मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काकणे आणि गाळ

पालीचा खंडोबा १ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काळोखभरल्या वाटेवर पाऊल जपून टाक अनाहूत पडलेल्या उल्केचा खडा पायात शिरेल अन् तुझ्या अस्फुट हुंदक्याने संभोगनिद्रेतले गाव जागे होईल. कासाराच्या उकिरंड्यातल्या फुटक्या काकणांची पोरींनी तोरणे केलीत वा-याच्या झुळकीला चुकवून पुढे हो वारा वळला तर काकणे किनकिनतील अन् मन मारणा-या विधवांना शृंगारस्वप्ने पडतील. लुगडे जरा वर उचल लाजेचे भय तुला आहे अंधारास नाही चुकुन पाय अडकेल अन् धुळीचे लोट उठुन वखवखलेल्या कुत्र्याना जागे करतील तेव्हा मात्र अंधारपण लाजेल. नदीत पाय रेट उचलून टाकु नकोस खळखळाटात सोनेरी माश्यांबरोबर मनुष्य मांसाला चटावलेल्या सुसरीही उठतील मग मात्र गाव सोडणे अवघड होईल. वेशीतल्या गावदेवाकडे बघुही नकोस त्याची नजर असतीच तर असे विटाळलेले शरीर घेऊन तुला गाव सोडावेच लागले नसते. पिके भरलेल्या शेताडीतुन हळूच चाल ओल्या लोंब्या उगाच दाणे ओघळतील ते पायाखाली चिरडताच त्यातील दुधाळ स्पर्शाने तुला मातृत्वाची जाणीव होईल मग हेतू साध्य होणार नाही. आता समोर आहे घाटिव विहीर, कित्येक शतकांपासून इथे सतींनी पावित्र्य अर्पण केलय तुही कर ! कुंकू मातिमोल झालं असतानादेखील, तू फुलं माळलीस भाळी तो मोहगंध अन् विटाळलेले शरीर, त्याग ह्या विहिरीत तुझा कित्ता गिरवत कितीतरी नासलेली शरीरे पवित्र होतील अन् समाज पापे करण्यासाठी ह्या विहिरीतला गाळ काढील तेव्हा मात्र पिचलेली काकणे खणखाणतील. विजयकुमार.............. १२ / ०४ / २००९ , मुंबई

वाचन 4229 प्रतिक्रिया 0