मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

यंदा कर्तव्य आहे? भाग १

प्रकाश घाटपांडे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
यंदा कर्तव्य आहे ? पुस्तकाचे या पुर्वीचे मनोगत मॅरेज इज नेसेसरी ईव्हल अशी एक म्हण आहे. त्यावर विश्वास बसावा अशीच परिस्थिती अवती भवती आहे. कुटुंब बनण्याची सुरवात विवाहापासून होते. विवाहसंस्था हा समाजरचनेचा एक अपरिहार्य भाग आहे. विवाह हा स्त्री-पुरुष मीलनाचा एक समाजमान्य मार्ग आहे. परस्पर सहजीवन,प्रजनन, कुटुंब,धर्माचरण,लैंगिक उपभोग यासाठी आवश्यक असलेली ती समाजरचनेची गरज आहे. भारतीय विवाह संस्थेचा इतिहास बघितला तर तो अतिशय मनोरंजक आहे. ज्या पद्धतीची लग्नं आज निषिद्ध मानली जातात ती सुद्धा वैदिक काळात कोणत्या ना कोणत्या प्रचलित विवाह पद्धतीनुसारच होती असे आढळते. वैदिक काळात विवाहाचे आठ प्रकार सांगितले आहेत. १) ब्राम्ह विवाह:- हे वैदिक मान्यता असलेले म्हणजे शास्त्रसंमत असलेले सालंकृत कन्यादान होय. आजचा वैदिक विवाह हाच आहे. हा सर्वश्रेष्ठ प्रकार मानला गेला. २) दैव विवाह:- यज्ञासाठी बोलविलेल्या ऋत्विजाला आपली कन्या देणे याला दैव विवाह म्हटले आहे. ३) आर्ष विवाह :- धर्मकारणासाठी गाय व बैल हे वधूपित्यास देउन ती कन्या आपली करुन घेणे. हा कन्याविक्रय ठरला तरी तो धर्मकारणासाठी असल्याने तो मान्य आहे. ४) प्राजापत्य विवाह :- प्रजापती या देवतेस उद्देशुन केलेला धर्म अर्थ व काम या त्रिकाणात राहून केलेला विवाह. तरी ब्राम्ह व दैव पेक्षा कमी प्रतीचा व आर्षपेक्षा जास्त प्रतीचा हा प्रकार मानला आहे. वरील सर्व प्रकार ब्राम्हण वर्णापुरते मर्यादित होते. ५) आसूर विवाह:- हा सर्व वर्णासाठी असलेला प्रकार यात वधूच्या नातलगांना यथाशक्ती द्रव्य देउन स्वच्छंद पणे केलेला विवाह प्रकार. धर्माचरण हे येथे गौण आहे. ६) गांधर्व विवाह : - सर्व वर्णांना हा प्रकार खुला आहे. इथे स्त्री पुरुषांची मने जुळली की बास आहे बाकी सबकुछ चलता है। सर्व गोष्टींना इथे कार्योत्तर मंजूरी घेण्याची सोय आहे. ७) राक्षस विवाह :- मनगट शाहीच्या जोरावर एखादी कन्या पळवून आणून जबरदस्तीने विवाह करणे म्हणजे राक्षसविवाह. हा फक्त क्षत्रिय वर्णास करता येतो. ८) पैशाच विवाह :- हा प्रकार म्हणजे बलात्काराला विवाह म्हणून दिलेली मान्यता असे म्हटले तर वावगे ठरु नये. हा अर्थातच वर्ज्य मानला आहे. आजही या सर्व गोष्टी समाजात दिसून येतात. परंतु समाज जसा जसा विकसित होत गेला तस तशा त्यातील छटा बदलत गेल्या. पूर्वी नाडीपरीक्षा, अश्वपरीक्षा, रत्नपरीक्षा अशा परीक्षा जशा होत तशा वधूवर परीक्षा सुद्धा धर्मशास्त्राचा भाग होता. त्यात आरोग्य, स्वभाव, कुलाचार, अंगलक्षण,वय इ.गोष्टी विचारात घेतल्या जात. विवाहात ज्योतिषशास्त्राचा विचार हा स्वतंत्रपणे न करता ज्योतिष हे धर्माचे अंग असल्याने त्या भूमिकेतून केला जात असे. भारतीय ज्योतिष हे नक्षत्राधिष्ठित आहे. प्रचलित ज्योतिषशास्त्र हे वराहमिहिर पासून म्हणजे इ.सन ५०० च्या आसपास अस्तित्वात आले. प्रचलित पत्रिका मेलन पद्धती ही त्या नंतरच्या काळातील आहे. थोडक्यात ती पंधराशे वर्षांपेक्षा जास्त जुनी नाही. सद्यस्थितीतील विवाह पद्धती मुलगा किंवा मुलगी शिक्षण संपल्यानंतर थोडेसे स्थिरस्थावर झालेवर विवाह योग्य झाले असे समजण्यात येते. साधारण पणे आपल्या समाजात मुली २० ते ३० या वयोगटात व मुले २३ ते ३५ वयापर्यंत विवाहयोग्य ठरतात. मुलामुलींचे पालक हे आपल्या पाल्याचा विवाह जुळविण्यासाठी नातेवाईक, परिचित यांना सांगून वधूवर सूचक मंडळात नांव नोंदवतात. त्यानुसार प्रथम व्यावहारिक बायोडाटासह तयार असलेली पत्रिका व फोटो हे प्राथमिक स्तरावर पाठविल्या जातात. अजून ही पुरुषप्रधान संस्कृती असल्याने बऱ्याच वेळा मुलीची बाजूच जास्त करुन ही माहिती पाठविते. मग पत्रिकेला किती महत्व द्यायचे हा प्रश्न उपस्थित होतो. आम्हाला पत्रिका पहायची नाही असा ठाम आग्रह धरणारे दोन टक्केच असतात असा अनुभव मंडळांचा असतो. म्हणजे अठठयाण्णव टक्के लोकांना पत्रिका हवी असते. स्थळ व्यावहारिक दृष्टया नाकारायचे असेल तर पत्रिका जुळत नाही हे सांगणे उभयपक्षी सोयीस्कर असते. इथपासून विवाहात पत्रिका पुराण चालू होते. यंदा कर्तव्य आहे ? भाग २ यंदा कर्तव्य आहे? भाग ३ यंदा कर्तव्य आहे ? भाग ४ यंदा कर्तव्य आहे? भाग ५ यंदा कर्तव्य आहे? भाग ६ यंदा कर्तव्य आहे? भाग ७ यंदा कर्तव्य आहे? भाग ८

वाचन 15166 प्रतिक्रिया 0