मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

निरीक्षण शब्दांच्या अपभ्रंशाचे

बाजीगर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
"सचीन शतकांसाठीच खेळायचा" कपील पा जी म्हणाला,"त्याच्यातल्या क्षमतेला अल्पसंतुष्टवृत्तीमुळे न्याय मिळाला नाही". मी वेगळाच विचार करत होतो. बंगाली साहित्यातून सुंदर नावं आली आहेत,मूळ शची +इंद्र =शचींद्र असावे ,मग उच्चाराला सोपे करण्यासाठी जसा देवेंद्रचा देवेन होतो तसा शचींद्रचा शचीन व पुढे सचीन झाला असावा. (दोन्ही सचीन नी, मैदानावरचा आणि पडद्यावरचा, कर्तृत्वाने आपल्या नावाचे विशेषण तयार केले तो वेगळा विषय !) पेशवाईत आनंदीबाईने राघोबादादाला पेशवाईची गादी मिळण्यासाठी नारायणास 'धरावे ' या हुकूमपत्रात 'ध' चा 'मा' केला होता अशी गोष्ट प्रसिध्द आहे.लहानपणी मी वाचलेल्या दुस-या गोष्टीतील राजा ,शेजारील राज्यातील राजपुत्र हेरगिरी करण्यासाठी आपल्या राज्यात आलाय हे ओळखतो व त्याला टपकवण्यासाठी प्रधानाला तात्काळ कारवाईसाठी एक पत्र पाठवतो आणि यात आपला हात नाही हे भासवण्यासाठी लगेच शिकारीला निघून जातो. ते पत्र दूताकरवी प्रधानाकडे जात असतांना चाणाक्ष राजकन्या 'विषया' क्षणभरच मिळवते व असे काही 'एडीट' करते की राजा शिकारीहून परत यायच्या आत ,प्रधान ती राजकन्या आणि तो राजपुत्र यांचं शुभमंगल करून मोकळा होतो. (त्या राजपुत्रास विष यासी द्यावे या आदेशातील दोन शब्द तीने आपल्या डोळ्यातील काजळ नखावर घेऊन जोडल्यामुळे 'विष' 'यासी' चा 'विषयासी' झाला.(!) ही झाली केलेली गोष्ट पण नकळतही शब्दांमध्ये कसे बदल घडतात याच मला फार कुतूहल वाटतं. काही अपभ्रंश नैसर्गीक आहेत.संस्कृतमधून प्राकृतात येतांना शब्द उच्चाराला सोपे झाले असणार. कृष्नाचा किसना,चक्र चाकवक्र वाकडे ,ग्राम गाव ज्ञान ग्यान,योगी जोगी,गावाकडचा बिगीबिगी हा वेगे (वेगाने) चा अपभ्रंश असावा,युवान चा जवान झाला,शहरी कवींनी त्या पुढे जावून ज्वानी असे ग्रामीण रूप तयार केले. बुध्दीबळ हा खेळ भारतातून अरब ,पर्शीया मध्ये गेला .या खेळाचे मूळ नाव चतुरंग (चतूर् +अंग ,चार अंग किंवा सैन्याचे विभाग) पणअरबीमध्ये 'च' चा 'श' होतो (चाय =शाय) आणिग चा ज झाला,त्यामुळे चतुरंग शतरंज म्हणून प्रसिध्द झाला. मला वाटतं तामिळ लोकांना ह च्या जागीग उच्चार करायची सवय आहे,एकदा मी क्लब मध्ये सहारा टिव्ही चॅनेल पहात होतो,तिकडून मोहन आला व म्हणाला, "काय,सगारा टिव्ही पहातोस? मी म्हणालो, "येस,मोगन" यावर तो चिडल्यावर मी हडबडीने......आपलं......गडबडीने विषय बदलला. त्यांच्यात 'फ' सुध्दा नाहीये,'प' वर कसंबसं भागवतात. केरळी लोकांच्या उच्चारात क चा गहोतो म्हणून प्रकाश होतो प्रगाश,तसेच त चा द होतो म्हणून सतीश होतो सदीश. क्रिकेटमुळे शारजाह प्रसिध्द झालं पण त्याचं स्पेलींग शारका ,उच्चारतांना अरबी उच्चार शारगा .इंग्लिशमध्ये येतांनाकसं शारजाह झालं कुणास ठाऊकपण ते हार जा शी चांगलं जुळलं. अभिमानाची गोष्ट म्हणजे आपली मराठी उच्चारावर आधारीत असल्याने बहुतेक सर्वभाषेतल्या शब्दांचे उच्चार जसे असतील तसे करू शकतो ,याचं गोष्टीचा योग्य उपयोग करून आपण मराठी माध्यमातील मुलांना इंग्लीश शिकवतांना भाषातज्ज्ञ अविनाश बिनीवाले म्हणतात तसे सरळ शब्दांचे मूळ उच्चार का शिकवू नयेत, उदा. खॅन यू गिव्ह मी द बुक आॅन द ठेबल? बिंदास (मूळ बिनधास्त) काय हरकत आहे? काही नावं इंग्लीश मध्ये जावून भ्रष्ट होऊन पुन्हामराठीत आलीत, शीव...सायन. इजिप्शीयन लोकांची ज चा उच्चार ग करायची (अपवाद इजिप्त) पध्दत असते, मौजूद च्या ऐवजी मौगूद वगैरे. त्यांनी राजेश चा रागेश केला (राग नाही येवू द्यायचा नाहीतर नाव सार्थ ठरायचं) जावू दे,त्यांचं काहीतरी व्याकरण असेल. मला आपलं कळतं नाही तर दुस-याभाषेतलं काय कळणार? हिन्दीत र आणि ड यांची का अदलाबदली होते, सिनेमा अनाडी असेल र इंग्लीशमधे अनारी लिहीलेले असते.चोपडा चोप्रा,रबर रबड काही कळत नाही,बहूदा हिन्दीच्या त्या तासाला मी हजर नव्हतो. शेवटी ज्याचा आपल्याला अभिमान वाटतो तो हिंदू हा शब्द आला सिंधूसंकृतीमधून,सिंधू नदीच्या काठावर वसलेल्या संस्कृतीतून. कालांतराने 'स' चा 'ह' झाला जो आमच्या हृदयात जावून बसला. वाटतं.... सांगावं पुन्हा एकदा निवडक ठिकाणी 'ग चा 'स' करून काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत रहाण्या-या, "सर्व से कहो हम हिंदू है " टिप: हा लेख हे एक वरवरचं साधं निरिक्षण आहे, यात गंभीर कोणतचं मतप्रदर्शन नाही

वाचन 2320 प्रतिक्रिया 0