मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भक्तीमार्गातील अडथळे.

प्रभाकर पेठकर · · विशेष
काही दिवसांपूर्वी जन्माष्टमी झाली. जन्माष्टमीच्या आधी झी-२४ तास वर अत्यंत उद्बोधक चर्चा (रोखठोक) ऐकायला मिळाली. गेल्या जन्माष्टमीला मानवी मनोरा कोसळून, खालच्याच थरावर असलेला, एकजण जबर जखमी झाला होता. मानेला दुखापत झाल्याने कमरेखाली लुळा पडला होता. ६ महिन्यांच्या उपचारांनंतर कुबड्याघेऊन चालण्याइतपत परिस्थिती सुधारली तरीपण कोणाच्या आधाराविना जगू शकत नाही. २० वर्षाचा मुलगा त्याच्या पुढे डोंगराएव्हढे आयुष्य आहे. चर्चेत तो आणि त्याची आई आले होते. त्याच्या आईला एकंदर प्रकाराबद्दल मत विचारले असता ती म्हणाली, 'ह्याच्या आयुष्याची वाट लागली आहे. मी जिवंत असे पर्यंत करीन ह्याचे सर्व काही पण माझ्या पश्चात काय? आम्हाला सरकारने मदत करावी.' म्हणजे त्या बाईलाही घटनेचे भांडवल करून सरकारकडून आर्थिक मदत हवी होती. पण 'हा प्रकार अयोग्य आहे. एखाद्या तरुणाच्या जीवाशी खेळ होतो आहे, तेंव्हा हे ताबडतोब थांबवा' अशी आर्त हाक तिच्या शब्दांमध्ये कुठेही नव्हती. कदाचित ती अशिक्षित असेल आणि एव्हढा व्यापक दृष्टीकोन तिच्याजवळ नसेल तरीही, प्रसंगाचे गांभिर्य कुठेही कमी होत नाही. दरवर्षी जन्माष्टमी येते, वाहिन्या तथाकथित 'सकारात्मक' चर्चा घडवून आणतात. पुन्हा जन्माष्टमीच्या दिवशी आख्ख्या दिवसाचे चित्रिकरण आणि सादरी करण आपल्या वाहिनीवर दाखवून 'गोविंदांचा जल्लोष' मोठ्या कौतुकाने दाखवितात, सेलीब्रेटीज हजेरी लावून, राजकारण्यांच्या खांद्याला खांदा लावून (की राजकारणी ह्या सेलीब्रेटीज च्या खांद्याला खांदा लावायला उत्सुक असतात कोण जाणे...) प्रसिद्धी वलयात राहण्याचा, वलय वाढविण्याचा प्रयत्न करतात, गोविंदांच्या दिशेने चुंबने फेकतात, तमाशा नृत्य, अंगविक्षेप करून गोविंदांना आणि उपस्थित जनसागराला चेकाळवतात. सेलीब्रेटीज आणि राजकारणी, 'स्वतःच्या जीवाला सांभाळून खेळा' असा, सिगरेटच्या पाकिटांवर असलेल्या 'तंबाखू सेवनाने कॅन्सरसारखे प्राणघातक रोग होऊ शकतात' ह्या कुणावरही सकारात्मक परिणाम होणार नाही पण आपल्याला मात्र एक नैतिक कार्य 'उरकल्याचे' श्रेय मिळेल अशा वाक्यासारखे वाक्य फेकून स्वतःची एक 'खेळी' खेळतात. पण सिगरेटवर जशी कायमस्वरूपी बंदीची मागणी कोणी करीत नाही तशीच गोविंदा ह्या खेळात शिरलेल्या प्राणघातक प्रथांवर कायमस्वरूपी बंदी घालण्यासाठी कोणी पुढाकार घेत नाही. ह्या वर्षी १ मृत्यू आणि ५७ जखमी (त्यातले कांही गंभीर) अशी मी ऐकलेली शेवटची बातमी. होऊदे मृत्यू आणि जखमी. त्याहून जास्त तर रस्त्यावरच्या अपघातातही होतात. त्याचं काय एव्हढं? त्या विषयावर किती चर्चा करणार? आता पुढच्या वर्षी पुन्हा जन्माष्टमी येईल तेंव्हा बघू. सेलीब्रेटीज, राजकारणी आणि वाहिन्यांनी जे कांही कमवायचे ते कमवून घेतले आहे. आता गणेशोत्सव. मागे वळून पाहू नका. लालबागचा गणपती मोठा की जीएसबी गणपती मोठा, गेल्यावर्षी दानपेटीत किती रक्कम जमा झाली, किती सोने-नाणे आले त्यापेक्षा जास्त ह्या वर्षी यायला हवे. मग काय? जाहिरात करा, दूरदर्शनवर चर्चा घडवा, लालबागचाच राजा(?) कोणाला कसा पावला ह्याच्या बातम्या पसरवा, गेल्या २५-३० वर्षात किंवा 'वयाच्या तिसर्‍या वर्षापासून आज ६५ वर्षांचा होई पर्यंत लालबागच्या गणपतीच्या पहिल्या दिवशीच्या दर्शनात कधी एकदाही खंड पडू दिला नाही' वगैरे शेखी मिरविणार्‍यांना शोधून काढा, त्यांच्या मुलाखती घ्या, ज्यांना अनेक वर्षे (प्रयत्न करूनही) मूल होत नव्हतं त्यांना 'बाप्पाच्या' नुसत्या दर्शनानेही कसे विनासायास मूल झाले अशांना पुढे आणा. त्यांच्या भक्तीचे गोडवे गा. एखाद्याला कांही नको असेल, पण राजाच्या नुसत्या दर्शनानेही विचलीत मन शांत होऊन अगम्य आनंद प्राप्त होत असेल त्यांनाही येऊ द्या. काहीही करा पण लालबागच्या, जीएसबीच्या, कोळीवाड्याच्या गणेशोत्सवाला विराट स्वरूप प्राप्त झालं पाहिजे. आमदनी वाढली पाहिजे. महिलांना धक्काबुक्की झाली तरी चालेल (त्याच महिला पुन्हा पुढच्या वर्षी येतीलच), गर्दीत चेंगराचेंगरी झाली तरी चालेल. सेलीब्रेटीज आणि राजकारण्यांना मात्र वेगळी वागणूक द्या. देवाच्या चरणी सगळे सारखे असतात हा जुना बुरसटलेला विचार झाला. आता तसे करून नाही चालत. राजकारण्यांना, सेलिब्रेटीजनां जर 'खास', इतरेजनांपेक्षा वेगळी, प्राधान्यक्रमाची वागणूक मिळाली तरच ते दरवर्षी हजेरी लावतील आणि त्यावरच आपल्या मंडळाची, आपल्या गणपतीची प्रसिद्धी अवलंबून असते. आणि प्रसिद्धीवरच पैसा अवलंबून असतो. व्यापार.. व्यापार वाढवलाच पाहिजे. भक्तीमार्गात मोक्ष असेल नसेल पण पैसा मात्र भरघोस आहे. गणपती सरता सरता नव्या तयारीला लागा.. नवरात्र येते आहे. गरबा देवीचा उत्सव. जोरजोरात बँड-डिजे, पुन्हा सेलीब्रेटीज, पुन्हा तरूणाईचा जल्लोष, तोच उन्माद, स्वातंत्र्य आणि स्वैराचारातील धूसर सीमारेखा. गर्भनिरोधक गोळ्यांची आकाशाला भिडणारी विक्री, मुलींवरून, अगदी चाकू-सुरे आणि लाठ्या काठ्या घेऊन, होणार्‍या मारामार्‍या, एकमेकांची डो़की फोडणं..... भक्तगणाची भक्ती कुठे गेली?........अंबे माता की जय. ह्या काळात नवजात अर्भकं, आजारी व्यक्ती, वृद्ध व्यक्ती आणि अभ्यास करू इच्छिणारे विद्यार्थी-विद्यार्थीनी ह्यांना त्रास झाला म्हणून काय झालं? त्यांनी थोडं सहन केलं तर काय हरकत आहे? समाजाच्या भक्तीमार्गाआड, धर्माआड कसे येऊ शकतात कोणी? आमचे उत्सव साजरे करणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. धर्मावर होणारे अत्याचार आम्ही सहन करणार नाही. कांही अस्मिता वगैरे आहे की नाही? हे सणवार संपले तर पदयात्रा आहेत. १२-१२, १५-१५ हजारांच्या संख्येने सहभागी होऊन दोनअडिचशे किलोमिटर्सच्या पदयात्रा करायच्या. रस्त्यावरच्या वाहनचालकांना त्रास, जिथे जिथे म्हणून विश्रांतीचे पडाव असतील तिथे तिथे खाण्यापिण्याच्या वस्तूंचा, प्लॅस्टिकच्या पेल्यांचा कचरा, त्या त्या गावच्या नदी काठी एव्हढ्या मोठ्या संख्येने आघोळी, मल-मूत्र विसर्जन करून तिथली स्वच्छ नदी प्रदुषित करायची. त्या गावात कोणी त्या नदीचे पाणी पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी वापरत असेल. तान्ह्या बाळांना पाजत असेल. असेना का. मला पदयात्रेचे पुण्य मिळतय नं, मग झालं तर. मी तर दरवर्षी जातो. भरपूर पुण्य, मनःशांती, आत्मबळ वगैरे वगैरे कमवितो. पाप म्हणजे काय? पुण्य म्हणजे काय? हे प्रश्न आपण स्वतःच स्वतःला विचारले पाहिजेत. त्याचे उत्तर शोधले पाहिजे. 'वैष्णव जन तो तेणें कहिए जे पीर पराई जाणे रे' हे आपण का स्विकारू इच्छित नाही? त्यात कसली पिडा? माझी देवावर श्रद्धा आहे आणि जोपासण्याचा मला हक्क आहे. हा 'मी आणि माझ्या' पलीकडे न जाणारा विचारच समाजात दुभंग निर्माण करतो आहे. देव देव्हार्‍यात नाही, देव नाही देवालयी देव चोरुन नेईल, अशी कोणाची पुण्याई देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी ह्या विचारांमधील गोडवा, सहजता आणि सत्यता का आपल्याला भावत नाही? आपण तसे आचरण का करीत नाही ह्यावर आपण सर्वांनी मिळून विचार केला पाहिजे. 'देव भावाचा भुकेला' असे आपण म्हणतो पण तो 'भाव'च हरवून बसलो आहोत हे भीषण सत्य आपण केव्हा स्विकारणार? आपल्यातली ही कमतरता दूर करून, कर्मकांडांपेक्षा मनाने इश्वरचरणी केंव्हा रुजू होणार? फकीराचे जीवन जगलेल्या, लोकांना ज्ञानाचा प्रकाश देणार्‍या साईबाबांना आपण चांदीच्या सिंहासनावर बसवून आणि सोन्याचा मुकुट घालून सामान्य माणसाप्रमाणे ऐहिक सुखाच्या कल्पनांच्या जोखडात अडकवतो आहोत हे आपल्या लक्षातच येत नाही. बुद्धीची देवता गणपती तिलाही आपण सोन्या-रुप्यात तोलतो. सिद्धीविनायकाला सोन्याचा मुलामा दिलेल्या कळसात आपण 'देवालय' शोधतो. देवाचे देवत्व विसरून, विश्वाचे निर्माण करणार्‍या त्या परमात्म्याला, पैसाअडका, सोनं-नाणं देऊन आपापल्या इच्छापूर्तीसाठी माणूस साकडे घालू लागला. ऐहिक उपभोगाची ही साधनं देवाला नको असतात. श्रीमंत देवालयं(?) त्यांच्या कडे जमा होणार्‍या पुंजीतून समाजकार्य करतात ह्यावरही माझा विश्वास नाही. आणि तो नसण्याचं कारण कानावर येणार्‍या देवालयातील भ्रष्टाचाराच्या सुरस कहाण्या. अनेक देवालयांच्या बेहिशोबाच्या कथा पेपरमधून येत असतात. विश्वस्तपदावर वर्णी लागावी म्हणून अनेक राजकारणी धडपडत असतात. हे देवालय तुमचं तर ते देवालय आमचं अशी वाटणी असल्याचेही ऐकले आहे. ते कांही भक्तीभावने भारलेले नसतात. तुम्हाला समाजकार्यच करायचं असेल तर थेट करा नं. देवालयाच्या मार्फत कशाकरता? हे म्हणजे, एखाद्या भिकार्‍याला थेट पैसे देण्याऐवजी रस्त्याने जाणार्‍या कुणा अनोळखी माणसाला पैसे देऊन सांगायचं, 'तुम्हाला जमेल तेंव्हा एखाद्या भिकार्‍याला हे पैसे द्या.' अशा, समाजकार्याच्या, बेगडी समाधानामागे आपण धावतो आहोत. त्यापेक्षा बाबा आमटेंच्या आश्रमाला पैसे पाठवा, वनवासी फंडात पैसे पाठवा, भाऊबिज फंडात पैसे पाठवा, एखाद्या विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा भार उचला, कुणा गरीब वृद्धाच्या आजारपणात औषधे पुरवा. भरपूर मार्ग आहेत. तुम्ही स्वतः हे करू शकता. पुस्तकं दान करू शकता, तुमचे वापरलेले कपडे, तुम्हाला नको असलेल्या वस्तू गरीबांना दान करू शकता. श्रीमंत देवालयांना आणि त्यांच्या विश्वस्तांना अधिकाधिक श्रीमंत करण्यापलीकडे तुमची मदत पोहोचत नाही. सत्ता आणि त्या पाठोपाठ येणार्‍या पैशाच्या माजातून काळ्या मिळकतीचे असे अनेक मार्ग त्यांनी शोधून काढले आहेत आणि आपण त्यांच्या ह्या कृष्णकृत्याला हातभार लावत आहोत. त्यापेक्षा जो गरजवंत आहे अशाला थेट मदत करा. कपडा, अन्न, धन कसलंही दान करा पण थेट करा. नाहितर तेच होत राहणार भक्तीमार्गातले दलाल श्रीमंत होत राहणार आणि गरजू कायम वंचित राहणार.... जिस दर्गाह की मजार पर सेंकडो चादरे चढती रही है। उसी दर्गाह का दरबान, सुना है, कल ठंड से मर गया। हे जीवघेणं सत्यच आपल्या मनाला डाचत नाही तो पर्यंत आपल्यात बदल अशक्य आहे. मी माझ्या पत्नीसह अनेकदा पुण्यातल्या दशभुजा गणपतीला, भवानी माता मंदिरात जातो. तिचाही कर्मकांडावर जास्त भर असतो. तिलाही मी अनेकदा सांगत असतो पण अजून कांही परिणाम झालेला मला दिसत नाही. दशभुजा गणपती मंदीरात अनेक भक्तगण येत असतात. बाहेरच्या विकलांग, वृद्ध भिकार्‍यांना शिताफीने टाळून मंदिरात जातात. दहा रुपयाचा नारळ, हार फुलं, उदबत्या वगैरे वगैरे तिथल्या पाषाणाच्या मूर्ती समोर ठेवतात. पण बाहेरच्या भिकार्‍यांना दहातले दोनच भक्त चार-आठ आणे देताना दिसतात. बाकीचे सर्व तोंडाने कांही स्तोत्र पुटपुटत भिकार्‍यांना टाळून निघून जातात. धडधाकट भिकार्‍यांना तर मीही मदत करीत नाही. पण जे वृद्ध, विकलांग आहेत त्यांना आवर्जून मदत करतो. त्यांना कांही पैसे, खाणे मिळाले नाही तर ते लवकरच मरून जातील. अर्थात भीक मागणे हा ही एक 'व्यवसाय' होतो आहे. तो विषय वेगळा आहे. राजस्थानातील कांही देवळांमध्ये देवाच्या माथी दूध ओतले जाते. दिवसभरात हजारो लिटर्स दूध वाया जात असते. आणि हे अनेक वर्षे चालू आहे. मला दूरचित्रवाणीवर दिसणारी कुपोषीत बालकांची, छातीच्या पिंजर्‍यावर नुसतेच कातडे ओढून बसविल्यासारखी चित्र डोळ्यासमोर येतात. वाईट वाटतं. चांगली साक्षर माणसं (त्यांना सुशिक्षित म्हणवत नाही) श्रद्धेच्या नांवाखाली अंधश्रद्धा जोपासताना दिसतात. आपल्या समाजाचं हे अंधश्रद्ध चित्र मला फार विचलीत करतं. खरंच, आपण कधीच बदलणार नाही का? आपल्या अंधश्रद्धेवरंच राजकारण्यांचं, व्यापार्‍यांचं, दलालांचं दुकान चालतं आहे. आपल्या अंधश्रद्धेलाच 'श्रद्धे' चं 'भक्तीमार्गाचं' लेबल लावून आपल्या भावना कुरुवाळणं हा त्यांच्या 'दुकानदारी'चाच भाग आहे. आपण सुशिक्षितांनी त्यांच्या ह्या चालीला, खेळीला बळी न पडता वाटचाल करावी, अशिक्षितांना ह्या चक्रव्युहातून ओढून बाहेर काढावं हे आपलं प्रत्येकाचेच राष्ट्रीय कर्तव्य आहे म्हंटल्यास गैर होणार नाही. मी नास्तिक आहे का? मी अश्रद्ध आहे का? ह्या प्रश्नांचे उत्तर मी ठामपणे 'नाही' असे देऊ शकतो. श्रद्धा असावी. इश्वराचे अस्तित्व स्विकारणे किंवा नाकारणे हा वैयक्तिक प्रश्न असू शकतो. मी त्याचा नक्कीच आदर करतो. पण कर्मकांडांचा अतिरेक नसावा. प्रत्येक कृती ही मनःचक्षु उघडे ठेवून करावी. प्रत्येक गोष्ट तार्किक कसोटीवर पडताळून पाहावी. आपली ईश्वरसेवा आपल्या घरापुरतीच बंदिस्त असावी. बाकी जमेल तशी समाजसेवा करावी. मुंबईत साजर्‍या होणार्‍या आंबेडकर जयंतीला आपण, 'आंबेडकरी' जनता शहरात घाण कचरा पसरवते म्हणून नांवे ठेवतो आणि आषाढीला वारीला मात्र न चुकता हजेरी लावतो. मुसलमानांच्या रस्त्यावरच्या नमाजाला, ध्वनीक्षेपकांना विरोध करतो पण गणेशोत्सव, नवरात्र, जन्माष्टमी आदी मोठ्या हिरीरीने उत्सवात साजरे करतो. आपल्या पदयात्रांप्रमाणे इतर सर्व धर्मियांनी, जाती-जमातींनी त्यांच्या त्यांच्या चालीरिती पाळायच्या ठरवल्या तर आपल्या देशात एव्हढे विविध धर्म, जाती, जमाती आहेत की वर्षभर रस्त्यांवर फक्त पदयात्रा करणारेच दिसतील. रस्ते, महामार्ग वाहनांसाठी बंद करावे लागतील. की इतरांनी त्यांच्या धर्माचे, चालीरितींचे पालन करू नये? ही मुभा फक्त माझ्याच धर्माला असावी का? शिर्डीच्या वाटेवर कफनी, चिमटा, चिलिम बाळगणारे सर्वच साईबाबा असतात का? उत्तरेत तर अनेक साधूंच्या जथ्थ्यात कित्येक गुन्हेगार, गांजेकस, भोंदू माणसांचा भरणा असतो. कोणावर विश्वास ठेवावा? मला वाटतं फक्त स्वतःवर ठेवावा, स्वतःच्या विचारशक्तीवर ठेवावा. माझं एव्हढंच म्हणणं आहे श्रद्धा जरूर बाळगा, भक्तीमार्गावर वाटचाल करा पण कर्मकांडांचा अतिरेक करू नका. तुमच्या भक्तीभावनेचा कोणी गैरफायदा घेईल, इतरांना थेट किंवा अप्रत्यक्ष त्रास होईल असे वागू नका. भक्तीमार्गावरील हे सर्व काटेकुटे टाळून मार्गक्रमणा करा. देवाला कुठे बाहेर शोधण्यापेक्षा स्वतःच्या अंतःकरणात त्याची स्थापना करा. चराचरात ईश्वर आहे. त्याचा सन्मान करा. तुम्ही उपासतापास, साधना, नैवेद्य, देवालयांना दान नाही केले तरी तुम्हाला देवाच्या मनांत स्थान प्राप्त होईल. देव भावाचा भुकेला आहे. पैशांचा नाही. -oOo-

वाचन 76355 प्रतिक्रिया 101
Permalink

प्रचंड सहमत....
Permalink

अगदी मनातले लिहिलेत! सुंदर मार्गदर्शन. याबद्दल पेठकरकाकांना मानाचा मुजरा.

In reply to by धन्या

Permalink

मार्केटिंग आणि भक्ती यातल्या सीमारेषा पुसट झाल्यात; नीर-क्षीर विवेकाची आज आपल्याला (पुन्हा एकदा) गरज आहे.

In reply to by आतिवास

Permalink

एक्दम ब्रोब्र!
नीर-क्षीर विवेकाची आज आपल्याला (पुन्हा एकदा) गरज आहे.
Permalink

:)
Permalink

तळमळीने लिहिलेला उत्तम लेख. मानवी जीवनाच्या अगदी प्रत्येक क्षेत्रात अमाप धंदेबाजी बोकाळलेली आहे. धूर्त धंदेवाल्यांनी आपल्या जीवनाचा पूर्ण कब्जा घेतलेला आहे. ज्याने त्याने स्वतः सावध राहून ('सावधपण सर्वविषयीं') तिच्यापासून स्वतःला वाचवले पाहिजे. माझ्या वडिलांनी तरूणपणीच घरातले सर्व 'देव' नर्मदेत विसर्जित केले होते, आणि त्यानंतर ते कधीही कोणत्या मंदिरातही गेले नाहीत, बाबा-स्वामींचा तर प्रश्नच नाही. हीच परंपरा आमच्या घरात चालत आली. मला तर हे हजारो-लाखो लोक असल्या ठिकाणी कडमडायला मुळात जातातच का, याचेच नेहमी आश्चर्य वाटते.

In reply to by चित्रगुप्त

Permalink

माझ्या वडिलांनी तरूणपणीच घरातले सर्व 'देव' नर्मदेत विसर्जित केले होते त्यामुळेच आम्च्यासारखे अश्रद्धावान नर्मदेची परीक्रमा करतात.
Permalink

सहमत !!
Permalink

तळमळीने लिहिलेलं थेट अंतःकरणाला भिडलं. माध्यमिक शाळेत असल्यापासून मी गर्दी असणार्‍या देवदर्शनाला जाणे बंद केले ते अजुनही पाळतोय. अमेरिकेतील हिंदू मंदिरांची कार्यपद्धती जवळून पाहिली आहे. स्वकष्टाने उद्योग / व्यवसाय उभा करणार्‍या कुणालाही हेवा वाटेल असे त्यांचे बिझनेस मॉडेल असते.

अमेरिकेतील हिंदू मंदिरांची कार्यपद्धती जवळून पाहिली आहे. स्वकष्टाने उद्योग / व्यवसाय उभा करणार्‍या कुणालाही हेवा वाटेल असे त्यांचे बिझनेस मॉडेल असते. अमेरिकेतच कशाला भारतही बिझनेस मॉडेलच्या बाबतीत आजिबात मागे नाही. मात्र स्थळ-काळ-परिस्थिती यामुळे या दोन मॉडेल्सच्या बाह्यरुपात फरक झाले आहेत... पण गाभ्याला फारसा धक्का न पोचवता *HAPPY* देवळात चकचकीतपणा आणि स्वच्छतेचा अभाव असतो... पण या दोन गोष्टी नसल्या तरी भारतात भाविकांच्या संखेवर काही परिणाम होत नाही. म्हणून तो खर्च अनावश्यक समजला जातो. फिनान्शियल ऑप्टिमाझेशन ते हेच नव्हे काय? पूर्ण फिजिबिलिटी स्टडी केल्याशिवाय आणि कॉस्ट-बेनेफिट (खर्च / गल्ला) रेशो असल्याशिवाय मंदिर बांधले जात नाही. उगाच काय आजकाल नविन मंदिरांतील देवाच्या निवडीत साईबाबा आणि बालाजी हे पुढे आहेत आणि राम-कृष्ण-शिव-गणेश मागे पडलेत ?! :) ;) पण इतके सगळे असले तरी हिंदू मंदिरे आणि एकंदरीत हिंदू धर्म हे वैयक्तिक किंवा फारतर छोट्या समुहांच्या प्रयत्नांवर जास्त अवलंबून आहेत. ख्रिश्चन चर्च आणि इस्लाम उम्मा यांच्या शतकानुशतके चालू असलेल्या जागतिक संघटनकौशल्याच्या ते पासंगालाही पुरणार नाहीत.

+१२३४५६. चिकनच्या ठोक विक्रेत्याचं प्रति ... मंदीर. माजी आमदाराचं प्रति ...बाबा मंदीर. आम्ही विकेण्डला जातो. पाया पडतो, कृतकृत्य होतो. मज्जानु लाईफ. बाकी ते जागतिक संघटनकौशल्याबाबत हज्जारदा सहमत.

यावरून एक किस्सा आठवला. सेन्ट लुईसला एकदा लोकल ट्रेनमधून जात असताना एक तरूण भेटला. तो नुकताच भारतात जाऊन आला होता. तो सांगत होता की त्याचे वडील भारतातील चर्चमध्ये गुंतवणूक करतात. त्यातून चांगले उत्पन्न मिळते. हे बिझनेस मॉडेल नेमके कसे काम करते याबद्दल कुतूहल आहे. बाकी भारतात मी एकाच घरात तीन तीन धर्म पाळले गेलेले पाहिले आहेत. आर्थिक फायदा हा त्यामागे केंद्रस्थानी असतो असे निरिक्षण आहे.

एक बालाजी/साई बाबा/हनुमान/शंकर/वैष्णोदेवी यांचे मंदिर उभारायचे. हा सगळ्यात सोपा मार्ग. देव नॅशनल (इंटरनॅशनल) अपील असणारा हवा. प्रदेशिक देवांच्या मंदिरात कमाई फारशी नाही. म्हणूनच दत्त, खंडोबा, स्वामी समर्थ आदी मंदिरे इतकी श्रीमंत नाहीत. स्टार लेव्हलचा देव असला की मंदिर आपसूकच ग्लॅमरस बनते. उद्घाटनाला एखादा सेलिब्रिटी बोलवायचा. भरपूर जाहिरात करायची. हळूच 'नवसाला पावणारा' अशी बातमी सोडून द्यायची. दगडूशेठ गणपती हा पूर्वी (९० च्या दशकात) नवसाला पावणारा म्हणून फेमस नव्हता. गेल्या १०-१२ वर्षात जोरदार मार्केटिंग करून त्याला हे बिरूद मिळाले आहे. त्यासाठी बिझनेस डेवलपमेंट ऑफीसर्स नेमायचे. त्यांना क्लायंट्स आणायला सांगायचे आणि त्यावर ५% कमिशन द्यायचे. काही मोठी माणसे भक्त म्हणून नेमायची. गरज पडल्यास दान पेटीतला कट त्यांना द्यायचा. मंदिरात चविष्ट असा प्रसाद अहोरात्र ठेवायचा. जसा तिरुपती बालाजीचा लाडू प्रसिद्ध आहे तसलं काहीतरी स्पेशल ठेवायचं. ब्रँड डेवलप करण्यात प्रसाद मोठी भूमिका बजावतो. काजूकतली किंवा पिस्ता बर्फी असा तगडा प्रसाद ठेवायचा. आंडू-पांडू साखरफुटाणे वगैरे नाही ठेवायचे. सुरुवातीचा खर्च गुंतवणूक म्हणून नेटाने करत रहायचा. मंदिरासाठी सुरुवातीला कुठेतरी आडवळणाला ५०० स्क्वे. फू. जागा पुरेशी आहे. नंतर ती आपसूकच वाढत जाते. सगळ्या मिपाकरांनी मिळून दहा-दहा हजार रुपये काढले तर असे एक छानसे मंदिर सहज उभे राहू शकते. गुंतवणुकीच्या प्रमाणात मंदिराच्या उत्पन्नाचा शेअर वाटून घेण्याचे ठरवून टाकायचे. मंदिरात छान-छान भजने सतत चालू ठेवायची. एक दिवा/धुनी सतत पेटत ठेवायचे. समोर एका सुरेख बोर्डावर त्याची कपोलकल्पित कहाणी लिहायची. "श्री ---- यांच्या या पवित्र देवळाच्या बांधकामासाठी पाया खोदतांना या जागेवर जमिनीच्या आठ फूट खाली एक पुरातन समई सापडली. समई बाहेर काढताच ती तेवत असल्याचा भास सगळ्यांना झाला. नंतर त्या समईची विधीवत पूजा करून ज्योत पेटवण्यात आली. समईमधले तेल संपले तरी समई अखंड तेवत असते. ही श्री ---- यांची किमया! त्यांच्या या कृपेचा प्रसाद आपणा सर्वांवर अखंड बरसत राहो ही प्रार्थना!" अशी ष्टोरी लिहिली की मंदिर फेमस व्हायला वेळ लागणार नाही. अशी समई सापडेल अशी व्यवस्था पाया खोदण्याच्या आधी करून ठेवावी. अजून एखादे वैशिष्ट्य डेवलप केल्यास ब्रँड व्हॅल्यू कैक पटीने वाढेल. उदाहरणार्थ १००१ वेळा विशिष्ट मंत्राचा जप पौर्णिमेच्या दिवशी मंदिरात उपाशीपोटी बसून केल्यास घरातल्या सगळ्यांचे आरोग्य चांगले राहते किंवा उपास करून देवाचे दर्शन घेतल्यानंतर अन्नदान केल्यास घरादाराला बरकत राहते वगैरे वैशिष्ट्य हळूहळू एस्टॅब्लिश करत जायचे. त्यासाठी सुरेख अभिनय करणारे भोळे भक्त वाटणारे एजंट्स नेमायचे. मंत्र नवीन शोधून काढायचा. नेहमीच्या मंत्रामुळे भक्त इंप्रेस होतीलच असे नाही. मिळणारे फळ मोघम ठेवायचे. म्हणजे आरोग्य चांगले राहील किंवा बरकत राहील वगैरे. तात्काळ मिळणारी स्पेसिफिक फळे मेनु मध्ये ठेवू नयेत. अशी फळे न मिळाल्यास लोकांचा विश्वास उडण्याचा धोका असतो. अशा ष्टोर्‍या प्रसिद्ध झाल्या की मग मस्त ब्रँड तयार होईल. अधून-मधून धार्मिक कार्यक्रम घेत रहायचे. सेलिब्रिटीजना बोलवत रहायचे. अगदी सुरेखा पुणेकर, बाबासाहेब पुरंदरे, राजकुमार तांगडे, सई ताम्हणकर, राखी सावंत, परिणीती चोप्रा, पूनम पांडे, माधुरी पुरंदरे, सुधीर गाडगीळ, अतुल पेठे, भाई वैद्य (थोडा निराळा कार्यक्रम ठेवून), मेधा पाटकर, भैय्युजी महाराज, सैफ अली खान, जेनेलिया डिसुझा, मानसी नाईक, बाबा आढाव, शमसुद्दीन तांबोळी, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, सिंधूताई सपकाळ, सुरेश कलमाडी, अनिल शिरोळे, जितेंद्र आव्हाड असे सगळ्यांना बोलवायचे. कुठलाच भेदभाव ठेवायचा नाही. दहा वर्षात आपण सगळे मर्सिडीझ मधून फिरत असू. मला 'नोकरी बदलायची आहे' असं आर्जव टाकण्याची गरज पडणार नाही. :-) एकच अडचण आहे; हे सगळं करण्यासाठी जे मन लागतं ते कुठून मिळवायचं? बाकी सब तो चुटकी में अरेंज हो जायेगा... :-)

सही आहे. गवि, माझ्या आयडीवरून तुम्हाला कसा काय धागा तयार करता आला? असे करता येते हे मला माहित नव्हते. :-)

जुनी माहिती नवीन प्रकारे कळवल्याबद्दल आभारी आहोत. ;)

In reply to by समीरसूर

Permalink

"एकच अडचण आहे; हे सगळं करण्यासाठी जे मन लागतं ते कुठून मिळवायचं? बाकी सब तो चुटकी में अरेंज हो जायेगा... :-) " प्रचंड अनुमोदन ....
Permalink

काकांची आमच्या लालबागच्या राजावर श्रद्धाच नाही दिसत.अहो काल तर ५-१० मीनीटात दर्शन देत होता राजा(पावसाच्या कृपेमुळे). लेखाशी सहमत . अवांतरः परोपकार ते पुण्य, परपीडा ते पाप. (हे स्वतः करणे हे फार अवघड असल्याने हे फक्त उपदेशामृत म्हनुन वापरावे) स्वतः बदला जग बदलेल. (अर्थातच आपल्यापुरते).

लालबागचा राजाने ह्या १० दिवसात फक्त ७ करोड रुपये दान पेटीतुन मिळवले आहेत. कॄपया "लालबागचा राजा" गणपती मंडळाचे गेल्या वर्षाचे "बॅलँस शीट" कोणी डकवू शकेल काय?
Permalink

लेखातल्या प्रत्येक शब्दाशी सहमत. पैजारबुवा,
Permalink

स्वीकारा .रोख्ठोक. शोधिशी मानवा, राऊळी मंदिरी नांदतो देव हा, आपुल्या अंतरी हेच खरे. अवांतर :बाकी "अतिरिक्त (?)" उत्पन्नवाले ज्यास्ती "दान-धर्म्-पूजा-अर्चा" विषेशतः "साई-बालाजी" करताना दिसतात असे निरिक्ष्ण आहे.

In reply to by नाखु

Permalink

"अतिरिक्त (?)" उत्पन्नवाले ज्यास्ती "दान-धर्म्-पूजा-अर्चा" विषेशतः "साई-बालाजी" करताना दिसतात समाजातील विविध आर्थिक पातळीवरच्या व्यक्ती मनी भक्तीभाव बाळगत असतात. प्रत्येकाला आपला आर्थिक स्तर उंचवायचा असतोच. वाढत्या महागाईने सर्वच जण बेजार आहेत. आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना परमेश्वराची साथ मिळाली तर नशिब बदलून इप्सित साध्य होईल इतका साधा विचार त्या मागे असतो. पण सर्व भाविक आर्थिक फायद्याच्याच मागे असतात असेही नाही. आपल्या पुरुषप्रधान समाजात स्त्रियां स्वतःला फार असुरक्षित समजत असतात. हि असुरक्षितता नेहमीच आर्थिक नसते, भावनिक ही असते. नवरा मनाविरुद्ध वागत असतो, मुलं अभ्यासात प्रगती करीत नसतात, कधी आयुष्याकडून अपेक्षाच जास्त असतात, कधी घरच्यांची आजारपणं, असाध्य व्याधी काहीही असतं. 'असुरक्षिततेची' ही वेगवेगळी रुपं कुठल्याही, मनाने कमजोर, व्यक्तीला घाबरवितात. पण स्त्री वर्ग ह्या भक्तीभावात सर्वात जास्त बुडालेला दिसतो. पुरुष मंडळी त्या मानाने, मनाने कमी आणि कर्तव्य म्हणून जास्त गुंतलेली असतात. हे वाईट नाही पण ईश्वरावरील परावलंबित्व चुकीचं आणि भक्ताची विचारशक्ती, सारासार बुद्धी बधीर करणारं असेल तर समस्या निर्माण होतात. मी जेव्हढं देवासाठी जास्त जास्त करेन तेव्हढं आयुष्यात देव मला भरभरून देईल हा विचार घातक आहे. देवावर श्रद्धा असू दे, भक्तीभाव असू दे पण त्याला पैशात तोलू नका. इश्वराला पैसे, सोने-चांदी, खाद्य पदार्थ अर्पण करू नका. दोन हात जोडून मस्तक टेका आणि मनोमन प्रार्थना करा. तुमचे मनोबल वाढायला एव्हढेच पुरेसे आहे. घरातल्या देवाच्या तसबिरीसमोर साधं गुळ-खोबरं, दुध साखर ह्याहून जास्त काही करावे लागत नाही. बाकी, तुमच्या समस्या दूर करायला 'तुम्ही स्वतःच' शर्थीचे प्रयत्न करा आणि मिळणार्‍या यशावर समाधानी राहा. शिवाय देव एके ठिकाणी (देवळात, तिर्थक्षेत्री) नाही तर चराचरास व्यापून आहे कुठल्याही दिशेने 'मनापासून' नमस्कार करा तो देवाला पोहोचतोच पोहोचतो. त्यासाठी लालबागच्या गणपतीसमोर रांगा लावाव्या लागत नाहीत की शिर्डीला साईचरणी धाव घ्यावी लागत नाही. परस्परांचा सन्मान करा, निसर्गाचा सन्मान करा, गोर गरीबांना यथाशक्ती यथामती मदत करा की तुमची इश्वरसेवा परिपूर्ण झाली. देवाच्या 'दलालांना' त्यांच्या दुष्कृत्यात बळ देऊ नका. एव्हढंच माझं म्हणणं आहे.

In reply to by नाखु

Permalink

बाकी "अतिरिक्त (?)" उत्पन्नवाले ज्यास्ती "दान-धर्म्-पूजा-अर्चा" विषेशतः "साई-बालाजी" करताना दिसतात असे निरिक्ष्ण आहे.
अवतरणात टाकलेल्या अतिरिक्त शब्दांत तुम्हाला काय अभिप्रेत आहे हे माहिती नाही. मात्र आयटीवाल्यांमध्ये हे साई-बालाजीचे फॅड खुप आहे. विकेंडला साई किंवा बालाजीला जाऊन देवदर्शन अधिक आऊटींग अशा दोन गोष्टी साधायच्या, फेसबुकवर फोटो टाकायचे, ऑफीसला आल्यावर फ्लोअरला "प्रशाद अ‍ॅट माय डेस्क" म्हणून मेल टाकायची. :)

माझ्या मते त्यांना अतिरीक्त म्हणजे 'वरचे' उत्पन्न अभिप्रेत असावे..

अतिरिक्त उत्पन्न म्हणजे "सर्व आवश्यक खर्च करून उरलेले उत्पन्न म्हणजेच डिस्पोझेबल इन्कम" असा अर्थ जास्त संयुक्तिक वाटतो.

नावारूपाला येण्यास "सिनेमा-मंडळी/बिल्डर/राजकारणी" अशीच मांदियाळी आहे. परिचयातील खाजगी कंपनीतील हमखास"वरकमाई" करणार्या लोकांचा एक ग्रुप दरवर्शी बालाजी दर्शन करतोच. आणी आल्यावर आम्ही कसे अन्न्दान केले/रांगेत थांबलो याच्या सुरस कथा इतर नास्तीकांना (त्यांच्या दृष्टीने नास्तीक) एकवत असतो. मात्र आयटीवाल्यांमध्ये हे साई-बालाजीचे फॅड खुप आहे. + यास प्रचंड सहमत.
Permalink

आवडला आणि पटला
Permalink

'सहमत' म्हणून मानाच्या गणपतीच्या दर्शनाला आणि विसर्जन मिरवणूकीत नाचायला आम्ही पयले!!
Permalink

रोखठोक लिखाण. ण पटण्यासारखे काहीच नाही ऑफिस ला लागून लालबाग आहे.. तरीही जावेसे वाटत नाही
Permalink

जिस दर्गाह की मजार पर सेंकडो चादरे चढती रही है। उसी दर्गाह का दरबान, सुना है, कल ठंड से मर गया।
हे आवडलं!!
Permalink

मनापासुन लिहिलात. कोणत्याही leading daily मध्ये प्रकाशित व्हावा अशा तोडीचा लेख आहे. जो विषय घेतलात त्याला पूर्ण न्याय दिलात. (१२ वर्षाखालील मुलांना उंच थरावर चढु न दिल्याने कुठल्या संस्क्रुतीचा -हास होतो हे केवळ राजकारण्यांनाच ठाउक.) अतिशय समतोल विचार मांडलेत. मुख्य म्हणजे भक्तिमार्ग आणि ईश्वरप्राप्ती ह्यातिल ढोंग,भ्रष्टाचार, अराजकता, अंधानुकरण ह्यावर कडाडुन हल्ला चढवलात, परंतु भक्तिमार्ग आणि ईश्वरप्राप्ती हे थोतांडच आहे ('मी सांगतो म्हणुन') असला आक्रस्ताळी पवित्रा घेतला नाहीत. हे फार अभिनंदनीय आहे.

हे म्हणजे आक्ख्या भक्तीमंडळावर जोड्यांची पुष्पवृष्टी झाली. आणि भक्तगण हसत मुखानं म्हणतोयं `सगळ्यांनाच बसले, त्यात काय विषेश, हॅ! हॅ! हॅ ! .... आणि सगळे पुन्हा... भक्तीभावानं रांगेत उभे!

In reply to by संजय क्षीरसागर

Permalink

व्वा! काय सुंदर उपमा आहे हो! आधी होते जोडे मग त्यांची झाली पुष्पं आणि मग झाली त्या पुष्पांची वॄष्टी... मला तर आता या अभिजात साहित्याचा आस्वाद घेत आनंदाने छानसं ओरडावसं वाटतंय .... हॉSकूSSS हॉSकूSSS हॉSकूSSS .
Permalink

चरणी सादर प्रणाम. आणखी काय लिहिणार? भक्तीमार्ग पुरे म्हणण्याची वेळ आली आहे. विघ्नकर्ता त्यात विघ्न आणण्यास समर्थ आहे. तरी कार्यात आपली अनुपस्थिती आवश्यक आहे हीच विनंती.
Permalink

अगदी मनापासून पटले... !!!
Permalink

पूर्ण सहमत. आमच्या एक सोसायटी पुढे गणेश विसर्जन तलाव आहे. डी.जे.लाऊन मिरवणुका येतात. आम्ही सोसतोय.
Permalink

मस्त लेख ! या जगात "चलाख आस्तिकाने" नेहमीच "आस्तिकावर" मात केली आहे कारण चलाख आस्तिकाचे अंतिम लक्ष व्यक्तिगत फायदा असते... त्यासाठी जरूर ते सर्व मार्ग चोखाळायला त्याची तयारी असते... आस्तिकतेचा अधिकाधिक आकर्षक देखावा करणे हे त्यातले एक प्रभावी मार्केटींग टेक्निक आहे.
Permalink

काका, अगदी रोखठोक लिहिलंय. लेख वाचतांना असं वाटलं की त्यातला शब्दन् शब्द माझ्या मनातला आहे. अर्थातच लेख १००% पटला. या लेखाचा दुवा माझ्या फेसबूक भिंतीवर देतेय. किती लोक लेख पूर्ण वाचतील आणि त्यातले किती अंमलात आणतील याची काहीच खात्री नाही. तरी मी आपला खारीचा वाटा उचलणार!
Permalink

लेख खरंच खूप पोटतिडकीने लिहिला आहे. विचारांशी सहमत आहे. मला तर आपल्या अतिउत्सवी वातावरणाचा भयानक कंटाळा आलाय. दहीहंडी हा प्रकारच कायद्याने बंद करायला हवा. आपल्या इथे वाईट खोड अशी आहे की आपण प्रत्येक घटनेचं, भावनेचं उत्सवीकरण करतो. आणि मुळात आपण इतरांचा आदर करणारे, इतरांना आपल्या कुठल्याही गोष्टींमुळे त्रास होणार नाही याची काळजी घेणारे, शांतता बाळगणारे असे कधीच नव्हतो आणि पुढचे ५०० वर्षे होणार नाही. कुठलाही सण आला की आसपासच्या भागात भयंकर अशांतता माजवून अघोरी पद्धतीने सेलिब्रेशन करणे म्हणजे सणांचे चैतन्य अशी भयानक समजूत आपण करून घेतली आहे. लाख-दोन लाख फेकले की सिनेमातल्या नट्या नाचायला येतात; दहीहंडीमध्ये भाग घेणारे सगळेच एकजात टवाळखोर असतात; त्यांना फूस लावणारे राजकारणी त्याहून जास्त टवाळखोर असतात; सगळा हरामाचा पैसा असतो; अतिशय अश्लाघ्य उन्माद, बेताल वागणे हे सगळे राजरोसपणे दाखवण्याची माध्यमे म्हणजे दहीहंडी, गणेशोत्सव वगैरे सण! आपल्या जनतेचा तेवढाच दोष आहे. त्यांना देखील असला थिल्लरपणा आवडतो. सनी लिओन आली की जातात जिभा बाहेर कढून तिला बघायला. जसं काही यांना ती अलिंगनच देणार आहे. नट आणि नट्यांना बघायला जाणार्‍या लोकांच्या बुद्ध्यांकाविषयी मला जबरदस्त शंका आहे. नट-नट्यांना काय पहायचं? असे काय तीर मारलेले असतात त्यांनी? पण आपली बिनडोक जनता जाते. जितेंद्र आव्हाडसारखे मुजोर आणि हलकट नेते कायदा धाब्यावर बसवून पोलिसांच्या नाकावर टिच्चून एक-एक नियम मोडतात आणि वरून अरेरावी करतात. दहीहंडीसारख्या उत्सवावर लाखो रुपये खर्च होत असतांना जनतेच्या लक्षात हे नाही येत की हा पैसा यांनी त्यांच्याच खिशांवर डल्ला मारून उडवलेला असतो. म्हणून तर इतका पैसा दहीहंडीसारख्या सणावर खर्च करतांना असल्या फालतू नेत्यांना दु:ख होत नाही. काल झी मराठीवर कुठलातरी फालतू कार्यक्रम सुरू होता. सुरेखा कुडची अतिशय भयंकर मेकप करून अतिशय घाणेरडे, किळसवाणे अंगविक्षेप करून कुठल्यातरी फालतू लावणीवर तितकाच फालतू नाच करत होती. लहान मुलांसोबत बघायला लाज वाटावी असला थिल्लर प्रकार चालू होता. आणि प्रेक्षक धुंद होऊन नाचत होते. लहान लहान मुले कंबर हलवून हलवून नाचत होती. असं असल्यावर भविष्य काय असणार हे सांगायची गरज नाही. मुळात तमाशा, लावणी वगैरे लोककला राहिलेत का हे तपासाण्याची वेळ आलेली आहे. तमाशा आणि लावणीच का बदनाम आहे? कथ्थक किंवा भरतनाट्यम का बदनाम नाही? तमाशाला कुणी सहकुटुंब जातांना का दिसत नाही? तमाशा बघायला जाणे म्हणजे काहीतरी वाईट असे का आहे? मराठी नाटक बघायला जाणे वाईट का समजले जात नाही? हे प्रश्न थेट विचारून तमाशा आणि लावणी ही महाराष्ट्राची लोककला आहे हा समज पूर्णपणे मिटवायला हवा. असला थिल्लर आणि निर्लज्ज प्रकार एका पुरोगामी राज्याची लोककला कसा काय असू शकतो हे कणखरपणे विचारून सत्य स्वीकारले गेले पाहिजे. पण आजकाल उत्सवीकरणाच्या नादात कुणालाच भान नाहीये की आपण काय पेरतोय. गणेशोत्सवाची तशीच तर्‍हा! पण उत्सवातले, सणांमधले चैतन्य, ऊर्जा, नवीन हुरूप देणारा सळसळता उत्साह वगैरे गोड शब्दांखाली हा सगळा ओंगळ प्रकार सहन करावा लागतोय. टीव्हीने तर हा सगळा प्रकार अगदी डोक्यावर घेतलाय. आमच्या घराजवळ मोठी दहीहंडी आयोजित केली होती. कुठल्यातरी नटीला बोलावले होते. संध्याकाळी ५ वाजेपासूनच रस्ता बंद ठेवला होता. स्पीकर्सच्या भिंती रचून ५ वाजेपासूनच कानठळ्या बसाव्यात अशा आवाजात फालतू गाणी चालू होती. आयोजकांचे टोळके दादा असल्यासारखे फिरत होते. रात्री ११ पर्यंत हा टुकारपणा चालू होता. आमच्या भागात जाणारा हा एक मुख्य रस्ता होता. तो संपूर्णपणे बंद होता. दुसरा रस्ता लांबून होता. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, शाळांच्या बसेस, रिक्शा वगैरेंना खूप त्रास झाला. "थोडा त्रास झाला तर काय फरक पडतो; सहन करायचा" ही आणखी एक मुजोरी. कुणी चकार शब्द बोलू शकत नाही. बोलला त्याला मारून मारून अर्धमेला करू अशी मस्ती सगळ्यांच्या डोळ्यातून झिरपत होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा उदय (किंबहुना शरद पवारांसारख्या नेत्याचा उदय म्हटले तरी चालेल) ही महाराष्ट्रातल्या राजकारणाची सगळ्यात मोठी शोकांतिका!! त्यामुळे बाकीचे पक्ष देखील गुंडगिरी करायला सरसावले. आणि राष्ट्रवादीनेच ही गुंडगिरी रस्त्यांवर आणि लोकांच्या उंबरठ्यांपर्यंत नेली. सामान्य जनतेचं जगणं हराम करून टाकलं राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारी गुंडांनी. असो. हे बदलणं शक्य नाही. त्यामुळे निमूटपणे सहन करायचं आणि जमेल तसं स्वतःला आणि आपल्या लोकांना वाचवायचं. अजून दुसरं काहीच शक्य नाही. :-(

लेख व वरील प्रतिसाद आवडला.
राष्ट्रवादी काँग्रेसचा उदय (किंबहुना शरद पवारांसारख्या नेत्याचा उदय म्हटले तरी चालेल) ही महाराष्ट्रातल्या राजकारणाची सगळ्यात मोठी शोकांतिका!! त्यामुळे बाकीचे पक्ष देखील गुंडगिरी करायला सरसावले. आणि राष्ट्रवादीनेच ही गुंडगिरी रस्त्यांवर आणि लोकांच्या उंबरठ्यांपर्यंत नेली. सामान्य जनतेचं जगणं हराम करून टाकलं राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारी गुंडांनी.
यात थोडीशी दुरुस्ती करावीशी वाटते. महाराष्ट्रापुरती राजकारणातील आणि रस्त्यावरील राजरोस गुंडगिरीची सुरुवात राष्ट्रवादीने केली नसून ती शिवसेनेने केली आहे. याचेच एक उदा. म्हणजे खुनाचे आरोप असलेली राण्यांसारखी व्यक्ती मुख्यमंत्रीपदावर बसवणे. या सर्व गोष्टींची जनतेला फिकीर नसल्याचे इतर राजकीय पक्षांच्या लक्षात आल्यावर पुढे त्यांनीही तोच कित्ता गिरवला.

In reply to by आजानुकर्ण

Permalink

आपल्याशी काही अंशी सहमत असलो तरी शिवसेनेच्या गुंडगिरीची व्याप्ती बर्‍याच अंशी मर्यादित होती. जनसामान्यांच्या रोजच्या जगण्यात अडथळा येईल अशी गुंडगिरी नव्हती शिवसेनेची. शिवाय शिवसेनेने नाही म्हटलं तरी बरीच विधायक कामे देखील केली आहेत. काही कारणांमुळे शिवसेनेला आक्रमक भूमिका त्या काळात घ्यावी लागली. नंतर अर्थात त्यात गुंडगिरी आली असली तरी थेट सामान्यांच्या जगण्याशी त्याचा फारसा संबंध नव्हता. राष्ट्रवादीचा पायाच शेकडो एकर जमिनींची मग्रूर मालकी, अफाट पैसा, पराकोटीचा जातीभेद, सरळ हाणामारी आणि धमकी, साखर कारखाने, वगैरेंसारख्या माजोर्ड्या तत्वांवर आधारलेला आहे. कसेही करून सत्ता मिळवायची फक्त हेच त्यांचे धोरण राष्ट्रवादीचे राहिले आहे. त्यासाठी गुंडगिरी आणि जातीभेदाचे विष पेरणे देखील राष्ट्रवादीने त्याज्य मानले नाही. कुठलाही विधीनिषेध न बाळगता फक्त सत्तेवर आणि संपत्तीवर डोळा ठेवून अमाप भ्रष्टाचाराचे राजकारण करण्यातच राष्ट्रवादीने धन्यता मानली. पुणे, पश्चिम महाराष्ट्रातल्या जमिनींच्या बळावर मुजोर बनलेल्या धनदांडग्यांनी राष्ट्रवादीला साथ दिली आणि त्यांची समाजविघातक तत्वे पोसली. शिवसेना हा पक्ष बहुतांशी सामान्य लोकांचा होता. त्यात धनदांडगे क्वचित होते. अमाप संपत्तीचे ओंगळवाणे राजकारण शिवसेनेत कधीच नव्हते. त्यामुळे त्यांची आक्रमकता खूपच मर्यादित राहिली. त्यांची ही आक्रमकता सामान्य लोकांचे जगणे हराम करून नाही गेली. शिवाय शिवसेनेने कधी जाती-जातींमध्ये तेढ माजवल्याचे ऐकले नाही. अठरापगड जातीची माणसे शिवसेनेत होती. नाही म्हणायला त्यांचा हिंदुत्ववादी चेहरा होता परंतु त्याच्यामुळे फार दुही माजली असे म्हणता येणार नाही. शिवसेना राष्ट्रवादीच्या तुलनेत खूपच मवाळ आणि सोवळी होती. राष्ट्रवादी मात्र भयंकर विषारी आहे. त्यांची तत्वेच मुळात चुकीची आहेत. म्हणून शिवसेना इतकी वर्षे टिकली, फोफावली. राष्ट्रवादी १५ वर्षात लोप होण्याच्या मार्गावर आहे. आणि महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस संपणे अत्यंत आवश्यक आहे. ६-जुलै-२०१४ च्या लोकसत्ता मध्ये संजय पवारांनी अतिशय परखड शब्दात राष्ट्रवादी-मुक्त महाराष्ट्राची गरज व्यक्त केली होती. फेसबुकवर तो लेख अजूनही असेल. लोकसत्ताच्या ऑनलाईन आवृत्तीमधून तो अचानक गायब झाला. साहजिकच राष्ट्रवादीच्या दमदाटीमुळेच तो काढून टाकण्यात आला असावा. तो लेख शरद पवारांच्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकणारा होता. तो लेख कुठे मिळाल्यास सगळ्यांनी अवश्य वाचावा. अगदी सडेतोड भाषेत संजय पवारांनी राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची आणी त्यांच्या बीभत्स राजकारणाची हजेरी घेतली आहे. शिवसेनेचे उपद्रव मुल्य राष्ट्रवादीच्या उपद्रव मुल्यापुढे क्षुल्लक आहे. शिवसेनेत चार चांगल्या गोष्टी देखील होत्या/आहेत. राष्ट्रवादीमध्ये बारकीशी गोष्ट देखील कधीच चांगली नव्हती आणी पुढेही कधीच नसेल.

म्हणून शिवसेना इतकी वर्षे टिकली, फोफावली. राष्ट्रवादी १५ वर्षात लोप होण्याच्या मार्गावर आहे.>>>>>>> राष्ट्रवादी बद्दल च्या तुमच्या मताशी १००% सहमत असुन ही हे सांगावेसे वाटते की एखादी गोष्ट बरीच वर्ष टीकली म्हणजे ती चांगली असेलच असे नाही आणि लोप पावली म्हणजे वाईट असेल असे नाही. गेल्या १० वर्षात राष्ट्रवादी फोफावली म्हणजे तेंव्हा ती चांगली होती का? तुम्ही म्हणताय ती शिवसेना २० वर्षापूर्वीच लोप पावली. आता तिच्यात आणि राष्ट्रवादीत काही फरक असेल तर १९-२० चा च. राष्ट्रवादी लोप वगैरे काही पावणार नाही, जास्तीत जास्त नाव बदलून तिच लोक पुन्हा सत्ते वर येतील

राजकीय गुंडगिरीची आणि त्या सर्व प्रकाराला 'शिवसेनेने आपल्या स्टाईलने/पद्धतीने दिलेले उत्तर' असे गौरवाने संबोधणे या सर्व प्रकाराची सुरुवात करण्याचे श्रेय निःसंशय शिवसेनेचे आहे. राष्ट्रवादी जसे जातीजातींमध्ये वाद लावते तसा निदान धर्माधर्मांमध्ये वाद लावण्याचे श्रेय शिवसेनेचे आहे. शिवसेनेच्या गुंडगिरीची व्याप्ती तो पक्ष जिथवर पसरला होता तिथवरच होती. आज राष्ट्रवादीच्या गुंडगिरीची व्याप्तीही तो पक्ष जिथवर पसरला आहे तिथवरच आहे. राजकारण म्हणजे गजकरण असे 'मार्मिक' मध्ये सुरुवातीला येत असे. मात्र नंतर काय झाले? कसेही करुन सत्ता मिळवायची हे धोरण शिवसेनेचीही झालेच की. (नामांतर आंदोलनापासून अगदी शिर्डीच्या निवडणुकीपर्यंत रामदास आठवल्यांचा शेलक्या शब्दात उल्लेख 'सामना'मध्ये होत असे). शिवसेनेची आक्रमकता सामान्य लोकांना त्रास देत नव्हती हे तुमचे मत म्हणजे तुम्हाला या आक्रमकतेचा त्रास झालेला नाही एवढेच दिसते. एक उदा. माझ्या एका मित्राच्या वडिलांची वडापावची गाडी कल्याण शहरात होती. तिथल्या मोक्याच्या जागेवर धंदा करण्यासाठी सर्व गाडीवाल्यांना गेली वीस वर्षे 'शाखेला' नियमित 'देणगी' द्यावी लागते. ठाणे-कल्याण परिसरातील शिवसेनेची दहशत तुम्हाला माहीत आहे का? शिवसेनेचा केवळ चेहरा हिंदुत्ववादी नसून त्या पक्षाच्या प्रमुखाला न्यायव्यवस्थेने मुंबईतील दंगलींना जबाबदार ठरवले होते हे विसलात काय? मुंबईतील गणेशमंडळे/दहिहंडीमंडळे ही प्रामुख्याने शिवसेनेच्या नगरसेवकांची वर्षानुवर्षे जहागीर होती. या सर्व कामांना 'समाजसेवा' असेही म्हटले जात असे. असो... कोणाचे उपद्रव मूल्य जास्त आणि कमी हा मुद्दा नाही. राष्ट्रवादी हा शिवसेनेपेक्षा चांगला पक्ष आहे असेही मला म्हणायचे नाही. मात्र या गुंडगिरीच्या राजरोस प्रकाराला एकंदर प्रतिष्ठा मिळवून देण्याचे कार्य शिवसेनेने केले आहे. बाकी या चांगल्या चर्चेत मला पक्षीय राजकारण आणायचे नव्हते. मात्र Credit should be given where it's due.

In reply to by आजानुकर्ण

Permalink

सहमत.. शिवसेनेच्या गुंडगिरीवरील समीरसूर यांचे भाष्य 'आपला तो बाब्या' स्वरूपाचे वाटले..

In reply to by बाळ सप्रे

Permalink

मी शिवसेनेचा नाही. मी कुठल्याच राजकीय पक्षाचा नाही. :-) त्यामुळे शिवसेना माझा 'बाब्या' असण्याचा प्रश्नच येत नाही. :-) शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात कुणा एकाला 'बाब्या' म्हणावे असे माझ्या खास जवळचे असे (उदा. जातीचे वर्चस्व, मोठ्या हुद्द्यावर कुणी जवळचा आप्त, कुणी मंत्री ओळखीचा, वगैरे) काहीच नाही. शेकडो एकर जमिनी, साखर कारखाने, अफाट श्रीमंती, शुद्ध सोने वापरून बनवलेले कोट्यवधींचे शर्ट्स (ते ही नगरसेवकांनी) या ताकदीच्या आधारावर राष्ट्रवादीने आणलेली गुंडगिरी भयंकर आहे एवढेच मला म्हणायचे होते. अशी ताकद शिवसेनाच काय इतर कुठल्याच पक्षात (थोड्या प्रमाणात काँग्रेस वगळता पण काँग्रेसनेही एवढी पराकोटीची गुंडगिरी सामान्यांच्या पुढ्यात आणून ठेवल्याचे स्मरत नाही) आधी कधीच नव्हती. ते श्रेय फक्त राष्ट्रवादीचे. :-)
Permalink

आशयाशी प्रचंड सहमत. आश्चर्य याचे वाटते की सर्व जण सहमत असताना उत्सवात गर्दी कोण बेटे करतात ?

In reply to by सस्नेह

Permalink

आशयाशी प्रचंड सहमत. आश्चर्य याचे वाटते की सर्व जण सहमत असताना उत्सवात गर्दी कोण बेटे करतात ?
ज्यांना त्यातून कमाई होते असे भूमिपुत्र..
Permalink

अतिशय सुरेख, वाचनीय लेख! नीलकांतने ज्या उद्देशाने ही लेखमालिका सुरू केली होती, तो उद्देश अशा लेखांतूनच परिपूर्ण होतो! धन्यवाद पेठकर काका!
Permalink

धन्यवाद पेठकर काका. मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत. खरेतर प्रत्येकजण धर्माचा आणि त्यातील कर्मकांडाचा सोयीस्कर अर्थ लावत आलेला आहे. ठरावेक दिवशी साइ /बालाजीला जाणे वारीला जाण्याचा इव्हेन्ट करणे इत्यादी अत्यंत फालतु गोष्टीना अवास्तव महत्व आणणे हा मूर्खपणा आपण कधी सोडून देणार आहोत कोण जाणे? या असल्या वेडाचारातून फक्त व्हेस्टेड इन्तेरेस्ट असणारांचेच फावते. सर्वसामान्यांचा मात्र फक्त वेळ आणि पैसा वाया जातो. राधेमा , निर्मल बाबा ,आसाराम हे कमी पडत असावेत की काय हनुमान सुरक्षा कवच ,नजर सुरक्षा कवच असले प्रकार राजरोस टीव्हीवर येत असतात. टीव्हीवर जे दिसते किंवा जे वर्तमान पत्रात छापले जाते ते सर्व खरे असते असे मानणारा एक मोठा वर्ग अजूनही समाजाचा भाग आहे. आपला एकूणच समाज हा अंधश्रद्धेवर पोसला जातोय याचे कोणालाच वाईट वाटत नाहिय्ये. चलाख आस्तिकांचे नेहमीच एक सोप्पे आणि फसवे पालुपद असते के अंधश्रद्ध नको पण श्रद्ध असायला काय हरकत आहे.पण त्या तथाकथीत आस्तिकाना श्रद्धा म्हणजे काय हे विचारले तर मात्र सोयीस्कर मौन किंवा पळवाट शोधली जाते ( उदा : डॉक्टर बरे करेल ही तुमची श्रद्धा असते ना.. पण डॉक्टरवरचा विश्वास हा त्याच्या डिग्री आनि ती डिग्री देणारे विद्यापीठ यावर असतो हे कोणी मान्य करत नाही.) ज्या दिवशी सगळे देव नाहिसे होतील तो खरा सुदिन ..............
Permalink

सुंदर लेख. काही वर्षांपूर्वी मुंबईतल्या गर्दी खेचण्यात नंबर एक असलेल्या गणेशमंदिरामध्ये असाच मनस्ताप देणारा अनुभव आल्यानंतर मंदिरात जाणे बंदच केले आहे. देवाचा बाजार. भक्तीची किंमत. सगळं रोखठोक. देवदर्शनासाठी पास काढणे हाही प्रकार असाच चीड आणतो. प्राॅब्लेम हा आहे, की हे प्रकार आयोजित करणा-यांना आणि त्यात सहभागी होणा-यांनाही अशा सूज्ञ बोलांनी काही फरक पडत नाही. ते सगळं निर्बुद्धपणे तसंच सुरू राहतं.
Permalink

हे प्रकार आयोजित करणा-यांना आणि त्यात सहभागी होणा-यांनाही अशा सूज्ञ बोलांनी काही फरक पडत नाही. ते सगळं निर्बुद्धपणे तसंच सुरू राहतं. कारण त्यांच्या व्यवसायाचं मुळ मुद्दल हे भोळे (कींवा मूर्ख) भाविक हे असतं. त्याचा तुटवडा भासू लागेल तेंव्हा राजकारण्यांचे आणि आयोजकांचे दुकान आपोआप बंद पडेल. भक्तांनाच सुबुद्ध करून सोडा.
Permalink

पेठकरांप्रमाणेच समीरसूरांच्या लेखातील तळमळहि समजते आहे. खरच, ते नट्या-बिट्या अगदी फालतू आहे. आणि तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे असे वाचले वा ऐकले की अगदी शरम वाटते.पण ह्यातले काहीहि कमी वा बंद होणार नाही, उलट हे सगळं वाढतच चाललय.
Permalink

समाजाला सातत्यानं कुठल्या तरी टेकूची गरज असते. त्यातला एक टेकू म्हणजे सार्वजनिक पूजा अर्चा नि उत्सव. त्या टेकूला सजवणारे स्वतः तथाकथित भक्त आणि राजकारणी, कुठल्याही कारणानं टेकू काढून घेऊ म्हणून भीती घालणारे धर्ममार्तंड आणि त्या टेकूला काढून त्याच्या दुसर्‍या बाजूचा टेकू पकडून ठेवणारे इथंही तथाकथितच विचारवंत नि डोळस लोक. चालायचंच. टेकू लागतातच.
Permalink

काहीसा असहमत. कर्मकाडांत एखाद्याला आनंद मिळतोच. जसे आमचे काही मित्र मोप दारू पितात, मी जराही पीत नाही परंतु बसणे या कर्मकांडात जो काही आनंद असतो तो घ्यावासा वाटतो. बाकी राहीला प्रश्न दशभुजा गणपती बाहेरच्या भिकार्‍यांचा, तर इतकेच म्हणतो ते भिकारी गरीब नाहीत. त्यांच्या देखील पाळ्या ठरलेल्या असतात. आणि तेही बख्खळ पैसा बाळगून असतात. आणि माझे स्पष्ट मत असे आहे की जर कष्ट करायची तयारी असेल तर कोणावरही भिक मागायची वेळ येत नाही. एक मुलांनी टाकून दिलेला वेड लागलेला म्हातारा आमच्या गल्लीत राहतो. लोक विषेशतः दुकानदार, छोटे हॉटेलवाले त्याला काहीतरी काम सांगतात तो ते करतो (म्हणजे कचरा टाकणे वगैरे ). त्याबद्दल ते त्याला रोज जेऊखाऊ घालतात. म्हणजे कोण ना कोणतरी. त्याला आजवर मी बडबड करताना, शिवीगाळ करताना पाहीले आहे पण भिक मागताना नाही पाहीले. बस्स इतकेच.
Permalink

सल्लारुपी सुंदर लेख पटला . काही मुद्दे .. १ ) अश्या समारंभ ( इव्हेन्ट ) ला वाढत असलेली गर्दी आणि लोकप्रियता ही, विषेशतः तरुणाईची ही बाब दुर्लक्ष करण्यासारखी नाही. २ ) स्टार माझा सारखं चॅनेल " बाप्पा माझा " हा विषेश कार्यक्रम लावते दरवर्षी , मी एकदा मेघराज पाटील ( कन्टेट एडिटर ) यांच्याशी बोलताना सहज या प्रकारावर भाष्य केले होते. त्या वेळी त्यांनी वापरलेले वाक्य " अश्या ठेवणीतल्या (आजचा सवाल सकट) टिआरपीजन्य कार्यक्रमांना मी एकटा वा चॅनेल जबाबदार नाही, आकडे बघतो आम्ही टिआरपीचे , महाभयानक वाढ झालेली असते, ते किळसवाणे आणि हिडीस असले तरी लोकं रिपीट देखील बघतात, तोच एखादा कृषी - विषयक, जन जागृती विषयक मात्र कोणी बघत नाही, दाभोळकारांविषयी एकुण ११ एपिसोड तयार केले होते, दुसर्‍या भागातच गच्छंती लागली टिआरपी ला !! " ..आपल तर तोंड बंद ...... ३ ) खरच समाजमन बदललयं की सेलीब्रेशन ची पध्दत हेच मुळात कळत नाही, याच मिपावर " प्या बिनधास्त मुंजीला " पासुन ते " साकी शराब पिने दे मस्जिद मैं बैठकर " इथवर झालयं, हे तर केवळ आभासी आंतरजालीय जग, प्रॅक्टीकली मात्र " विचार करा, पुण्याच्या मध्यवर्ती वस्तीमध्ये एका माडंवात एक गणपती ठेवला आहे, संगीत नाही की आरास नाही, चार टवाळके दिसणारे नाहीत, आजुबाजुला गर्दी नाही.काय म्हणाल ? अरे इथे मंडळाच कोणीतरी गेलेले दिसतय, गर्दीत अश्या ठिकाणी पाय धजत नाहीत, वाटत काही तरी मिसींग आहे " हे वाक्य माझ्या हाफिसात बसलेल्या शेजारणीचे आहे. सवय झाली असावी. मुंबईत साजर्‍या होणार्‍या आंबेडकर जयंतीला आपण, 'आंबेडकरी' जनता शहरात घाण कचरा पसरवते म्हणून नांवे ठेवतो आणि आषाढीला वारीला मात्र न चुकता हजेरी लावतो. मुसलमानांच्या रस्त्यावरच्या नमाजाला, ध्वनीक्षेपकांना विरोध करतो पण गणेशोत्सव, नवरात्र, जन्माष्टमी आदी मोठ्या हिरीरीने उत्सवात साजरे करतो. आपल्या पदयात्रांप्रमाणे इतर सर्व धर्मियांनी, जाती-जमातींनी त्यांच्या त्यांच्या चालीरिती पाळायच्या ठरवल्या तर आपल्या देशात एव्हढे विविध धर्म, जाती, जमाती आहेत की वर्षभर रस्त्यांवर फक्त पदयात्रा करणारेच दिसतील. रस्ते, महामार्ग वाहनांसाठी बंद करावे लागतील. की इतरांनी त्यांच्या धर्माचे, चालीरितींचे पालन करू नये? ही मुभा फक्त माझ्याच धर्माला असावी का? शिर्डीच्या वाटेवर कफनी, चिमटा, चिलिम बाळगणारे सर्वच साईबाबा असतात का? उत्तरेत तर अनेक साधूंच्या जथ्थ्यात कित्येक गुन्हेगार, गांजेकस, भोंदू माणसांचा भरणा असतो. कोणावर विश्वास ठेवावा? मला वाटतं फक्त स्वतःवर ठेवावा, स्वतःच्या विचारशक्तीवर ठेवावा. >>> या वाक्यासाठी टाळ्या !!
Permalink

ह्या उत्सवाच्या निमित्ताने हे दिसुन येत की समाज पूर्ण पणे दोन गटात विभागला गेला आहे. हे जास्त धोकादायक आहे. अतिशय अल्पसंख्य असलेले ( कदाचित ५% ) लोक, ज्यांना हे जे काही उत्सवाच्या निमित्ताने चालू आहे त्याची शिसारी आली आहे. आणि दुसरा ९५% समाज हेच उत्सव Enjoy करतो आहे. हा जो ५% वाला गट आहे तो उरलेल्या ९५% टक्क्यांकडे तुछ्छतेने बघतो आहे आणि ९५% वाला समाज कसा तुम्हा ५% वाल्यांना त्रास दिला असा असुरी आनंद उपभोगतो आहे. गम्मत अशी आहे की हे ५% जे हिंदू उत्सवांना नावे ठेवत आहेत, त्या पैकी ८०-९० टक्के बीजेपी चे मतदार आहेत. माझ्या लहानपणी हे दोन समाजाचे तट बर्‍यापैकी एकत्र होते. तत्वविहीन राजकारण जे ८० सालापासुन आणि काही लोकांपासुन सुरु झाले तेंव्हा पासुन हे दोन समाज दुर होत गेले.
Permalink

कोणावर विश्वास ठेवावा? मला वाटतं फक्त स्वतःवर ठेवावा, स्वतःच्या विचारशक्तीवर ठेवावा.
अगदी, अगदी!!! मस्त लेख झालाय काका! अगदी मनापासून लिहिलाय हे जाणवतय!
Permalink

बहुतांश मिपाकर लेखाशी सहमत असल्याचे पाहून छान वाटलं.. आपल्या सारखे समविचारी आपल्या आसपास आहेत हे बघून उभारी येते.. पण आपण एवढे सगळे सहमत असूनही उत्सवांचे बाजारीकरण चालू असतेच आणि ते वाढत जाणारच. हा देव, भक्ती, धर्म, संस्कृती चा व्यापार न व्हावा म्हणून आपण काही करू शकतो का? मी मझ्या परीने जे करू शकतो ते करतो - म्हणजे कुठ्ल्याही 'राजा' च्या दर्शनासाठी जात नाही जेणे करून
देवाच्या 'दलालांना' त्यांच्या दुष्कृत्यात बळ देऊ नका
हे पेठकर काकांचे म्हणणे सार्थ होईल.. पण मुळात या दलालांना दुष्कृत्य करण्याचेच बळ येऊ नये म्हणून काही करता येईल का? मिपाकरांची ताकद एकवटून काही होऊ शकेल काय? या निमित्ताने कुणा थोराचे एक वाक्य आठवले -- The world suffers not because of the violence of bad people, but because of the Silence of good people.. विचार करण्याजोगे..

In reply to by निखळानंद

Permalink

प्रत्येकाने आपल्या घरापासून सुरुवात करावी. आपण स्वतः बदलावे. मुलांवर योग्य ते संस्कार करावे. देवाची भिती घालू नये. इश्वरसेवेचा खरा अर्थ समजावून द्यावा. कर्मकांडाचे महत्व बिंबवू नये. सद्वर्तनाचे महत्व वाढीस लागेल असे पाहावे. स्तोत्र, आरत्या ह्यांचे महत्त्व त्यातील उच्चारांना अधोरेखित करून जीभेला वळण लावणे, श्वासावर नियंत्रण आणि स्पष्टोच्चार एवढेच असो द्यावे. देवाचे केल्याने परिक्षेत चांगले मार्क मिळतील, देव पाठीशी आहे तो सर्व संकटातून तारून नेईल वगैरे वगैरे भ्रामक विचारसरणी मुलांच्या गळी उतरवू नये. कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास ह्या दोन महत्वाच्या बाबींचे महत्त मुलांच्या मनावर बिंबवावे. 'देवाला कांहीतरी 'देऊन' स्वतःसाठी कांही 'मिळवावे'' ह्या विचारांपासून स्वतःला आणि मुलांना अलिप्त ठेवावे.

त्यापेक्षा स्वतःपासून करावी! देव पाठीशी आहे तो सर्व संकटातून तारून नेईल वगैरे वगैरे भ्रामक विचारसरणीतून मुक्त व्हावे. कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास ह्या दोन गोष्टींना पर्याय नाही असा वस्तुनिष्ठ दृष्टीकोन राखावा. 'देवाला कांहीतरी 'देऊन' स्वतःसाठी कांही 'मिळवावे'' ह्या विचारांपासून दूर होऊन, देव ही निव्वळ कल्पना आहे ही साधी गोष्ट लक्षात घ्यावी! आयला, पेठकर तुम्ही लिहीलंय म्हणून बरं, माझी पोस्ट असती तर, व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी, जनश्रद्धांना दुखावणे आणि (सरते शेवटी), स्वतःला कोण समजता? या वळवणावर गेली असती. मुद्दा तोच आहे पण सगळं श्रेय तुमच्या मांडणीला आहे. या लेखानं का होईना प्रबोधन झालं तर आनंद आहे.

संक्षी साहेब दुर्दैवाने मिपावरील वाचकाला पेठकर साहेबांनी लिहिलेले पटलेले आहेच पण ज्यांचे प्रबोधन व्हायला पाहिजे ते लोक असे लेख वाचतच नाहीत. आता काय करावे? खर तर असे लेख व्हाटस एप्प किंवा तत्सम सार्वजनिक न्यासावर पाठवले पाहिजेत म्हणजे ते वाचणार्यापैकी १ % लोकांनी बोध घेतला तर बरे. नाहीतर तेथेही रोज सकाळ दुपार संध्याकाळ लालबागचा राजा किंवा साईबाबा यांचे दर्शन होत असतेच.

खरे साहेब, >>>>>दुर्दैवाने मिपावरील वाचकाला पेठकर साहेबांनी लिहिलेले पटलेले आहेच.... मिपा वाचकांना माझे मुद्दे पटले असतील तर ते 'दुर्दैवं' आहे? मी म्हणेन 'सुदैवाने' मुद्दे पटले आहेत. अगदी इथेही १ टक्का वाचकांच्या विचारसरणीत बदल झाला आणि ते खर्‍या अर्थाने भक्तीमार्गावर आले तरी भरून पावलो.

त्यांना बहुतेक असं म्हणायचं आहे... >>>...दुर्दैवाने मिपावरील वाचकाला पेठकर साहेबांनी लिहिलेले पटलेले आहेच पण दुर्दैवाने ज्यांचे प्रबोधन व्हायला पाहिजे ते लोक असे लेख वाचतच नाहीत. आता काय करावे?>>> (असा माझा अंदाज आहे) :)

पेठकर साहेब क्षमस्व एक्का साहेब धन्यवाद आपल्या खुलाश्याप्रमाणेच मला लिहायचे होते. चुकून एक शब्द इकडचा तिकडे झाला
Permalink

या सगळ्या तमाशाला एक महत्वाचं कारण म्हणजे माणसाला जीवनाचं सौंदर्य उमगतच नाहि. त्यामुळे आपण त्या सौंदर्याला धक्का लावतोय, ते पायदळी तुडवतोय याची जाणिवच नसते. आणि जिथे सौंदर्यच आकर्षीत करत नाहि तिथे त्या सौंदर्याला अभिव्यक्त करणारी सृष्टीची, समाजाची प्रचंड मशीनरी कशी लक्षात येईल... एव्हढं मस्तं जीवन लाभलय, धडधाकट शरीर आहे, कल्पना करता येणार नाहि इतक्या प्रचंड शक्तीचं भंडार असं मन आहे, आकाशगंगेपासुन ते पार अणुरेणुची चीरफाड करु शकणारी धारदार बुद्धी आहे, दशदिशांना उजळुन टाकणारा विवेकाचा प्रकाश आहे... आणि निव्वळ अत्यर्क अशी कर्मशक्ती-इच्छाशक्ती आहे... हे सगळं दिलं सोडुन, आणि आपल्याला नेमकं काय-कसं-किती हवं याचा काहिही-कसलाही विचार न करता काहितरी 'फिक्स' करुन आपल्या समस्या ( ज्या ९९ टक्के खोट्या असतात )सोडवल्या जाव्यात म्हणुन गोट्या खेळण्याचे हे प्रकार वैचारीक दिवाळखोरी न आणतील तर आणखी काय. लेखातली उदाहरणं निदान दृष्य वैगुण्य तरी दाखवतात. कोरेगावपार्कातल्या हाय-फाय साधुबाबांच्या आणि त्यांच्या प्रवचनाने सिद्धी पावलेल्या मनोरुग्ण महात्म्यांच्या सुरस कथा तर काय वर्णाव्या. असो... तुपाचे दिवे जाळुन सोन्यारुप्याचा लखलखणारा हा प्रकाश मनाच्या अंधारातुन उगम पावतोय. किंबहुना कुठलंतरी बाह्य कृत्रीम झमझ्म लाईटींग लाऊन हा अंधार दूर होईल असाच आक्रोश हि लेखात वर्णन केलेली डोकेदुखी निर्माण करतो आहे. कधि ना कधि त्याचं निराकारण होईल अशी आशा करुया.

धाग्याच्या टायटलशी काहिसा असहमत आहे... धाग्यात जे काहि लिहीलय ते भक्तीमार्गातले अडथळे नसुन भक्तीमार्ग उमगण्यातील अडथळे आहेत. किंबहुना भक्तीशी या भानगडींचं काहि घेणं देणं नाहि. जि गोष्ट प्रेमाने सुरु होऊन प्रेमातच विलीन होते तिचा मानव समाज वा एकुणच विश्वाच्या पसार्‍याला उपद्व्याप होईलच कसा.... झाला तर फायदाच होईल.

'भक्तीमार्ग' म्हणजे संतांचा मार्ग अशी माझी व्याख्या आहे... बाकी त्यांचं त्यांनी बघावं..

अर्धवटराव, ईश्वरसेवा, ईश्वरभक्ती करताना आपण आणि ईश्वर ह्या मार्गावर, पक्षी: भक्तीमार्गावर, आपले अनेक समज, गैरसमज, श्रद्धा, अंधश्रदा, स्वार्थ, आळस, देवालयांचे व्यापारीकरण, पाप-पुण्याचा विधिनिषेध न बाळगणारे देवालयांचे दलाल, राजकारणी, कर्मकांडांचे अवास्तव महत्त्व वाढविणारी माध्यमे आदी अनेक अडथळे आहेत. ह्या सर्वांना टाळून आपण आपला भक्तीमार्ग निष्कंटक करून थेट देवाची भक्ती करणं ही काळाची गरज आहे असे मला वाटते. जर शीर्षक चुकले असेल तर त्याबद्दल मला क्षमा असावी. फक्त आशय लक्षात घ्यावा ही विनंती.

अहो क्षमा असावी वगैरे इतकं फॉर्मल का होताय... लेखातल्या विचारांशी कुणिही असहमत होणार नाहि. मी फक्त हेच म्हटलं कि हा सगळा तमाशा भक्तीमार्गावरचा नसुन भक्तीमार्गावर न पोचलेल्यांचा आहे. असो.
Permalink

श्रद्धा, भावनेच्या सहाय्याने उत्सवाचे विकृतीकरण थांबवता येत नाही. यात मुख्य दोष पुरोगाम्यांचा नाही की उत्सवांना ताब्यात घेऊन आपल्या ब्रेड-बटर ला वाईन ची जोड देणार्‍या गुंडपुंडांचाही. दोष आहे तो स्वतःला 'खरे सश्रद्ध' म्हणवणार्‍या, हा सगळा बाजार आम्हाला पटत नै बर्का असा बाऽरीक चिरका सूर काढणार्‍या, पण जेव्हा हे थांबवा म्हणत कुणी बोलू लागतो तेव्हा अचानक २८ इंची छाती ५६ इंची असल्यासारखी ताणून 'आमच्या सणांवर बोलणारे तुम्ही कोण? त्यांना सांगा की.' म्हणत धावून येऊन गुंडाचीच बाजू घेणार्‍या षंढांचा. दुर्दैवानी ही 'आम्ही तुमच्या बाजूचे' असे दोन्ही बाजूंना पटवणारी नि गुंडांना शरण जाणारी कातडीबचावू जमातच बहुसंख्य असल्याने पुरोगामी विचाराच्या मंडळींना हताश होऊन पहात राहण्याखेरीज काही करता येत नाही- लेखन श्रेय मन्दार काळे. फेबु वरुन सभार

सहमत.. या धाग्यावरपण सहमती आणि तितक्याच उत्साहाने पुण्याची शान असणार्‍या सार्वजनिक गणपतींची भलामण इतर धाग्यांवर !!
Permalink

माझा असा अनुभव आहे की , ज्या ज्या क्षेत्रात राजकारणी शिरले , तिथे तिथे त्यांनी डाळ नासली. मग ते बान्धकाम क्षेत्र असो की धार्मिक क्षेत्र, शैक्षणिक असो अथवा पर्यटन ! त्यांनी जाईल तिथे घाण करुन ठेवली. उद्योजकाकडे असणारा स्मार्ट्नेस सामान्य माणसांकडे नसतो आणि त्यामुळे सामान्य माणूस या नालायकांना चार हात दूर ठेऊ शकत नाही हे दुर्दैव आहे , उलट त्यांच्या भपक्यांना आणि भूलथापांना सामान्य लोक बळी पडतात , आपसूक त्यांचेच शिकार बनतात. त्यातच राजकारण्यांचे गुन्हेगारीकरण ( किंवा उलटे) झाल्याने प्रश्न आता अतिगंभिर झाला आहे. ही घाण हा फक्त भक्तिमार्गातील अडथळा नसून आमच्या जीवनातीलच अडथळा आहे. मतपेटीतून यांना त्यांची जागा दाखवून देणे हाच त्याचा खरा उपाय आहे.
Permalink

>>>>ही घाण हा फक्त भक्तिमार्गातील अडथळा नसून आमच्या जीवनातीलच अडथळा आहे. मतपेटीतून यांना त्यांची जागा दाखवून देणे हाच त्याचा खरा उपाय आहे. सहमत.
Permalink

काही प्रतिसादांबद्दल कोणाचे नाव न घेता सांगू इच्छीतो की दोन गोष्टी विसंगत वाटल्या तरी त्यांना एकमेकांसह स्थान नाही असं नाही. समाजात सर्व काही असणारच. गोंदवलेकर महाराजांना एका माणसानं विचारलं ज्ञानी लो़कं सगुण परमात्मा मानत नाहीत पण आपण मात्र सगुणभक्ती आणि नामाचा महिमा सांगता. आंम्ही यातलं खरं काय जाणावं? गोंदवलेकर महाराजांनी एक उदाहरण दिलं: समजा तुम्ही तुमच्या मित्राच्या घराचा पत्ता शोधत आहात. कोणीतरी वाटेत तुंम्हाला सांगतं की इथून सरळ पुढे जा, डावीकडे जा, एक पोस्टाच्या खांब दिसेल, तिकडेच मागे तुमच्या मित्राचं घर आहे. ईश्वराच्या सगुण रुपाचं महत्व या पोस्टाच्या खांबासारखं आहे. जोपर्यंत तुंम्हाला तुमच्या मित्राचं घर कुठे आहे हे माहीत नाही तोपर्यंतच त्या खांबाचं महत्व. तसंच आणि तेवढच प्रतिमेतल्या देवाचं. यापुढे जाऊन एका देवभक्त संताचा अजून असा एक विचार आहे: देव आहे देव आहे जनी बोलावे | देव नाही देव नाही मनी जाणावे || जर कुणी म्हणणार असेल की देव या संकल्पनेवर विश्वास ठेवणारे मूर्ख आहेत तर ते त्या म्हणणार्‍या व्यक्तीचं अभिव्यक्तीस्वातंत्र आहे. आणि त्याच न्यायाने जर कोणी अशा मूर्ख म्हणणार्‍याला मूर्ख म्हणणार असेल तर त्यांनाही ते अभिव्यक्तीस्वातंत्र आहेच. आपण असं समजूयात की काही लोकांना देव आहे या संकल्पनेचा आधार वाटतो आणि योग्य ती कॄती करण्याचं मानसिक बळ निर्माण होतं तर त्यात बिघडलं कुठं? त्याच तत्वाने, अजून काही लोकांना देव ही भ्रामक समजूत आहे असं जाणवून योग्य कार्य करण्याची प्रेरणा मिळत असेल तर त्यात बिघडलं कुठं? पण जर यापैकी कोणत्याही एका गोष्टीवर निर्बंध आणले जात असतील तर ते व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी करणं ठरेल. लेख आवडला, पटला.
Permalink

लेख आवडला, पटला, अस्वस्थही करुन गेला. आपल्या समाजाचं हे अंधश्रद्ध चित्र मला फार विचलीत करतं. खरंच, आपण कधीच बदलणार नाही का? हा कळीचा मुद्दा आहे, टिळक, आगरकर, फुले दांपत्य ही फार मोठी नावं झाली. पण कुठेतरी आरंभ जरी झाला तर आजपासुन ५० वर्षांनी चित्र जरातरी सुधारलं असेल अशी आशा करायला हरकत नाही.
Permalink

सुरेख लिहिलय, अगदी पटले.
Permalink

सुंदर उद्बोधक लेख ! ||देव आहे देव आहे जनी बोलावे | देव नाही देव नाही मनी जाणावे || -- हे तर खासच ! "देव" या संकल्पनेचा मर्यादित वापर करून खरोखरची समाज"सेवा" करणारे गाडगेबाबांसारखे मोजके थोर संत विरळाच ! खर्‍या भक्तीमार्गाला डावलून "भक्ती"च्याच नावाने भाबड्या लोकांना वापरून स्वतःचा स्वार्थ साधणे की समाजातल्या काही घटकांची, लोकांची मजबूरी आहे. आपल्या सारख्या "डोळस" लोकांनी वेळीच यापासून बाजूला होणे व आपली मते इतरांना पटवून देत राहणे हाच यावरचा उपाय आहे. या संदर्भात चंद्रशेखर गोखले यांची एक चारोळी उधृत करतो: इथे सर्वजण समजतात स्वतःला शहाणे, आपल्या हातत एकच शांतपणे पाहणे.
Permalink

हिटलर नं एका दिवसात शेकडो राजकारणी कुत्र्यांना ठार मारलं होतं. (http://en.wikipedia.org/wiki/Night_of_the_Long_Knives)