पळसाला पाने तीन...
आमचे काही मित्र आमचे म्हणणे ऐकून घ्यायचे नाहीत. आम्ही समजावून सांगण्याचा खुप प्रयत्न केला पण पालथ्या घड्यावर पाणी. आमचे म्हणणे एवढेच होते की बाबांनो संधी मिळत असली की कुणी सोडत नाही. सत्ता माणसाला भ्रष्ट करतेच. कुणीही फायदा घेण्याचा प्रयत्न करतोच. फार थोडे असतात जे बरबटत नाहीत. आणि ही वृत्ती केवळ कुठल्या वंशाशी, देशाशी वा जातीशी संबंधित नाही. माणुस जिथे आहे तिथे ही वृती आहे. पण नाही. विचारवंती झूल अंगावर पांघरली की जे काही भारतीय असेल ते तुच्छ मानावेच लागते असा काही दंडक आहे की काय कळत नाही. पण आमचे काही मित्र विचारवंती झुली अंगावर पांघरत जे अकलेचे तारे तोडत आम्हाला आणि विशेषतः भारतीयांना दुषणे देतात त्यामुळे आम्ही मनातून अतिशय खंतावलो होतो. आणि खरोखर भ्रष्टाचार हा केवळ भारतीय उपखंडातील रोग असून जगात असल्या रोगाचा प्रादुर्भाव अजिबात नाही. जिथे कुठे ह्या रोगाची लागण आहे असा संशय होता तिथे विशेष कायदे, शिक्षण देऊन हा रोग मुळापासुन उखडून टाकलेला आहे हे आम्ही जवळपास मनाने मान्य केले होते. बुद्धी थोडी साशंक होती पण पंडीत लोकांनी जेव्हा ठासुन सांगितले असते तेव्हा ते मानायचेच असते ही परंपरा पाळणे गरजेचे होते ते आम्ही केले. असो. पण आमच्या ह्या मोहमयी निद्रेतुन आम्हाला खडबडून जागे करण्याचे कार्य एका बातमीने केले आणि आमच्या काही कल्पनांना धक्का बसला आहे. आता नक्की विश्वास कुणावर ठेवावा ही समस्या आमच्या पुढ्यात आली आहे. कुणाचे नक्की ऐकावे ? विचारवंतांचे की बातमीदाराचे की आपलीच आधीची भुमिका योग्य होती त्यानुसार वागावे ? काय नक्की करावे. असो.
बातमी फार मोठी नाही आणि विशेष लक्ष देण्याजोगती नाही असा निष्कर्ष विचारवंतांनी मांडावा असे मला मनापासून वाटते. कारण सरळ आहे माझा सर्व विचारवंतांवर त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर विश्वास आहे. श्रद्धाच आहे म्हणाना ! त्यांचा जरी श्रद्धेवर राग असला तरी माझा नाही. त्यामुळे मी विचारवंतांवर श्रद्धा ठेवतो ब्वा ! :)
बातमी : http://www.bbc.co.uk/news/world-europe-26014387
वाचन
14722
प्रतिक्रिया
0