हिंसा आणि अहिंसा...
मोहनदास करमचंद गांधी यांच्यासंदर्भात दोन-तीन धागे गेल्या काही दिवसांत मिपावर चर्चेत आले आहेत. काही गोष्टी ठळकपणे लक्षात आल्या. धाग्यांवरील चर्चेत काही जण गांधी यांच्या अहिंसावादाचे समर्थक आहेत. बाकी काही जण त्याचे विरोधक आहेत. ते असो. जे अहिंसेचे विरोधक आहेत, त्यांच्या मांडणीतून काही गोष्टी मला जाणवल्या (हे माझे आकलन, समज वगैरे आहे):
१. गांधींनी मांडलेली अहिंसा ही एक प्रकारे कमजोरीच असते, तो भ्याडपणा असतो.
२. गांधींची हत्या समर्थनीय ठरू शकते, कारण नथुराम गोडसे यांची (यांची, याची नव्हे) तशी राष्ट्रविषयक, मातृभूमीविषयक धारणा होती.
३. हिंसेला उत्तर अहिंसा हे असू शकत नाही, तिथे हिंसा करावीच लागते.
गांधींच्या अहिंसेविषयीचे ज्याचे-त्याचे आकलन, समज वगैरे काहीही असो. माझ्या आकलनात आणि समजेनुसार काही प्रश्न निर्माण झालेच.
भारतात एक राजकीय पक्ष आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) असे त्याचे नाव आहे. या पक्षावर बंदी आहे. पण त्या पक्षाचे 'कार्य' सुरू असते. या पक्षाने हिंसेचे तत्वज्ञान केले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार राज्यसंस्था हिंसा करतेच, 'आहे रे' वर्ग हिंसा करत असतोच. त्याला प्रत्युत्तर हिंसेचेच असू शकते, म्हणून आमच्या (तथाकथित) हिंसेकडे त्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे.
आता मला असे दिसते आहे की, गांधींचा मारेकरी आणि त्याच्या बाजूने होत असलेले तत्वज्ञान हे 'हिंसा हा सामाजिक परिवर्तनाचा (यात सारे काही आले) एक मार्ग (किंवा साधन म्हणा) आहे' अशाच स्वरूपाचा आहे. माझ्यासमोरचे प्रश्न आहेत:
नथुरामवादी व माओवादी या दोघांना एक मानायचे का?
नथुरामवादी व माओवादी समधर्मी नसतील तर त्यांच्यातील फरक कशाच्या आधारे करावयाचा?
मला फक्त या साम्यस्थळांचा किंवा त्यांच्यातील भेदाचा विचारविमर्ष अपेक्षीत आहे आणि तो करताना हिंसा हा मुद्दा यावा.
वाचन
19908
प्रतिक्रिया
0