मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बोगदा

संजय क्षीरसागर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
समोर आणि मागे ...वर आणि खाली ..या बाजूला अन त्या बाजूला एक लांबलचक अंधारा बोगदा.. (रस्त्याच्या खालून तर चालत नाहीये ना मी?) बोगद्यात प्रवेश करताना वाटत होतं, हां हां म्हणता संपेल तो. पण जसजसं आत जाऊ तसं अंधार दाटतच चाललाय ...अंतराचा ठाव लागेना झालाय... (`कशाला मारली झक' असं आता वाटतंय... पण काय उपयोग?) मी जात आहे..की येत आहे ? (आयचा घो! रिवर्समधे चालतोयं की काय?) ..आता संपेल , मग संपेल असे वाटणारा हा बोगदा संपत तर नाहीच..पण आणखी आणखी अरुंद होत चाललाय. डोळे उघडले काय अन मिटले काय, सारखेच..! (माझे डोळे उघडे आहेत का बंद? पण आता हे सांगणार तरी कोण?) वाटचाल अवघड म्हणता म्हणता अशक्य होत चाललीय...मघापर्यंत पाउल तरी पुढे (की मागे ?) पडत होतं ! पण आता तर बोटही हलवणं अशक्य झालंय... (बहुतेक माझी एमाराय चाललीये ! अजिबातच हालता येत नाहीये) ओह. काय करू ? किंबहुना काही करण्याचा ऑप्शन मला आहे का ? (एमाराय कुणी करायला सांगितली होती बरं?) ..आतापर्यंत तरी जे केलं ते ‘मी’च केलं का ? मला काही पर्याय होता का ? ( `ऐकावे डॉक्टरचे आणि करावे मनाचे' हेच खरं!) माझी वाट चुकली आहे का ? (यालाच `वाट लागली' म्हणतात का? पण आता `वाट पाहाण्याशिवाय' हातात काये ?) किती काळ गेला समजत नाही. काळ ही संकल्पनाच या बोगद्यात अर्थशून्य ठरली आहे... (पुन्हा तोच प्रश्न डोळे उघडेत का बंद? आणि ते सुद्धा कोण ठरवणार, मी की बोगदा?) ....अं ? हा आवाज कसला ? खरंच आवाज येतो आहे की चाहुलीला आसावलेल्या माझ्या कानांना भास होतो आहे ? कोण ते हसतंय ? हे सुपरिचित असे मंद शांत सूर कुठून ऐकू येताहेत ? (हल्ली पेशंटला एमारायमधे बासरी ऐकवतात असं दिसतंय!) कुणाचं तरी निकट सान्निध्य जाणवतंय ... फार फार पूर्वी लहानपणी, स्मृती पोचते तिथपासून, अगदी श्वाससुद्धा घेता येत नव्हता तेव्हापासून माझा प्रेमानं सांभाळ करणारं कुणीतरी...तोच का तू ? (का मीच तो? आयला, काय लफडा आहे हा? `मी' तू आहेस की `तू' मी आहेस? कोण कुणाशी बोलतंय?) अन इथे कसा अवचित समोर आलास ? (तू समोरून आलास का मागून हा खरा प्रश्न आहे! ....पण तो नंतर सोडवू.) ...ओह आता मी तुला ओळखले आहे..तू तो अंती असणारा आहेस..सगळं काही अखेर ज्याच्याकडेच जातं तो.. ..नाही, नाही, पण तू तर सुरुवातीला पण होतास..! ..जेव्हा मी एक बिंदूसुद्धा नसेन, तेव्हापासून तूच तर सोबत होतास..! म्हणजे तू अंती नव्हे तर आदि...! (अरे, आता आलं लक्षात तू आदी उर्फ अ‍ॅडी (किराणावाला)! आणि मी आँटी!) हसू नको..मी ओळखलंय तुला. तूच तो ! तू..माझ्या अंतर्यामी राहून दिशा देणारा, माझे चलन वलन, वहन-भरण करणारा ...योगक्षेम चालवणारा आत्मन ! माझेच शुद्ध केवल स्वरूप..! (येस, अ‍ॅड्या वाणी! कडकीत सुद्धा वाणसामान देणारा आणि मला शुद्ध डालडा देणारा तो तूच!) ..जनधिक्काराच्या अंधारात चाचपडताना थेंबाथेंबाने मी गलितगात्र होताना, मति तर्क अन मार्ग सारे खुंटले होते तेव्हा, विजेसारख्या क्षुल्लक गोष्टीचे बील थकले होते तेव्हा, तूच ना नवा मार्ग सुचवलास ? (`आज उधार उद्या रोख' हाच तो वाणसामानाचा मार्ग आणि शेजार्‍याकडून टेंपरवारी कनेक्शन घेऊन घर उजळवून टाकलं होतस, आठवतंय?) ..होय. आता माझ्या थोडं थोडं लक्षात येऊ लागलंय...मागे वळून पाहताना काही काही उमज पडू लागला आहे. ...पुष्कळदा मला वाटत होतं मला निर्णय घ्यायचा आहे.. (आता तरी बीलं भरु का नको? चालललंय ते काय वाईट आहे?) पण आता उमगतंय, ..निर्णय घेतले ते ‘मी’ नाही, तर माझ्या पूर्वकर्मांनी, ... त्या कर्मांच्या वेळोवेळी समोर ठाकलेल्या परिणामस्वरूप परिस्थितीने... (ज्ञानीजनांनी पूर्वीच सांगितलंय `नाईलाज को क्या इलाज? आणि सिनियर सिटिझन्स म्हणतात ते, `कर्म माझं!' म्हणजे हेच असावं) निर्णयाचे योग्य पर्याय अर्थात होते..पण अज्ञानाच्या धुक्यामुळे मी ते जाणले नाहीत. ...केवळ घेतले म्हणून काही निर्णय अंमलात आणले...कधी स्वत;च्या कधी इतरांच्या मतानं कर्म पार पाडले. (आयला, संपतेयं का नाही ही एमाराय?) होय.. तुझ्यासाठीच केली सर्व कर्मे..कधी भली कधी बुरी..कृष्ण अन धवल..सुचेल तसं केलं. आल्या क्षणाला साजरं केलं त्या कर्माच्या आहुतीनं (अरे, गॅस कोण फुकटात देणार? तिथे पैशाची आहुती द्यावीच लागली) कधी तू समोर असायचास, कधी वळणापलीकडे ! तुझे इशारे कधी कधी समजलेच नाहीत. कधी समजूनसुद्धा दुर्लक्ष केलं मी ! पण परिणाम भोगायला अन उपभोगायला लागले मात्र आपणा दोघांना ! एकत्रित.. (म्हणजे बीलं थकवायची मी आणि परिणाम मात्र `एकत्रित'! दैवी चमत्कार म्हणतात तो हाच) या काळोख्या बोगद्यातला प्रवेश ही त्याचीच तर परिणीती नव्हे ? (तू बोगद्यात आहेस का बाहेर? आणि एकावेळी दोघांचा एमाराय कसा चालूये?) ..यावेळी तुझे हास्य मघासारखे मुक्त नाही...! (बील वाढलं की काय?) ...समजलं ! कधीतरी काहीतरी चुकलंय. नाही समजत, नक्की कधी अन कुठं...पण चुकलंय खरं ! पश्चात्ताप.. ? हं..चूक समजेल तर ना पश्चात्ताप ? (छे, छे, रामराया, सोडव रे या हिवतापातून) पण खोल तळाशी एक खात्री आहे रे..रस्ते चुकले असतील पण इरादे नक्कीच चुकीचे नव्हते. जन्म घेणं हातात नव्हतं पण जन्म घेतल्यावर जमेल तितके हातपाय हलवले, काही दिशा ठरवून मार्ग शोधण्याचा प्रयत्न तरी प्रामाणिकपणे केला रे ! (जन्म घेतला का दिला? हातपाय हालायचे थांबून आता, डोक्यात विचारांना सुद्धा हालायला जागा राहिली नाही. टोटल ज्याम!) आणि हे सर्व तुझ्यासाठीच रे आत्मन, तुझ्यासाठी ! ना त्या आईवडिलांसाठी, ना बायको-मुलांसाठी, ना सख्या-जिवलगांसाठी. सगळं काही स्वत:साठीच बरं. .( अ‍ॅडया, गैरसमज नको बरं, `आत्मन' म्हणजे संस्कृतमधे `ग्रोसर', ज्याच्याशिवाय `आत्मा चालत नाही' तो) आज या अंधाऱ्या बोगद्याच्या अंतर्गृहात जणू माझी प्रज्ञा शुद्ध व्हावी तसे सर्व काही स्वच्छ दिसते आहे मला ! आता या ज्ञानाच्या क्षणी मला निवळलेल्या मानससरोवराचा तळ अगदी स्पष्ट दिसतो आहे. (एमारायच्या पाईपात ही बिसलेरीची बाटली कुठून आली?) अन हेही समजतंय की ही अनुभूती या ज्ञानासाठीच ! तुझीच योजना ही ! तुझ्या-माझ्यातले अंतर शून्य करण्यासाठी ! जिवा-शिवाची भेट घडवण्यासाठी ! द्वैताला अद्वैत करण्यासाठी ! (आयचा घो, जीवाला शिवायचा अनुभव यावा म्हणून मला या पाईपात घातलं?) अन मग आता वेळ का लावतो आहेस जिवलगा ? (त्यापेक्षा साईडनं पाईप खोल!) पुरे झालं आता ! नको अंत पाहूस ! नको दुरून दुरून ते विलक्षण मोहक हास्य फेकूस ! भरून जाऊदे तुझ्या प्रकाशमय चैतन्याने माझा रिकामा गाभारा ! उजळून जाऊदे हे तमोमय कृष्णविवर तुझ्या दैदिप्यमान सान्निध्याने ! (लावा रे कुणी तरी लाईट लावा!) .....या अज्ञान-बोगद्याचा अंत करणारे हे पाउल, मी शिल्लक राहिलेले सर्व बळ एकवटून हे पहा उचलले ! (मायला, आणि पुन्हा नवा बोगदा लागला!) ______________________________ (मूळ बोगदा इथूनच साभार!)

वाचन 23729 प्रतिक्रिया 0