एक स्वप्न प्रवास.(३)
लेखनप्रकार
या पूर्वीचा दुवा एक स्वप्न प्रवास (१) http://misalpav.com/node/1699
एक स्वप्न प्रवास (२) http://misalpav.com/node/1712
प्रिय ऎन..आपण चॆट वर जेंव्हा ठरवले की स्वप्नात का होईना आपण भेटायचेच्.तेंव्हा पासुन मी त्या प्रयत्नात आहे
तुझ्या स्वप्नात येण्यासाठी आज काही तरी वेगळा उपाय करायच्या विचारानेच झोप् येत नव्हती. काय करायचे; स्वप्नात तुला कुठे भेटायचे; याचे विचारत् मी मग्न होतो. मला कोणीतरी सांगितले की श्रीखंड खाउन झोपले की स्वप्ने चांगली पडतात. तर कोणी म्हणाले की गाडीवरचा शिळा शेजवान राईस खाल्ला की स्वप्ने पडतात. गेल्या खेपेला मी हा उपाय करुन पाहेला होता. पण चायनीज खाउन स्वप्नात ड्रॆगन् आला त्यामुळे मी हल्ली रात्री चायनीज खात नाही. ऎन तू मलेशिअन.तुझ्या स्वप्नात यायचे म्हणजे मला तुमच्या देशातली काहीतरी पाक कृती खाउन् झोपायला हवे. पण् दुरियान फ़णस;ग्रीन राईस आणि काळा चहा या शिवाय मला एकाही मलेशिअन पदार्थाचे नावही ठाउक नाही. तिखट थाई जेवण मिळते पण त्यातील तिखटपणामुळे झोप् यीण्यापेक्शा रात्रभर जागेच् रहावे लागते अशी परिस्थिती. माझ्या एका मित्राने मला मलेशियन खाद्य पदार्थ म्हणुन झुरळाचे लोणचे असे नाव असलेला एक पदार्थाचे नाव सांगितले. पण खायला जायचो एक आणि व्हायचे भलतेच् असे काही होऊ नये म्हणुन मी वेलदोडे केसर पिस्ता घातलेला श्रीखंड भरपूर चापला. श्रीखंडाचा शेवटचा चमचा हातात असेल नसेल तोच डोळे जडावले, कसा बसा श्रीखंडाचा वाडगा बाजुला केला आणि खुर्चीवरुन उठणार इतक्यात मला तिथेच झोप् लागली......
चला सुरुवात तर मस्त झाली.
जल स्थल आकाश मार्ग सोडुन तुझ्या कडे येण्याचा एक नवा मार्ग मला चोखाळायचा होता. मी ठरवले अगदी अद्ययावत मार्ग वापरायचा. स्वत्:ला ई मेल मधुन पाठवुन बघायचे. एरव्ही आपले संभाषण ईमेल द्वारे होते. पण ते केवळ टाईप केलेले शब्द असतात. मी मला ई मेल ने पाठवायचे ठरवले. आता मी स्वत:च ई मेल ने तुझ्या स्वप्नात तुला येउन भेटणार होतो.
हा असला प्रकार कितपत यशस्वी ठरु शकेल? हे असे करणे योग्य आहे का? हे आपल्याला जमेल का ? असली काहीतरी शंका क्शणभर मनात चमकुन गेली. त्याच क्शणी डोळ्यासमोर पूर्वी दूरदर्शन वर व्यत्यय ची पाटी यायची तशी एक पाटी तरळुन गेली. त्यावर लिहीले होते "प्रेमात आणि स्वप्नात सारे काही क्षम्य असते. म्हणुनच ते रम्य असते." स्वप्ने पहाणारेच जगात काहीतरी करु शकतात"
स्वत:ला ईमेल ने पाठवायचे तर सर्व प्रथम माझे रुपांतर हार्ड फ़ॊर्मॆट मधुन सॊफ़्ट कॊपी मधे करावयास हवे होते. मी स्कॆनर मधे बसलो आणि स्कॆन मेन्यु वर क्लिक केले. स्कॆनर सुरु झाला. माझ्या डोक्यापासुन पायाकडे स्कॆनर ची निळी हिरवी प्रकाश रेषा फ़िरु लागली.
प्रकाश रेषा आता पायापासुन डोक्याकडे येवु लागली. आता माझे पाय दिसेनासे होऊ लागले. पाय गुढगे कंबर छाती हात खांदे...एकेके अवयव अदृष्य होऊ लागला . कर्रर्रर्र आवाज....एक अनामीक भीति......पाठीच्या कण्यातुन भयाची एक लाट.......अचानक......... सर्व शरीरातुन गरम संवेदना... मग सारे कसे थंड गार........आता फ़क्त हालचाल जाणवतेय्....आसपास.एक हिरवी गाभुळलेली जाणीव.माझे आस्तित्व कुठेतरी विलीन होत होतं....छे काहीतरी चुकतय.....अरे हो मी कॊम्प्युटरला ही माझी स्कॆन केलेली फ़ाईल ऎटॆच कर असे सांगायलाच विसरलो..मी पुन्हा मूळ स्वरुपात आलो. कॊम्प्युटरला आवश्यक त्या आद्न्या दिल्या. आणि पुन्हा स्कॆनर मधे जाऊन बसलो. स्कॆनर चे बटण दाबले. स्कॆनर सुरु झाला.पुन्हा माझ्या डोक्यापासुन पायाकडे स्कॆनर ची हिरवी प्रकाश रेषा फ़िरु लागली.त्याच क्रमाने पुन्हा एकेके अवयव अदृष्य होऊ लागला मी पूर्ण अदृश्य झालो....... ही अनामिक भीति काही मनातुन जात नाही...... मनात उगाच अनेक शंका येत होत्या. मी माझ्यापेक्शा माझ्या स्वप्नांवर जास्त भरोसा ठेवायचे ठरवले.
अगोदर अनादी अथांग अंधार त्यानन्तर एक प्रकाशाचा हिरवा लोळ...मग कसला तरी प्रवाह..उसवलेले विरत जाणारे धागे.....आणि मुक्त सूक्श्म कण..एकदम हलके हलके वाटत होते. आता माझी पूर्ण रुपांतर झाले होते. मी जणूएक एलेक्ट्रॊन बनलो होतो. वजन नसलेला उर्जेचा कण. मला कोठेही फ़िरायला आता अडचण नव्हती. उत्साह तर अंगात मावत नव्हता.अंगात मावत म्हणायला मला शरीर तरी होते कुठे. आता कुठेही कसेही मजेत फ़िरायचे असा विचार करत असतानाच मला माझ्यासारखे दिसणारे आणखी काही कण येउन चिकटले. किंवा मी त्याना चिकटलो म्हणाना. आमच्यात एक कसलेतरी जोरदार आकर्षण होते. एकमेकाना घट्ट चिकटलो गेलो. आम्ही सारे मिळुन एक ईमेल संदेश बनलो होतो. एकत्र आल्यामुळे आता आम्हाला अर्थ मिळाला होता.आम्ही सारे मग कोणाच्या तरी सांगण्यावरुन एका मोठ्या नळीत गेलो.आता आम्ही एका विस्तीर्ण दालनात उभे होतो. त्या दालनाला आदी नव्हता अंत नव्हता प्रकाश अंधार यांच्या सीमारेषा एकमेकात विलीन झाल्या होत्या.समोर कोणीतरी सिंहासनावर बसलेला होता. त्याला रूप् नव्हते ... आकार नव्हता...रंग नव्हता. त्याचे आस्तित्व होते.त्याच्या तीक्श्ण नजरेची जाणीव मात्र होत होती. माझ्या शेजारच्या कणाने मला त्या सिंहासनावर बसलेल्या आस्तित्वाचे नाव सर्व्हर असे सांगितले. ....मला उगाचच भगवत गीतेतल्या भगवंताच्या विष्व रूपाची आठवण झाली. त्या विस्तीर्ण दालनात आमच्या सारखे अनेक कणांचे पुंजहोते. अठरा अक्षौहीणी की काय म्हणतात् तेवढे किंवा त्यापेक्शा जास्तच असतील ते. सगळे काहीतरी घडण्याची वाट पहात होते. सिंहासनावर बसलेल्या आस्तित्वाने काहीतरी अगम्य भाषेत काहीतरी आदेश दिला.त्याबरोबर प्रत्येक कणांचा पुंज एक विवक्शीत दिशेने जाऊ लागला. त्याना पाय नव्हते तरीही सैनिक संचलन करतात तसे प्रत्येकाची हालचाल लयबद्ध होत होती. आमचा कण पुंज आता एका नळीच्या दिशेने जाऊ लागला.आमच्या हालचाली कोणाच्या नियंत्रणावरुन होत होत्या तेच कळत नव्हते. पण त्या ठरावीक दिशेने होत होत्या.आमचा असा प्रवास सुरु होता. मी मजेत प्रवासाचा गम्मत घेत चाललो होतो.कोणतेही वाहन नसताना आम्ही चाललो होतो. संध्याकाळच्या ५:५७ च्या विरार लोकल ला असते त्यापेक्शा ही जास्त गर्दी आसपास होती. पण कुठेही घुसमट घामट असे काही नव्हते. नाही म्हणायला गर्दीमुळे डब्यातुन बाहेर येणे व आत जाणे हे तिथे तुमच्या ताब्यात नसते.तुम्हाला जणु पाय नसतातच. तसे इथे आम्हाला कोणालाही पायच नव्हते हे मोठे साम्य मला त्याही स्थितीत जाणवुन गेले. बाहेरचे काही दिसत नव्हते.
सोबतच्या कणांना चेहरे वगैरे असे काहीच नव्हते. त्यामुळे नेत्रसूख वगैरे विचार हद्दपार झाले होते.आम्हाला स्वत:चेसुद्धा वजन नव्हते त्यामुळे त्यामुले कसलाही भार नव्हता.( उगाचच् मला कुणाच्या खान्द्यावर कुणाचे ओझे हे गाणे आठवले. खरे तर् हे गाणे कुणाच्या पायावर कुणाचे ओझे असे असायला हवे होते) कोठे निघालो होतो हे माहीत नव्हते. कुठे जायचे ते मी ठरवु शकत नव्हतो. त्यामुळे वेळेवर पोहोचु / ऊशीर होईल असली फ़ालतू टेन्शने/चिंता नव्हती.अदभूतामधुन जाणे की काय म्हणतात तसा मस्त् प्रवास चालला होता.
इतक्यात काय झाले........
(क्रमश:)
वाचन
9481
प्रतिक्रिया
0