तुमचा पगार किती आणि तुम्ही काम करता किती ?
लोकसभेच्या निवडणुकीत "आम आदमी के साथ, कॉंग्रेस का हाथ', अशा घोषणा देणार्या कॉग्रेसला आता महागाई वाढल्याचे कळाले असावे कारण आता खासदारांची पगारवाढ करण्यात आली आहे. फारच गरीबीचे आणि कष्टाचे जीवन हे खासदार मंडळी जगत असावेत. यातील बहुतेक खासदारांची संपत्ती काही कोटीच्याही पुढची आहे, तरी सुद्धा या लोकांना पगार कमी पडतो तर आम आदमीची काय अवस्था असेल ? अर्थात आम आदमीला विचारतोय कोण ज्याला त्याला स्वतःची पडलेली आहे, खासदारांना वाढीव पगार मिळण्यासाठी सर्व पक्ष कसे एकत्र आले याचे सुरेख आणि दुर्मिळ चित्र पहायला मिळाले,मग त्यात डावे असो वा उजवे पगार वाढ मिळतेय ना ? मग झाले तर्...देशाच्या आणि देशवासियांच्या समस्या सोडवण्यासाठी ही मंडळी अशी एकत्र कधी आली होती ते काही मला आठवत नाही, तुम्हाला आठवत असेल तर जरुर सांगा.
जनतेच्या सेवेसाठी नियुक्त केलेल्या लोकांना इतका पगार कशासाठी हवा ?असा प्रश्न कोणीही का विचारत नाही ? यातले किती जण सभागॄहात संपूर्ण हजेरी लावतात ? किती खासदारांनी आत्ता पर्यंत किती प्रश्न सभागॄहात विचारले आहेत ? किती खासदारांनी किती लोकांच्या / देशाच्या समस्या सोडवल्य आहेत? कुठल्याही क्षेत्रात कर्मचार्यांचा पगार त्यांची कार्यक्षमता वगरै बघुन वाढवला जातो म्हणे !!! मग यांच्या कार्मक्षमतेचे आकडे सरकारने लोकांपुढे जाहीर करावेत.इतका पगार मागण्यासाठी हे काम किती करतात ते कळायला नको ?
बरं पगार वाढ हवी आहे, ठीक आहे पण वाढ करुन किती दिले ३००% साला इथे दिवस रात्र काम करणार्या एखाद्या कंपनीच्या व्हीपीला देखील इतक्या टक्क्यांनी पगार वाढ मिळत असेल का याची शंका वाटते, तर सामान्य मध्यम वर्गीय नोकरदारांच्या पगार वाढी बद्धल काय विचार करावा ? इथे इंधनाचे दर वाढवतात्,स्वयंपाकाला लागणार्या गॅसचे भाव वाढवतात, मग हा कॉग्रसचा हात सामान्यांना नागवण्यासाठीच निर्माण झाला आहे का ? असा विचार तुमच्या मनात येतो काय ? हे कसले सरकार जे ३००% पगारवाढ करते ? कुठल्या तर्कावर ही पगार वाढ देण्यात आली आहे ?
इथे राष्ट्रकुल स्पर्धांमधे सरकारच्या अब्रुचे धिंडवडे निघत असताना आणि करोडोंच्या घोटाळ्यांची माहिती बाहेर येत असताना सरकार अशी भयानक पगारवाढ कशी काय करु शकते ?
तसेच खासदार पती पत्नी प्रथम श्रेणीने किंवा एक्झिक्युटिव्ह श्रेणीने आता देशभर प्रवास करू शकतील, शिवाय या खासदारांच्या पेन्शन लाभाची मर्यादाही दरमहा आठ हजारावरून २० हजारांपर्यंत वाढवली . पण आम आदमी प्रवास करताना अर्धमेला होत आहे त्याची कोणाला चिंता नाही.
आता १६ हजाराच्या पगाराहुन ( ज्यात महागाई भत्ता, प्रवास भत्ता मिळून हा आकडा 45 हजारांवर जातो. ) पगार ५० हजार केला आहे तरी हा गरिब बिचार्या आणि महागाईने गांजलेल्या खासदार मंडळींची भूक काही कमी होताना दिसत नाही,आणि त्यांनी आता हा पगार ८० हजार केला जावा अशी मागणी करण्यास सुरुवात केली आहे.इथे आपल्या हिंदुस्थानचे प्रंतप्रधान १५ ऑगस्टला लाल किल्यावरुन महागाई रोखण्यास सरकार अपयशी ठरले असले तरी प्रयत्न चालु आहेत असे म्हणतात मग इतकी पगार वाढ करण्यासाठी सरकारने पैसे आणले कुठुन? म्हणजे महागाईचा त्रास फक्त खासदारांनाच होतो असे सरकारला म्हणायचे आहे का ?
मी या ३००% केलेल्या पगार वाढीचा निषेध करतो...
देशात अनेक नथ्था जरी मेले तरी खासदार पगार वाढ करत राहतील हे मात्र निश्चित आहे... :(
वाचन
13918
प्रतिक्रिया
0