निरो कपडे बदलतोय...
रोमच्या इतिहासात निरो या राजाबद्दल अनेक घटना प्रसिध्द आहेत. हा राजा प्रचंड बेफिकीरी आणि प्रजेविषयी कोणतीही आस्था नसलेला होता. आणि त्यामुळे संपूर्ण रोम जळत असताना निरो बासरी वाजविण्यात मग्न होता. आता हा विषय इतिहास जमा झाला तरीही वैभवशाली इतिहास असलेल्या भारतातही असा इतिहास घडविणारे महामानव अजूनही शाबूत आहेत.
याचा प्रत्यय संपूर्ण देशाला शनिवारच्या रात्री आला. राजधानी दिल्लीच्या गजबजलेल्या भागांमध्ये एकामागोमाग एक सलग 5 बॉम्बस्फोट झाले. आणि त्यामुळे संपूर्ण देश हादरला. दिल्लीच्या रुग्णालयांमध्ये जखमींची आणि त्यांच्या नातेवाईकांची प्रचंड गर्दी, स्फोटाच्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांचा टाहो, मदत आणि पुनवर्सनाच्या कामासाठी झटणारे दिल्लीकर आणि ठिकठिकाणी पोलिसांनी केलेली नाकेबंदी अशा सगळ्या घटना घडत होत्या. थोडक्यात काय तर दिल्ली दहशतवादाच्या आगीत होरपळत होती. आणि या पार्श्वभूमीवर आपल्या सार्वभौम प्रजासत्ताकाचे माननीय गृहमंत्री शिवराज पाटील काय करीत होते माहितेय...? हं तेच... एव्हाना कळल असलेचं तुम्हाला. ते कपडे बदलून-बदलून माध्यमांना प्रतिक्रिया देत होते.
अशा परिस्थितीत एका गृहमंत्र्याने परिस्थितीची माहिती घेणं, स्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी खंबीर पावलं उचलण्यासोबतच हल्ला करणा-यांच्या शोधार्थ यंत्रणा राबविणं आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात असा हल्ला करविणा-या देशाविरुध्द आवाज उठविणे. निदान एवढं तरी अपेक्षित होते. मात्र जनतेच्या या सर्व अपेक्षा अंतर्गत सुरक्षेची घटनात्मक जबाबदारी स्वीकारणा-या गृहमंत्र्यांनी फोल ठरविल्या आहेत.
'दिल्लीत झालेला स्फोट हा देशात अशांतता पसरवू पाहणा-यांचे कारस्थान आहे. आम्ही ते हाणून पाडू दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. अशा हल्ल्याची आम्ही घोर निंदा करतो. आणि मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करतो' हाच जुना पुराणा रेकॉर्ड त्यांनी त्यादिवशी पुन्हा वाजविला. गेल्या साडेचार वर्षांत देशात निदान डझनभर तरी हल्ले झाले. प्रत्येक वेळला पाटील यांची तीच साचेबध्द प्रतिक्रिया. मात्र आजपर्यंत एकही आरोपीला पकडण्यात सरकारला यश आलेले नाही. किंबहुना संसदेवर हल्ला करण्यात सहभागी असलेल्या अफजल गुरूच्या फाशीच्या शिक्षेवरही अद्यापही काहीही कार्यवाही झालेली नाही. हे गृहमंत्रालयाचे पर्यायाने सरकारचे अपयश नाही का?
त्यामुळेच शिवराज पाटील यांच्या कार्यपध्दतीविरुध्द आता त्यांच्याच सरकारमधील घटक पक्षांनीही तोंड उघडले आहे. अशा परिस्थिती त्यांनी नैतिकतेने राजीनामा देण्याची आवश्यकता आहे. यामुळे कॉंग्रेसचीही प्रतिष्ठा राखली गेली असती. मात्र शिवराजना सोनियांचे अभय मिळाल्याने तुर्तास तरी ते शक्य नाही. गृहमंत्र्यांची राजीनामा देण्याची गरज नाही असे सोनियाने जाहीर करताच आजवरचे अपयश जणू धुऊन निघाले अशा अविर्भावात गृहमंत्री आता टिका करणा-या माध्यमांवर तोंडसुख घेताहेत.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सारखा खंबीर गृहमंत्री पाहिलेल्या या देशाला आणखी काय काय पहावे लागणार आहे. देव जाणे.
वाचन
5987
प्रतिक्रिया
0