मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मग पुन्हा सामसूम...!

विसोबा खेचर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
अगदी निवांत, निर्मनुष्य ठिकाण..निवांत पहुडलेल्या रेल्वे लाईनी... त्यांचा एकमेकींशीही काही संवाद नाही.. दिसभर बोलणार तरी काय एक-दुसरीशी आणि किती? एकाकीपणा.. अगदी तासंतास...! आणि मग अचानक एक उत्साहानं भरलेलं धावतं विश्व येतं.. विलक्षण उत्साह.. विलक्षण गती.. ! नानविध लोकांनी भरलेलं, गजबजलेलं एक धावतं विश्व.. कोण आहेत ही नानविध लोकं? ती द्योतक आहेत.. रागाची, लोभाची, उत्साहाची, प्रेमाची, मायेची, कर्तव्याची, निराशेची, आशा-आकांक्षांची, जिद्दीची, उमेदीची...! त्या विश्वात जराही वेळ नाही कुणाजवळ.. त्यातलं कुणीही उतरून साधी चौकशी, साधी विचारपूसही नाही करणार त्या एकाकी रेल्वेलायनींची..! जगाचा नियम आहे हा.. धावत्या विश्वाचा नियम आहे.. तिथे कुणालाही वेळ नाही, उसंत नाही.. आहे ती फक्त गती.. आहे ती फक्त जिद्द. पुढे जाण्याची, कुरघोडी करण्याची, जग जिंकण्याची..! हेच सगळं सांगतो आहे त्या इंजिनाचा तो कर्कश्श भोंगा आणि डब्यांची ती थडथड...! आणि मग निघून जातं ते धावतं विश्व त्या रेल्वेलायनींना लाथाडून..! उत्साहाचा, रगेलतेचा, रंगेलतेचा, रागालोभाचा, मस्तीचा, चैतन्याचा क्षणिक धुराळा उडतो.. आणि मग पुन्हा तीच सामसूम.. तोच निवांतपणा.. तोच एकाकीपणा.. -- तात्या अभ्यंकर.

वाचन 9926 प्रतिक्रिया 0