मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सहानुभूती आणि प्रत्यक्ष कृती

लिखाळ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नमस्कार, लहानपणापासूनच आपण परोपकाराय पुण्याय वगैरे ऐकत आलेलो असतो. अगदी पाठ्यपुस्तकांतसुद्धा दुसर्‍याला मदत करुन मोठ्यांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या मुलांच्या कथा आपल्यावर संस्कार व्हावा म्हणून दिलेल्या असतात. त्यामुळे दुसर्‍याला मदत करायची असते हे कुणी मुद्दामहुन शिकवण्याची गरज असते असे मला तरी कधी वाटले नसते. पण एक प्रसंग अचानक घडला की ज्यामुळे मला शिकवण आणि प्रत्यक्ष कृती यात काय फरक असतो ते समजले. मी शाळकरी असतानाचा प्रसंग आहे. अगदी लहान नव्हतो. दहावीत वगैरे असेन. गणपती उत्सवाच्या वेळी आम्ही काही मित्र गणपतीचे देखावे पाहायला गेलो होतो. सोबत तीन-चार वर्षे वयांत अंतर असलेले आम्ही चौघे पाच मित्र होतो. मजा करत, हास्य विनोद करत आम्ही चाललो होतो. तेव्हढ्यात आम्हाला दिसले की पदपथावर एक अपंगाच्या चाकाच्या गाडीमध्ये मध्यमवयीन माणूस बसला आहे आणि तो इतरांकडे काही मदतीच्या अपेक्षेने पाहतो आहे. त्याने आम्हा मुलांना बोलावले आणि त्याची गाडी ढकलून थोडे अंतर चढ पार करुन द्यायला सांगितले. त्याचे ते अतिशय ओंगळ रुप, अत्यंत मळलेले फाटके आणि एकावर एक चढवलेले कपडे आणि रोगट त्वचा अंगावर काटा आणत होती. आजवर झालेल्या पुस्तकी संस्कारांनी डोके वर काढले पण कृती करायला मन धजेना. तेव्हड्यात आमच्यातला एक जण उत्साहाने पुढे आला आणि त्याने त्या माणसाला ढकलत पुढे नेऊन सोडले. हे सर्व इतक्या जलद गतीने झाले की मी मनामध्ये एकदम खजील झालो. वास्तविक मी ती गाडी ढकलायला तयार नाही हे माझ्या व्यतिरिक्त कुणालाच समजले नाही करण माझ्या मनातली उलघाल सुरु होत असतानाच माझा मित्र पुढे झाला सुद्धा होता. अश्या ओंगळ किंवा किळस उत्पन्न करणार्‍या पण असहाय्य व्यक्तींबद्दल आपल्या मनात सहानुभूती असते. त्यांना मदत करावी असे ही समाजातला एक चांगला घटक म्हणून आपल्याला वाटत असते. पण सार्वजनिक ठिकाणी अशी वेळ आल्यावर माणसे चटकन तो प्रसंग टाळायला पाहतात असे मला निरिक्षणातून जाणवले आहे. असे का व्हावे असा विचार आता करताना वाटले की अश्या वेळी अश्या माणसासोबत काही क्षण सुद्धा आपण आहोत ही भावना आपल्याला सहन होत नाही. पण पोक्त माणसे या भावनेवर विजय मिळवून कृती करतात. -- लिखाळ.

वाचन 6768 प्रतिक्रिया 0