मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गांधीवादाने मिपाच्या अहितचिंतकांचे निर्मूलन होऊ शकते काय?

छोटा डॉन · · जनातलं, मनातलं
मित्रांनो गेले काही दिवस आपल्याकडे "गांधीवादाचा उपयोग व मिपावरचे मशिन जनरेटेड हिट्स लाऊन केलेले हल्ले" हे २ विषय वारंवार समोर येत आहे. जरी ह्या २ घटनांचा एकमेकांशी काही दुरगामीसुद्धा संबंध दिसत नसला तरी सुक्ष्मात जाऊन ( म्हणजे नक्की काय हे विचारु नये, अपमान होईल ) विचार केला असता ह्या "परस्पर पुरक घटना" आहेत असा अनुमान मी काढला आहे ... ********* डिसक्लेमर *********** इथुन पुढचे लिखाण हे केवळ "विनोद, विरंगुळा, मज्जा " ह्याच हेतुने केले आहे आणि ते तसेच घ्यावे अशी विनंती आहे. ह्यात कुणावरही कसलेही "वैयक्तीक हल्ले " करण्याचा माझ्याकडुन "मुद्दामुन, जाणुनबुजुन, हेतुपुर्वक" अशा कुठल्याही प्रकारे करण्याचा विचार / प्रयत्न नाही. तरीही कुणी मुद्दामुन खुसपट काढुन हा "टीपी" धागा "वाद / विवाद / भांडण " ह्यात बदलायचा प्रयत्न केला तर होणार्‍या नुस्कानीची जबाबदारी आम्ही आत्ताच नाकारत आहोत. त्याला आम्ही नव्या "डॉनवादाने" उत्तर देऊ .... * गांधीवाद : समोरच्याने जर तुमच्या एका गालात मारली तर स्वतःहुन तुमचा दुसरा गाल पुढे करा. हल्लेखोराला मनस्वी दु:ख / पश्चाताप होऊन त्याचे मतपरिवर्तन होईल ... * डॉनवाद : निष्कारण तुमच्या वाटेला जाणार्‍या व्यक्तीच्या आधी "एकाच श्रीमुखात" भडकवा, वाट पहा, त्याने स्वतःहुन दुसरा गाल पुढे न केल्यास सत्वर त्याच्या "दोन्हीही नडग्या " फोडुन टाका. विरोधक आपोआपच तुमच्यापुढे नतमस्तक होईल ... नडग्या फोडल्याने त्याला उभे राहता येणार नाही व पुढची कानफाटीत वाचवण्यासाठी मान खाली घालुन लपण्याशिवाय पर्याय नाही, पर्यायाने तो "नतमस्तक" होईल ... ******** डिसक्लेमर संपले ********** आमची प्रेरणा, तात्यसाहेबांचा मिपावरील हल्ले सुरूच... व कलंत्रीसाहेबांची गांधीवादाने अतिरेक्यांचे निर्मुलन करता येईल का? ही लेखमाला ... आजच्या काळात हल्ल्याचे उत्तर प्रतिहल्ल्याने किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या हल्ल्याने देण्यात यावे असा सर्वसाधारण लोकप्रिय समज आहे. गेले काही महिने होत असलेल्या मिपावरच्या मशिन जनरेटेड हिट्स व पर्यायाने सर्व्हरवर ताण येऊन मिपा न उघडणे यासारख्या समस्यांनी प्रत्येक अट्टल/ अस्सल मिपाकराच्या मनात अथवा जगातील मराठीभाषाप्रेमींच्या मनात नकळतच एक काळजीची भावना निर्माण झाली आहे. सगळ्याच्याच मनात भडक विचार येत आहेत. एकदा सोक्षमोक्षच लावू या असाही विचार नकळतच सगळ्याच्या मनात येत असेलच. आरपाराची लढाईतर करून घ्याच. अशा पार्श्वभूमींवर या समस्येच्या मुळातच जाता येईल का ( म्हणजे आयपी वगैरे ट्रॅक करुन त्याला पकडता येईल का ? एफ बी आय ची मदत घेऊ शकु का ?? वगैरे वगैरे ) ? मिपाच्या स्थापनेपासुन सुरु झालेला व मिपाच्या सध्याच्या अमाप लोकप्रियतेमुळे सध्या जोर पकडलेला संघर्ष संपेल का / संपवता येईल का? यात मला थोडाफार आशेचा किरण दोन गोष्टीमध्ये दिसतो.एकतर आपल्या देशात ब्रिटिशाविरुद्ध यशस्वी ठरलेला व मिपावर मेगाबाईट्सच्या मेगाबाईटस वाद घातलेला गांधीवाद आणि हल्लेखोर जरी मशिनची मदत घेत असली तरी त्यामागे डोके हे माणासाचे आहे हा एक मुद्दा . काही संकेतस्थळे वाचकांच्या रोडावत्या संख्येमुळे ( व पर्यायाने मिपाच्या वाढत्या सदस्यसंख्येमुळे ) बंद पडण्याच्या काल्पनिक भीतीच्या अथवा "मराठी शुद्धलेखनाच्या व लेखनातल्या साधनशुचितेच्या " भ्रामक आदर्शाच्या पोटी त्यांची दिशाभूल होत आहे असे मला वाटते. प्रत्येक व्यक्तिच्या मतात परिवर्तन हे काळाच्या ओघात, अनुभवामुळे आणि भ्रमनिरासामुळे होत असतेच. तर मुद्दा असा आहे की सर्व सर्व शांततेत थांबले पाहिजे, हिंसेने कोणाचेही भले होत नाही, तसेही हे सर्व आंतरजाल विश्व काल्पनीक उर्फ आभासी असल्याने वैयक्तीक सुड्/हल्ले/कारवाई वगैरे कल्पनातीत गोष्टी आहेत. मग हे थांबवायचे कसे आणि ते पण शांततेच्या मार्गाने हा तुमचा पुढचा प्रश्न असेल. माझ्याकडे काही पर्याय आहेत, पहा पटतात का ? मुळात "मिपाची वाढती लोकप्रियता, वाढते ट्रॅफीक, प्रसारमाध्यमांकडुन मिपाची वरांवार घेतली जाणारी दखल " या मुद्द्यांचा दुसर्‍यांना त्रास होऊन मदभेद / जळजळ तयार झाली आहे असे आम्ही मानतो ... १. सध्या एखादे मिपाकर व (सध्या ) मिपाचे शत्रु असलेल्या व्यक्ती ह्यांच्यात समान दुवा असलेले मित्रमंडळ अस्तित्वात असेल तर त्या मंडळाला आपण जोडून घेतले पाहिजे, नसेल तर त्याची निर्मिती केली पाहिजे. सध्या तशी काळे संस्थळे उपलब्ध आहेत असे आमच्या निदर्शनास आले आहे, त्याठिकाणी कट्टे घेऊन सलोखा वाढवला पाहिजे ... २.मिपातून हुशार, सज्जन, शांत, सुजाण नागरिकांना दुसरीकडे जाण्यासाठी मदत केली पाहिजे. त्याच प्रमाणे दुसरीकडुन संतापी, दुसर्‍याचे चांगले न बगवणारे, टोकाची विचारसारणी असणारे अशा भिन्नविचारांच्या नागरिकांना मिपावर सन्मानपूर्वेक बोलावले पाहिजे. जेणेकरुन विचारांची देवाणघेवाण झाल्याने परिस्थीती सुधरायला मदत होईल .. पण हे "दोन्ही बाजुकडुन" होणे महत्वाचे, अन्यथा याला काहीच अर्थ नाही हे तितकेच खरे .... ३.दुसरीकडच्या शिकाऊ व वाचकांच्या प्रतिसादाअभावी ( दोन्ही गट वेगवेगळे ) निराश लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी, कौतुकासाठी मिपावर बोलावले पाहिजे. इनफॅक्ट मी तर म्हणतो की आपण "आठवड्याच्या पाहुणा संपादक" ही जबाबदारी सुद्धा वाटुन घेतली पाहिजे ... त्यासाठी असलेले मानधन त्यांना मी एकदा मागे दिलेली ही लिश्ट तात्पुरती गुंडाळुन ठेऊन त्वरित दिले पाहिजे .... ४. आजारी / दुर्धररोगाने ग्रस्त असलेल्या लोकांना मिपाकरांनी सर्वतोपरी मदत केली पाहिजे. ताप्तुरता आपण "इनोचा" पुरवठा कमी पडणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी ... जळाज्ळ फार वाढल्याचे ऐकिवात आहे ... ५.मिपाकर व दुसरे संस्थळ यांच्या प्रशासनाने सुयोग्य आयडी धारक प्रवाश्यांची देवाणघेवाण सुलभ आणि जलद होईल अशी प्रक्रिया राबवली पाहिजे. योग्य तो प्रचार केला तर "मराठी संस्थळे" ही मराठीप्रेमींची आदर्श भक्तिस्थान होऊ शकतील. मराठी संस्थळे काढुन मराठी भाषा संमॄद्ध करण्याचा मुळ हेतुच कुठेतरी हरवत चालला आहे असे माझे मत आहे ... ६.मिपा आणि मिपा विरोधक संस्थांचे साहित्यीक जीवन बरेच सारखे आहे. त्यांच्या मध्ये साहित्य आणि साहित्यिकांचे आदानप्रदान जास्त प्रमाणात होईल अशी योजना आखली पाहिजे. ७."स्पर्धा" ह्या साहित्यीक अथवा हौशी लोकांना चांगल्या पद्धतीने जोडत असतात . मिपाकरांमध्ये व बिगर मिपाकरांमध्ये मध्ये साहित्य, लेख, अनुवाद, कविता, विडंबन, पाककॄती इत्यादी साहित्यप्रकार जोपासले जातात. शिकाऊ, हौशी आणि मुरलेल्या व अनुभवी लोकांना वारंवार जोखण्याची संधी मिळेल अशा "स्पर्धा " आयोजित केल्या पाहिजेत. मिपावर अशा कित्येक स्पर्धा "हिट" झाल्याची उदाहरणे डोळ्यासमोर आहेतच. ८.प्रतिसादांविना निराश लोकांकडून अतिरेकी हल्लेखोर होण्याची शक्यता जास्त असते. दुसरीकडच्या हुशार व्यक्तींना मिपावर लेखन टाकता येईल व त्याला भरपुर प्रोत्साहन मिळेल अशी पावले उचलली पाहिजेत .... ९.मिपा व बिगर मिपामधील लेखांमध्ये , साहित्यात परस्परांच्या चांगल्या भागाचे, सौहार्द, सहिष्णू वागण्याचे वास्तव दर्शन घडवले पाहिजे. १०.मिपावरील गाजलेल्या व हुशार लेखकांचे लेख तिकडे प्रकाशित व्हायला हवेत जेणेकरुन ज्यांना इकडे येणे "अब्राम्हण्यम" ह्या सदराखाली येते त्यांना तिकडेच आस्वाद घेता येईल, त्यांच्या आवडीचे लेखन करवुन घ्यावे मिपावरील मान्यवरांकडुन व तिकडे प्रसिद्ध करावे. लोकांच्या "कट्टर" असण्याला आक्षेप नाही पण यामुळे "मराठी भाषेचे नुकसान " होत आहे हे विसरु नये. अन्यथा सर्वच प्रयत्न वाया जात आहेत असे मी मानतो. ( सध्या असे होत असावे असे मी ऐकतो,मिपावरील काही लेख व इतर साहित्यांचे तिकडे बरेच चाहते आहेत असेही मी ऐकतो.) ११.अजुन एक सुचवावे वाटते की मिपा आणि बिगर मिपा इथला "लॉगीन आयडी " एक केला तरी बराच फरक पडू शकतो. १२.हल्लेखोर का बनतात, कसे बनविले जातात, त्यांची दिशाभूल कशी केली जाते, त्यांच्या नैराश्याचा आणि भावनांचा वापर कसा होतो याबाबत साहित्य निर्मिती होईल अशी योजना आखणे आणि त्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार करणे. १३.मशिन जनरेटेड हल्ल्यानंतर सामान्य आणि निरपराधांनाच जास्त झळ लागते. त्यामुळे ज्यांचे अर्धवट लेखन गायब झाले, व्यवस्थीत साठवले न गेले अशा मिपाकरांच्या व बिगर मिपाकरांच्या पोळलेल्या लोकांच्या हकिकती प्रसिद्ध करणे. १४.मराठी आंतरजालविश्व जर अखंड राहिले असते तर अखंड संस्थळाचे स्थान आज आंतरजालसत्तेच्या अग्रभागी राहिले असते. विभाजनाने आपण काय गमावले आणि काय गमावत आहोत याचा सातत्याने प्रचार करत राहणे. १५.जगात अनेक ठिकाणी मिपाकर व बिगर मिपाकर विद्यार्थी, नागरिक, नोकरीदार एकत्र राहत असतात. त्याच्यांमध्ये सामंजस्य निर्माण होईल यासाठी मंडळे स्थापन करणे. हे उपाय नक्कीच योग्य आहेत असे माझे मत आहे ... बाकी "लेखाच्या विस्तारभयाने बाकीचे (डोक्याला शॉट देणारे ) सुविचार पुढच्या भागात ( जर आपली इच्छा असेल तर ) इति लेखणसीमा ...!

वाचन 4152 प्रतिक्रिया 0