मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नौदलातील आयुष्य -१

सुबोध खरे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मी १९८७ साली एम बी बी एस पास होऊन नौदलात कमिशन मिळवून मुंबईच्या नौदलाच्या रुग्णालयात इंटर्न शिप साठी कामावर रुजू झालो. तेथे २ वर्षे काम १ वर्ष इंटर्न शिप आणि १ वर्ष वैद्यकीय अधिकारी (सर्जन लेफ्टनंट) म्हणून काम करून जानेवारी १९९० मध्ये विक्रांत या विमानवाहू जहाजावर वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झालो. विक्रांत तेंव्हा दुरुस्ती साठी कोरड्या गोदीत ( dry dock) होती. त्याचे पूर्ण दुरुस्तीकरण चालू होते. त्यामुळे तेथे वातानुकूलन यंत्रणा बंद होती सर्व ठिकाणी पत्र्यांना असलेली भोके तपासणे आणि बुजवणे चालू होते.१९६१ च्या डिसेंबर पासून पूर्ण पणे समुद्राच्या पाण्यात उभी असल्याने त्याच्या तालावर ठिकठिकाणी गंज चढलेला होता काही ठिकाणी तर आतले लोखंड पूर्ण सडलेले होते पण वर लावलेल्या रंगामुळे भोक पडलेले दिसत नसे. प्रत्येक पत्र्यावर वाळूचा मारा (sand blasting )करून त्याचा रंग काढत असत आणि जेथे जेथे भोक दिसेल तेथे तो भाग कापून नवा पत्रा weld(वितळ जोड) करीत असत. उड्डाण माळा(फ्लाईट डेक) वर असलेला न घसरणाऱ्या रंगाचा एक २ सेमी आकाराचा थर असतो. तो काढण्यासाठी त्यावर पहिल्याने लोखंडी हातोडीने ठोक ठोक ठोकतात आणि त्यात एकदा भेग पडली कि त्या भेगेत छिन्नी घुसवून परत ठोकत या टोकापासून त्या टोकापर्यंत तो रंग उखडून काढला जातो. पूर्ण जहाज लोखंडी आहे त्यातून त्यावर वापरलेल्या प्रत्येक यंत्राचा आवाज पूर्ण जहाजाच्या आत घुमत राहतो.आयुष्यात इतक्या प्रचंड आवाजाची मला कधीच सवय नव्हती त्यातून हा आवाज सकाळी ९ पासून ते संद्याकाळी ५ पर्यंत सतत असे.फक्त दुपारी १ ते २ जेवणाच्या वेळेला शांतता.म्हणून मी दुपारी १२.३० ला जेवण उरकून घेत असे म्हणजे १ ते २ या काळात थोडी झोपे घेत येत असे.जहाज गोदीत असल्याने बहुतेक विभागातील सैनिकांना सुट्टी दिलेली होती (फक्त अभियांत्रिकी विभाग सोडून).शांततेची किंमत काय असते ते मला तेंव्हा कळले. तुम्ही जेंव्हा जहाजावर राहत असता तेंव्हा २४ तास केंव्हाही पूर्ण शांतता कधीही मिळत नाही सर्व यंत्रांचा आवाज हा पूर्ण रिकाम्या लोखंडी खोलीत सदा सर्व काळ घुमत असतो.वर ठोक ठोक ठोक गाणे ऐकले तर कसे येते --मालवून टाक दीप-~~ घुं घुंग घुंग ~~ चेतवून अंग अंग ~~~ घुं घुंग घुंग --- मधल्या अवकाशात मशिनरीचा आवाज मिसळलेला येतो. शिव कुमार शर्मा जींच्या संतूर मध्ये सुद्धा असेच वेगवेगळे घोघाव्णारे आवाज येतात त्यामुळे जहाजावर १२०० पैकी ४००-५०० लोक हजर होते. पण जवळ जवळ ६०० ते ७०० गोदी कामगार तेथे काम करीत असत. गोदी कामगार हा एक स्वतंत्र विषय आहे. टाटा कन्सल्टन्सी च्या अहवालाप्रमाणे गोदीत १२००० कामगारांची गरज होती पण प्रत्यक्षात १९००० कामगार भरती केलेले होते. हे सर्व सिविलियन असल्याने त्यांना लष्करी नियम लागू नव्हते तर केंद्र सरकारी नियम होते. त्यातून त्यांची युनियन अतिशय ताकदवान होती त्यामुळे त्यांना विचारणारे कोणीच नव्हते. विक्रांत ची सुकी गोदी वेगळी होती पण विक्रांतची खोली जास्त असल्यामुळे तिला त्या गोदीत फक्त पौर्णिमा किंवा अमावास्येच्या पूर्ण भरतीच्या वेळेतच नेता येत असे. हे त्या लोकांना माहित असल्याने ते बरोबर त्यादिवशी गैरहजर राहत. तेंव्हा त्यांच्या आदल्यादिवशीच्या लोकांना अतिरिक्त भत्ता( overtime pay) देऊन थांबवून ठेवावे लागत असे. या तर्हेची मनमानी चालत असून नौदलाला कहिअहि करता येत नसे. काही करण्याचा प्रयत्न केल्यास ते लोक लगेच संपावर जात आणि युनियन चे लोक विचारीत कि केंद्र सरकार पैसे देत आहे तर तुमच्या( नौदलाच्या) बापाचे काय जाते? पण हे फुकट चे दीड पट पैसे जात असल्याने नौदल सैनिकांचे इमान कुठेतरी जळत असे. असो त्यावर मला तेथे सकाळी रुग्ण पाहिल्यावरही कोठेही जाता येत नसे कारण कोठेना कोठे तरी अपघात घडत असे.त्यातून गोदी कामगार दारू पिउन कामावर येणे हि नित्याची बाब होती. शिडीवर चढताना पडला पाय घसरला या गोष्टी रोज होत होत्या. दारू न मिळाल्यास ते लोक थिनर सुद्धा पीत. त्यामुळे त्यांना उलट्या होत असत. असा एक महिना तेथे काढला आम्हाला तेथे असलेल्या गोदीच्या दवाखान्यात रात्र पाळीच्या आपत्कालीन विभागात काम करावे लागत असे तेंव्हा एका रविवारी सकाळी तिथला सुरक्षा अधिकारी एका गोडी कर्मचारयाला वैद्यकीय परीक्षेसाठी घेऊन आला.अधिकार्याचे म्हणणे असे होते कि हा दारू पिउन कामावर आला होता.त्यासाठी त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याच्यावर कारवाई करायची होती. मी १९८८-८९ मध्ये मानसिक रुग्ण विभागात व्यसनमुक्ती केंद्रात काम केले होते त्याप्रमाणे मी त्याची चौकशी केली, त्या सफाई कर्मचार्याने असे सांगितले कि साहेब मी २ पेग दारू प्यायलो हे सत्य आहे पण मी ते का प्यायलो ते ऐकून घ्या. मला तेथील गटार तुंबले होते ते साफ करण्यास सांगितले. त्या गटाराच्या आत एक कुत्रा मरून पडला होता आणि तो पूर्ण सडला होता आणि त्याला भयंकर वास येत होता. मी आत उतरून त्या कुत्र्याचे शेपूट पकडले तर ते शेपूट तुटून माझ्या हातात आले. पूर्ण कुत्रा भयंकर सडला होता त्या वासाने मला आत उलटी झाली.मी परत बाहेर आलो दोन पेग दारू प्यायलो आणि मग आत उतरलो आणि तो कुत्रा तुकड्या तुकड्याने बाहेर काढला.साहेब दारू प्यायलो नसतो तर मला हे काम करणे अशक्य होते. आता मी त्या अधिकार्याला विचारले कि यावर तुझे काय म्हणणे आहे? तो म्हणाला साहेब हा म्हणतो ते सत्य आहे पण हा दारू पिउन आत उतरलं आणि वर आला नाही तर माझी मान अडकली असती मी काय करू? मला दोन्ही बाजू पटत होत्या पण मला वैद्यकिय प्रमाणपत्र तर द्यायचे होते. म्हणून मी पळवाट काढली. मी लिहून दिले कि हा कर्मचारी दारू प्यायले असल्याचे मान्य करतो आहे परंतु तो दारूच्या पूर्ण अमलाखाली आहे असे वाटत नाही. नरो वा कुंजरो वा याचा खरा अर्थ मला तेंव्हा समजला क्रमशः

वाचन 18869 प्रतिक्रिया 0