मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गुवाहाटी आणि बागपत

पुण्याचे वटवाघूळ · · काथ्याकूट
गेल्या काही दिवसात आपल्याच देशात अशा काही घटना घडल्या आहेत ज्यामुळे कोणाही सुसंस्कृत भारतीयाची मान शरमेने खाली जाईल आणि संतापाचे अंगार दाटून येतील.आणि दुर्दैवाने आपण त्याविषयी काहीही करू शकत नाही म्हणून हळहळ व्यक्त करण्याशिवाय फारसे काही करू शकणार नाही. घटना १: स्थळ: गुवाहाटी. एक १५-१६ वर्षांची मुलगी तिच्या मैत्रिणीचा वाढदिवस एका पबमध्ये साजरा करून बाहेर पडत असताना तिची काही माणसांबरोबर वादावादी झाली.त्यानंतर १५-२० जणांनी त्या मुलीचे केस ओढून तिला रस्त्यावर पाडले.त्या मुलीचे कपडे फाडायचा प्रयत्न करण्य़ापर्यंत या हैवानांची मजल गेली.आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे हा सगळा प्रकार रेकॉर्ड होत होता आणि तो व्हिडिओ इंटरनेटवर आला आहे.त्या २० जणांची छायाचित्रे (त्या व्हिडिओतून घेतलेली) फेसबुक आणि इतर अनेक ठिकाणी आली आहेत.त्यांच्या चेहऱ्यांवर आपण करत आहोत ते कृत्य चुकीचे आहे असा पुसटसाही भाव नाही.यातील ३ जणांना पोलिसांनी पकडले आहे पण उरलेले अजूनही सापडलेले नाहीत. जर का रस्त्यावरून जाणाऱ्या मुलीला अशा पध्दतीने वागविले जात असेल, तिचे कपडे फाडायचा प्रयत्न होत असेल तर आपण आपल्याला सुसंस्कृत का म्हणवावे? काही वर्षांपूर्वी मुंबईत सुनील मोरे नामक पोलिस हवालदाराने मरीन लाइन्समधील पोलिस चौकीत एका १५-१६ वर्षीय मुलीवर बलात्कार केला होता.त्याच्या पुढच्या वर्षी ३१ डिसेंबरला रात्री गेटवे ऑफ इंडियावर नववर्षाचे स्वागत करत असलेल्या जमावाने दोन मुलींचे कपडे फाडले होते आणि ते कृत्य करणाऱ्यांचे हिंदुस्थान टाइम्समध्ये फोटोही आले होते.नशीबाने या मुलींना त्यांच्याबरोबर असलेल्या तरूणांनी त्यांना वेळीच गाडीतून त्यांच्या घरी नेऊन सोडले.समजा त्यांच्याबरोबर असे कोणी नसते तर त्यांची काय अवस्था झाली असती? अशा घटना घडल्यानंतर नेहमीप्रमाणे स्वयंघोषित नैतिक पोलिसांचे ’मॉरल पोलिसिंग’ चालू झाले. (अजून गुवाहाटीच्या प्रकरणात ते कसे चालू झाले नाही याचेच आश्चर्य वाटते).दरवेळी मुलींनी तोकडे कपडे घातल्यामुळे/दारू प्यायल्यामुळे या प्रसंगांना सामोरे जायची वेळ त्यांच्यावर येते अशाप्रकारचे ठेवणीतले डायलॉग झोडले जातात. इतरांनी काय करावे (तोकडे कपडे घालावे की घालू नये, दारू प्यावी की पिऊ नये) हे सांगायचा अधिकार अशा मॉरल पोलिसांना कोणी दिला?दुसरे म्हणजे मुलींनी तोकडे कपडे घातले हे त्यांच्या अंगाला हात लावायचे समर्थन कसे होऊ शकते?तिसरे म्हणजे तोकडे कपडे म्हणजे नक्की काय?अशा बुरसटलेल्या लोकांना नऊवारी साडीसोडून इतर सर्व काही तोकडेच वाटेल.गेट वे ऑफ इंडियाप्रकरणी हिंदुस्तान टाइम्स मध्ये आलेले फोटो मी पण बघितले होते.गुडघ्याइतक्या लांबीचा स्कर्ट आणि खांदे झाकणारा टॉप असा पेहराव त्या मुलींनी केला होता.याला तोकडे कपडे का म्हणावे?कामानिमित्त मी युरोप आणि ऑस्ट्रेलियात अनेकदा गेलो आहे.तिथे त्यापेक्षाही कितीतरी तोकडे कपडे घातलेल्या मुली असतात.तरीही भर रस्त्यावर त्यांच्या अंगाला हात लावून घाणेरडी कृत्ये होत नाहीत. दृश्य क्रमांक २: राजधानी दिल्लीपासून ५०-६० किलोमीटर अंतरावरील बागपतजवळच्या एका गावातील खाप पंचायतीने ४० पेक्षा कमी वयाच्या स्त्रियांना बाजारात खरेदीसाठी जाऊ नये, मोबाइल फोन वापरू नयेत अशा स्वरूपाची बंधने घातली आहेत आणि प्रेमविवाहाला बंदी घातली आहे.आणि धक्कादायक बातमी म्हणजे उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी ’प्रत्येकाला आपले विचार मांडायचे स्वातंत्र्य आहे’ असे म्हणत एका पध्दतीने या खाप पंचायतीचे समर्थन केले आहे. अफगाणिस्तानमधील तालिबानला का नावे ठेवा?असे तालिबान आपल्या देशातच आहेत आणि तेही राजधानीपासून इतक्या जवळ बिनदिक्कतपणे आपले बुरसटलेले विचार मांडतात आणि इतकेच नव्हे तर त्याची सक्ती करतात.मागे हरियाणातील जिंद जिल्ह्यात जातीबाहेर प्रेम केल्याच्या ’गुन्ह्याबद्दल’ एका युगुलाला ठार मारले होते आणि ते कृत्य केल्याचा कसलाही पश्चात्ताप त्या लोकांना नव्हता याची आठवण आली.त्यांच्या जीवनपध्दतीत प्रेमविवाहाला स्थान नाही असे समर्थन या खाप पंचायतीच्या लोकांनी केले होते.त्यांच्या जीवनपध्दतीत प्रेमविवाहाला स्थान नसले तर त्यांनी स्वत: प्रेमविवाह करू नयेत.पण ज्यांच्या जीवनपध्दतीत प्रेमविवाहाला स्थान आहे अशांचा हक्क हिरावून घ्यायचा अधिकार त्यांना कोणी दिला?आणि त्याउपर त्यांना ’आमच्या जीवनपध्दतीच्या’ नावावर ठार मारायचा अधिकार त्यांना कोणी दिला? अशा घटना वाचल्या की खूप व्यथित व्हायला होते.एक समाज म्हणून आपल्याला सुसंस्कृत म्हणवून घ्यायचा अधिकारच नाही असे वाटते.या सगळ्याला जबाबदार कोण आहे?प्रत्येकाला आपले आयुष्य आपल्या मर्जीने जगायचा अधिकार आहे आणि आपल्याला ते मान्य नाही म्हणून (किंवा अन्य कोणत्याही कारणाने) अशी कृत्ये करायचा कोणालाच अधिकार नाही हे आपला समाज कधी शिकणार?आणि अशा बातम्या वाचून दु:ख व्यक्त करण्याशिवाय आपण काय करू शकतो?मला पाच वर्षांचा एक मुलगा आणि दोन वर्षांची मुलगी आहे.या सगळ्या गोष्टी समजण्याइतकी ही मुलं मोठी नाहीत.पण ती जशीजशी मोठी होतील त्याप्रमाणे मला त्यांना या सगळ्या गोष्टी समजावून सांगायच्या आहेत म्हणजे मोठे झाल्यावर माझी मुले अशा कृत्यांपासून दूर राहतील आणि तोपर्यंत अशा प्रकारांविरूध्द काही चळवळ उभी राहिली असेल तर त्यात पुढाकार घेतील.याव्यतिरिक्त आपण काही करू शकतो का?तुमची काय मते आहेत? (रात्रीच्या वेळी झाडावर उलटे लटकणारे) पुण्याचे वटवाघूळ मी "ऐसी अक्षरे" संकेतस्थळावर "पिसाळलेला हत्ती" नावाने वावरतो मी "उपक्रम" संकेतस्थळावर "आयाळ वाढलेला सिंह" नावाने वावरतो मी "मायबोली" संकेतस्थळावर "जिभल्या चाटणारा बोका" नावाने वावरतो

वाचन 45408 प्रतिक्रिया 0