मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उजवे - डावे प्रतिसाद ..??..

माहितगार · · जनातलं, मनातलं
"मयूरपंथाच्या पुर्नजन्मापर्यंत" हा धागा लेख मी डिसेंबर २०१४च्या आसपास लिहिला गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत इसीस नावाच एक दमनचक्र इराक नावाच्या देशात दाखल झाल आता सावकाश पडद्या आड जाताना दिसते आहे. अग्दीच सिंजारचा पहाड आमेरीकन प्रयत्नांनी सोडवून घेतला नाही तो पर्यंत याझिदींच्या बातम्या मुखमृष्ठावर होत्या त्या आताही आहेत पण तुमच्या समोर मुखपृष्ठावर येत नाहीत एवढेच. एकवीसाव्या शतकात एखाद्या समुहाला वंशसंहाराला सामोरे जावे लागेल असा विचारही येऊ नये त्या काळात इराक मध्ये याझिदी समुदायावर गेली तीन साडेतीन वर्षे उघड दमनचक्र चालले. युद्धा दरम्यान स्त्रीया आणि मुलांवर कठीण प्रसंग येतात त्याची या पुर्वीच्या माहितींचे स्वरुप ऐकीव होते. याझीदी पुरुष महिला आणि बालकांना गेल्या तीन वर्षात जे झेलावे लागले ते जगाच्या इतिहासात ऐकीव नव्हे तर नोंदीकृत म्हणून दाखल झालेले असेल. अजूनही एकएक याझीदी शोधण्याचा प्रयत्न चालू आहे आणि अत्याचाराची एक एक बातमी बाहेर पडत आहे फक्त गूगग बातम्यात Yazidi शब्द टाकला तरी वाचण्यास नकोशा वाटणार्‍या अत्याचारांच्या बातम्यांची रांग दिसते. युरोमेरीकनांनी नाही म्हटले तरी त्यांच्या संरक्षण आणि त्यांना आश्रय देण्यासाठी फुल नाही पण फुलाची पाकळी तरी योगदान दिलेले दिसते.हे पहातानाच भारतीय भूमीके बद्दल गंमत वाटते. म्हणावयास उजवे सरकार केंद्रात आहे. याझिदींकरता आश्रय शिक्षणादी सुविधांवर भारत सरकारने काही केले असल्याचे किमान जाहीरपणे ऐकीवात नाही,(चुभूदेघे) काही केले असल्यास जाणून घेण्यास आवडेल. कोणत्याही युद्धांतर्गत झालेल्या अत्याचारकर्त्यांना धर्माची लेबले लावून न पहाणे अधिक यूक्त पण केलेल्या अत्याचारांना कुठल्यातरी ग्रंथातले काडीचे तात्वीक आधार देण्याचे प्रयत्न झाले हे कसे नाकारता येईल ? याच कालावधीत भारतीय कथीत डावे आणि पुरोगामींची वाचाळता सक्रीय दिसते पण याझीदींवरील अत्याचारांची त्यांनी किती समतोल दखल घेतली आणि भारत सरकारवर त्यांना मदत देण्यासाठी कोणकोणत्या प्रकारे दबाव आणला हे केव्हातरी समजू शकेल का ? अत्याचार करणार्‍यांनी जे काडीचे आधार घेतले त्या आधारांवर कितपत जोरकसपणे टिका केली हाही अभ्यासाचा विषय असावा. आणि मग पुरोगाम्यांना उजवे तथाकथित हे विशेषण लावत असतील तर त्या विशेषणाबाबत नाही म्हटले तरी सहानुभूतीची क्षेत्रे निर्माण होण्याची शक्यता असते किंवा कसे ? असो. एक कुपर्व संपले. माझा डिसेंबर २०१४ मधील धागा लेख खाली आहेच. मी धागा लेखाचे वर नवे शीर्षक देऊन काही खुपलेले नोंदवले एवढेच. मयूरपंथाच्या पुर्नजन्मापर्यंत (ऐसी अक्षरेवर पुर्वप्रकाशीत, पण सोबतीला सद्य बातमीने अद्ययावत) भारतात दहाव्या का बाराव्या दिवशी गोडाचं जेवण देतात; आफ्रीकन योरुबा जमातीत दहाव्याला जवळपास लग्नाच्या कार्यक्रमा सारख वातवरण असत म्हणजे नातेवाईकांना नवे कपडे देणे जेवण संगीत आणि नृत्य का ? तर, मयत हा फक्त शरीर बदलण्या पुरता वर गेलेला असतो आणि लहान मुलांच्या स्वरुपात त्याच कुटूंबात पुन्हा जन्मणार असतो. आपल्याकडेही आधीच्या पिढीतल्या माणसांचच नाव पुन्हा नवीन जन्मणार्‍या लहान मुलांना देण्याची प्रथा होतीच. पुर्नजन्मावर विश्वास ठेवणे हे भारतीयच करतात असे नव्हे. इराकच्या निनेवेह प्रांतातील (अत्यल्पसंख्यंक) याझिदी जमात सुद्धा शरीर म्हणजे कपडे आणि मृत्यू म्हणजे केवळ कपडे बदलणे असा विचार करते. भारतीयांप्रमाणेच मृत्यूपथावर असलेल्या अथवा मृताला घोटभर पाणी पाजणे हा प्रकार यांच्यात आहेच पण अजून एक साम्य म्हणजे शनी किंवा गणेशाची विघ्नकर्ते असून सुद्धा आपण आराधना करतो, तशी त्यांच्या श्रद्धेतील विघ्नकर्त्यांची आराधना ते त्यांच्या पद्धतीने करतात. सोबतीला तावूस या नावाने देवदूताचे मुख्य प्रतीक म्हणून मोर या पक्षाची चक्क मुर्ती पुजा केली जाते. त्यांची स्वतःची कालगणना आहे त्यानूसार सहाएक हजारवर्षांपासून तरी त्यांचा हा पंथ पृथ्वी तलावर आहे. मुख्यत्वे इराकच्या कुर्दीस्ताना जवळील निनेवेह प्रांतातील ह्या पंथाचे लोक आर्मेनियासहीत पुर्वाश्रमीच्या सोव्हीएत संघातील अनेक प्रांतातून अत्यल्पसंख्याक म्हणून आपले अस्तीत्व जपून आहेत. पण मुख्य सांस्कृतिक केंद्र म्हणजे ननिनेवेह प्रांतातील मोसूल जवळील शेखान आणि सिंजार च्या ग्रामीण भागात. भारतात अशा प्रकारच्या श्रद्धा सहजपणे समजून घेतल्या जाऊ शकतात; पण इस्लाम पोहोचल्या पासून पुढची सर्व म्ह्णजे आतापर्यंत जवळपास १३ शतके पुर्वीच्या इस्लामी ओटोमन साम्राज्यात असो वा आताच्या इराकात अशा प्रकारच्या श्रद्धा म्हणजे जणू सैतानीच ! या जमातीच दुर्दैव म्हणजे ज्युडायिक धर्मियांप्रमाणे त्यांची जमात आदम आणि इव्ह पासून आल्याचे ते मानत नाहीत यांना देवाने पाठवलेल्या देवदूताने देवाच्याच आज्ञेवरून आदम पुढे झुकण्यास नकार दिला; इस्लाम मधील काही विश्वासांनुसार सैतान सुद्धा बाबाआदमचा सत्कार न करता देवाज्ञा मोडतो त्यामुळे या याझिदी जमाती बद्दल इस्लामी लोकात मोठे गैर समज आहेत. एवढी सगळी शतके इस्लामी राज्यात अशा प्रकारचा विश्वास ठेऊन तग धरणे कोणत्याही जमातीला अशक्य ठरावयास हवे, पण हि मंडळीही स्वतःच्या श्रद्धा अत्यंत अवघड परिस्थितीतही सांभाळण्यात कडवी पण आजू बाजूच्या ज्युडायीक आणि मुख्यत्वे इस्लामी बहुसंख्यकांशी जुळवून तर घेतले पाहीजे, मग स्वतः मूळची सूर्य पुजक असलेली हि जमात अस्तीत्व टिकवण्यासाठी बाकीच्या जगाला पुस्तक पुजक असल्याची लोणकडी देऊ लागली. कुणी इस्लामी संत सुद्धा यांनी आपल्याच देवदुताचा अवतार म्हणून आपलासा करून घेतला. बाकी धार्मीक रिती रिवाजात, जमाती-बाहेरच्यांना मुर्तीपुजा विषयक गोपनीयता राखण्यासाठी म्हणून हे लोक फिरकु देत नाहीत. पण सोबतीला गोपनीयतेमुळे अविश्वास अधीकच वाढतही असावा. अनेक वेळा मानवीसंहार घडवला जाऊन सुद्धा जरासे ग्रामिण भागात आड बाजुला असल्यामुळे असेल आणि आजूबाजुच्या प्रांतातील कुर्द, शिया इत्यादी लोकांना, यांच्या श्रद्धा पटणार्‍या नसल्यातरीही त्यांचे अस्तीत्व मुळा पासून पुसले नाही. सोबतीला सद्दामही कुर्दप्रेमी नसला तरी नावाला तरी सेक्युलर राजवट बाळगून होता त्यामुळे या जमातीचे अस्तीत्व पुर्ण पुसले गेले नव्हते. युरोपीय पर्यटक अभ्यासक मंडळींनी यांच्या श्रद्धांचा मागोवा घेतला नसता तर बाकीच्या जगाला त्या टिकुन असलेल्या आदिम परंपरांची माहितीही फारशी झाली नसती; अभ्यासकांचा अभ्यास झाला पण त्यांनी त्यांच्या सांस्कृतीक अस्तीत्वासाठी बाळगलेली गोपनीयतेचे कवच ढासळले. आमेरिकी महत्वाकांक्षेनी सद्दामची सेक्युलर राजवट संपुष्टात येताना या छोटाश्या समुहाने अमेरीकनांचे स्वागतच केले, पण इराक स्वतःच अस्तीत्व स्वबळावर टिकवण्याच्या आधीच ही आमेरिकन मंडळी मायघरी परतली, ती या याझिदी जमातीला अधीकच संकटात सोडून; एकविसाव्या शतकाच्या १४ व्या वर्षी या जमातीचे एका आदिम संस्कृतीचे अस्तीत्व आणि प्राण कंठाशी येतील अशा स्थितीत. मरणासन्न माणसाला घोटभर पाणि देणारा याझिदी, इराक मधल्या नव्या मुलतत्ववादा पासून प्राण वाचवण्यासाठी डोंगर आणि गुहां चढू लागला; खाली राहीला तर प्राण राहणार नाही, डोंगर चढला तर मरताना पिण्यासाठी घोटभर पाणीही मिळणार नाही अशा स्थितीत. आमेरीकन दबावा खाली इराकी वायू सेना आकाशातन अन्न पाण्याची पाकीट टाकते आहे, एक वेळ अन्न खाता येईल एवढ्या उंचीवरून टाकलेली पिण्याच पाणी मात्र हाती न लागताच डोंगराच्या मातीत जात असणार. पु.शि. रेग्यांच्या सावित्री कादंबरीत युद्धकाळात सैरभैर होण्याच वर्णन येत, पण एकदाचं युद्ध संपत आकाशातली युद्ध विमान निघून जातात आणि सावकाशपणे हसरी आनंदी संस्कृती पुन्हा एकदा उदयास येऊ लागते, तसे ह्या मयुरपंथी याझिदी जमातीमागची इडा पिडा टळून पुन्हा एकदा त्यांच्या श्रद्धांना त्यांच्या परीने आनंदा जगू देणारा सांस्कृतीक पुर्नजन्म मिळून मृत्यूचा थयथयाट संपून त्यांच्या जीवनाचं चक्र पुन्हा सुरु होईल, या शुभेच्छा आपण देऊ शकतो आणि मृत्यूचा थयथयाट माजवणार्‍यांना 'गेट वेल सून' या शुभेच्छाच त्या काय आपण देऊ शकतो नाही का ? (अद्ययावत माहिती. इराक मधून येत असलेल्या बातम्यांनूसार आमेरीकी वायुसेनेच्या छत्र-साहाय्याने, सिंजार आणि लगतच्या डोंगरांना असलेला अतीरेक्यांचा वेढा तोडण्यात कुर्दीस्तानी पेशमर्गा लढवय्यांना यश येत असल्याच्या बातम्या आहेत. पण अतीरेक्यांचा पूर्ण पाडाव होऊन मुख्य इराकचे स्वतचे सैन्य आणि व्यवस्था स्वतच्या पायावर उभी टाकून स्थैर्य लाभून मोकळा आश्वासक श्वास घेण्यासाठी किमान ३-४ वर्षांचा कालावधी जाईल असे सामरीक तज्ञांना वाटत असल्याचे बातम्यांवरून दिसते आहे. संदर्भ ) संदर्भ : १) याझिदी (इंग्रजी विकिपीडिया) २) एकोणिसाव्या शतकात युरोपीयनांनी घेतलेल्या याझिदींच्या सांस्कृतीक नोंदीचे आंतरजालावर मिळालेले टिपण ३) गूगल बातम्यातून वाचलेली विवीध वृत्ते जॉर्जीया देशातील पारंपारीक वेशभूषा केलेला याझिदी माणूस (चित्र सौजन्य इंग्रजी विकिपीडिया)

वाचन 8750 प्रतिक्रिया 0