मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रश्न

तिमा · · काथ्याकूट
हे यक्षाचे प्रश्न नाहीत. एका सश्रद्ध आदरणीय व्यक्तीने एका विज्ञाननिष्ठाला म्हणजे (माझ्यासारख्या माणसाला) विचारलेले बेसिक प्रश्न आहेत. त्याला मी माझ्या बुद्धीला झेपेल अशी उत्तरे दिली आहेत. संभाषण वैयक्तिक निरोपातून असल्यामुळे आत्तापर्यंत अप्रकाशित आहे. त्यावर चर्चा व्हावी या हेतूने इथे देत आहे. १. मन खंबीर नसेल तर माणसाने अश्या प्रसंगी काय करावे? मन खंबीर नसेल तर माणसाने परमेश्वराचा जरुर आधार घ्यावा. २. विज्ञानाभिमुख होण्याने मन खंबीर होते काय? माझे तरी झाले आहे. ३. कर्मकांड करणार्‍या सर्व लोकांची मने खंबीर नसतात काय? असे मी म्हणणार नाही. ती व्यक्ती प्रत्यक्ष समोर असेल तर त्यावर भाष्य करता येईल. ४. विज्ञानाभिमुख असणार्‍या सर्व लोकांची मने खंबीर असतात काय? उत्तर प्रश्न नं. २ प्रमाणेच. ५. "हिंदूंनी मयतानंतर दिवस घालू नये" हे ज्या हिरीरीने मांडता तितक्याच हिरीरीने "मुसलमानांनी-ख्रिश्चनांनी मृतदेह पुरू नये, जाळून टाकावेत" असे आपण सांगता का? मी फक्त माझे मत नोंदवले. इतरांनी तसेच करावे असा माझा आग्रह नाही. ६. विज्ञानाभिमुख होणे म्हणजे सर्व मानवी भावनांना भडाग्नी ("मंत्राग्नी" शब्द टाळला आहे) देणे असा अर्थ आहे काय? अर्थातच नाही. मानवी मन हे भावनांपासून मुक्त होणारच नाही. पण त्यावर ताबा मिळवता येणे शक्य आहे. ७. धर्म आणि विज्ञान मानवी जीवनांत गुण्यागोविंदाने नांदू शकत नाहीत काय? नांदतील की. फक्त आपण जे आचरण करतो ते आपल्या बुद्धीला पटते का हा प्रश्न ज्याचा त्याने स्वतःला विचारावा. ८. ज्या ठिकाणी श्रद्धेचा प्रश्न येतो तेथे प्रत्येकाला आपापला मार्ग चोखंदळण्याची मुभा आहे असे आपणांस वाटते का? नक्कीच, समाजसुधारणा जबरदस्तीने कधीच होणार नाही. ९. इतर लोकांची मानसिक अथवा शारीरिक हिंसा न करता जो-तो आपली श्रद्धा-अश्रद्धा बाळगण्यास स्वतंत्र आहे असे आपणांस वाटते का? होय. १०. जसे आस्तिकांनी आपल्यावर आस्तिकपणाची सक्ती करू नये असे नास्तिकांना वाटते. तसेच नास्तिकांनी आपल्यावर नास्तिकपणाची सक्ती करू नये यात आस्तिकांचे काय चुकले बरे? अशी सक्ती मी माझ्या घरच्यांवरही करत नाही. ११. असेच शाकाहारी विरुद्ध मांसाहारी वादाबद्दलही म्हणता येईल असे वाटते का? हो, नक्कीच. १२. मग असेच विज्ञानाभिमुख विरुद्ध कर्मकांड करणारे याबद्दलही म्हणता येईल असे वाटते का? हो येईल ना, पण विज्ञानवाद्यांना फक्त मत मांडण्याचा अधिकार असावा. मत दिले म्हणजे सक्ती केली असे नाही.

वाचन 3434 प्रतिक्रिया 0