मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नान्या..!

विसोबा खेचर · · जनातलं, मनातलं
"तात्या, पोष्टाजवळचा टकल्या सातपुते खपला रे. वेळ असेल तर ये!" रात्री अकराच्या सुमारास जरा कुठे डोळा लागतो न लागतो तोच नान्याचा फोन! शिवनाथ पांडुरंग नवाथे, ऊर्फ नाना नवाथे, ऊर्फ नान्या! हा प्राणी मला कधी भेटला, कधी आमची घट्ट दोस्ती जमली आणि कधी हा माझा झाला ते कळलंच नाही. नान्याला मर्तिकं पोचवायची भारी हौस. छंदच म्हणा ना! जरा ओळखीपाळखीतलं कुणी मरायचा अवकाश, नान्या त्या घरात सर्वात पहिल्यांदा हजर! नुकतीच पोरगी पटलेल्या एखाद्या युवकाने ज्या लगबगीने तिच्याबरोबर सहाचा शो पाहायला जावं, त्याच उत्साहाने नान्या कुणाच्याही मयताला निघतो! मग काय हो, ज्या घरी मयत झालेलं असेल त्या घरच्या मयताच्या तयारीचं पुढारीपण आपसुकच नान्याकडे येतं आणि नान्याच सगळी सूत्र हलवायला घेतो. कुठल्या स्मशानात जायचं, लाकडं की विद्युतदाहिनी, भटजी ठरवणे या सगळ्या गोष्टी नान्याच बघतो. हे नान्याला कुणी सांगायला लागत नाही आणि नान्या कुणी सांगण्याची वाटही पाहात नाही. एकतर त्या घरची मंडळी हे सगळं ठरवायच्या मनस्थितीत नसतात, बरं मर्तिकातलं सगळंच काही सगळ्यांना माहिती असतं असंही नव्हे. उलट कुठून सुरवात करायची, कुणी पुढाकार घ्यायचा हा जरा प्रश्नच असतो. आणि तिथे नेमका आमचा नान्या सगळी सूत्र हातात घेतो आणि मंडळी मनातल्या मनात हुश्श करतात! "काय रे नान्या, तू एरवी जसा मोठमोठ्याने आणि भसाड्या आवजात बोलतोस तसाच मयताच्या घरीही बोलतोस का रे?" मी एकदा गंमतीत नान्याला विचारलं होतं! "अर्रे! त्यावेळचा बोलण्याचा खास दबका आवाज आपण राखून ठेवला आहे!" एखाद्या मुरब्बी नटाच्या थाटात नान्या उत्तरला! नान्याचं बोलावणं आलं आणि मी चूपचाप टकल्या सातपुतेच्या घरी हजर झालो. टकल्या सातपुते त्याच्या नेहमीच्या खत्रूड चेहेर्‍यानिशीच घोंगडीवर विसावला होता. "बरं झालं तू आलास!" नान्याने मला हळूच एका कोपर्‍यात घेऊन म्हटलं. "आयला, हा टकल्या सातपुते म्हणजे एक नंबरचा भिकारचोट माणूस! आयुष्यभर सगळ्यांशी तुसडेपणाने वागला. लेकाच्या मर्तिकाला कोण आलंय का बघ! अरे चार डोकी तरी हवीत ना मयताला? म्हणून मुद्दामच तुला बोलावून घेतला. अरे चार माणसं जमवताना माझी कोण पंचाईत झाल्ये म्हणून सांगू! छ्य्या..!" अर्थात, टकल्या सातपुतेच्या मयताला चार डोकी जमवायची जिम्मेदारी कुणीही नान्याकडे दिलेली नव्हती, तर हौशी नान्याने ती आपणहून अंगावर घेतली होती हे वेगळे सांगणे न लगे! "काय करणार काकू? आता जे झालं त्याला काय इलाज आहे सांगा पाहू! तुम्ही धीर सोडू नका. अहो मरण काय कुणाच्या हातात असतं का? बरं, वसू निघाल्ये का पुण्याहून? तुम्ही काही काळजी करू नका. मी आलोय ना आता, मी सगळं बघतो सातपुतेकाकांचं!" नान्या टकल्या सातपुतेच्या बायकोला धीर देत होता. एकिकडे टकल्या सातपुतेला 'भिकारचोट' अशी माझ्याकडे खासगीत शिवी देणारा परंतु त्याच्या बायकोशी बोलताना मात्र, "काय करणार काकू, आता जे झालं त्याला कुणाचा काही इलाज आहे का? मी सगळं बघतो सातपुतेकाकांचं!"असं बोलणार्‍या नान्याचं मला हसूही आलं आणि कौतुकही वाटलं! :) वास्तविक टकल्या सातपुतेला रात्री मुद्दाम उठून अगदी हटकून पोचवायला वगैरे जावं इतकी काही त्याची आणि माझी घसट नव्हती. पण काय करणार, आमचे नान्यासाहेब पडले मर्तिकसम्राट! त्यांच्या दोस्तीखातर मला जावं लागलं होतं! "अखेर टकल्या सातपुते अत्यंत गरीब परिस्थितीतच गेला रे!" नान्या पुन्हा एकदा दबक्या आवाजात हळहळला! "गरीब परिस्थिती? अरे त्याचं हे घर तर चांगलं सधन दिसतंय. आणि मी तर अलिकडेच टकल्या सातपुतेला सॅन्ट्रो कारने जाताना-येताना पाहात होतो! मग टकल्या गरीब कसा काय? काय कर्जबिर्ज होतं की काय त्याच्या डोक्यावर?" मी. "च्च! तसा गरीब नाही रे!" (बर्‍याचदा बोलण्याच्या सुरवातीला 'च्च' असा उच्चार करायची नान्याची खास ष्टाईल बरं का! :) "पैशे खूप आहेत रे टकल्याकडे. पण आता तू बघतो आहेस ना? अरे चार डोकी तरी आपुलकीने, आस्थेने जमली आहेत का त्याच्या मयताला? तुला सांगतो तात्या, माणूस गरीब की श्रीमंत हे तो मेल्यावरच समजतं! तशी पैशेवाल्यांच्या मर्तिकाला काही मंडळी स्वार्थापोटी जमतात, किंवा एखाद्या राजकारण्याच्या मर्तिकाला पुढे पुढे करायला मिळावं म्हणून कार्यकर्तेही जमतात, तो भाग वेगळा! परंतु तुझ्यामाझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मयताला उत्स्फूर्तपणे चार माणसं जमतात आणि हळहळतात ना, ती खरी त्या माणसाची श्रीमंती समजावी!" अच्छा! म्हणजे नान्या या अर्थाने टकल्या सातपुतेला गरीब ठरवत होता! माणसाला गरीब किंवा श्रीमंत ठरवायचा नान्याचा हा निकष काही औरच होता! "आता तुझ्या त्या देशपांडेचंच उदाहरण घे. तो खरा श्रीमंत! अगदी सामान्यातला सामान्य माणूस त्याला आपुलकीने पोचवायला गेला होता!" "कोण देशपांडे?" मी. "अरे तुझा तो भाई देशपांडे रे!" ?? "अरे तुझा तो भाईकाका देशपांडे रे! टीव्हीवर शो करून सगळ्यांना हासवायचा ना? तो! काय गर्दी रे त्याच्या मयताला! टीव्हीवर दाखवत होते ना!" मी मनातल्या मनात भाईकाकांची त्यांच्या एकेरी उल्लेखाबद्दल माफी मागितली आणि म्हटलं, "भाईकाका, आमच्या नान्याला एकेरी उल्लेखाबद्दल मोठ्या मनाने क्षमा करा. मनानं तसा निर्मळ आहे तो. तुमच्या अंतयात्रेला झालेल्या उत्स्फूर्त गर्दीवरून तो तुम्हाला श्रीमंत ठरवतोय! तुमच्यातल्या माणूसवेडाला ही त्याची दाद समजा!" एका बाबतीत मात्र नान्या खरंच सुखी होता. त्याला संगीत, कला, साहित्य वगैरे कश्शाकश्शात इंटरेस्ट नव्हता! पुलंनादेखील तो लेखक वगैरेच्या ऐवजी, 'टीव्हीवर ते कार्यक्रम करायचे' इतपतच ओळखत होता! "हॅलो, कोण टिल्लूगुरुजी का? मी नाना नवाथे बोलतोय. पोष्टाजवळचे सातपुते वारले. तुम्ही अमूक अमूक वाजता डायरेक्ट स्मशानात पोहोचा. आम्ही त्याच सुमारास मयत घेऊन तिकडे येऊ!" नान्या आता पुढच्या उद्योगाला लागला होता. नान्याची फोन डायरी जर तपासली असती तर त्यात मर्तिकाची कामं करणार्‍या किमान पाचपन्नास भटजींची नांवं तरी सहज सापडली असती! :) "काय करणार तात्या, अरे ऐनवेळेस लोकांना भटजी कुठून बोलवायचा, कुणी बोलवायचा, कोण कोण भटजी अशी कामं करतात हे देखील माहीत नसतं! त्यामुळे साला मला या भटजी मंडळींशी कॉन्टॅक्टस् ठेवावे लागतात!" एखाद्या गब्बर बिल्डरचे जसे महापालिका आयुक्त, नगरसेवक वगैरे मंडळींशी कॉन्टॅक्टस् असतात त्याच थाटात नान्या मर्तिकाच्या भटजींशी आपले कॉन्टॅक्टस् आहेत हे सांगत होता! अंगापिंडाने काटक-सडपातळ, उभेल्या चेहेर्‍याचा, रंगाने सावळा, नाकीडोळी चांगला तरतरीत स्मार्ट, मध्यम उंचीचा, नेहमी साध्या शर्ट प्यँटीत असलेला नान्या गावात मुडदेफरास म्हणून प्रसिद्ध आहे. नान्या रेल्वेत इलेक्ट्रिकल कामगार या पदावर नोकरीला आहे. प्रसन्न चेहेर्‍याची, वृत्तीने अत्यंत समाधानी अशी पत्नी नान्याला लाभली आहे. तिचं नांव सुधा. नान्या तीन मुलींचा बाप आहे. सर्वात धाकटी स्नेहा आता ५-६ वर्षांची आहे. मी तिला चिऊ म्हणतो. कधीही नान्याच्या घरी जा, आमची चिऊ जिथे असेल तिथनं भुर्रकन येऊन तात्याकाकाला येऊन बिलगते! "गधडे, तू तात्याकाकाकडेच राहिला जा! तोच तुझं कन्यादान करील!" असं नान्या चिऊला म्हणतो! :) नान्याचं सगळं घरच अगदी प्रसन्न आणि हसतमुख चेहेर्‍याचं आहे. रेल्वेची नोकरी सांभाळून नान्या घरगुती इलेक्ट्रिक वायरींग दुरुस्तीची वगैरे कामही कामं घेतो. भरपूर कष्ट करतो. बायकोमुलींवर बाकी नान्याचा भलताच जीव! अत्यंत कुटुंबवत्सल स्वभाव आहे नान्याचा. पण नान्याचा आवडीचा छंद किंवा विरंगुळा मात्र एकच. तो म्हणजे लोकांच्या मर्तिकाला जाणे! :) नान्या एकवेळ कुणाच्या लग्नामुंजीला जायचा नाही, पण ओळखीत कुठे मर्तिक असल्याचं कळलं की सर्वात पहिला नान्या हजर! मग अगदी शेवटपर्यंत तिथे थांबणार. अगदी सामान आणण्यापासून ते तिरडी बांधण्यापर्यंत, डॉक्टरचं सर्टिफिकेट, स्मशानात सुपूर्द करायची कागदपत्र, लाकडं रचणार्‍या इसमाशी "काय रे बाबा, लाकडं ओली नाहीत ना? मीठ आणि रॉकेल आहे ना?" इत्यादी गोष्टी कम्युनिकेट करणे, पळीपात्र, काळे तीळ, दर्भ, इथपासून भटजींच्या सामानाची अप्टुडेट तयारी करणे या सगळ्यात नान्याचं हात धरणारं गावात दुसरं कुणी नाही! गणपतीच्या दिवसात नान्याकडे खरी धमाल असते. नान्याकडे पाच दिवसांचा गणपती बसतो. "अरे तात्या, तुझं ते भजनीमंडळ घेऊन गणपतीत अमूक अमूक दिवशी माझ्या घरी ये रे. मस्तपैकी गाण्याचा कार्यक्रम करू!" वास्तविक नान्याला संगीताचीही फारशी काही समज किंवा आवड नाही, पण गणपतीत घरी गाण्याचा कार्यक्रम झालाच पाहिजे ही हौस मात्र दांडगी! दरवर्षी नान्याच्या घरी माझं गाणं ठरलेलं, कारण मीच काय तो एकमेव गायक नान्याच्या ओळखीचा! पण मला खरंच कौतुक वाटतं नान्याचं. त्याच्या त्या दोन खोल्यांच्या रेल्वे क्वार्टर्समध्ये पाचपंचवीस माणसं गाणं एकायला अगदी दरवर्षी जमतात. ही सगळी नान्याच्या गणगोतातली माणसं! मला अभिमन वाटतो की मी देखील नान्याच्या गणगोतातीलच एक आहे! गणपतीत दरवर्षी ठरल्याप्रमाणे मी माझा तब्बलजी आणि पेटीवाला घेऊन नान्याच्या घरी हजर होतो. नान्या तेव्हा कोण मुलखाच्या गडबडीत असतो! मग त्यानंतर अगदी यथास्थित, पाय दुखेस्तोवर अर्धापाऊण तास आरती! आरती झाली की गणपती बाप्पा मोरया या आरोळी पाठोपाठच, "देवा गणपतीराया सगळ्यांना मुक्ति मिळू दे रे बाबा! कुणाचा जीव तरंगत रहायला नको!" हे देखील नान्या ओरडतो! :) छ्या! या नान्याचं मर्तिकाचं खूळ केव्हा जाणारे कुणास ठाऊक! गणपतीच्या दिवशीही "सगळ्यांना मुक्ति मिळू दे रे बाबा!" या आरोळीच्या रुपाने ते खूळ नान्याच्या पायात पाय घालायला येतंच तिच्यायला! ते सुद्धा नान्याच्या नकळत! कारण आपण असं काही बोललो हे देखील नान्याच्या गावी नसतं! :) मला तर एखाद् वर्षी "देवा गणपतीराया, या वर्षी लाकडं जरा स्वस्त होऊ देत रे बाबा!" असंही नान्या ओरडेल की काय अशी भिती वाटते! :)) "हं तात्या, इथे सतरंजी घातल्ये. तुम्ही मंडळी इथे बसा आणि सुरू करा गाणं! मंडळी, सर्वांनी बसून घ्या रे. आता गाणं ऐकायचंय! सुधा, खिचडीच्या प्लेटा भरल्यास का?" नान्याची तोंडपाटिलकी सुरूच असते! "तात्या, काय सुपारी-तंबाखू, पानबिन हवं तर सांग रे. लेका मोठा गवई तू!" एवढं म्हणून नान्या पुन्हा इतर लोकांच्यात कुणाला काय हवं नको ते पाहायला मिसळतो! मग मी आणि माझी साथीदार त्या गर्दीतच स्थानापन्न होऊन वाद्यबिद्य जुळवू लागतो. कुठलीही औपचारिकता वगैरे न पाळता नान्या मला हुकून सोडतो, "सुरू कर रे तात्या. तुझं ते 'जो भजे हरि को सदा' होऊन जाऊ दे जोरदार!" मैफलीच्या सुरवातीलाच गायकाला भैरवीची फर्माईश करणारा नान्या हा जगातला एकमेव श्रोता असेल! :) मग मी देखील नान्याच्या घरी अगदी मन लावून, यथेच्छ गातो. तसा काही मी कुणी मोठा गवई नव्हे. बाथरूम सिंगरच म्हणा ना! पण नान्याच्या घरी गायला जी मजा येते ती कुठेच येत नाही! देव आहे की नाही हे मला माहिती नाही, पण नान्याच्या घरी गाताना मात्र मला इश्वरी वास जाणवतो! बरं एवढं करून देखील नान्या तिथे गाणं ऐकायला थोडाच थांबेल? ते नाही! तो लगेच आलेल्या मंडळींना गरमागरम साबुदाण्याची खिचडी आणि उत्तम मावा बर्फीचा तुकडा असलेली प्लेट द्यायला उठणार! नान्या, त्याची ती प्रसन्नमुखी बायको सुधा, आणि तीन निरागस मुली सगळ्यांच्या सरबराईत लागलेल्या असतात. गातांना मध्येच धाकटी चिऊ माझ्या मांडीवर येऊन बसणार! "तात्याकाका, मी पण गाणार!" असं मला म्हणणार! :) "खरंच रे तात्या, चिऊला गाणं शिकवण्याकरता लेका मी तुझ्याचकडे पाठवणार आहे. तिला आपण मोठ्ठी गायिका करूया!" नान्या हे सांगत असताना सुधावहिनीही कौतुकाने चिऊकडे बघणार! मंडळी, खरंच किती साधी माणसं आहेत ही! नान्याच्या घरची गणपती मूर्ती जशी प्रसन्न दिसते तशी कुठलीच मूर्ती मला दिसत नाही! अहो देवसुद्धा शेवटी निरागसतेचा, साधेपणाचाच भुकेला आहे! पण मंडळी, एका बाबतीत मात्र मी नान्याचा नेहमीच धसका घेतलेला आहे! अहो काय सांगावं, रात्री अपरात्री कधीही नान्याचा फोन यायची भिती असते, "तात्या अमका अमका खपला रे तिच्यायला! मोकळा असशील तर ये! अरे मयताला चार डोकी तरी जमवायला हवीत ना!" -- तात्या अभ्यंकर.

वाचन 27995 प्रतिक्रिया 0