मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जेम्स लेनच्या निमित्ताने उघडी पडणारी मराठी वैचारिक दिवाळखोरी

चिंतातुर जंतू · · काथ्याकूट
नमस्कार मिपाकरहो, चिंतातुर जंतू यांचा हा उत्तम लेख त्यावर काही आक्षेपार्ह प्रतिसाद आल्याने आणि त्या प्रतिसादांचा त्रास मिसळपाव प्रशासनाला होऊ शकेल या शंकेतून काही काळ अप्रकाशित करण्यात आला होता. सध्या लेख प्रकाशित करून वाचनमात्र ठेवला आहे. लेखावरील आक्षेपार्ह प्रतिसाद एक एक करून अप्रकाशित केले जातील. तरीही असे प्रतिसाद राहील्यास सजग सदस्यांनी संपादकांना तसे कळवावे. धन्यवाद, संपादक मंडळ जेम्स लेनच्या शिवाजीविषयीच्या पुस्तकावरची बंदी सुप्रीम कोर्टानं उठवल्यामुळे पुन्हा एकदा मराठी माध्यमं आणि जालावर त्याविषयी गदारोळ उठला आहे. या गदारोळात काही मूलभूत गोष्टींकडे सातत्यानं दुर्लक्ष होताना दिसतं आहे. हे दुर्लक्ष केवळ या एका मुद्द्यापुरतं मर्यादित नाही तर ते एका वाईट आणि अक्षम्य परंपरेच्या पायवाटेला हमरस्ता बनवणाऱ्या प्रवाहाचा भाग आहे. म्हणून सुशिक्षित समाजानं तरी त्याची दखल घेतली पाहिजे असं वाटतं. त्यासाठी हा लेखप्रपंच. पुस्तकामागची ऐतिहासिक भूमिका: मुळात आपल्याकडे अनेकदा असं दिसतं की एखाद्या गोष्टीवर अगदी आग्रही मतं प्रदर्शित करणाऱ्या लोकांनाही काही मुलभूत गोष्टी माहीत नसतात. असंच काहीसं या पुस्तकाच्या बाबतीत झालेलं दिसतं. इतिहास संशोधन करताना अनेक दस्तऐवजांचा वापर केला जातो. पुरावा म्हणून आधार घेतला जातो. ज्याची सत्यासत्यता अस्पष्ट आहे किंवा जी असत्यच आहेत अशी साधनंही इतिहासाचा अभ्यास करताना वापरता येतात याची जाण आपल्याकडे फारशी दिसत नाही. मिथकं आणि लोककथा यांचा वापर इतिहासात अशाच प्रकारे केला जातो. त्याची एक पध्दत आहे. त्याचे काही उपयोग आहेत. उदा. रामाविषयी उत्तरेत निर्माण झालेल्या लोककथा आणि दक्षिणेत निर्माण झालेल्या लोककथा यांचा तौलनिक अभ्यास केला तर त्यांत रामाची प्रतिमा भिन्न दिसते. रामाच्या दक्षिण विजयाविषयी जित (म्हणजे हरलेल्या) दक्षिणी लोकांचा जो विचार दिसतो, तो रामाला देव न मानता मर्त्य आणि स्खलनशील दाखवतो. किंवा, शकुंतला-दुष्यंताच्या मूळ कथेतली शकुंतला स्वाभिमानी आहे पण कालिदासाच्या नाटकात ती दुष्यंतानं आपला स्वीकार करावा यासाठी खूप झटते कारण ती कालिदासाच्या काळातल्या पुरुषप्रधान संस्कृतीनुसार वागते. अशा प्रकारे कालसापेक्ष, समाजसापेक्ष विश्लेषण करण्यासाठी लोककथांचा वापर करणं ही इतिहास संशोधनातली एक रूढ पद्धत आहे. हीच पध्दत लेन शिवाजीच्या आजूबाजूला निर्माण झालेल्या मिथकांना लावतो. या पध्दतीत काहीही गैर नाही. लेनचे निष्कर्ष चूक किंवा बरोबर ठरवण्याचं काम इतिहास संशोधकांचं आहे आणि ते त्यांना करू दिलं पाहिजे. पण त्यासाठी मुळात पुस्तक उपलब्ध होणं गरजेचं आहे. पुस्तकातला वादग्रस्त भाग: 'शिवाजीचे खरे पिता शहाजी नसून दादोजी कोंडदेव होते, असं महाराष्ट्रात काही लोक खाजगीत (चेष्टेच्या सुरात) म्हणतात.' अशा प्रकारचं विधान लेन पुस्तकात करतो. आता दोन प्रश्न विचारावे लागतात: १. एखादी वदंता अस्तित्वात आहे असं म्हणणं हे पुस्तकात गैरलागू आहे का? तर अजिबात नाही. कारण पुस्तकाचं स्वरूपच शिवाजीविषयीची मिथकं, आख्यायिका, लोककथा यांचा धांडोळा घेऊन त्यातून काय बोध होतो, ते पाहणं हा आहे. त्यामुळे अशा वदंतेचा उल्लेख करणं या पुस्तकाच्या एकंदर स्वरूपाशी सुसंगत आहे. २. अशी वदंता खरंच अस्तित्वात आहे का? तर नक्कीच आहे. इतरांविषयी सांगू शकत नाही, पण पुण्यात ब्राह्मणी वातावरणात वाढलेल्या लोकांना कधीतरी असं काहीतरी कानावर येतं. उदा: दत्तो वामन पोतदार यांच्या हे (म्हणजे शिवाजीच्या पितृत्वाविषयीची कथित बाब) लक्षात आलं पण त्यांनी त्याची जाहीर वाच्यता कधी केली नाही असं माझ्या स्वत:च्या कानावर आलं होतं. त्याला आता कित्येक वर्षं लोटली. तेव्हा जेम्स लेनचं अस्तित्व आमच्या दखलपात्रही नव्हतं. त्यामुळे या वदंतेला जन्म देणारा मनुष्य लेन खचितच नाही. त्याला निव्वळ तिची वाच्यता करण्याबद्दल (आणि तेही शिवाजीविषयीच्या मिथकं/लोककथांच्या चर्चेच्या चौकटीत ती करण्याबद्दल) झोडपणं म्हणजे निरोप्याला जीवे मारण्यासारखं आहे. लोकक्षोभ: या पुस्तकात भावना भडकवणारं लिखाण आहे म्हणून त्यावर बंदी घालणं योग्य आहे असं एक मत दिसतं. वरचे मुद्दे वाचून हे मत पोकळ आहे असं समंजस लोकांना वाटेल अशी अशा आहे. तरीही जर भावना भडकवणाऱ्या लिखाणाचाच लेखाजोखा घ्यायचा झाला, तर सर्वप्रथम लेनला लक्ष्य बनवणार्‍या संभाजी ब्रिगेडची पत्रकं, पुस्तकं यांवर बंदी घालावी लागेल. कारण त्यांतलं लिखाण खूप भडक आणि प्रक्षोभक आहे. त्यात 'असं काही लोक म्हणतात' वगैरे संभ्रमाला जागा नाही. उलट अंतिम सत्य आम्हालाच कसं ठाऊक आहे असं अतिरंजित शैलीत ठणकावून सांगितलं गेलं आहे. त्या मानानं लेनचं लिखाण हे Oxford किंवा तत्सम शैक्षणिक (academic) प्रकाशनसंस्थेला पचेल असंच (म्हणजे काहींच्या भाषेत मुळमुळीत) आहे. त्याच्याशी तार्किक लढा देता येऊ शकेल कदाचित, पण त्याला रंजक वा सवंग म्हणणं कठीण आहे. आता पुस्तकाला बाजूला ठेवून पुस्तकासंदर्भातल्या घटनांचं ऐतिहासिक विश्लेषण करायला कुणी संशोधक बसला तर त्याला काय सापडू शकेल? (हे सर्व केवळ अंदाज आहेत; हेच अंतिम सत्य आहे असा लेखकाचा अजिबात दावा नाही. मात्र, विशिष्ट काळात समाजात घडणाऱ्या काही गोष्टींना एका सुसंगत धाग्यात बांधणं शक्य होतं आहे असं जाणवतं, एवढंच.) महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा समाज पुरेसा सत्ताधारी असूनही सर्वसामान्य मराठा मतदाराला त्याचा पुरेसा लाभ मिळत नसावा, कारण वरची समृद्धी तळागाळातल्या मराठा समाजापर्यंत पोहोचत नव्हती. नव्वदीच्या दशकात या काहीशा असंतुष्ट समाजाचा एक घटक काँग्रेसी पक्षांपासून दूर जाऊ लागला होता. १९९५ मध्ये भाजप-सेना युतीचा झेंडा विधान भवनावर फडकला. यामुळे काँग्रेसी मराठा नेते कदाचित असुरक्षित झाले असावेत. अशातच एक वेगळा राजकीय प्रवाह दिसू लागला: धर्म, प्रांत, भाषा यांविषयीच्या अस्मितांना खतपाणी घालून, सर्वसामान्यांच्या भावना भडकावून त्यांद्वारे मतं मिळवता येतात याचे पुरावे नव्वदच्या दशकात अधोरेखित झाले. अशा भावना भडकलेला मतदार काही काळापुरता आपलं विदारक आर्थिक वा सामाजिक वास्तव विसरून जाऊ शकतो, हेही लक्षात येऊ लागलं. काहीशा दुरावलेल्या मराठा मतदाराला अशीच काहीशी भूल घालून आपल्याकडे पुन्हा खेचून आणता येईल अशा आशेत मराठा नेतृत्व मराठा समाजाला भडकावता येईल अशा एखाद्या मुद्द्याच्या शोधात असावं. एका काळापर्यंत महाराष्ट्र सरकारचे व त्या अनुषंगानं पवार यांचे लेनसारख्यांशी - म्हणजे व्यक्तिश: लेनच असं नाही, पण महाराष्ट्राविषयी काम करणाऱ्या परकीय इतिहास संशोधकांशी - चांगले घनिष्ठ संबंध होते. उदा: "House and Home in Maharashtra, New Delhi, Oxford University Press, १९९८" हे पुस्तक पाहावे. त्यात परदेशात महाराष्ट्राविषयी घडलेल्या एका चर्चासत्रातले शोधनिबंध आहेत. चर्चासत्राची सुरुवात पवारांच्या बीजभाषणानं झाली होती. म्हणजे पवार त्या चर्चासत्रात भाग घेण्यासाठी परदेशात गेले असावेत. अशा चर्चासत्रांना, यात आणि इतरत्र प्रकाशित झालेल्या अनेक संशोधकांना पवारांनी सरकारतर्फे (मुख्यमंत्री म्हणून) मदत केली होती. महाराष्ट्रावर होणाऱ्या संशोधनाशी त्यामुळे ते परिचित असावेत. लेन हा त्यांपैकी एक होता. या पार्श्वभूमीवर भावना भडकावून राजकीय फायदा उठवता येईल असा मुद्दा म्हणून लेनचा कोलीत म्हणून वापर केला जाऊ शकतो, याची जाणीव मराठा नेतृत्वाला झाली असावी. त्यातच भांडारकर संस्था हे soft target होतं. कारण ज्याच्या भावना संस्थेवरच्या हल्ल्यानं दुखावतील आणि जो आपल्यापासून दुरावेल, असा मतदार अगदीच अल्पसंख्य होता - कारण मुळातच सुशिक्षित मतदारानं (म्हणजे आपण सर्व किंवा आपल्यापैकी बरेच जण) विचारवंतांना 'विचारजंत' म्हणून संबोधत सुशिक्षित, ज्ञानाधिष्ठित व्यवहाराला केराची टोपली दाखवली होती (हेच अजूनही चालू दिसतं). थोडक्यात, स्वत:ला सुशिक्षित, समंजस, प्रतिष्ठित म्हणवून घेणारे आपण जेव्हा विचारवंतांना अप्रतिष्ठा दाखवतो, जगभरात रूढ असणार्‍या विचारपद्धतींना आणि ज्ञानशाखांना आपल्या अज्ञानापोटी कस्पटासमान मानतो, तेव्हा अशा भावना भडकावून लोकांच्या अज्ञानाचा फायदा उठवून राजकारण करणाऱ्या आणि त्यावर आपली पोळी भाजून घेणाऱ्या नेत्यांच्या हातातली आपण बाहुली बनतो. यातून आपण एक समाज म्हणून आपली वैचारिक दिवाळखोरी जगजाहीर करतो. जेम्स लेनच्या पुस्तकावरची बंदी उठवली जाण्याच्या निमित्तानं आपलंच आपल्याला जे दर्शन घडतं आहे, ते याच्याशी सुसंगतच आहे.

वाचन 52570 प्रतिक्रिया 0