वादग्रस्त, चाकोरीबाहेरची, धक्कादायक पुस्तकं
काही पुस्तकं अतिशय वेगळ्या विषयांवर असतात. काही नेहमीच्याच विषयावर अगदी वेगळा दृष्टिकोन मांडतात. काहींची भाषा नि शैली धक्कादायक असते. काही उग्गीच धक्कादायक असतात.
असली पुस्तकं सहसा डोक्यातून पुसली जात नाहीत मात्र. परत परत निरनिराळ्या कारणांनी डोक्यात डोकावत राहतात. असल्या पुस्तकांबद्दल जरूर सांगा. फक्त नाव सांगून थांबू नका मात्र. लेखक, प्रकाशन सांगाच. पण पुस्तक वेगळं का वाटलं, याबद्दलही जरूर लिहा.
सुरुवात करते -
टोकदार सावलीचे वर्तमान
रंगनाथ पठारे
प्रकाशन नाही आठवत.
लग्नाआधी 'प्रकरण' करून पळून जाणार्या, 'शेण खाणार्या' मुली म्हणजे बापाला विवंचना आणि मानहानी हा सर्वमान्य समज. पण या गोष्टीतला बाप मात्र वेगळा आहे. त्याची पहिली मुलगी पळून जाते, तेव्हा तो त्रागा करतो, खंतावतो, नशिबाला आणि मुलीला दोष देतो. पण हळूहळू त्याला प्रश्न पडायला लागतात. लग्न म्हणजे नेमकं काय? समाजमान्य समागमाची संधी. निसर्ग तर शरीराला हाक देणारच. कुणाला आधी, कुणाला नंतर. अशा वेळी नाही मिळाला जोडीदार, तर काय करावं कुणी? आपल्या शरीराची हाक ऐकून मुलीनं जोडीदार मिळवला, तर तिचं काय चुकलं? ती तिच्या निर्णयाची जबाबदारी घ्यायला तयार असेल, तर आपण तिला मदत करणं आपलं कर्तव्य नाही का? असे निर्णय घेण्याची पाळी तिच्यावर येऊ नये, म्हणून तिच्या मनात बापाविषयी विश्वास निर्माण करायला नको का... अशा विचारांपर्यंत तो पोचतो. त्याच्या या स्थित्यंतराची ही गोष्ट आहे. पार वेगळी...
वाचन
35799
प्रतिक्रिया
0