का...का...का....काकस्पर्श!
लेखनप्रकार
'एक विलक्षण प्रेमकहाणी' म्हणून बराच गाजावाजा झालेला, जाहिरातींतून उत्सुकता चाळवणारा 'महेश वामन मांजरेकर' दिग्दर्शित 'काकस्पर्श' काल पाहिला. ( हे 'महेश वामन मांजरेकर' म्हणजे 'वास्तव'वादी महेश मांजरेकरच का? बहुदा असावेत.) अडीच-तीन तास कुठेतरी काढायचे होते, बाहेर मनस्वी उकडत होते. चित्रपटगृह चांगले, वातानुकूलित होते. या सबबी वाचकांसाठी नसून मी माझ्या 'मना सज्जना' ला सांगितलेल्या आहेत. मन हे ( 'काकस्पर्श' सारखे ) विलक्षण असते. ते हा चित्रपट बघून झाल्यावर पुन्हापुन्हा म्हणत होते, नुसताच मॉलमध्ये फिरला असतास, 'तेज' बघीतला असतास, 'विकी डोनर' बघीतला असतास...
स्वातंत्र्यपूर्व काळातले कोकणातले एक खेडे. त्यातील ब्राह्मणाचे एक कुटुंब. हरी हा कुटुंबप्रमुख. कणखर, तत्वनिष्ठ वगैरे. आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्या समर्थ,बळकट वगैरे खांद्यांवर पेलणारा. कुटुंब म्हणजे बायको, पोरे, लहान भाऊ आणि एक सोवळी आत्या. या काळातले चित्रपट, मालिका यांमध्ये केशवपन केलेली. लाल अलवणातली, भेसूर दिसणारी एखादी जुनी आत्या, मावशी वगैरे नसेल तर त्यांना सेन्सॉरचे सर्टिफिकेट मिळत नसावे. स्वातंत्र्यपूर्व काळ, पण एकंदरीत या चित्रपटात काळाची, पात्रांच्या भाषेची, वेशभूषेची रचना करताना धारपांच्या कथेत पडतो तसा मितींना एक पिळा पडला आहे. या पात्रांची भाषा कधी सानुनासिक, पुस्तकी, ब्राह्मणी होते तर कधीकधी ती पात्रे - म्हणजे अगदी आपला हरीसुद्धा - बोलताबोलता 'अच्छा..' असा शब्द वापरुन जातो. हरीचा मुलगा पुढे पॅन्ट-शर्ट असा पोषाखात वावरतो, पण डोक्याला घेरा आणि शेंडी आहेच. असो, तर हा हरी आपल्या धाकट्या भावाचे दुर्गीशी लग्न ठरवतो आणि फलशोभनाच्या (हा शब्द या चित्रपटातली सर्व पात्रे 'फलशोधन' असा उच्चारतात. हरेच्छा!) रात्रीच तो भाऊ मरण पावतो. मग पुढचे काही लिहायलाच नको. ढसढसा रडणार्या कुटुंबियांमध्ये शून्य चेहर्याने बसलेली त्याची पोरगेलेशी बायको, तिला सोवळी करा असा अट्टाहास धरणारी ती आत्या (आणि गावातले कर्मठ ब्राह्मण), तिच्या लांबसडक केसांवर वस्तरा चालवण्याच्या एक सेकंदभर तेथे आलेला हरी, त्याने मग तो वस्तरा त्या नाव्याच्या हातून हिसकावून फेकून देणे (त्या न्हाव्याचे नावही... बरोबर ओळखलेत! शांतू!), गावाने हरीवर बहिष्कार घालणे, हरीने एखाद्या कातळासारखे सगळ्या आपत्तींना तोंड देत आपल्या धाकट्या भावजयीला या जालिम जमान्यापासून वाचवण्यासाठी उभे रहाणे, पुढे हरीची बायको गंभीर आजारी होणे, मग.. वगैरे वगैरे वगैरे...
तर अशी ही 'काकस्पर्श' ची शोकांतिका. चित्रपटाच्या नावापासूनच तो खास ब्राह्मण प्रेक्षकांना आकर्षित करुन घेण्यासाठी बनवलेला आहे हे स्पष्ट होते. एक निर्माता म्हणून अगदी फक्त व्यावसायिक दृष्टीकोनातून बघीतले तरी हे धाडसाचेच काम आहे. निर्माता-दिग्दर्शकाचे या चित्रपटात धाडस म्हणून काही असेल तर ते हे एवढेच. बाकी पन्नास -साठ-सत्तर वर्षांपूर्वीची कोकणी पार्श्वभूमीवरची कोणतीही एक कादंबरी घ्या, कोणीही एक शांतारामी ढोबळ सांकेतिकी दिग्दर्शक घ्या, थोडे फडकाळलेले-खांडेकरी संवाद लिहा. पाचदहा बाराबंद्या, साताठ धोतरे, नऊवारी लुगडी, पगड्या आणि नथी घ्या, उमेदवारी करणारे काही कलाकार घ्या आणि सुरु करा शूटिंग! झाला 'काकस्पर्श'! हाय काय आन नाय काय...
असल्या दाणादाण पडापडीत सचिन खेडेकर आणि केतकी माटेगावकर हे (आपले मराठी वगैरे..) कलाकार ध्यानात राहतात. सचिन खेडेकरचे काम सरासरीत चांगलेच असते. 'काकस्पर्श' मध्ये त्याने आपले टपोरे, भावपूर्ण डोळे, आपला आवाज आणि आपली शरीरयष्टी यांचा उत्तम वापर करुन घेतलेला आहे. केतकी माटेगावकरचा 'स्क्रीन प्रेझेन्स' ताजा, गोड आहे. 'शाळा' मध्ये ही ती इतक्याच प्रसन्नपणे वावरली होती. बाकी कलाकार या चित्रपटात आहेत इतकेच. पण ते तरी काय करणार बिचारे!
आपल्या भावाचे पिंडदान करणारा हरी या दृष्यापासून 'काकस्पर्श' हा चित्रपट सुरु होतो. पुढे याच दृष्यात कावळे पिंडाला शिवत नाहीत तेंव्हा कावळ्यांना बोलावण्यासाठी हरी मोठमोठ्याने 'का...का...का..' अशा हाका मारतो. साक्षात विधात्याला विचारलेला हा प्रश्नच जणू! चित्रपट संपला आणि मी बाहेर आलो. विलक्षण भूक लागली होती. पोटात कावळे ओरडत होते असे म्हटले तरी चालेल. डोक्यात बाकी तोच प्रश्न होता. का? का? का?
वाचन
36613
प्रतिक्रिया
0