मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

म्हैस माजावर येते

धन्या · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
माज आलाय म्हशीला सालीला. लहानपणी गाय, म्हैस किंवा अगदी एखादया लहान मुलीचा किंवा स्त्रीचा काही कारणास्तव प्रचंड राग आला की ही शिवी आम्ही मुलं देत असू. गाय किंवा म्हशीला दयायची असेल तर समोरासमोर. स्त्री किंवा लहान मुलगी असेल तर ती व्यक्ती नजरेआड झाल्यावर. त्या वयात शब्दांच्या अर्थाशी काही देणं घेणं नसायचं. अर्थात जेव्हा प्रौढ व्यक्तीसुद्धा जेव्हा एखादयाला आई किंवा बहिणीवरुन शिव्या देते तेव्हा त्या व्यक्तीला तरी कुठे त्या शिवीच्या अर्थाशी घेणे देणे असते. शिवी देण्याचा उद्देश मुळी समोरच्या व्यक्तीला "प्रोवोक" करणे हा असतो. परंतू म्हशीला खरोखरीच माज येणे हा मात्र वैतागवाणा प्रकार होता. दिडेकशे उंबरठयाचं गाव आमचं. गावाचा मुख्य व्यवसाय शेती. शेतीला जोड म्हणून शेकडा नव्वद घरांमध्ये गुरं पाळली जायची. गुरं म्हणजे प्रामुख्याने म्हशीच. म्हशीच्या दुधाचा व्यवसाय शेतीला जोडधंदा म्हणून केला जायचा. तीन चार म्हशींच्या जोडीला गोठयात एक बैल जोडी आणि एखाद दुसरी गायही असायची. म्हशींच्या दोन जाती असायच्या. एक गावठी आणी दुसरी गुजरी. म्हणजे तशा म्हशींच्या बर्‍याच जाती असतात, जाफराबादी, मेहसाणा ईत्यादी. परंतू या सार्‍या बाहेरच्या जाती गुजरी मानल्या जायच्या. गावठी म्हशीला दुध कमी असायचे. म्हणून गावठी म्हशींच्या जोडीला गुजरी म्हशीही पाळल्या जायच्या. गायींच्याही अशाच दोन जाती. एक गावठी आणि दुसरी जर्सी. जर्सी गायी खुपच महाग असल्याने आख्ख्या गावात जेमतेम दोन तीन जर्सी गायी असायच्या. गावठी गायीही तशा कमीच असायच्या. गावठी गाय एका वेळेला जेमतेम अर्धा लिटर दुध देते. म्हशीचं दुध पचायला जड असा एक समज असल्यामुळे लहान मुलांना गायीचं दुध दिलं जायचं. तसेच शेतीला बैलही हवे असायचे. म्हणून गायींना फारसं दुध नसतानाही गायी पाळल्या जायच्या. म्हशी बहुधा जोडीने पाळल्या जायच्या. म्हणजे दोन, चार अशा. या जोडयांमधील एक म्हैस दुभती असायची जिला तानी म्हैस म्हटले जायचे. दुसरी म्हैस दुध न देणारी किंवा दुध देणं नुकतंच बंद केलेलं असायची जिला पाडशी म्हैस म्हटलं जायचं. दुध देणं बंद करुन एखाद दुसरा महिना निघून गेला की ही पाडशी म्हैस माजावर यायची. तिला रेडा लावला की गाभण राहायची. म्हशींची अशी जोडी पाळायचे कारण असायचे. म्हैस व्याली की जवळपास दहा महिने दुध देते. या दुध देणार्‍या तान्या म्हशीने पाडशी होऊन दुध देणं बंद करेपर्यंत दुसरी दुध न देणारी पाडशी म्हैस गाभण राहून व्यायल्यानंतर दुध देउ लागायची. या तानी पाडशीच्या चक्रामुळे दर वेळी नविन म्हैस घ्यायची गरज नसायची. त्यामुळे पंधरा वीस हजार वाचायचे. अर्थात या चक्रात कधी कधी खंडही पडायचा. कधी म्हैस चरायला गेली असताना हरवायची, कधी तिवा य गुरांच्या जिवघेण्या रोगाने मरायची तर कधी कोकण रेल्वेच्या ट्रॅकवर रेल्वेच्या धडकेने मरायची. अशा वेळी नवी म्हैस घेण्याशिवाय पर्याय नसायचा. आम्हा लहान मुलांना गुरं चरायला न्यावी लागायची. सकाळी शाळेत जाण्यापूर्वी दोन तीन तास वेळ असायचा. सकाळी सातला गुरं चरायला नेली की दहा वाजेपर्यंत चरायची. दहाला त्यांना पाण्यावर नेऊन सव्वा-दहा साडे दहा पर्यंत शाळेत जाण्यासाठी घरी. गुरांकडे गेल्यावर गुरे डोंगरावर किंवा माळरानावर लावून देऊन आम्ही खुप धमाल करायचो. विटी दांडू खेळायचो. बाजूच्या काळ नदीत मनसोक्त डुंबायचो. आंबा करवंदांच्या हंगामात तर मज्जाच असायची. हे असं चालू असताना दहाएक महिने झाल्यानंतर तानी म्हैस दुध देणं बंद करायची. अजून एखादा महिना झाला की माजावर यायची. पाडशी झालेली म्हैस थोडयाच दिवसात माजावर येणार हे आम्हालाही कळायचं. अशा म्हशीचं जननांग सुजू लागायचे. शेपटीच्या खाली जननांगाच्या बाजूला चिकट द्रव जमा होऊ लागायचा. आणि अचानक एक दिवस म्हैस सतत ओरडू लागायची. दर दोन तीन मिनिटांनी हंबरडा फोडायची. जर म्हैस चरायला नेली असेल तर बेफाम उधळायची, वाट सापडेल तिकडे पळायची. ही सारी म्हैस माजावर आल्याची लक्षणं असायची. ही माजावर आलेललीम्हैस गोठयातच बांधलेली असेल तर ठीक. जर ती चरायला नेली असताना माजावर आली तर मात्र आम्हा मुलांना मोठी डोकेदुखी असायची. बेफाम उधळलेल्या म्हशीला आवरुन घरी आणणं खुप अवघड काम असायचं. हे सारं होत असताना म्हशीचा हंबरडा अखंड चालूच असायचा. जशी काय ती रेडयाला सादच घालत असायची. म्हैस पाळणे हा व्यवसाय असल्यामुळे माजावर आलेल्या म्हशीला चांगला रेडा लावणे आवश्यक असायचे. आजुबाजूच्या दोन चार गावांपैकी एखादया गावामध्ये खास म्हशीला लावण्यासाठी एखादा मस्तवाल रेडा पाळलेला असायचा. रेडयाचा मालक रेडयाला म्हशीवर सोडण्याचे पन्नास रुपये घ्यायचा. माजावर आलेल्या म्हशीला मग बैलगाडीला बांधून रेडा असलेल्या गावी नेले जायचे. सोबत आम्हा गुराख्यांची वरात असायचीच. म्हशीचं रेडयाला साद घालणंही अखंड चालू असायचं. ही वरात जात असताना आजूबाजुने जाणारेही विचारायचे, "माज आलाय काय?". त्या रेडयाच्या गावात पोहोचेपर्यंत दोघे तीघे जण तरी असं विचारायचे. बैलगाडी रेडयाच्या मालकाच्या गोठयाजवळ थांबायची. म्हशीला जवळच्याच एखाद्या मोठया झाडाच्या बुंध्याला घट्ट बांधले जायचे. रेडयाच्या मालकाला बोलावले जायचे. म्हशीच्या अखंड साद घालण्याने गोठयात बांधलेला रेडाही एव्हाना अस्वस्थ होउन थयथय नाचू लागलेला असायचा. रेडयाचा मालक कसाबसा त्या रेडयाचं दावं सोडायचा. दावं सुटताच रेडा थेट म्हशीकडे धाव घ्यायचा. रेडा व्यवस्थित लागण्यावर पुढचा वर्षभराचा दुधाचा व्यवसाय अवलंबून असल्याने म्हैसवाले आणि रेडयाचा मालक कुठलाच धोका पत्करायला तयार नसायचे. एव्हाना त्या गावातील रिकामटेकडयांचीही गर्दी जमलेली असायची. म्हशीच्या शेपटीमुळे रेडयाचं काम अडू नये म्हणून गर्दीतील कुणीतरी हौशी म्हशीची शेपटी वर उचलत उचलत असे. कहर म्हणजे रेडयाचा मालक रेडयाचं जननांग हातात पकडून त्याला दिशा दाखवत असे. रेडयाचं काम एकदा झालं की रेडा शांत व्हायचा. पण म्हशीकडची मंडळी एव्हढयावर समाधानी नसायची. शेवटी वर्षभराच्या दुधाच्या व्यवसायाचा प्रश्न असायचा. न जाणो रेडयाच्या एका दमाने काम झालं नाही तर. म्हणून रेडयाला पुन्हा पुन्हा म्हशीजवळ नेलं जायचं. त्या बिचार्‍याची पुढे काही करायची ईच्छा नसायची म्हणून मग आजुबाजूचे बघे "हुर्र हुर्र" असा विचित्र आवाज काढायचे. कसं कोण जाणे पण त्या आवाजाने रेडयाला पुन्हा चेव यायचा. आणि पुन्हा सारं व्हायचं. हे असं तीन वेळा झालं की "झक्कास झालं" असं म्हणून रेडयाच्या मालकाला पैसे दिले जायचे. म्हशीचा हंबरडा बंद झालेला असायचा. रेडाही म्हशीपासून दुर गेलेला असायचा. म्हशीला पुन्हा एकदा बैलगाडीला बांधून आम्ही परतीच्या प्रवासाला लागायचो. ********************************************************************************* यथावकाश माझं शिक्षण पुर्ण झालं. शिक्षणाने जगण्याचा कॉन्टेक्स्ट पुर्णपणे बदलून गेला. बालपणीच्या सार्‍या आठवणी कुणा परक्याच्या बालपणीच्या आठवणींचं पुस्तक मिटून ठेवावं अशा मनाच्या कप्प्यात बंद झाल्या. परवा बाईकवरुन सिंहगड प्रदक्षिणा करताना पाबे घाटात वल्लीने गाय आणि बैलाचं बागडणं दाखवलं आणि मी त्याला वर्षातून किमान दोन वेळा होणार्‍या म्हशीला रेडा लावण्याच्या सोहळ्याचे वर्णन केले. योगायोगाची गोष्ट अशी की पाबे घाट उतरुन राजगड आणि तोरणा मागे टाकल्यावर एका गावी हे रेडा लावणे पाहायला मिळालं. इथेही फार वेगळं नव्हतं. वल्ली यावर लिहि अस म्हणाला. अशा वेगळ्या विषयावर लिहिणं थोडं अवघड होतं. पण विचार केला, जे आपण वयाच्या तेराव्या चौदाव्या वर्षी पाहिलं ते मिपाचे वाचकही समजून घेतील. लेखात कुठे खटकण्याजोगं जाणवलं तर ती माझ्या लेखनाची मर्यादा समजून सांभाळून घ्यावं.

वाचन 97476 प्रतिक्रिया 0