अहिंसात्मक प्रतिकाराचा इतिहास (भाग१: इ.सन २५-२६ ते १९००)
लेखनप्रकार
भारताला आणि भारतीयांना अहिंसात्मक प्रतिकाराची ओळख असली तरी त्याचा राजकीय वापर श्री. मोहनदास करमचंद गांधी यांनी ब्रिटिश सरकार विरुद्ध प्रभावीपणे केला आणि त्याची दखल अख्ख्या जगाने घेतली. पण म्हणजे गांधीजींचा प्रयोग जगात अहिंसात्मक प्रतिकाराचा पहिलाच प्रयत्न होता का? का याआधीही असे लढे लढले गेले होते? त्यात कितपत यश आले होते? वगैरे अनेक प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे आपण या ३ लेखांच्या लेखमालेतून शोधायचा प्रयत्न आपण करणार आहोत. मला मिळालेली माहिती इथे लेखाच्या रूपात मांडत आहे. त्यात मिपाकर अधिकची भर घालतीलच अशी खात्री आहे.
अहिंसेवर आधारित राज्य असा इतिहास बघायला लागलो तर पहिला संदर्भ इसवीसन पूर्व ४७० ते ३९१ मधील चायनामधील 'मोहिझम' या तत्त्वाने राजवट करणाऱ्या 'मोहिस्ट' लोकांना जातो. या मंडळींचा 'युद्ध' या संकल्पनेला विरोध होता. मात्र तो काळ युद्धाचा असल्याने त्यांनी किल्ले मात्र बांधलेले होते. थोडक्यात ही पद्धत 'लढा' या पद्धतीतली नसून "बचाव" या पद्धतीचा अधिक होती असे दिसते. त्यामुळे त्याची अधिक माहिती या लेखात देणे योग्य वाटत नाही.
या इतिहासात पहिल्या ज्ञात अहिंसात्मक राजकीय 'विरोधाचा' मान बहुदा ज्यू मंडळींकडे जातो. 'पाँच्यस पायलट' च्या राजवटीत त्याने सिएस्रा येथे रोमन चिन्हे उभारायची ठरवली होती. त्यातील 'रोमच सम्राट' आणि ' गरूडाचे' चिन्ह ज्यू लोकांमध्ये निषिद्ध समजले जात होते. त्यांनी याचा प्रतिकार करायचा ठरवला. ते एका चौकात जमून निदर्शने करू लागले. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी स्वतः पाँच्यस पायलटला यावे लागले. मात्र हा लढा यशस्वी झाला नाही व हे निदर्शने करणाऱ्यांना मारण्यात आले होते. या अयशस्वी विरोधाचे वर्णन मात्र वेगळे-वेगळे केले जाते. काही लेखनात पाँच्यसने सैनिकांच्या गराड्यात या विरोध करणाऱ्यांची सभा घेतली व त्यांना मारण्यात येईल अशी धमकी दिली तेव्हा ज्यू लोकांनी 'लॉ ऑफ तोरा' न पाळण्यापेक्षा आम्ही मरणे पसंत करू असे सांगितले व मरण पत्करले असे वर्णन आहे तर काही लेखांत पाँच्यसने ज्यू गटांत आपले हेर पाठवले होते. व एकीकडे त्यांच्यापुढे भाषण करताना अचानक हेरांनी हल्ला चढवून ज्यूंना मारल्याचे सांगितले जाते.


वाचन
20549
प्रतिक्रिया
0