नवविधवेचे नवर्यास पत्र
लेखनप्रकार
तू गेलास... बरं झालं. आणि लवकर गेलास ते आणखीन बरं झालं.
नाही तरी रात्री पिऊन पडायचास.....काय उपयोग होता तुझा? लग्नानंतर तुझं पिणं कमी होईल या आशेनं आई-वडीलांनी मला घरात आणलं. पण आधी बाहेर पिणारा तू , घरीच बाटली घेऊन बसायला लागलास, का तर म्हणे चखण्याचा खर्च कमी होतो.
मुलं तुला घाबरायची पण एकदाच मी, तुझी पोलीसात तक्रार करुन, इन्स्पेक्टर बोक्यांना घरी बोलावलं. त्यांनी तुला असा काही झोडला आणि म्हणाले ‘फोकलीच्या, पोराबाळांवर आणि बायकोवर हात टाकशिल तर गोमूत्र पाजीन !’ तेंव्हापासनं तू फक्त शून्यात नजर लावून प्यायला लागलास.
कधेमधे स्वत:चं समर्थन करायला, `दारु औषधी असते, हृदयविकार दूर ठेवते' वगैरे सांगायचास. पण त्यावर तुला , ‘मग मी करु का सुरु ?’ विचारल्यावर तुझं बंद झालं....दारु पिणं नाही, स्वत:ला जस्टीफाय करणं.
कधीकधी तू सोडायचास सुद्धा. पण तुला किकची सवय लागल्यानं, ‘हल्ली लाईफमधे काही मजा येत नाही’ म्हणून पुन्हा सुरु करायचास.
तू गेल्यावर युएसमधल्या अदिती वन्सं, इतक्या वर्षांनी, वेळात वेळ काढून आल्या आणि आई-बाबांच्या गळ्यात पडून रडायला लागल्या. मी म्हटलं, ‘ मुलांना मी कसंही सांभाळीन पण यांची मला काळजी वाटते, पुढचं सगळं आयुष्य काढायच’.... तशी म्हणाल्या, तुझं ही खरंच आहे. आणि त्यांनी त्या पावली जाऊन इतिश्रीमधे फ्लॅट घेतला... म्हणाल्या, `पुण्याच्या धोरणी बिल्डर्सनी, काळाची पावलं वेळीच ओळखून, आमच्यासारख्या एनारायंची कायमची सोय केलीये. हे दोघं तिथं इतर समवयस्कांबरोबर जीव रमवतील, त्यांची मेडिकल केअरपण चांगली आहे'.
कुठे बहिण आणि कुठे भाऊ ? तू आई-वडीलांची जवाबदारी माझ्यावर टाकून बिनधास्त लास व्हायचास आणि वन्संनी लास वेगासहून इथे येऊन त्यांची सोय केली....शिवाय तुझं हॉस्पिटलचं बीलही भरुन टाकलं. याला म्हणतात समानता, नाही तर फक्त वाटणीच्या वेळी येतात बहिणी.. आरटीजिएस झाल्याचं कन्फर्म करुन सह्या करायला.
मी बोलून गेले खरी, पण मुलांची काळजी मी तरी कशी घेणार होते ? शेवटी मनाचा हिय्या करुन `सेकंड इनींग्ज मॅरेज' ब्यूरोत गेले. तिथे तर रेग्युलर पेक्षाही जास्तच झुंबड होती. माझी नजर स्थिरावल्यावर, तिथे एक उमदा मध्यमवयीन, निराश बसलेला दिसला. त्याच्याशी थोडी नेत्रपल्लवी साधल्यावर त्याच्या चेहेर्यावरचे भाव बदलायला लागले.
तशी मी विचारलं ‘तुम्ही इकडे कसे?’
‘म्हणजे तुम्ही मला ओळखता?’ तो चकित.
‘सम-दु:ख हीच आपली ओळख नाही का?’ या माझ्या हजरजवाबीवर तो खलासच झाला.
‘माझी बायको मला सोडून गेली’ तो म्हणाला.
कोणत्या वेळी काय प्रश्न विचारावा हे बायकांना नेमकं कळतं. मी उगीच, तुमचे नक्की काय मतभेद होते? वगैरे भलत्या चवकशा न करता सरळ म्हटलं, ‘ आणि मुलं तुमच्यावर टाकून?’
त्यावर तो आणखीच खचला, ‘नाही हो, एकच मुलगा आहे पण ती निर्दयपणे त्याला घेऊन गेली....मला मुलांचा इतका लळा आहे पण आता आयुष्यात काही नाही... नुसती पोकळी ’.
‘मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे’ मी पटकन सांगितलं.....माझे मिस्टर अतिरेकी मद्यपानानं आम्हाला कायमचे सोडून गेले.
तोही बराच प्रॅक्टीकल असावा. किती घ्यायचे? लग्नापूर्वी लक्षात नाही का आलं? वगैरे वायफळ प्रश्न न विचारता तो सरळ म्हणाला, ‘आपण एकमेकांचा आधार होऊ शकतो’.
मुलांना नवे आणि चांगले बाबा मिळाले. आता त्याच्या प्रशस्त फ्लॅटमधे आम्ही चौघं मजेत राहातो. लग्नापूर्वी मी त्याचा फ्लॅट बघायला गेले होते. त्यानी मला त्याचा पर्सनल बार दाखवला आणि म्हणाला ‘तुला चालेलना मी कधेमधे घेतली तर ?’
मी म्हणाले ‘मी अनेक चुका अनेक वेळा करते पण एकच चूक पुन्हा करत नाही’
यावर तो सर्दच झाला... ‘म्हणजे ?’
‘म्हणजे मी सुद्धा तुला कंपनी देईन !'
त्यावर त्याच्या कपाळातच गेल्या, `त्यानं काय होईल?'
`मग मला लिमीटमधे ठेवायला...तुला कायम लिमीटमधे राहवं लागेल!’ मी म्हणाले.
माझ्या या वाक्यावर तर तो इतका फिदा आहे की आता मित्रांचे फोन आले तरी तो, `आज मला वेळ नाही म्हणून सांगतो' आणि मग आम्ही दोघंच बैठक जमवतो.
मुलं मला विचारतात, आई तू इतकी कशी बदललीस?’
त्यावर मी त्यांना सांगते, ‘बाळांनो, हे सगळं मी फक्त तुमच्यासाठी करतेय. तुमचे पहिले बाबा गेले, आता हे बाबा मात्र मला सांभाळायला पाहिजेत.
वाचन
17683
प्रतिक्रिया
0