोकांचे ते मत असेल. (संगणक आणि इंटरनेट अफोर्ड करु शकणारा कोणिहि मुलांना मराठी शाळेत घालणार नाहि. वाद घाला पण स्प्रर्धेच्या युगात असे होणे नैसर्गिक आहे हे मान्य आहे. मागे कुना माउलीच्या आपल्या मुलांस पु. लं. समजाउन सांगन्यासाठि केलेले प्रयत्न वाचुनहि अस्वस्थता वाटली होती. पु. लं चे लेखण सर्वसामावेशक होते का? पुढच्या पिढ्यानां पुरणारे होते का? अणि सर्वात महत्त्वाचे ते समाजातल्या एका मोठ्या वर्गाचे प्रतिनिधीत्व करतात का? हे कित्येक वर्षापासुनचे प्रश्न. अश्वथाम्याच्या जखमेसारखे घेऊन हिडतोय. त्याला बिचार्‍याला तेल तरी मिळाले असेल. आम्हाला चर्चा करण्यासाठी एक माणुसहि नाहि भेटला. नंतर जाणवले. परमेश्वर किंवा त्याच्या एवढ्या मोठ्या माणसांवर टिका करणे कधिहि शक्य नसते. दहा कोटिच्या महाराष्ट्रात मराठी कधिच अस्तगंत होणार नाहि. पन्नास लाख लोक रॉक रॉक म्हणू लागले तरी पुर्णतः मराठि बोलणारे साडे नऊ कोटि लोक रहातात. मग त्या पन्नास लाखाचे एक कोटि झाले तरी चालतिल. हे सर्व होत असतांना ज्या साहित्याने दोन ते तिन पिढ्या घडविल्या ते आणखि एक पिढि पोसु शकेल असे मात्र ठामपणे म्हणता येत नाहि. आता हे सगळे सांगन्याचे प्रयोजन म्हणजे फक्त भावनांना वाट करुन देणे. या विषयावर वाद घालुन मी फार आगोदरच हरलोय. त्यामुळे सर्व अगदि सर्व मराठी बांधवाची क्षमा मागतो. यात आगाऊपणा नाहि. मला पु.ल. आणि त्यांच्या चाहत्याविषयी प्रंचड आदर आहे. पु. ल. एक माणुस म्हणुन प्रचंड थोर होते आणि त्याच्याविषयी असले काहि भाष्य करनाच्या ना तर मला अधिकार आहे आणि ना तर माझी लायकी. पण १९७० ते १९८० च्या एका गाफिल पिढीला निदान माझ्यासारख्या परिस्थितीत काहि सांगण्यास माध्यम होते. आमच्या नशिबी तेहि नाहि.

In reply to by शिवापा

Permalink

त्यांच्या सर्व लिखाणात कुठेतरि एक स्निग्धता असते. मी गलिछ्च चाळित वाढलो. तिथे बटाट्याच्या चाळिसारखे कधिच काहिच नव्हते. पुलंच्या लेखनातले कुठलेहि पात्र खर्‍या आयुष्यात कधिच भेटले नाहि.
पुलंचं साहित्य आवडत नाही असे म्हणण्यामागे 'आपण त्यांच्या साहित्यातल्या पात्रांशी-परिस्थिशी सहानुभूत होऊ शकत नाही ' असे आपले पक्के मत दिसते. असे असताना आपले मत मोकळेपणी मांडायला संकोच वाटण्याचे काही कारण दिसत नाही. वाचक म्हणून लेखकाच्या लेखनावर आपले मत बनणे हे स्वाभाविकच आहे. मला स्वतःला पुलंच्या लेखनातून त्यांच्या काळातल्या वातावरणाची माहिती मिळते असे वाटते. ते वाचायला मला आवडते. त्यांचे विनोदसुद्धा मला आवडतात. ते अनेक कलांत पारंगत असल्याने त्यांचे लिखाण दर्जेदार वाटते. 'हसता हसता डोळ्यांच्या कडा ओल्या'करणारे काही भाग मला स्वतःला फारसे रुचत नाहीत. पण त्यांची शैली असे समजून मी त्याकडे फारसे लक्ष देत नाही :) -- लिखाळ.
Permalink

लेख आवडला परंतु.. ओबामांचा धागा या लेखाच्या विणलेल्या वस्त्रात नीट विणला गेला नाही. आणि ओबामा हे नाव जरी वगळले , तरी , "भविष्यातील भाषेचा वेध" हा कोनाचा धांडोळा पुरेसा झाला नाही. खुद्द लेखकाने हे मान्य केलेले दिसते. लेखाचे प्रॉमिस मोठे होते ; डिलिव्हरी पुरेशी सर्वंकष रीतीने झालेली नाही. नंदनने याचा दुसरा भाग लिहावा असे मी सुचवतो. एकदम सहमत मुक्ता
Permalink

सर्वप्रथम, मिपावर एक नवीन सभासद म्हणून माझ्यासारख्या इतर, थोड्याशा जुन्या सभासदांतर्फे स्वागत करतो. तुमची प्रतिक्रिया विचार करण्यासारखी वाटली. काही प्रश्न पडले ते विचारतो आहे. तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यातल्या एका कालखंडात , "गलिच्छ" भागात राहिल्याचा उल्लेख केला आहे. या संदर्भात, अगदी दलित लेखकांचे लिखाणही जर का "पुलंसारख्या लेखकाच्या वाचकांसाठीच " लिहिल्यासारखे वाटले असेल , तर पुलंचे चाळीचे चित्रण तुम्हाला स्वप्नरंजनात्मक वाटले, यात काहीच आश्चर्य नाही ! मला पुलंचे लिखाण आवडत आले आहे हे खरे , पण धगधगीत आर्थिक आणि सामाजिक वास्तवामुळे , एखाद्याला हे लिखाण "खोटे" वाटणे मी समजू शकतो. समाजातला एक थर इतका पिचलेला आहे की साहित्य, संस्कृती इ. इ. गोष्टीच त्यातील लोकांना "ज्यांना परवडते त्यांचे थेर" वाटू शकतात ; मग विनोद, व्यंग वगैरेदेखील तसेच वाटणे , हे ओघाने आलेच. तुम्हाला विचारायचा प्रश्न वैयक्तिक आहे , कारण , अर्थातच , तुमच्या स्वतःच्या पोस्टचे स्वरूपही अतिशय वैयक्तिक स्वरूपाचेच आहे. तर माझा प्रश्न असा की : कालपरत्वे जशी तुमची परिस्थिती पालटत गेली तसे तुम्हाला , पुलंचे म्हणा , की इतर सहित्यिकांचे म्हणा , लिखाण वाचावेसे वाटू लागले काय ? तुमच्या कर्दमातून तुम्ही थोडे बाहेर पडल्यावर पुलंच्या , किंवा इतर कुणाच्या लिखाणाला ओलावा म्हणा , कारुण्य म्हणा कुठे जाणवले की नाही ? की तुम्हाला तुमच्या पूर्वायुष्यातील कटु स्मृतींच्या छायेमुळे पुलच काय , पण इतर काहीही आनंददायी वाटणे अशक्य आहे ?

शिवापांचे मुद्दे विचार करायला लावणारे आहेत. त्यांचे वैयक्तिक अनुभव माझ्यासारखे आहेत असे वाटले म्हणून हा प्रतिसाद. लाल डब्यातून बीड सारख्या शहरात जाऊन यायला मिळाले तर तो आमच्या बालपणी कित्येक दिवस चवीने व अभिमानाने मिरवायचा विषय असायचा. त्या वातावरणात वाढत असल्याने मला सुद्धा कधी पु ल अथवा चि वी जोश्यांच्या लेखनाची आवड निर्माण झाली नाही. शाळेत शिकलेल्या बहुतांशी धड्यांबद्दल असेच होत असे. कधी कधी ना ग गोर्‍यांच्या हातांच्या किमयेसारखे धडे आपलेसे वाटत. पेपरात अनुताई वाघांनी लिहिलेल्या लेखांबद्दलही आपलेपणा वाटे. म्हणून पुढे थोडेफार दलित साहित्या अभ्यासायचा प्रयत्न केला. त्याबाबत म्हणाल तर काही मोजके आदरणीय अपवाद सोडले (उदा. पु. डॉ. बाबासाहेब) तर बाकीचे सगळे अक्रस्ताळेपणाने लिहिणारे रडीचे लेखक वाटतात. दुर्गम खेड्यातून व्हाया हिरानंदाणी फ्लॅट (मुंबई) ते अमेरिका असा राहणीमानातला बदल झाल्या नंतर जेव्हा मी पु ल वाचले तेव्हा मला त्या लेखना बद्दल बद्दल थोडासा जिव्हाळा वाटू लागला. बाजरीची भाकरी नशिबी नसणारे कित्येक खपाट-पोटे दाररोज पहायला लागावे असल्याने नारायणाच्या कष्टाचे कौतुक वाटले नव्हते. ते पुलंसारख्या भाकरीची भ्रांत नसणार्‍या लेखकाने लिहिले म्हणून त्यांचा पुढे आदर वाटू लागला. एकंदर बोलायचे तर अनुभव संपन्नतेसोबत देशपांडे-अत्र्यांच्या लेखनाबद्दल आदर निर्माण झाला आहे. पण अजूनही नाळ जोडली गेलेली नाही असे वाटते. आपला, (वाटसरु) भास्कर

In reply to by भास्कर केन्डे

Permalink

केंडे यांचे आभार. शिवापा आणि केंडे यांचे प्रतिसाद वाचून काही मुद्दे सुचतात. त्यापैकी काहींची नाळ वैयक्तिक अनुभवाशी जोडलेली आहे. - निम्नस्तरीय रहाणीमान आणि पुलं आवडणे : शिवापा यांच्याप्रमाणे , पहिली नोकरी मिळेस्तोवरचे माझे आयुष्य चाळीत गेले. दोन खोल्यांची जागा. आणि चाळ म्हणजे , नांदती-गाजती नव्हे , तर ज्यातील बहुसंख्य भाडेकरू सोडून गेले आहेत , इमारत पडीक बनत चाललेली आहे अशी चाळ. जिच्याकडे पाहिले असता माणसाला डीप्रेशन यावे. पण आयुष्याच्या इतर सुखदु:खांबरोबर , साहित्याशी नाळ जोडलेली राहिली. आणि प्रस्तुत विषयाच्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे , पुलंचे लिखाण आनंदाचा ठेवा होता. त्या लिखाणाची पारायणे झाली. त्यातल्या विनोदाला पुन्हापुन्हा पोट धरधरून हसलो. त्यांच्या अनेकविध क्षेत्रातल्या देदिप्यमान कामगिरीने भारावलो , त्यांच्यातल्या माणुसकी आणि कारुण्याने डोळे ओले झाले, स्फूर्ती मिळाली. हे असे का झाले असावे ? असा प्रश्न पडतो. काही उत्तरे : - पुलं चा "मी" . मग तो "असामी असा मी" असो , किंवा "हसवणूक" सारख्या पुस्तकातला. हा मी , मध्यमवर्गीय आहे. जुन्यात रमणारा , नव्याने बावचळणारा , मुख्य म्हणजे परिस्थितीचे चटके हसत हसत सहन करणारा. या सर्व वैशिष्ट्यांशी कुठेतरी "सहानुभाव" निर्माण झाला असणार. आणि असा दुबळा , घाबरलेला , गरीब "मी" म्हणजे , "महाराष्ट्राचं दैवत " ! साहजिकच पुलं आपले वाटले. - जातीचा मुद्दा. कळत्या वयापासून , जातीधर्माच्या भेदभावाचा मी (माझ्या इतर समविचारी मित्रांप्रमाणे) तिरस्कार केला. पण यातील "कळत्या वयापासून" हे शब्द महत्त्वाचे. मी ज्या घरात वाढलो, ज्या नातेवाईक आणि इतर लोकांमधे समज यायच्या आधी मिसळलो ते सगळे बामणी वळणाचे होते. त्यांच्यात ठरवून कुणाला जातीपातीवरून घालून पाडून बोलण्याइतके दुष्ट नसतील , पण स्वजातीचा अभिमान धरण्याइतकी गतानुगतिकता नक्की होती. तर या ब्राम्हणी वातावरणाचा आणि पुलं आवडण्याचा काही एक संबंध असावा असा मला दाट संशय आहे. अंतू बर्वा , नारायण अशी अनेकानेक ब्राम्हणी तोंडवळ्याची पात्रे , वातावरण यांचे वर्णन पुलंनी त्यांच्या सुरवातीच्या लिखाणात केले आहे. अर्थात जातीपातीचा अभिमान असल्या फडतूस गोष्टी पुलंनी कधीही कणभरही दाखवल्या नसल्या तरी , बामणी वातावरणास ज्याचे आकर्षण वाटेल असे बरेच त्यांच्या लिखाणात होते हे नक्की. - शहरी वातावरणाचा मुद्दा : एक गोष्ट स्पष्ट आहे. पुलं एक माणूस म्हणून , एक लेखक म्हणून पक्के शहरी आहेत. त्यांनी आयुष्यभर खेड्यापाड्यातल्या कार्यकर्त्यांना वेळोवेळी मदत केली , ग्रामीण लेखकाना भरपूर प्रोत्साहन दिले (अगदी प्रस्तावना लिहिण्यापासून.) पण त्यांच्या लिखाणातील संपूर्ण पर्स्पेक्टीव्ह (मराठी शब्द ?) शहरी माणसाचा आहे. याचा संबंध , मुंबईपुण्यातल्या माणसांना पुलं "भयंकर " आवडण्यामधे नक्की झाला असे मला वाटले. केंडेंच्या लिखाणातून , गावातल्या माणसाचा दृष्टीकोन काहीसा प्रातिनिधिक रीतीने व्यक्त होतो असे मला वाटले. (कदाचित आमचे प्रिय मित्र सर्कीट या अनुषंगाने काहीतरी अर्थपूर्ण लिहू शकतील असा एक कयास आहे. )

पर्स्पेक्टिव् = दृष्टिकोन? (साभारः वेब्स्टर् - from per = through + specere = look => perspective = to look trough, see clearly) (सूचक)बेसनलाडू

चाळीतील जीवन आणि ब्राह्मणी वातावरण यांबाबत स्वानुभूती असल्याने मुक्तसुनीतांनी दाखवून दिलेल्या त्याच्या साहिस्त्यसंबंधाशी सहमत आहे. (सहमत)बेसनलाडू

केंडेंच्या लिखाणातून , गावातल्या माणसाचा दृष्टीकोन काहीसा प्रातिनिधिक रीतीने व्यक्त होतो असे मला वाटले. (कदाचित आमचे प्रिय मित्र सर्कीट या अनुषंगाने काहीतरी अर्थपूर्ण लिहू शकतील असा एक कयास आहे. ) माझे बालपण एका छोट्याशा खेड्यात गेले हे मान्य. ह्या छोट्या खेड्यातील माझ्या सारख्या एका गरीब मुलाचा त्याहूनही अधिक गरीब मित्रांशी जवळचा संबंध आला हेही मान्य. पण आम्ही गरीब असूनही केवळ शिक्षण ह्या एकमेव प्लस पॉईंटमुळे स्वतःला मध्यमवर्गीयच मानत आलेलो आहोत. जेव्हा गरीब होतो, तेव्हादेखील कधीतरी मध्यमवर्गीय होऊ ह्या आशेने, मध्यमवर्गीयांना जे काही रुचते, ते आम्हालाही रुचावे, म्हणून रुचीवर्धन त्याच दिशेने सुरू होते. त्यामुळे मध्यमवर्गीय संस्कृतीला आवडणारे पु. ल. देशपांडे हे लेखक आम्हालाही आवडतात, आवडत होते, आणि आवडत राहतील. (पुलं देखील जोगेश्वरीला राहत होते, तेव्हा ते गरीब ह्याच क्याटेगरीत होते, असे कळते. परंतु संस्कार ब्राह्मणी आणि मध्यमवर्गीय, त्यामुळे लेखन ह्याच पठडीतले.) -- सर्किट
Permalink

नंदनचा लेख अत्यंत आवडला. विचार मार्मिक व समृद्ध वाटले. एकदा वाचून चालणार नाही. पण हा विषय अजून फार मोठा आहे आणि त्यावर आणखी बरेच लिखाण (नंदनकडून व इतरांकडून) व चर्चा झाली पाहिजे असे वाटत राहिले. काउंटर-पॉइंट म्हणून शिवापा यांची प्रतिक्रियादेखील आवडली. हाही एक विचारार्ह दृष्टिकोण आहे व त्यात काही तथ्य आहे. (आपल्या मनात असलेल्या पुलंच्या विभूतिमत्त्वाच्या कारणाने शिवापांसारख्यांचे मत मोडीत काढले जाऊ नये.) - दिगम्भा
Permalink

स्वागत केल्याबद्दल सर्वप्रथम आभार. आणी माझी प्रतिक्रिया प्रचंड संकुचित रित्या वैयक्तिक केल्याबद्दल क्षमस्व. सर्वप्रथम पु. ल. वाचले नाहि असे कधिच नव्हते. किंबहुना फार फार वाचन केल्यानंतर असे मत बनले असेल. आता ज्या परिस्थितीत वाढलो त्याचा विशाद वैगेरे वाटतो असेहि नाहि.किंबहुना त्या चाळीत काढ्लेले आयुष्य मजेशिर होते. पण ते बटाट्याच्या चाळीसारखे कधीच नव्हते. मुंबैच्या आताच्या किंवा अगदी २० वर्षांपुर्वीच्या चाळित देखिल पु. लं. च्या वाङमयिन सेटिन्ग्ज मिळणे दुरापास्त आहे. नंतरच्या काळात आलेले वास्तववादी साहित्य देखिल पुर्णतः वास्तव वाटले नाहि. पण हि पुस्तके खपतात ती लोक विकत घेतात आणि शाळा कॉलेजच्या पाठ्यक्रमात देखिल ति असतात म्हणजे आपल्यात जे जे सुंदर ते ते नाकरण्याचा नालायकपणा आहे की काय असे वाटले. काहि ले़खक अभ्यासक्रमात कधिच भेटले नाहित. मग पुढे ग्लोबलायझेशनच्या लाटेत नाटके आणि साहित्य सर्वसमावेशक होउ लागल्यानंतर मराठी भाषेतल्या काहि लेखकांचे साहित्य वाचण्यात आले. ते देखिल इतर भाषिक लोकाकडुन कळाले. बाहेरच्या प्रांतात इतके प्रभावशाली समजले जाणारे मराठी साहित्य मराठी घरांपासून इतके दुर का आहे ते आजतगायात कळाले नाहि. गोल गोल वळनानि जाणारी पुस्तके, नाटके सर्व काहि सुदंर आणी स्वछ्छ आहे असे भासविणारे साहित्यच जर लोकाभिमुक असेल तर मग येणारी नवी पिढि जी प्रंचड वास्तववादी आहे आणि असेल त्यांना आपण काय वारसा देणार आहोत? आता या घडिला देखिल घरात मोठ्या होणार्या या पिढिला आपण काहि देत आहोत का असा प्रश्न पडतोच!

In reply to by शिवापा

Permalink

पण हि पुस्तके खपतात ती लोक विकत घेतात आणि शाळा कॉलेजच्या पाठ्यक्रमात देखिल ति असतात म्हणजे आपल्यात जे जे सुंदर ते ते नाकरण्याचा नालायकपणा आहे की काय असे वाटले.
आपण आपली मते सविस्तर मांडावित अशी विनंती. (या धाग्यावर विषयांतर होईल असे वाटल्यास त्यासाठी नवी चर्चा सुरु करावी.)
आता या घडिला देखिल घरात मोठ्या होणार्या या पिढिला आपण काहि देत आहोत का असा प्रश्न पडतोच!
साध्याची पिढी न्यु न्यु ड्रेस घालुन हॅप्पी बडडे सेलिब्रेट करण्याच्या मूड मध्ये असावी..आणि पालक त्या पिढीला न्यू नॉलेज देऊन मॉडर्न आणि अपटुडेट करण्याच्या एफर्टस मध्ये असावेत :) (ह.घ्या.) अनेक सुजाण वाचक दर्जेदार साहित्य म्हणजे 'प्रसिद्ध साहित्यच' असे न मानता अनेकविध विषय आणि त्यांवरचे साहित्य वाचताना आढळतात. सर्वजनांना आवडणार्‍यात काही भाग दर्जेदार असतोच पण सर्वजनांना माहित नसलेल्यामध्येसुद्धा दर्जेदार असे काही असते असे जाणणारे लोक असतातच की. -- लिखाळ.

In reply to by शिवापा

Permalink

शिवापा , पुन्हा काही प्रश्न. तुम्ही म्हणता : किंबहुना त्या चाळीत काढ्लेले आयुष्य मजेशिर होते. पण ते बटाट्याच्या चाळीसारखे कधीच नव्हते. मुंबैच्या आताच्या किंवा अगदी २० वर्षांपुर्वीच्या चाळित देखिल पु. लं. च्या वाङमयिन सेटिन्ग्ज मिळणे दुरापास्त आहे. बटाट्याच्या चाळीचे वातावरण २० नव्हे तर सुमारे ११०-१२० वर्षांपूर्वीचे आहे. संदर्भ : "नाना कर्झन आहे". लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली १९०५ साली. तर मुख्य मुद्दा काय , की , "बटाट्याच्या चाळी"मधले सगळे संदर्भ आहेत इतक्या वर्षांपूर्वीचे. दुसरे काय , पहिलेही महायुद्ध तोवर जमा झालेले नव्हते. त्यामुळे , तुम्ही पाहिलेले चाळीतले जीवन आणि "ब.चा." मधली वर्णने यात मोठा फरक असणे अगदी स्वाभाविक आहे. दुसरे म्हणजे , पुल जगाकडे ज्या चष्म्यातून पहातात तेही इथे महत्त्वाचे ठरते. ५० च्या दशकात गंगाधर गाडगीळांनी लिहिलेली "किडलेली माणसे" सारखी कथा, किंवा श्री ना पेंडशांनी चाळीतल्याच एका तरुणाच्या डायरीवर आधारित लिहिलेली कादंबरी "लव्हाळी" किंवा ६० च्या दशकात आलेली पाध्यांची "वासूनाका" यातून मुंबईच्या वस्त्यांची , माणसांची , परिस्थितीची (प्रसंगी दाहक वाटावी) अशी चित्रे आणि पुलंच्या स्मरणरंजनातली चाळ यात फरक आहे आणि तो खूप मोठा आहे. त्यामुळे "आपल्यात जे जे सुंदर ते ते नाकरण्याचा नालायकपणा आहे " या तुमच्या विधानात काहीतरी खोल विसंगती आहे असे मला वाटले. बाहेरच्या प्रांतात इतके प्रभावशाली समजले जाणारे मराठी साहित्य मराठी घरांपासून इतके दुर का आहे ते आजतगायात कळाले नाहि. नेमके कुणाचे आणि कुठले साहित्य ?

In reply to by मुक्तसुनीत

Permalink

गाडगीळांनी लिहिलेली "किडलेली माणसे" आठवन करुन दिल्याबद्दल सर्वप्रथम आभार. आता माझी विसंगती पण लक्षात येतेय माझ्या. पुलेतर साहित्य आणि त्यांचा लोकाश्रय हा विषय स्वतंत्रपणे चर्चिला जाउ शकतो का यावर जरा विचार करावा लागेल. मला वाटते माझा मुद्दा मी माझ्यापुरता सध्या थांबवितो. त्यामुळे इथे असलेल्या मुळ लेखानाचे विषयांतर होतेय. पण निदान भावना व्यक्त करु दिल्याबद्द्ल आभार. आता इथेच आहे तर काहितरी संदर्भ सापडेल नेमकं बोलण्याकरिता. मनापासुन तात्यांचे आणि तुम्हा सर्व लोकांचे धन्यवाद.

In reply to by शिवापा

Permalink

तुम्ही मांडलेला दृष्टीकोन माझ्याकरता नवा आहेच आणि या विषयाशी सुसंगतही आहे. तेव्हा तुम्ही याच धाग्यावर लिहावे असे मी सुचवतो !

In reply to by शिवापा

Permalink

पुलेतर साहित्य आणि त्यांचा लोकाश्रय हा विषय स्वतंत्रपणे चर्चिला जाउ शकतो का यावर जरा विचार करावा लागेल. मला वाटते माझा मुद्दा मी माझ्यापुरता सध्या थांबवितो. त्यामुळे इथे असलेल्या मुळ लेखानाचे विषयांतर होतेय.
+१, पुलं, त्यांचे साहित्य आणि लोकाश्रय हा "खरोखर" स्वतंत्रपणे चर्चिला जावा असा विषय आहे. माझ्याकडेही बरेच आहे ह्यावर लिहण्यासारखे ... तर मुद्दा असा की इथे "विषयांतर" नको असेल तर आणि मिपा हे पुलंना आदर्श मानत असल्याने मिपाच्या धोरणात बसत असेल तर "पुलंचे साहित्य व लोकाश्रय" असा नवा धागा सुरु करावा. मी सुद्धा ह्यावर "आक्षेप" घेतलेले बरेच वाचले आहे, त्या अनुषंगाने व सविस्तर चर्चा करता येईल ... इथे जास्त विषयांतर न झाल्यास उत्तम ... ------ छोटा डॉन
Permalink

हा धागा फार उशीरा वाचतो आहे, त्यामुळे ओबामा-पुलं-मराठीभवितव्य ही वेणी जास्तच विसविशीत वाटते, पण ते सोडून द्या. संख्यासामर्थ्यामुळे भाषा आपोआप लवचिक राहील, आणि मराठी भाषा टिकेल, याबबत नंदन यांचे विचार पटण्यासारखे आहेत. कोंकणी भाषा गोव्याची राज्यभाषा झाली आहे. ती भाषा मला फार आवडते. पण दोन-तीन वर्तमानपत्रे आणि मोजकीच वर्षाकाठची पुस्तके त्या भाषेत प्रसिद्ध होतात. पंधरा-एक लाखाच्या लोकसंख्येतून मजूर-कारकून-डॉक्टर होऊन झाल्यानंतर साहित्यनिर्मिती करायला किती लोक राहाणार आहेत... अशा परिस्थितीत कोंकणी भाषा टिकेल की नाही, याबद्दल मला काळजी वाटते.
Permalink

नेहमी विचार करायला प्रवृत्त करणारं असतं नंदन.... आणि म्हणूनच आवडतं. परवाच एक पुलंच्या अप्रतिम भाषणाचा दुवा ऐकला. त्यांने कानडी साहित्य संमेलनाला केलेलं भाषण. मिळाल्यास जरूर ऐक (मला मिळाला तर इथे टाकतो)

In reply to by संदीप चित्रे

Permalink

पुलंनी कानडी साहित्य समेंलनात केलेले भाषण इथे ऎकता येईल. --मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.
Permalink

ह्या लेखामधे नक्की काय म्हणायचं आहे? #o