मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एटीएम कार्डाचा अनुभव

आनंद घारे · · काथ्याकूट
क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वगैरेंमुळे आपले जीवन किती सोपे आणि सुखकारक झाले आहे असे मला वाटत होते. पण काल मला एक धक्कादायक अनुभव आला. पुणे येथील वारजे भागातील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रात मी पैसे काढायला गेलो. तिथल्या यंत्राने माझे कार्ड गिळून टाकले आणि वर पुन्हा "प्लीज इन्सर्ट युवर कार्ड" अशी विनंती केली. माझे कार्ड तर आधीच 'इन्सर्ट' केलेले होते. दरवाजाजवळ बसलेल्या रक्षकाला मी ही गोष्ट सांगितल्यावर त्याने दोन तीन बटने दाबून प्रयत्न केला आणि तो असफल झाल्यानंतर जवळच असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जायला सांगितले. दोन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या त्या शाखेत गेलो. तिथे उपस्थित असलेल्या अधिकारी महिलेने फोनवर कोणाशी बोलून चौकशी केली आणि मला माझ्या बँकेत (पंजाब नॅशनल बँकेत) जाऊन नवे कार्ड मिळवण्याबाबत कारवाई करायला सांगितले. वारंवार विनंती करूनसुध्दा बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनमध्ये अडकलेले माझे कार्ड परत मिळवण्याबद्दल ती काही सांगू शकली नाही. ते जवळ जवळ अशक्य आहे असेच तिच्या बोलण्यावरून जाणवले. ते एटीएम मशीन त्या शाखेच्या अखत्यारीत येत नाही, हे काम औटसोर्स केलेले असते असे त्या बाईंनी सांगितले. रिक्शा करून मी कोथरूड येथील पीएनबीच्या शाखेत गेलो. तेथील अधिकार्‍याने एक टोलफ्री नंबर दिला आणि तिथे फोन करून माझे कार्ड कँसल करायची कारवाई करावी आणि मुंबईला जाऊन माझ्या खात्यातून नवे कार्ड मिळवावे असे सांगितले. म्हणजे तेवढ्यासाठी मला लगेच मुंबईला जायला हवे. तो टोलफ्री नंबर मिळता मिळत नव्हता. दोन तास सतत प्रयत्न केल्यानंतर एकदाचा लागला आणि माझे पूर्वीचे कार्ड रद्द करण्याची कारवाई तीन तासात होईल असे आश्वासन मिळाले, पण ते केल्याची सूचना काही पुढील वीस तासात आलेली नाही. या सगळ्या प्रकारात माझी काहीच चूक नसतांना मला जो त्रास भोगावा लागत आहे याबद्दल मी कोणाकडे तक्रार करावी याबद्दल कोणी मार्गदर्शन करू शकेल कां?

वाचन 5941 प्रतिक्रिया 0