मुलीस पत्र
लेखनप्रकार
प्रिय रिया,
हा हा म्हणता केवढी मोठी झालीस बाळा, तुला पंख फुटले. माझा अजूनही विश्वास बसत नाही की कालपरवा पर्यंत अंगणात खेळणारं माझं बछडं उद्या नोकरीनिमित्ताने दुसर्या देशात भुर्र उडून जाणार आहे. अशा वेळी तुझ्या या वेड्या आईचं मन सैरभैर होणं साहजिकच आहे. तुला मी देता येतील तितके चांगले संस्कार दिले, बाळकडू पाजलं, वेळोवेळी उपदेशाचे डोस दिले मग तुला आवडो अथवा न आवडो. पण काही गोष्टी तरीही राहूनच गेल्या.
मानापमान -रियु मी तुला कधी हे सांगीतलं का की गरींबांच्या मनात त्यांचा अपमान होण्याची नेहमी धास्ती असते. त्यांच्या मानापमानाच्या कल्पना टोकदार असतात आणि म्हणूनच त्यांचा चुकूनसुद्धा अपमान करायचा नसतो.
संस्कार -आपण नेहमी झाड पहातो. झाड कसं वाढतं सांग पाहू मला. वरवर, सूर्याच्या दिशेने वाढतं बरोबर? पण त्याच झाडाला खत पाणी कोण आणतं? मूळं, जी की मातीत खोलवर रुजतात. त्याचप्रमाणे तुझा खूप विकास होईल, चौफेर प्रगती होईल पण तू नेहमी हे लक्षात ठेव की तुझ्या ध्येयपूर्तीस आवश्यक असे विचार, खाद्य तुला तुझ्या संस्कारांच्या मातीतूनच मिळेल.
फेरविचार - तू मोहमयी जगात प्रवेश करणार आहेस. तुझ्या हातात पैसा खुळखुळणार आहे. तुला मोह होणं स्वाभाविकच असेल. मग तो मोह टाकाऊ, निकस खाद्यपदार्थांचा असो की अनावश्यक वस्तूंवर पैशाचा अपव्यय करण्याचा असो. या मोहावर एक रामबाण उपाय आहे - फेरविचार! एखादी गोष्ट खरेदी कराविशी वाटली की स्वतःला ३० मिनिटे दे. फक्त ३० मिनिटे आणि फेरविचार कर. त्या ३० मिनिटांनी तरी जर तुला ती वस्तू खरेदी कराविशी वाटली तर जरूर कर.
स्तुती - स्तुतीस भुरळू नकोस तसेच कटू बोलणारी व्यक्ती नेहमी वाईटच असते असेही गृहीत धरू नकोस्.साखरेचेच उदाहरण घे. साखर तोंडावर गोड बोलून , पाठीत सुरा खुपसते.तेव्हा सदैव स्वतःचा सारासार विवेक जागृत ठेव.
कष्ट - गरीबांचे कष्ट कधीही विनामोल घेऊ नकोस तसेच तुझ्या स्वतःच्या कष्टाचे मोल नेहमी जाण. आपल्या मित्रमैत्रिणींना, स्नेह्यांना, नातलगांना आपण केवळ पैशानेच नव्हे तर कष्टरूपाने, वेळरूपाने मदत करू शकतो, दिलासा देऊ शकतो. पारखून मैत्री कर. मैत्रीसारखी सुंदर नाती फार कमी आहेत या जगात.
वाचा -शेवटचे पण महत्त्वाचे स्वतःची जीभ कधीच खराब करून घेऊ नकोस. समोरची व्यक्ती निंदा करत असेल, कटू बोलत असेल, तर तू तेथून निघून जा कारण ते तुझ्या हातात आहे पण त्या व्यक्तीच्या पातळीवर उतरू नकोस.
तुला वाटेल आई नेहमी प्रवचन देते. पण तू दूर , एकटी जाणार म्हणून या गोष्टी सांगाव्याशा वाटल्या. बाकी तू सुजाण आहेसच. मला खात्री आहे की तू यशस्वी होशील. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदोदीत आहेतच.
तुझी आई
वाचन
12991
प्रतिक्रिया
0