मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दूरचा कट्टा (भाग १)

कविता१९७८ · · भटकंती
मी मुंबईपासून खूप लांब राहत असल्याने मुंबई आणि पुणे कट्ट्याला गेले कि माझ्या उत्साहाचे खूप कौतुक केले जाते कारण मला मुंबई कट्ट्याला ही साधारण येऊनजाऊन ४-५ तासांचा प्रवास होतो पण मी सहसा कधीच कट्टा चुकवत नाही. बोईसरचे नाव बर्‍याच जणींनी ऐकलंय. पण इथे खूप लांब यायचं आणि समुद्र पाहिल्याशिवाय जायचं म्हणजे काहीतरी हुकल्यासारखं होतं त्यामुळे सर्वजणींनी माझ्याकडे वस्तीचा कट्टा ठरवुन येणे भाग होते. मिपाकर स्वप्नांची राणी (स्वरा) भारतात आल्याने तिला माझ्याकडे यायचंच होतं आणि आपली दबंगताई म्हणजेच मिपाकर सुरंगीताईही माझ्यासारखी प्रत्येक कट्ट्याला हजर राहत असल्याने या दोघी तर नक्कीच येणार याची खात्री होती, त्यांच्याबरोबर आणखी २-३ जणी तयार झाल्या खर्‍या पण कट्ट्याची तारीख जसजशी जवळ आली तस्तसा त्यांना कट्ट्याचा दिवस धुसर दिसु लागला आणि मी काय समजायचं ते समजले. जाऊद्या आता यांच्या नशीबी मज्जाच मज्जा नाहीच्चे तर त्याला मी बापडी करणार तरी काय???? अशी मी त्यांच्या मनाची समजुत घातली आणि दोन दमदार कट्टेकरणींच्या स्वागताच्या तयारीला लागले, तयारीचे मी इतक्या मनावर घेतले की कट्ट्याच्या आदल्या रात्री फक्त २-३० तासच काय ते झोपले, काय करणार ना दोन दिग्गज येणार म्हटल्यावर घराचे इंप्रेशन मारायला नको? आणि म्हणतात ना फर्स्ट इंप्रेशन इज द लास्ट इंप्रेशन. मग काय जंगी तयारी केली. त्या आल्यावर त्यांना नाश्ता काय द्यायचा , जेवणासाठी काय पदार्थ बनवायचे आय मीन मागवायचे , नाही तशी मी आहे सुगरण पण ४-५ वर्षात डाएटच्या चक्कर मधे स्वतः च्या हाताने साग्रसंगीत जेवण बनवलेच नव्हते त्यामुळे रेसिप्या सुचता सुचेना. पदार्थांची लिस्ट तर अगदी ऐटीत बनवली होती पनीर बुर्जी काय आणि इनोवेटीव आलु के पराठे काय नी पुलाव काय , तशी मनातून चरकलेच होते कारण सुरंगी ताई सारख्या सुगरणी पुढे मै कीस खेत की मुली?? होना बच्चीच आहे तिच्यापुढे, पण मिसळपाव वरच्या पाककृती वाचुन मनाचा शेफ उचंबळुन बाहेर येऊ पाहत होता. मग काय जोश मधे येउन हवं नको ते सगळं सामान घेउन आले. येऊच दे त्यांना एकावर एक असे पदार्थ खाऊ घालेन की त्यांना विचार करायला वेळ्च नको मिळायला हा उद्देश. शनिवारी ९ तारखेला येउन त्या १० तारखेला जाणार होत्या त्यामुळे शनिवारी मी सुट्टी घेउन त्यांचे छान स्वागत करायचे ठरवले पण हाय हे जुलमी ऑफीस !!!!!!!!!!!! काही कामानिमित्त मला शनिवारी ऑफीसला जावेच लागले मग बॉसला हाफ डे पायजेच अशी धमकी दिली. थोडं का-कु केलं बॉस ने पण ऐकतय कोण त्याचं. ऑफीसमधुन निघताना त्याला कोण विचारणारे असे मनात ठरवुन मी सगळं प्लॅन केलं. कट्ट्याचा दिवस उजाडला, मी सगळी तयारी करुन ऑफीसला पोहोचले, थोड्यावेळात स्वप्नांची राणी तिथनं निघाली थोड्या अंतरावर तिला सुरंगी ताई भेटणार होती आणि मग दोघी एकत्र येणार होत्या. साधारण लंच टाईमपर्यंत त्या पोहोचतील असा अंदाज बांधुन त्या नुसार काम धडाधड आवरुन उरलेली कामे तशीच टेबलावर टाकुन निघाले , मग काय, कंपनी करते का आपला विचार , मग आपण का करावा तिचा विचार? ८ तास सांगुन १२ तास राबवुन घेते मग मी तिला आज शिक्षा करायची असा विचार करुन निघुन आले लगेच तिथनं.. बॉस गेला होता रोजच्या प्रमाणे मिटींगमधे फुकटचा चहा ढोसायला मग निघाले, पुरेसा वेळ न मिळाल्याने आणि स्वरा आणि सुरंगीताईने सांगितल्या प्रमाणे आम्ही लंच हॉटेलातच करायचा विचार केला होता. स्वराला फोन केल्यावर त्यांनी चिल्हार फाट्यावर वळण घेतले आणि ड्रायव्हरला बोईसरचा रस्ता माहीत असल्याने १८-१९ की.मी. अंतर पार करायला त्यांना २५-३५ मिनिटे लागतील असा अंदाज बांधुन निघाले आणि ते बोईसर स्टेशनवर पोहोचल्यावर ५ मिनीटात त्यांच्या पर्यंत पोहोचले मग त्यांच्याचबरोबर गाडीत बसुन चित्रालयला सरोवर हॉटले मधे जेवायला गेलो. झाला कट्टा आणि खादाडि सुरु. . (दुपारचे जेवण) पोट टम्म फुगल्यावर यांना आधी समुद्रावरची हवा खावडाची असा विचार मनात आला, डहाणुचा समुद्रकीनारा तारापुर आणि चिंचणीच्या समुद्र कीनार्‍यापेक्ष जास्त स्वच्छ असल्याने आणि तिथे जेवायला २-३ चांगले रेस्टॉरंटस असल्याने चिंचणीमार्गे डहाणुला निघालो. पोहोचलो तितक्यात सुरंगीताईने सांगितले की इथे मिस्टर सुरंगीचे आजोळ आहे, त्यांचे मामा - मामी असतील आणि तिला भेटायची इच्छा आहे तर तुम्हाला वेळ असेल तर जाउयात का? आम्ही लगेचच हो म्ह्टलं , काये ना कुणाकडे गेलो तर चहा विचारला जाईलच ना. आणि आम्हाला रोजच्या सवयीने चहाची तलफ लागलीच होती त्यामु़ळे आम्ही एका पायावर तयार झालो. शेवटी काय तर सुरंगीताईच्या मिस्टरांचे आजोळ ते आपलेच आजोळ ना ,मग लाजायचं कशाला, चला हक्काचा चहा पिऊन येऊ नाहीतर मिस्टर सुरंगीच्या मामा मामीला वाईट नाही का हो वाटणार , छ्या छ्या अशा बाबतीत आपण कधी म्हणजे कधी कुणाचं मन दुखवत नाही बघा, निघालो आमचा रथ घेउन पण गंमत अशी की खुप वर्षांनी आल्याने सुरंगीताईला काही रस्ता आठवेना , डहाणु फोर्टपर्यंत विचारत विचारत आलो, मग गणपती बनवण्याच्या कारखान्याचे मालक शिंदे कुठे राहतात हे विचारत असे विचारत विचारतच पोहोचलो, मामीला पाहताच सुरंगी ताई अगदी इमोशनल झाली मग आम्ही तिला मामीबरोबरच सोडली आणि मी आणि स्वप्नांची राणी (स्वरा) जसं आम्ही आमच्याच आजोळी आलोत तस घरात फीरु लागलो. गणपतीचा कारखाना असल्याने गणपतीच्या मुर्त्या बनवणे सुरु होते मला वाटले की आता माघ महीन्याचे गणपती येतील त्याचीच तयारी असेल पण हे तर पुढच्या सप्टेंबर मधे येणार्‍या गणेशोत्सवाची तयाची आतापासुन करायला घेतलीये हे कळले, मग काय, मिपाकर असल्याचे स्फुरण चढले भराभर फोटो काढुन मामांची छोटीशी मुलाखत घेतली. त्यासाठी वेगळा धागा काढणारच आहे. मग ज्यासाठी इतकी आस लाऊन बसलो होतो त्या चहाचा चांगला सुवास आला. वाह चहा पिण्याची अतिशय तलफ लागली असताना माननीय पाहुणे म्हणुन जाउन चहा पिणे कीती सुखावह असते काय वर्णावे. मामा - मामींना आम्हाला भेटुन आनंद झाला आणि आम्हालाही. दोघांचा स्वभाव छान. सुरेख गणपतीच्या मुर्त्या बनवतात मामा. फोटो वगैरे काढुन घेतले आणि निघालो समुद्र किनारा पाहायला. डहाणु पारनाक्यावर आलो आणि गाडी पार्क करुन आम्ही तिघी किनार्‍यावर गेलो. लोकल मधुन उतरल्यावर टीसी जसा टपलेलाच असतो ना तसा एक फोटोग्राफर आम्हाला लांबुन हेरुन टपुनच बसला होता. १० मिनिटात फोटो देतो असं सांगुन फोटो काढु का म्हणुन मागे लागला मग म्हंटलं बाबा तुझ्या घराची जबाबदारीही आमच्यासारख्या पर्यटकांवरच टाकलीये देवाने , काढ एखादा फोटो, तर हा लेकाचा हुश्शार धडाधडा ५-६ फोटो क्लीक केले , आम्ही म्हणालो अरे बाबा एकच फोटो हवाय , बास कर आता मग म्हणे सेल्फी काढतो , अगदी हट्टानेच नाही नाही म्हणुन एकच फोटो दे असं सुनावलं. तोच समोर घोडागाडी दिसली मग काय धाव मारली लगेच , फोटोग्राफर ही धावला मागे मागे म्हणे घोड्याबरोबर तरी फोटो काढुन घ्या, त्याला सांगितला बास कर आता, आहेत आमच्या तिघींकडे मोबाईल, याच्या घरची काळजी केली तर हा आमच्या घराचं बजेट उधळायला निघाला. मग आम्ही तिघींनी घोड्याच्या जवळ, घोडा गाडी चालवताना, मागे बसलेलो असे बरेच फोटो घोडागाडीच्या ड्रायव्हरला आमचे मोबाईल देउन काढायला सांगितले आणि फोटोग्राफर ला जळवला पण त्याची चिकाटी तर बघा जायला निघालो तरी तो मागेच फोटो अजुन हवेत का हे अन ते. शेवटी कसाबसा कटवला त्याला. . . मग आम्ही किनार्‍यावर फिरु लागलो, किनार्‍याजवळच असलेल्या गजानन महाराजांच्या मंदीरात जाउन दर्शन घेतलं , अगदी प्रसन्न वाटलं. . पुन्हा किनार्‍यावर गेलो, सुर्यास्त होत आला होता, छान फोटो काढले , .. . .. . वाळुवर तिघींची नावे लिहिली आणि परत फिरलो. .. चौपाटीवर जाउन तिथल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला नाही तर काय मज्जा? मग मी आणि सुरंगीताईने बर्फाचा गोळा खाऊन चौपाटीला रामराम ठोकला.आणि निघालो नरपडच्या साईबाबा मंदीराकडे. सुरंगी ताई आणि स्वराला तर इथला पुर्ण बोईसर पासुन ते चिंचणीमार्गे डहाणुचा रस्ता आणि नरपडपर्यंतचा सभोवतालचा परीसर खुप आवडला. त्यांना अगदी कोकणाची आठवण येत होती. रस्ते - घरे, अधुन मधुन वरोर आणि वाढवणला रस्त्यावरुन दिसणारा समुद्रकीनारा , खाडी. त्यांना खुपच मज्जा आली. .. नंतर थकुन भागुन पुन्हा बोईसरला निघालो, चित्रालयला सरोवर मधे जेवलो. आता चक्क स्वरा वेज खात असताना मी आणि सुरंगीताईने नॉन व्हेज झोडले. .. .. आलो नंतर घरी, माझे छोटुसे घर दाखवले आणि गप्पा मारत मारत मला केव्हा झोप लागली हे कळालेच नाही. (क्रमशः)

वाचन 10118 प्रतिक्रिया 0