मी बिभीषण एकटा
लेखनविषय:
काव्यरस
बेमुवर्त पणे येथे, मद्याचे प्याले वागती
यांना न कसली नीती, यांना न कसली भिती
तो जो ऊभा राहिला, अन्याय बोलण्या काही
तो ही म्हणे आताशा, मद्यात धुंद राही
कोणीच आज येथे, शिरसावंद्य नाही
हात जोडूनी तिष्ठलो, देव राऊळी नाही
होती काल परवा, हिरवी डौल शेते
केव्हा लिलावले त्यांना, आम्हा कळलेच नाही
पाऊस अजुनही पडतो, न पडतो ऐसे नाही
झाडांचे वॄक्ष व्हाया, आकाश मात्र नाही
तो तुका थोर, त्याने अभंगही तरवले
आम्ही करंटे आम्हाला,आमुचाच तोल नाही
वाटे जरी निराशा, माझ्या स्वरांतुनी तुम्हाला
मी बिभीषण एकटा, धनुष्य पेलवत नाही
झटलो बांधावया सेतू,तरले दगड नाही
लिहिणा-याच्या अहो आज, हातात राम नाही...
वाचन
3155
प्रतिक्रिया
0