मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एका गांधीवाद्याच्या समर्थनार्थ

धनंजय · · काथ्याकूट
येथे श्री कलंत्री यांनी चालू केलेल्या गांधीवादी लेखमालेच्या अनुषंगाने मी हा प्रतिसाद (वेगळे चर्चासत्र म्हणून) देत आहे. श्री. कलंत्री यांनी सुचवलेली कार्यवाही मला पटलेली नाही, पण मी येथे पूर्णपणे त्यांच्या समर्थनार्थ लिहिणार आहे. या संकेतस्थळावर श्रद्धेच्या महतीबद्दल गप्पा मारणार्‍यांनी एका अश्रद्ध माणसाकडून हे ऐकून घ्यावे - श्री कलंत्री यांची श्रद्धा धाडसी आहे, आणि नि:शस्त्र लोकांना गोळ्या घालणार्‍या श्रद्धावानांसारखी भ्याड नाही. श्री. कलंत्री यांना "तुम्ही अतिरेक्यांचे मतपरिवर्तन करायला जा" म्हणणारे लोक स्वतः काय करू इच्छितात? त्यांनी स्वतः वर्दी चढवलेली आहे? त्यांना स्वतःला उभारायचे आहे कुठले प्रति-लष्कर-ए-तैयबा आणि जायचे आहे होड्या घेऊन पाकिस्तानात त्या अतिरेक्यांना मारायला? छे - नव्हे, भारताच्या लष्कराच्या खांद्यावरून बंदुका झाडताना बहुधा त्यांची निशाणी त्यांच्या नावडत्या पक्षाचे भारतातले सरकार आहे. श्री. कलंत्री यांनी माणुसकीबद्दल श्रद्धा दाखवली आहे. "श्रद्धा-श्रद्धा" स्तोम माजवणार्‍यांनी त्यांना समजून तरी घ्यावे. मला त्यांचा कार्यक्रम पटला नाही तरी माणुसकी दिसते. मला हा "वेताळाचा हट्ट" वाटत नाही. अतिरेक्यांपेक्षाही "नि:शब्द करणारा" वार वाटत नाही. श्री. कलंत्री माझ्यासारखे इंटर्नेटवरून टोपणनावाच्या मागे सुरक्षित नाहीत. (माझी पूर्ण ओळख पुष्कळांना आहे, ही बाब अलाहिदा.) मिसळपावाच्या अनेक सदस्यांना ते भेटलेले आहेत. त्यांच्या शिव्या प्रत्यक्ष झेलण्याची, मिसळपावाच्या सदस्यांपैकी "नडगी-फोड" तरुणांकडून धक्काबुक्की सहन करण्याची शक्यता ते जाणतात. (एवढे असून कट्टा भरवण्यात, अन्य सदस्यांना सामोरे जाण्यास ते पुढाकार घेत आहेत.) या प्रकारचे नैतिक धैर्य माझ्यात नाही. पण ज्या माणसात तसे धैर्य आहे, त्याच्याविषयी माझ्या मनात आदर आहे. अशी माणसे स्वतंत्रपणे वावरू शकावीत हे मिसळपावाचे सौभाग्य आहे. यासाठी भारत स्वतंत्र आहे - अनुशासनपर्वात बांधलेला नाही. एकनाथांची अशी कथा आहे, की एकदा गोदावरीच्या घाटावरती स्नान केल्यानंतर कोण्या मुसलमानाने त्यांच्यावर थुंकले. एकनाथांनी पुन्हा स्नान केले, पुन्हा तो पाजी माणूस अंगावर थुंकला - असे शंभर वेळा झाले. शेवटी तो माणूस शरमून म्हणाला - माझे चुकले. तर एकनाथ म्हणाले, "छे, छे, तुझ्यामुळे माझी शंभर गोदास्नाने झालीत." माझा सल्ला मागितला असता, तर वागणे एकनाथांपेक्षा वेगळे असावे. अशा परिस्थितीत माझे वागणे वेगळे असेलच. पण म्हणून एकनाथांना मी कमी लेखू लागलो, तर थू माझ्यावर. एकनाथांचे कुठलेही साहित्य "अतिरेकाइतके थंड करणारे" मानू लागलो, एकनाथांना "विक्रमाचा वेताळ" मानू लागलो तर ती माझ्या लहान बुद्धीची मला कोणी जाणीव करून द्यावी. श्री. कलंत्री हे बहुधा स्वत:ला एकनाथ मानत नाहीत. पण यांची माणूसकी, त्यांची विचारशक्ती कायम राहावी; त्यांच्या विचारांना विरोध करताना, त्यांच्या विचारात सत्याचे काही बीज असू शकेल ही मला जाणीव राहावी; म्हणून मी त्यांचे समर्थन करत आहे.

वाचन 16490 प्रतिक्रिया 0