रिमझिम पावसात बारवी धरण परिसरात!
या मंगळवारी मी काही कामानिमित्त बदलापूर ला गेलो होतो. तेव्हा रिमझिम पाऊस बरसत होता. सृष्टी हिरवेगार वस्त्र नेसून अतिशय सुंदर दिसत होती. मग काय? ठरवले बारवी धरण परिसर पाहण्याचे. त्याआधी काही मित्रांबरोबर गप्पा मारताना या मोसमात बदलापूर जवळील परिसर किती सुंदर असतो ही माहिती मिळाली.
तसेच बदलापूर हे नाव कसे पडले याची रंजक माहिती मिळाली ती अशी: शिवाजी महाराज रायगडावरून सुरत किंवा त्या दिशेला स्वारी करताना याच दिशेने येत. तेव्हा त्याचे घोडे अतिशय थकलेले असत. मग याठिकाणी घोडे बदलले जायचे आणि मग सुरत कडे प्रयाण सुरू. यावरून या ठिकाणाला बदलापूर असे नाव पडले. रंजक वाटले मला हे कळल्यावर!
सकाळी ११ च्या आसपास कंजूस काकांना फोन केला आणि १ वाजता आम्ही बदलापूर ला भेटलो. बदलापूर पश्चिमेला एस टी स्थानक आहे. तेथून मुरबाड ला बस आहेत. बारवी धारण मार्गे जाणारी बस पकडली आणि आमचा प्रवास सुरू! बदलापूर गावाबाहेर पडल्यानंतर बसमधून दिसणारा निसर्ग दृष्ट लागण्याजोगाच! जेमतेम १८ किमी वर बारवी धरण लागते. बारवी धरण हे कल्याण आणि नवी मुंबईला पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. सव्वीस जुलै च्या प्रलयंकारी पावसावेळी धरण पूर्ण भरले होते आणि पाणी कल्याण भिवंडीत खांद्यापर्यंत साचले होते. धरणाचा परिसर वृक्षवैविध्याने नटाला आहे. भोकर , मोह आणि इतर झाडे येथे भरभरून आहेत. धरण मोठे आहे. रिमझिम पावसामुळे या भागात फिरण्यास मजा आली . विशेष म्हणजे शनिवार रविवार न जाता आम्ही मंगळवारी भेट दिल्यामुळे गर्दी आणि हुल्लडबाजी टाळून निसर्ग जवळून बघता आला. तिथे एक स्थानिक रहिवासी आताच्या मोसमात येणाऱ्या भाज्या गोळा करत होते. कंकाकांनी या भाज्यांबद्दल लिहावे अशी विनंती. सध्या नुकताच पाऊस सुरू असलेने आजूबाजूला थोडे पाण्याचे झरे पाहिले.
एकंदरीतच सुट्टी नसलेल्या दिवशी संवड काढून अशी ठिकाणे पाहणे उत्तम! पण हे कर्णोपकर्णी करु नका हं!
फोटो देत आहे. बाकीचे फोटो कंकाकांनी द्यावेत अशी त्यांना विनंती करतो .
रस्ता:
धरण
कंकाकाका आणि मी
परिसर
रहिवासी आणि भाज्या
धरण
कंकाकाका आणि मी
परिसर
रहिवासी आणि भाज्या
वाचन
13591
प्रतिक्रिया
0