मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वारियाने कुंडल हाले

शरद · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
श्री.ज्ञानेश्वर,नामदेव व तुकाराम यांच्या पदांनंतर आपण आज श्री. एकनाथ महाराज यांचे एक पद घेऊन संतांच्या कविता या मालिकेचा निरोप घेऊ. एकनाथांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या लिखाणातील विविधता. गौळणी,भारुड आदी लोकवाङ्मय लिहावे तर एकनाथांनीच. इतर कवी या क्षेत्रांत त्यांच्या जवळपासही येऊ शकत नाहीत. त्यांची एक अतिशय लोकप्रिय गौळण म्हणजे : वारियाने कुंडल हाले डोळे मोडित राधा चाले ! फ़णस जंबीर कर्दळी दाटा हाती घेऊन नारंगी फ़ाटा ! हरि पाहून भुलली चित्ता राधा घुसळी डेरा रिता ! !धृ! राधा पाहून भुलले हरि बैल दुभवी नंदाघरी !!धृ! ऐसी आवडी मिनली दोघा एकरूप झाले अंगा ! मन मिनलेसे मना एका भुलला जनार्दना ! !धृ! जंबीर-- लिंबू, दुभविणे -- धार काढणे, मिनणे -- एकजीव होणे मधुरा भक्तीने जें रूप बंगाल-ओरिसामध्ये अंगिकारिले ते महाराष्ट्रीय संतांना बिलकूल पसंत नव्हते. त्यांनी विठ्ठलाला माऊली म्हणून स्विकारले. फ़ारच कमी पदे अशी आहेत कीं ज्याना आज आपण अश्लील म्हणू. गाथा सप्तशतीतील गाथांशी नाते सांगणार्‍या या पदात दोन प्रेमिकांचे वर्णन आहे.दोघांचेही चित्त सैरभैर झाले आहे. खास ग्रामिण बाजामध्यें, नायिका ताक घुसळतीय; फ़क्त डेरा रिकामा आहे एवढेच ध्यानांत नाही! गोपाळाचीही तीच गत.बिचारा दूध काढावयाला बसला आहे खरा पण गाई ऐवजी बैलापाशी ! प्रेमाची एवढी एकरूपता झाल्यावर असे होणारच. पण प्रेमिकांची अशी अवस्था झाली तरी रसिकाने त्यांतच वाहून जाऊ नये म्हणून एकनाथ लगेच आसूड उगारल्यासारखे सांगतात " एका भुलला जनार्दना". अरे, हे प्रेम माझे माझ्या गुरुवर आहे तसे आहे. खास ग्रामिण ढंग ही ह्या पदाची खासियत. राधा उघड उघड डोळॆ "मोडत" , नेत्र कटाक्ष टाकत नाही, चालली आहे, कानातले डूल वार्‍याने हलत आहेत असे म्हटले असले तरी आपण कल्पना करूं शकतो हा बहुदा ठुमकत चालण्याचा परिणाम असावा. दोघे एकमेकांना गल्लीमध्ये वा जास्त शक्यता म्हणजे गावाबाहेरच्या एखाद्या पायवाटेमध्ये भेटले असणार.दुसरी ओळ अशा झाडी जवळ असलेल्या वाटेचाच निर्देश करते, ( की ही संकेतमीलनाच्या वेळेचीच आठवण आहे ? नक्की कळत नाही,) पण त्याचा असर काय झाला त्याचे वर्णन मात्र दोघे आपापल्या घरी पोचल्यानंतरचे आहे. दोन ठिकाणी असूनही दोघेही एकजीव झालेले आहेत. शृंगाररसामध्ये डुंबलेल्या लावणीफ़डावर आणि भक्तीरसांत चिंब झालेल्या भजनी मंडळात एकाच वेळी गायले जाण्याचे भाग्य अशा एखाद्याच रचनेला लाभते. शरद

वाचन 13238 प्रतिक्रिया 0