मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मोडीलिपीची ओळख

जिप्सी · · विशेष
विशेष
इंग्रजी भाषेला ज्याप्रमाणे जलद लिहिण्याची स्वतंत्र लिपी आहे, ज्याला आपण 'कर्सिव्ह' म्हणतो त्या प्रमाणेच मराठीलादेखील देवनागरीशिवाय मोडी ही एक स्वतंत्र लिपी आहे. मोडी लिपीला सुमारे ८०० वर्षांचा इतिहास आहे. यादवांचा प्रधान हेमाडपंत ह्याच्या काळात या लिपीचा उगम झाला असा एक सर्वसाधारण ठोकताळा आहे, पण मोडीलिपी त्याहीपेक्षा जुनी असण्याचा संभव नाकारता येत नाही. परंतु हेमाडपंतांच्या काळापासून म्हणजेच यादवांच्या राजवटीत मोडीलिपीचा वापर सरकारी दप्तरात होऊ लागला. हळूहळू सर्वसामान्यांच्या दैनंदिन वापरातसुध्दा मोडी आली.देवनागरी म्हणजेच बाळबोध पेक्षा मोडीत भराभर लिहीता येते. मोडीत अनेक शब्दांची लघुरुपे वाअप्रुन कमीतकमी ओळीत/वाक्यात सारांश लिहिला जातो. जसे देIIख = देशमुख, पII = परगणे / पाटील. अश्या अनेक शब्दांच्या लघुरुपांची जंत्री वानगीदाखल देता येईल. सुंदर मोडी लिहिणे जे जसे कौशल्याचे काम आहे, त्याचप्रमाणे अचूक मोडी वाचणे हे देखील कौशल्याचे आणि अभ्यासाचे काम आहे. मोडीतील दस्ताऐवज वाचताना वाक्यातील पुर्णविराम, स्वल्पविराम हे समजुन वाचावे लागतात, कारण मोडी लिहिताना विरामचिन्हे देण्याची पध्दतच नाही. त्यामुळे शब्द / वाक्य कुठे तोडायचे हे सरावाने आणि तत्कालीन भाषेच्या अभ्यासाने कळू लागते. नविनच मोडी वाचणार्‍यांच्या संदर्भात एक विनोद नेहमी सांगितला जातो. "रस्त्यातनाचतमासेचाललेहोते" हे वाक्य नवशिका हमखास "रस्त्यात नाचत मासे चालले होते" असे वाचतो. मुळात ह्या वाक्याचा अर्थ "रस्त्यात नाच, तमासे चालले होते" असा असतो. अर्थात सरावाने ह्या गोष्टी जमू लागतात. इतिहाससंशोधनासाठी मोडी वाचता येणे हे अगदी महत्वाचे आहे. स्वातंत्रपुर्व काळापर्यंत मोडी ही शालेय अभ्यासक्रमात होती, पण नंतर मात्र वगळण्यात आली. त्यामुळे आज उत्तम मोडी लिहू-वाचू शकणार्‍या लोकांची संख्या फारच कमी आहे. यादवकाळात चालू झालेली मोडी पेशवाईकाळात अत्यंत उत्कर्षावस्थेत होती. पेशवे दप्तरातील पत्रे, दस्तऐवज पाहिले असता त्या उत्कर्षाची कल्पना येते. सुबक अक्षर, दोन ओळीतील समान अंतर, अत्यंत शुध्दलेखन हे या लेखनाचे वैशिष्ट्य. शिवकाळ ते उत्तर पेशवाई ह्या काळातील मोडीवाचनातून मराठी भाषेतील स्थित्यंतरे, बदल लक्षात येतात. मराठी भाषेचा प्रवास अभ्यासता येतो. भाषेच्या स्थित्यंतराच्या अभ्यासाच्या दृष्टीने वानगीदाखल दोन पत्रांच तर्जुमा पाहू:
१.शिवाजी महाराजांनी त्यांच्या हवालदार व जुमलेदारांना लिहिलेल्या पत्रातील भाग - "रयतेस काडीचा अजार द्यावया गरज नाही, साहेबी खजानातून वाटणिया पदरी घातलिया आहेती............ ............... वरकड विकावया येईल ते रास घ्यावे, कोण्हावरी जुलुम अगर ज्याजती अगर कोणास कलागती करावयाची गरज नाही.... हा रोखा तपशिले ऐकणे आणिक हुश्शार राहणे. " २.उत्तर पेशवाई काळातील (दुसरा बाजीरावाचे काळात)पत्रः दुसरे बाजीरावाचे दौलतराव शिंदे (ग्वाल्हेर) यांना लिहिलेल्या पत्रातील भाग - "मौजे वडगाव पोI (पोI= प्रांत) खर्डे हा गाव राजेश्री रामराव जीवाजी चिटणीस यांजकडे आहे, तेथे तुम्ही रोख केला म्हणोन हुजुर विदीत जहाले, त्याजवरुन हे पत्र लिहिले असे तेथे रोखा केला असेल तो मना करुन दर येक मीसी गावास उपद्रव न लगे ते करणे. "
मोडी एकदा वाचायला येऊ लागली की आप्ल्यापुढें ५००-६०० वर्षांचा इतिहासच उघड होतो. मग त्याकाळचे समाजजीवन, रुढी, परंपरा इत्यादीचीही माहिती मिळते. सामाजिक स्थित्यंतरे अभ्यासता येतात. मग, कधी वळताय परत मोडीकडे?

वाचन 20810 प्रतिक्रिया 0